" प्रीती माझा आल्याचा चहा बनवला का गं?"
" अरे प्रसाद, मी मॉर्निंग वॉकला गेले होते. तू बनवतोस का आजपासून तुझा चहा?"
"अग पण तू छान बनवतेस ना माझ्यापेक्षा! पण काय ग ,आज काय अचानक एकदम मॉर्निंग वॉक वगैरे?"
" अरे असंच! तूच म्हणतोस ना,तुझे वजन खूप वाढले आहे, मॉर्निंग वॉकला जात जा!"
" बर झालं! सुरूवात तर झाली तुझी."
" बर मी तुला आता चहा बनवते."
" अगं बनवेल मी माझा चहा रोज. तू जात जा रोज सकाळी वॉकला!"
प्रसाद मनोमन सुखावला.कधीही कोणालाही न विचारता एकही पाऊल न उचलणारी प्रीती अचानक एवढी कशी बदलली,असा विचार त्याच्या मनात पिंगा घालत होता.एवढ्या दिवसांत प्रीतीने स्वतः काहीतरी डिसिजन घेत वॉकला जायचे ठरवले होते.म्हणूनच प्रसाद प्रीतीने स्वतःत घडवून आणलेल्या या बदलासाठी खूप खुश होता व थोडा अचंबित देखील होता.तो किचन मध्ये निघून गेला.
तेवढ्यात सासूबाई प्रीतीला म्हणाल्या,
"सूनबाई अग विशूला आल्याचा आणि मला वेलचीचा चहा बनवतेस का?"
"आई, मी आजपासून सर्वांसाठी एकच चहा आणि एकच नाष्टा बनवणार आहे.चहामध्ये चहा मसाला टाकला की आल्याचा आणि वेलचीचा दोन्हीही फ्लेवर आपोआप येतील. माफ करा मला काही प्रत्येकाचे वैविध्य जपता येणार नाही. मला लवकर कामे आटोपून हॉबी क्लास जॉईन करायचा आहे."
" हे काय खुळ भरलय तुझ्या डोक्यात? घरातील प्रत्येकाच्या आवडीनिवडी तुलाच माहीत आहेत. त्या जपल्या गेल्या नाहीत तर उगाच वादावादी होऊ शकते.प्रत्येकाला घरातील गृहिणीने सांभाळून घ्यायचे असते, हे तुला नव्याने शिकवावे लागेल का आता? आधीच न पेलवता येणारे ओझे आहे तुझ्या नशिबात! मग हा तोरा कशासाठी दाखवतेस?"
"सॉरी आई,मी तोरा नाही,माझा स्पष्टवक्तेपणा दाखवते आहे. "
" मॉर्निंग वॉक ला जाते तिथे कोणी कान भरलेत का तुझे? एवढे उलट बोलतेस ते!"
" अहो आई परिस्थिती ने मला खरं तर स्पष्ट बोलायला भाग पाडले आहे."
"आता काय झालय तुला? सगळं तर मिळतं तुला या घरात!"
"जाऊद्या ,मी सांगते तुम्हाला नीट.कसे आहे ना आई, हे वांझोटी असल्याचे दुःख मी आजवर खूप सहन केलं.तुमच्या मैत्रिणींनी,आपल्या नातेवाईकांनी आजपर्यंत या गोष्टीवरून मला खूप उणेदुणे बोलणे केले.प्रसाद सोडून मला कधीही कोणी मानसिक आधार दिला नाही.तुम्ही मला आधार दिला बऱ्याचदा पण तो बोलूनही दाखवला. "
" वहिनी आज काय झालंय ? आईशी तुम्ही अशा काय बोलताय?"
" बघ ना विशू ,आज ही माझ्याशी खूपच उद्धट बोलतेय. एवढं आपण तिला समजून घेत काही बोलत नाही,तर ही बघ कशी वागतेय !"
" विशू ,तू यापासून जरा लांबच रहा.आजपर्यंत मी माझ्या दुःखाला कुरवाळत खूप रडले,पडले.माझी कहाणी म्हणजे बऱ्याच लोकांचा चर्चेचा विषय ठरला.मला वांझोटेपणाचा शाप आहे,तसाच काही बायकांना विधवा असण्याचा,अपंग मुल असल्याचा,नवरा नीट नसल्याचा,तरुण मुलं व्यसनाधीन असण्याचा शाप आहे.पण मला अशा बायकांना माझ्या जीवनशैलीतील बदल दाखवून,आपण स्वतःच स्वतःचा आधारवड बनू शकतो हे दाखवून द्यायचे आहे.आता हा बदल कसा ? तर मला ज्या गोष्टींतून आनंद मिळतो त्या मी करणार म्हणजे करणारच.मी आता माझी आणि माझ्या आनंदाची काळजी घेणार.नशिबाने पुढ्यात जे मांडून ठेवले आहे,ते स्वीकारून पुढे चालण्यात मला शहाणपण वाटते आहे."
