स्वावलंबन

Marathi Katha


कथेचे नाव - स्वावलंबन

विषय-स्त्री आणि परावलंबीत्व
राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा.

मी नेहमी त्या दोघांकडे बघून विचार करत होते. "अरे हा तर एवढा सुंदर दिसतो आणि ती अशी कशी काय?" ती नेहमी गावंढळच रहात होती. कधीही व्यवस्थित आवरलेली नसायची. राहणीमानदेखील अगदी साधे आणि दिसायला साधारण सावळी होती. सावळ्या मुलीला एवढा देखणा राजकुमार कसा काय मिळू शकेल?. दोघेजण कुठेतरी फिरायला गेले की सर्वजण एकटक त्यांच्याकडेच बघत होते. कित्येक लोकांना मी बोललेलं बघितलंय.

"अरे एवढ्या साधारण बाईला एवढा देखणा नवरा कसा काय पसंत करू शकतो?" सतत चर्चा असायची.

तेच हे दोघे कविता आणि दीपक. दीपक अगदी देखणा मुलगा होता. घरची परिस्थिती साधारण होती. आई, बाबा, दीपक आणि दीपकच्या तीन बहिणी असा दीपकचा परिवार होता. त्याच्या तिन्ही बहिणींची लग्न झाली होती. दीपक एका कंपनीमध्ये काम करत होता. कविता दिसायला देखील सुंदर नव्हती. ती नेहमी विचार करत होती की, \"माझा कलर असा मी दिसायला चांगली नाही माझ्याबरोबर कोण लग्न करून घेणार ?मला कोणी पसंत करू शकणार नाही?\" असे म्हणत ती सतत एकाच विचारात असायची. तिच्या माहेरचे खूप श्रीमंत होती. सगळ्या सुखसुविधा तिच्या पायाशी लोळण घेत होत्या, पण ती नेहमी गप्प गप्प राहत होती. कधी घरातल्यांशी जास्त बोलत नव्हती. जेवढे विचारेल तेवढेच बोलायचे; नाही तर एक शब्द देखील बोलायचं नाही.

दीपक आणि कविता हे दोघे त्यांच्या मैत्रिणीच्या लग्नाला आले होते आणि तेव्हापासून त्या दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली होती. प्रेम आंधळं असतं म्हणतात ना? अगदी तसंच. ते दोघे एकमेकांशिवाय राहत नव्हते. दोघांनी लग्न करायचे ठरवले होते. पण कविताच्या घरच्यांनी नकार दिला होता, कारण कविता आणि तिची बहीण दोघीच होत्या. तिच्या घरची परिस्थिती खूप श्रीमंती होती, म्हणून ते नकार देत होते. पण कविताला ते मान्य नव्हते. तिने घरात कोणालाही न सांगता घरातून पळून जायचे ठरविले होते. तिने घरातील थोडेफार पैसे, अंगठी चेन वगैरे घेतले, आपले कपडे घेऊन तिने बॅग तयार ठेवली आणि ती दीपकला फोन करून रात्री त्याच्यासोबत निघून गेली.

दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे आई उठून आवरली आणि कविताला उठवण्यासाठी हाक मारू लागली. तोपर्यँत कविताचा काहीही आवाज आला नाही मग आई घाबरून कविताला शोधू लागली. तोपर्यंत कविता कुठेही दिसत नव्हती. तिचा फोन लावला तर तिचा मोबाईलदेखील स्विच ऑफ लागत होता. आईने वडिलांना सांगितले.

"अहो आपली कविता कुठे दिसत नाहीये. ती आपल्याला सोडून बहुतेक पळून गेली असावी." आई म्हणाली.

"काय सांगतेस काय? आपली कविता असे करणारच नाही ती आपल्या शब्दाबाहेर नाही." बाबा म्हणाले

"अहो आपण पोलीस कम्प्लेंट करून आपल्या पोरीला शोधूया." आई म्हणाली.

"अगं असं काय बोलतेस? बघ असेल इथेच कुठेतरी." बाबा म्हणाले.

"नाही ओ. तिचे सामान देखील दिसत नाही आहे." आई म्हणाली.

"तोंड काळं केलं आपल्या पोरीने" बाबा रागाच्या भरात म्हणाले. "तोंड दाखवायला जागा ठेवली नाही पोरीने. आपल्या घराण्याची लाज घालवलीे."

आईच्या तोंडून तर एक शब्ददेखील फुटेना. आई रडतच म्हणू लागली, "आपण संस्कारात कुठे कमी पडलो?\"

तोपर्यंत दीपक आणि कविताने इकडे लग्नदेखील केले होते. जेव्हा आई-बाबांना कळाले तेव्हा बाबा तर "माझ्यासाठी माझी मुलगी मेली, मला तिचे तोंडदेखील बघायची इच्छा नाही आणि तिला या घरात घेतलं तर खबरदार." असे आईलादेखील बजावून सांगितले.

दीपक आणि कविताचे लग्न होऊन ते दोघे संसारदेखील करू लागले. दीपकच्या घरातल्यांनी कविताला सून म्हणून लगेच स्वीकारले. दोघेजण संसार करू लागले. पहिला नव्याचे नऊ दिवस अगदी आनंदाने सुखाने आणि उत्साहाने जात होते. कविताही सर्वांसोबत मिळून मिसळून वागत होती. घरची जबाबदारी अगदी योग्य पद्धतीने सांभाळत होती. पण जसे जुने होत गेले तसतसे कविताला आयुष्यात खूप काही वाईट गोष्टींना तोंड द्यावे लागत होते.

कविताच्या सासूला काम करणे देखील फारसे जमत नव्हते. त्यामुळे घरकामाचा सर्व लोड कवितावरच पडला होता. ती घरकामात पूर्णपणे गुंतून गेली होती आणि तिने आयुष्यात "परावलंबित्व " पत्करले होते. तिने कधी विचारही केला नव्हता की आपण स्वावलंबी बनावे कारण ती संसाराच्या रहाटगाडग्यात पूर्णपणे अडकली होती. पण कविताच्या आयुष्यात असा प्रसंग आला की, तिला तिचे "परावलंबित्व" सोडून "स्वावलंबी" बनावे लागले होते.

अचानक ऑफिसचा स्टाफ कमी करण्यात आला होता. त्यात दीपकची नोकरी गेली होती. घरामध्ये दुःखाचे वातावरण निर्माण झाले. \"पुढे घर खर्च कसा चालणार? महागाई इतकी प्रचंड प्रमाणात वाढली होती आणि अचानकच नोकरी गेली होती\" म्हणून दीपक विचार करत गप्प रहात होता. मग त्याने ही गोष्ट कविताच्या कानावर घातली. त्यामुळे घरामध्ये चिंताजनक वातावरण होते. पण कविता मात्र शिक्षित होती. तिचे शिक्षणदेखील झाले होते. फक्त तिने नोकरी करण्याचा विचार डोक्यात नसल्यामुळे ती नोकरी करत नव्हती. पण आता अचानकच दीपकची नोकरी गेल्यामुळे कविताने एक दोन कंपनीमध्ये इंटरव्ह्यू देण्याचे ठरविले होते. कविता इंटरव्ह्यू देऊन आली. दीपक पण दुसऱ्या कंपनीत नोकरीसाठी ट्राय करत होता. कविताला मेल आला की तुमचे सिलेक्शन झाले आहे म्हणून. तिला खूप आनंद झाला होता.

कविता नोकरी करू लागली आणि घरात सर्व गोष्टींना हातभार लावू लागली. सकाळी लवकर उठून घर काम करून मग ती ऑफिसला जात होती. घरातील सर्व कामे करून कविता नोकरीला जात होती. नवऱ्याची नोकरी गेल्यावर तिने खचून न जाता आपल्या घराला हातभार लावण्यासाठी परावलंबित्व नष्ट करून स्वावलंबनाचा स्वीकार केला. आणि आपले आयुष्य सुखाने आणि आनंदाने जगू लागली. मग हळूहळू दीपकला नोकरी लागली. त्याला नोकरी लागली म्हणून तिने आपली स्वावलंबि वृत्ती सोडली नाही. दीपकनेही तिला सोडू दिली नाही. म्हणून एकमेका सहाय्य करू अवघे जीवन जगू म्हणत दोघेही सुखाने संसार करू लागले.
समाप्त.
©® पूजा अक्षय चौगुले.
जिल्हा- कोल्हापूर.


धन्यवाद