सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या...

एका मुलीची कथा
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या…


एक दिवस विद्या आपल्याच विचारात असताना तिच्या मोठया भावाने मुकूंदने बघीतले तो लगेच तिला म्हणाला,

"विद्या किती दिवस त्या अरूणचा विचार करून आपल्या आयूष्यातील एकेक दिवस गमावणार आहे? स्वत:कडे बघ जरा."

मुकूंद लहान बहीण विद्याच्या प्रेमापोटीच बोलत होता. यावर विद्या हसून म्हणाली,

"अरे माझ्या मनात आत्ता अरूण नाही. आत्ता मी फक्त माझाच विचार करतेय."

" मला पटलं नाही." मुकूंद म्हणाला. जरा थांबून पुढे म्हणाला,

" असं आहे तर तू लग्नाला सतत नकार का देतेस?"

"अरे दादा आता मला लग्नाबद्दल एवढं आकर्षणच वाटत नाही मग कशाला ते लग्न नावाचं जोखड माझ्या गळ्यात बांधून घेऊ?"

मुकूंदाला तिचं म्हणणं काही पटलं नाही.तो पुढे काही न बोलता निघून गेला.

मुकुंद गेल्यावर विद्या स्वतःशीच बोलली.

"दादाला पटलं नाही माझं म्हणणं.त्याला पटावं असा मांझा आग्रह नाही. कारण प्रत्येकाला आपलं म्हणणं पटलं पाहिजे असा काही नियम नाही. नियमांच्या या सगळ्या बंधनातूनच मुक्त होऊन मला माझं आयुष्य पुन्हा जगायचं आहे. मग हा अरूण कशाला हवा? अरूणच नाही तर दुसरा कोणीही कशाला हवा?

\"एकला चालोरे\" असंच आता करायचं आहे. वाटेत भेटणा-याला हाय,हॅलो करून पुढे जायचं. नातं कोणाशी जुळवायचं नाही."

विद्याच्या चेह-यावर ठामपणा होता.

***

मुकूंद निघून गेल्यावर विद्याचं मन परत विचारात गुंतलं,

मनाशी एक ठाम निश्चय केल्यामुळे आज खूप दिवसांनी मला इतकं मोकळं वाटतंय. माझा श्वास स्थीर चालला आहे. कितीतरी दिवसांनी माझं मन ताणरहित आहे. मी तशी एक सर्वसामान्य स्त्री आहे.एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली, मध्यमवर्गीय कुटुंबाच्या शिस्तीत राहून लहानाची मोठी झाले. पण आता असं वाटतं कुठेतरी की स्वच्छंद जगावं.

लहान असताना आलेल्या परीस्थीतीत राह्यचं आणि तेच सूख आहे असं समजायचं. थोडक्यात मन मारून जगायचं. असंच मला सतत सांगीतल्या गेलं. माझ्या आयुष्याबद्दल खूप अपेक्षा नाहीत. कारण मी सर्वसामान्य आहे. खूप मोठ्ठ धेय्य माझ्यासमोर नाही. आलेला प्रत्येक क्षण आनंदानी जगावा एवढीच माझी अपेक्षा आहे.

लोकांना माझं धेय्य निरर्थक वाटेल पण मी आता त्याची फिकीर करणार नाही. कारण हे माझं आयुष्य आहे. मला माझं धेय्य महत्वाचं वाटतं. साधेपणातून जगण्यातला उच्च कोटीचा आनंद मिळवावा हे माझं स्वप्नं. माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कोणालाही त्रास देणार नाही.

मी का म्हणून कोणाला माझ्या स्वप्नं पूर्ततेसाठी वेठीस धरावं? मी अशीच जगणार. मला हवं तसं. मरणाचा अजून विचार केला नाही. कशाला करायचा?

एकदाच मिळणारा हा जन्म कशाला ईश्वराच्या इच्छेशिवाय संपविण्याचा प्रयत्न करायचा?"

हे आणि असे बरेच विचार तिच्या डोक्यात सतत चालू असायचे.

***

लहान असतानाच्या काळातले दिवस तिला आठवले.

शाळेत असताना पासून तिचं आणि अरूणचं नातं होतं. त्याच्या आणि तिच्या दोघांच्याही घरातल्या सगळ्यांना माहीत होतं. शाळा संपली तरी ते एकमेकांना भेटायचे. अरुणचं डाॅक्टर होण्याचं स्वप्नं होतं तसा तो डाॅक्टर झाला. तिने आर्ट्स घेतलं कारण तिला पुढे पुरातत्त्व विभागामध्ये जायची इच्छा होती. त्यासाठी तिने प्रयत्न चालू ठेवले.

अरुण डाॅक्टर झाला त्या दिवशी तिने आणि अरूणनी खूप धमाल केली. त्याचे मेडीकलला असणारे सगळे मित्र मैत्रीणी होत्या. तीच वेगळ्या फॅकल्टीची होते. सगळ्यांना अरूणने ही माझी खूप जवळची मैत्रीण आहे असं सांगितलं.सगळे मनात समजले होते.आणि गमतीत त्याला चिडवतपण होते.

त्यानंतर अरूण परदेशी गेला पुढचं शिकायला.

"तो तिकडून आला की आपण त्यांच्या आई वडिलांशी बोलू"

असं बाबा मला म्हणाले. मी मान डोलावली. माझ्या डोळ्यातला आनंद बघून आईनी चटकन माझा एक गालगुच्चा घेतला. मीही मनातून मोहरून गेले होते.

आमची मैत्री झाली तेव्हा आम्ही दोघंही आठवीत होतो.

आज इतकी वर्ष झाली आमची मैत्री आहे. आता मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आहे. अरूण परदेशी जाण्यापूर्वी म्हणाला होता की

"मी तिकडून आलो की लगेच आपण लग्नं करू." विद्याची पण तयारी होतीच.

तिने आपल्या आई बाबांना स्पष्ट सांगितलं की मला दुस-या मुलांशी लग्न करायचं नाही. आई बाबांनीपण मान्य केलं.

दिवस काय दोन वर्ष सरली.अरूणचं शिक्षण पूर्ण झालं.नंतर तिथेच त्यानं नोकरी घेतली. काही दिवसांनी भारतात येईन मग लग्न करू असं म्हणाला तेव्हा विद्याचं मन खूप रोमांचीत झालं.

आईबाबा लग्नाच्या तयारीला लागले. अरूणनी तिला पासपोर्ट काढून ठेवायला सांगितलं. म्हणून तिने लगेचच पासपोर्ट पण काढला.

इतकी सगळी झोकात तयारी झाली होती. आता फक्त नवरदेवांचं विमान भारतात कधी लॅंड होतं याची सगळे वाट बघत होतो. विद्या जरा जास्तच वाट बघत होती. कारण तिच्या साठी अरूण स्पेशल होता.
………

पण आता हे फक्त आठवणीतच राहीलं. प्रत्यक्षात अरूणचं विमान भारतात कधी लॅंड झालंच नाही.

अरूण भारतात परत न आल्याने सगळेच दु:खी झाले. विद्यापण दु:खी झाली. बरेच दिवस आपलं काय चुकलं असेल याचा विचार ती करत होती. शेवटी तो विचार सोडून नवीन आयुष्याला तिने सुरुवात केली. म्हणजे तिने लग्न नाही केलं. तिने एकटीच रहायचं ठरवलं.

***

आज बरीच वर्ष उलटली या गोष्टीला. अरुणच्या घरीही अरूणचं पत्र किंवा फोन आला नाही असं कळलं पण तिला या गोष्टींशी आता काही देणं घेणं नव्हतं.

"मी ,\"एकला चलो रे\" चा बॅंनर घेऊन आयुष्यात पुढे निघाले होते. अरूण माझा भूतकाळ झाला होता.वर्तमान काळात कोणी अरूण भेटला नाही. मीही शोधलं नाही." विद्या स्वतःशीच पुटपुटली.

***

आज याही प्रसंगाला काही वर्ष लोटली. विद्या तिच्या आयुष्यात आनंदी होती. तिची नोकरी, तिचे छंद, तिचं मित्र मंडळ यात तिने स्वतःला खूप छान रमवून घेतलं होतं.

तिच्या लग्नाचा विचार घरातील कोणीच करत नव्हते.

एक दिवस अचानक विद्याला अरूणच्या भावाचा फोन आला. त्याच्या फोन मुळे नाही म्हटलं तरी विद्या जरा अस्वस्थ झाली. जरा नाराजीनेच तिने फोन घेतला.

" हॅलो…" विद्या

" विद्या आज ऑफीस सुटल्यावर मला भेटशील का? खूप महत्वाचं बोलायचं आहे." अरूणचा भाऊ मनोज फोनवर म्हणाला.

"आता काय बोलायचं राहिलय? मी आता माझं नवीन आयुष्य सुरू केलंय.त्यात आता अरूणला स्थान नाही." ठामपणे विद्या म्हणाली.

"कळतंय मला पण एकदाच शेवटच भेट. नंतर तुला फोन करणार नाही.प्लीज." मनोज

" ठीक आहे.पण शेवटचच. कुठे भेटायचं ती जागा आणि वेळ सांग" विद्या नाराजीनेच मनोजला भेटायला तयार झाली.

" धंतोलीतील बगीच्याच्या मुख्य दरवाजाच्यापाशी थांब मी सहा पर्यंत पोचतो. " मनोज म्हणाला.

ऑफीस सुटल्यावर विद्या ठरलेल्या वेळी धंतोली बगीच्यापाशी आली. मनोज आधीच तिथे येऊन थांबला होता.

गाडी पार्क करून विद्या मनोज उभा होता तिथे गेली. तिच्या चेह-यावरून ती मनोजला भेटायला फारशी उत्सुक नाही हे मनोजला कळलं.

" सॉरी. मला भेटायची तुझी इच्छा नाही हे मला कळतंय." मनोज

"कळतंय नं! मग कशाला बोलावलस? तेही इतक्या वर्षनंतर." विद्या

" कारणच तसं घडलं." मनोज

" कोणतं कारण?\" विद्या

"आठ दिवसांपूर्वी अरूण ने लिहिलेलं पत्र आलं." मनोज

" वा छान! इतक्या वर्षांनी आठवण झाली का साहेबांना?" विद्या

" तुला कसं सांगू कळतं नाही…" मनोज

" मनोज नौटंकी पुरे. अरुणच छान लग्न झाले असेल, तो आता आपल्या बायको मुलात दंग असेल, त्याला कशाला माझी आठवण येणार आहे?" विद्या

विद्याचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता आणि मनोजच्या डोळ्यातून अश्रू वहात होते.

मनोजला बोलणं कठीण जात होतं. विद्यालही रागाने बोलणं जमत नव्हतं.

बराच वेळ दोघंही तसेच बसले होते. शेवटी मनोज विद्याला म्हणाला

" अरुणच लग्न झालं नव्हतं."

विद्याने मनोजकडे बघत म्हटलं

" काही काय सांगतोस?" विद्या

" खरं तेच सांगतोय. अरूण काही दिवसांसाठी भारतात यायला निघाला होता. इथे आल्यानंतर तुझ्याशी साखरपुडा करून मग जाणार होता." मनोज

"मग ! …माशी कुठे शिंकली? अमेरिकेतून भारतात येण्याच्या मार्गातच कुण्या सुंदरीने त्याला पकडलं का? छान स्टोरी आहे." हे बोलुन विद्या हसायला लागली.