प्रसाद दोघींचा संवाद ऐकून म्हणाला,
"प्रीती,तू अगदी बरोबर बोलते आहेस.मला पण असच वाटतं की प्रत्येक महिलेने किंवा वैफल्यग्रस्त माणसाने असा सकारात्मक विचार करावा, आनंदाचं इंद्रधनुष्य स्वतःच तयार करावं,कुठल्याही ऊनपावसाची वाट बघू नये आणि स्वतःचा आधारवड स्वतःच बनावं."
" प्रसाद,तू माझ्याबरोबर या माझ्या निर्णयात सहभागी आहेस,हे बघून मला खूप आनंद होतोय.पण तरीही माफ करा तुम्ही सर्व जण मला.मी माझ्या आनंदासाठी टोकाची भूमिका कधीही घेणार नाही.घरातील कामे ,जबाबदाऱ्या सांभाळून,प्रत्येकाच्या आवडीनिवडी माझ्याप्रमाणे जपून मी माझा आनंदाचा मार्ग शोधणार आहे;कारण माझ्या आनंदाचा, समाधानाचा आधार प्रसादने सांगितल्याप्रमाणे मला स्वतःच व्हायचे आहे."
"प्रसाद,तुला मान्य आहे तुझ्या बायकोचे म्हणणे?"
" हो आई, तिला जे हवे तेच मी तिला करू देणार आहे. कारण सर्व कर्तव्य पार पाडून ती स्वतःचा आनंद आणि समाधान शोधणार आहे!"
" हो का !बर सूनबाई पटला ग बाई तुझा विचार मला.मग आता तू काय करायचे ठरवले आहेस?"सासुबाई एकदमच बदलल्या आणि त्यांचा सूरही बदलला .
" आई मी आता माझा छंद जोपासणार आहे. तोच तोपणा न ठेवता माझ्या प्रत्येक कृतीत नावीन्य आणणार आहे.कधी भाजी तुमच्या तर कधी माझ्या पद्धतीने करणार आहे.कधी वाटले चालत जावे तर कधी सायकलवरही जाणार आहे.ज्या गोष्टी येत नाहीत त्या करून पाहणार आहे. तुम्हाला हे सर्व चालणार आहे ना आई?"
"मला पटले ग प्रीती आता.आजवर खूप सोसलंस तू पोरी.पण तू आता स्वतःसाठी जग.मला तू तुझ्या आनंदासाठी, आधारासाठी काहीही केलेलं चालणार आहे.तुझ्या आनंदाला तू तुझा आधार बनवले हे बघून मला खूप भरून आलय पोरी.आजपर्यंत तुला जे मी उणेदुणे बोलणे केले, त्यासाठी मला माफ करशील ना?"
"अहो आई ,मला तुमचा पाठिंबा हवाय या सगळ्यात.मी तुमच्यापेक्षा लहान आहे. त्यामुळे कधी माझे चुकले तर बोलाही मला तुम्ही ,अगदी हक्काने! तुम्हाला माफ करणारी मी कोणी एवढी महान व्यक्ती नाहीये! खर तर मीच तुमच्याशी आज एकदम स्पष्ट बोलले त्याबद्दल मला माफ करा."
" अगं वेडे,यात माफी काय मागतेस? तू खूप छान पद्धतीने मला तुझा सकारात्मकतेचा मार्ग समजून सांगितलास.माझा पाठिंबा तुझ्यासोबत नेहमी असेल."
"खूप खूप धन्यवाद आई.अशाच माझ्या पाठीशी रहा नेहमी!"
" वहिनी मी सुद्धा तू जसा चहा बनवशील तसा घेईल.मलाही तू आनंदी हवी आहेस."
" थँक्यू विशू."
" गुणाची ग माझी बायको ती!"
" ह. बघ बघ बायकोला कसे लाजवायला लावतोय हा प्रसाद!"
प्रीती छान लाजली अन् घरात एकच हशा पिकला.घरातील वातावरण, प्रीतीच्या स्पष्ट बोलण्याने हलके फुलके झाले.आता प्रीती आधीपेक्षा अधिक आनंदी तसेच समाधानी राहू लागली. सुरुवातीला तिच्या सासूबाई तिचे काही एक ऐकून घेण्यास तयार नव्हत्या,पण जेव्हा प्रसाद आणि प्रीतीने त्यांना छान समजून सांगितले, तेव्हा त्यांनी सुनेच्या निर्णयाचे आनंदाने स्वागत केले.
वाचकहो,आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे काही ना काही विवंचनेमुळे त्यांच्या आयुष्यात उदास आहेत; म्हणून नैराश्याचे आणि आत्महत्येचे बळी ठरत आहेत. आहे ती परिस्थिती स्वीकारून स्वतःच्या आनंदाला आपला आधार बनवला तर आपले दुःख पचवून, नव्याने आयुष्याचा अर्थ समजून घेऊन जगता आले तर खूप मजा येईल,हेच प्रीतीने आज घरच्यांना पटवून दिले.त्यामुळे त्यांनीही तिच्या या निर्णयाचे स्वागत केले.शेवटी आपली माणसे आपले सुख ,समाधान यात नेहमी आपल्या सोबतच असतात. फक्त गरज असते ती मोकळ्या संवादाची, ठरवलेल्या आधारवडाला फुलू द्यायची, एकमेकांना समजून घेण्याची.
©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे