Login

सुशिक्षित सासू -भाग 2

गोष्ट सासू -सुनेची
"अतुल, उद्या सकाळी पहिल्या गाडीने मी गावी जाईन म्हणते." भरलेल्या सामानाची पिशवी अलका बाईंनी एका कोपऱ्यात ठेवली. तसा अतुल काही न बोलता आत गेला.
"आई घर सोडून जायचं म्हणते. तू तिची माफी माग."

अतुलचं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं करत अनुष्का मोबाईल बघत राहिली.

"अनु, प्लीज. तिच्याजागी तुझी आई असती तर काय केलं असतंस?"

"त्यांच्या जागी माझी आई असती तर अशी वागलीच नसती आणि आई गावी तर जाणार आहेत. जात असतील तर जाऊ देत. मी कशाला अडवू?" अनुष्का बेफिकीरपणे बोलली.

'आपण जिच्याशी लग्न केलं, हीच का ती? लग्नाआधी अनुचा स्वभाव किती गोड होता! इतका उद्दामपणा, निष्काळजीपणा तिच्याच नव्हताच मुळी. माझ्यावर प्रेमही तितकंच होतं तिचं. आई -आबांशी ती नीट वागायची, बोलायची. जसं प्रमोशन मिळत गेलं तसं स्वर्ग दोन बोटं उरला तिच्यासाठी.' विचार करत अतुल पुन्हा बाहेर आला.

"आई, उद्या सकाळी लवकर सोडेन मी तुला. आता तू इथं येण्याची तसदी घेऊ नको. मीच तुम्हाला भेटायला गावी येत जाईन. गावी गेलीस की तुला इथल्या वातावरणाचा विसर पडेल. पुन्हा तुझा अपमान झाला तर मला सहन होणार नाही. मी बोललो तर गोष्टी टोकाला जातील आणि घरचं वातावरण बिघडून जाईल. तुला वाटत असेल ना, मी बायकोची बाजू घेतोय म्हणून? पण तसं अजिबात नाहीय. सगळ्यांची वेळ येते. तशी तुझीही येईल. अनुला तिच्या चुकीची जाणीवही होईल. मीही तिला समजवण्याचा प्रयत्न करेन."

अतुलने आईच्या मांडीवर डोकं ठेवलं. अलका बाई बराच वेळ त्याच्या डोक्यावरून हात फिरवत राहिल्या. किती माया होती त्या स्पर्शात! पण ही माया अनुला का कधी जाणवत नाही? की तिच्या डोळ्यावर गर्वाची पट्टी बांधली गेली आहे? विचार करता करता अतुलचा डोळा लागला.
-----------------------------

दुसऱ्या दिवशी सकाळी अनु जरा उशीराच उठली. शेजारी अतुल नव्हता. आईंना सोडायला गेला असेल म्हणून तिने फ्रेश होत स्वतःसाठी कॉफी बनवली. बराच वेळ झाला तरी अतुलचा पत्ता नव्हता. त्याच्या फोनही लागत नव्हता. दोन -तीन मित्रांना फोन करून झाले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. आता मात्र अनुला काळजी वाटायला लागली. 'मी आईंना जरा जास्तच बोलले का? पण चूक त्यांची होती. असल्या पार्टीत स्वतः हून यायची काय गरज होती? बरं, आल्यावर शांत राहावं तर तेही नाही. उगीच नको तिथं पुढं -पुढं करून आपलं हसं करून घेतलं.'

इतक्यात अतुल आत आला. "आई गेल्या? आणि इतका वेळ तू कुठं गेला होतास?" अनुष्का त्याला मिठी मारत म्हणाली. "सॉरी, काल मी जरा जास्तच हायपर झाले होते."

अतुल मात्र काही न बोलता तिची मिठी सोडवून आत निघून गेला.
"अतुल, आता तू माझ्याशी बोलणार नाहीयस का? सॉरी म्हणाले ना मी!"

"माझी माफी मागण्यापेक्षा तू आईची माफी मागितली असतीस तर फार बरं झालं असतं. ती अशी तडका -फडकी गावाला निघून गेली नसती."