" विद्या तुझा माझ्या सांगण्यावर विश्वास नाही बसला तरी चालेल पण मी काय सांगतो आहे ते नीट ऐक तरी." मनोज

"ठीक आहे सांग. माझ्याजवळ जास्त वेळ नाही." विद्या

" विद्या अरूण आता या जगात नाही." मनोज

" काय…?" विद्याला हे ऐकून क्षणभर गरगरल्या सारखं झालं.

" मनोज पुन्हा गंमत तर नाही न करत आहेस?" विद्या

विद्याने जसं हे विचारलं तसं मनोज हमसून हमसून रडायला लागला.

" मनोज …काय झालं ते नीट सांग." विद्या

"अमेरिकेतून निघाल्यावर एअपोर्टवर जायला अरुणने शेयर टॅक्सी घेतली. त्या टॅक्सीत चार माणसे होती. अनोळखी लोकांशी कधी न बोलणारा अरूण त्या लोकांशी खूप मोकळेपणाने बोलला. त्यांनी दिलेलं ज्यूस पण प्यायला. त्यांनंतर त्याला जेव्हा जाग आली तेव्हा त्याचे हातपाय बांधून त्याला एका खोलीत ठेवलं होतं. त्याला काही कळत नव्हतं.

तिथे कोणीच येत नव्हत. फक्त एक निग्रो बई त्याला जेवण द्यायला यायची. सुरवातीला त्या निग्रो बाईबरोबर कोणीतरी आडदांड गोरासा माणूस यायचा. नंतर त्याच येणं पण बंद झालं. तशी ती निग्रो बाई हावभाव करून,मोडक्या तोडक्या इंग्लिश मध्ये बोलुन अरूणशी संवाद साधू लागली.

त्या संवदामधून त्याला जे कळलं ते भयंकर होतं. त्यांना अरुणचे जेवढे अवयव हवेत तेवढे एकेक करून काढून नंतर त्याला मारून टाकणार होते. एक अवयव काढला की काही दिवस ते थांबायचे. त्याला खाऊ पिऊ घालायचे. दोन अडीच महिन्यांनंतर एक डॉक्टर अरूणला तपासायला यायचा.

त्याने हो म्हटलं की त्याने सांगितलेल्या दिवशी अरूणचा दुसरा अवयव काढायचे. बरेच दिवस हे चाललं. मध्ये अरुण आजारी पडला.त्यामुळे त्यांना थांबावं लागलं.बरेच महिने अरुणच्या आजारपणात गेले. तो तब्येतीने चांगला झाल्याशिवाय त्याचा अवयव काढता येणार नव्हता.

अरुण बरेच दिवस आजारतून बाहेर आला नाही कारण त्याचं जेवण खाण त्याला पचत नव्हतं. अरुण पूर्ण शाकाहारी होता.त्याचं मास- मासे प्रकार त्याला जमेना ती निग्रो बाई खूप प्रेमाने अरुणच करायची.

अरूणला एक दिवस त्या नर्सने हळू आवाजात इंग्लिशमध्ये सांगितलं की बाहेर खूप कडक सिक्युरिटी आहे ते. तूम्ही इथून बाहेर पडूच शकणार नाही.

अरुणला तेव्हा वाटलं आपल्या घरी पत्र पाठवावं म्हणून अरुणने त्या नर्सला कागद पेन मागितला. नर्स म्हणाली

" मी उद्या आणून देईन पण लपून"

शेवटी अरुणला कळलं आता आपण जिवंत राहणार नाही. अरुण आजारी असताना जी नर्स यायची ती पण निग्रो होती. ती नर्स आणि ती बाई दोघी आपल्या भाषेत एकमेकींशी बोलायच्या.

…….


विद्याचा हे सगळं ऐकून जीव दडपला. अरुण बरोबर एवढं सगळं घडत होतं आणि आपण त्याच्या विषयी काय काय विचार केला. विद्याच्या डोळ्यातून अखंड अश्रुधारा वाहू लागल्या.

" मनोज मला खरंच हे काहीही माहिती नव्हतं "

"आम्हालाच माहिती नव्हतं तर तुला कसं माहिती असणार. अरुण आला नाही मग आम्ही पोलिसांकडे तक्रार केली."

" मग..?"

" त्यांनी सगळी चवकशी केली. अरूण विमानात चाढलाच नाही मग ते शोधणार कुठे? तिथल्या एम्बासीला पण कळवल पण त्यांनाही शोध घेता आला नाही."

" ही तर चक्क अवयवांची तस्करी आहे.ते पकडले गेले नसतील?" विद्या

" काहीच कळायला मार्ग नाही" मनोज


" हे पत्र कसं आलं?" विद्या

"त्या नर्सनेच बहुदा पोस्ट केलं असावं.हे कोणी पाठवलं असेल कळायला मार्ग नाही.पत्रातील अक्षर नंतर नंतर खूप खराब आलं आहे याचा अर्थ अरुणच्या अंगात नंतर त्राण राहिलं नसेल.

रोज थोडं थोडं त्या नर्सने लिहून घेतलं असं त्यानेच पत्रात लिहीलं आहे. त्याचं लिहिणं झालं की तो कागद नर्स खोलीतच एका खुर्ची खाली लपवत असे.

जेव्हा अरुणचा शेवटचा अवयव काढणार होते तेव्हा अरुणने मी आता कोणालाच भेटू शकणार नाही. काही दिवसात माझा शेवटचा अवयव काढला की मला मारून टाकतील. विद्याला सांग तिला दिलेलं लग्नाचं वचन मी पळू शकलो नाही. शेवटचा सगळ्यांना नमस्कार. हे पत्र ही नर्स नंतर पोस्ट करेल. असं लिहिलं होतं

त्या पत्रावर ३/०५/२००० ही तारीख होती.पत्र आम्हाला आठ दिवसापू्र्वी मिळालं."

" म्हणजे चक्क दहा वर्षानंतर ? इतकी वर्ष कशी काय मध्ये गेली." विद्या

" तेही कळत नाही. कदाचित अरुणचा मृत्यू झाला तेव्हा हे पत्र त्या नर्स कडेच असेल पण ती तिच्या आयुष्यातील व्यापामुळे ती विसरली असेल. एका परीने हे पत्र आलं म्हणून कळलं की अरुण आता या जगात नाही. कळलं तेव्हा आई आप्पांना खूप वाईट वाटलं पण हे कळलच नसत तर ते वेड्यासारखे आयुष्यभर त्याची वाट बघत बसले असते. अग वर्षभर आप्पा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन चवकशी करायचे."

एवढं बोलून मनोज रडायला लागला. त्याने विद्याचा विश्वास बसावा म्हणून अरुणचं ते पत्र विद्याला दिलं.

" मी आधीच तुला हे पत्र वाचायला देणार होतो पण तू वाचशील की नाही अशी शंका आली. म्हणुन मी घडलेलं सगळं सांगितलं. आता वाच हे पत्र.

विद्याचा हातात पत्र फडफडत होतं. मधून मधून त्यातील ओळी वाचून विद्याला भडभडून आलं. काहीच शब्द तिला वाचता आले.तिला स्वत:ला अपराधी वाटायला लागलं.

विद्या अवती भवतीचं भान विसरली. कितीतरी वेळा पासून मनोज आणि विद्या बागीच्याच्या गेटपाशीच उभे होते.

\"आपल्या प्रेमाची रांगोळी अशी विस्कटून जाईल.\" अशी शंका सुद्धा विद्याला कधी आली नव्हती.

त्या बागीच्या जवळ असणाऱ्या घरातून रेडीयोवर वाजणाऱ्या गाण्यांच्या ओळी हे दोघं उभे होते तिथे भिरभिरत आल्या…

"सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे…..
______________________________
लेखिका…मीनाक्षी वैद्य.