"जाऊ दे ना तो विषय. प्रमोशननंतरचा उद्या माझा पहिला दिवस आहे. पण तुझ्या आईच्या वागण्याने मला काय ऐकून घ्यावं लागणार, काय माहित? माझे सगळे कलिग हायफाय आहेत. हे असलं गावंढळ वागणं पाहून ते माझ्याशी बोलणं बंद करतील की काय अशी भीती वाटायला लागलीय मला." अनुष्का तयार होत म्हणाली.

"शॉपिंगला येशील? नवीन ड्रेस घ्यायचे आहेत. वरची पोस्ट मिळालीय. आपली स्टाईल थोडी चेंज करावी म्हणते मैत्रिणींचा कसा जळफळाट झाला पाहिजे." अनु डोळे मिचकावत म्हणाली.

"तुला काहीच कसं वाटत नाही?आपल्या मैत्रिणींची काळजी आहे. पण आपल्यामुळे सासू घर सोडून गेली त्याचं काहीच वाटत नाही? मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती अनु. तुझं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाहीय. बाहेर आपली इमेज राखताना घरात आपली किंमत राखली जाईल असं माणसाने वागावं आणि घरातल्या मोठ्यांनाही किंमत द्यावी."
आपल्याच विश्वात मग्न असलेली अनु यावर काही न बोलता आवरून बाहेर पडली. तिला नवऱ्याचं फुकटच लेक्चर ऐकायचं नव्हतं. सासू गावी गेली याचा मनातून आनंद झाला होता. पण उघडपणे बोलणार कसं? म्हणून ती गप्प होती.

'जेवण बनवलेलं नाहीय. आज तेवढं ऑर्डर कर.' बाहेर पडताच अनुने नवऱ्याला मेसेज केला.

'काय म्हणावं हिला? लहान वयात असं सहजासहजी यश मिळत गेलं तर डोक्यात हवा जाते, असं म्हणतात ते अगदी खरं आहे. हिला केवळ स्वतःची किंमत आहे. आपल्यापुढे घरच्यांची किंमत शून्य.'
अतुलने डाळ तांदळाची खिचडी केली. त्याला खाण्याची इच्छाही नव्हती अन् भूकही. फक्त शरीर धर्म म्हणून दोन घास त्याने पोटात ढकलले.
आता उरलेला दिवस एकट्याने कसा काढायचा म्हणून अतुलने आपल्या मित्राला फोन केला.

संध्याकाळी थकून -भागून अनुष्का घरी आली. अतुल टीव्ही पाहत सोफ्यावर आडवा पडला होता.

"इतकी सारी शॉपिंग?" तिला आलेलं बघताच तो उठून बसला.

"हो. तुझा एकही पैसा खर्च केला नाहीय. हे सगळं माझ्या पैशातून आणलंय." अनुने सामान आपल्या खोलीत नेऊन ठेवलं. "तू काय जेवणार आहेस? मला जेवण बनवायचा जाम कंटाळा आलाय." अनु ओरडून म्हणाली.

"तू काहीही कर. मी मित्राकडे जेवायला जातोय."

"वा! हे छान आहे. मला सोडून जाणार?"

"तू दिवसभर बाहेर होतीस. सकाळी सुद्धा जेवण न बनवता गेलीस तेव्हा माझा विचार केलास? आई असती तर बरं झालं असतं. सुखानं दोन घास पोटात गेले असते." असं म्हणत अतुल आवरून बाहेर पडला देखील.

अतुलला खूप वाईट वाटलं.
'आम्ही आधी एकमेकांच्या सुखाचा विचार करत होतो आणि आता फक्त स्वतः चा विचार करावा लागतोय. अनु बदलली की परिस्थिती? की दोन्हीही बदलल्याने मी बदललो?' तो चालत मित्राकडे निघाला. घरी यायला उशीर होणार होता. पण त्याला तेच हवं होतं. घरी जाऊन करायचं तरी काय?