नवी पहाट... भाग २७

चहा घेऊन झाल्यावर दोघांनी परत नेटवर उपवर शोधण्यास सुरुवात केली. त्या दिवसाची शोध मोहीम जवळ जवळ तासाभराने थांबली. काही नावे आणि त्यांचे फोननंबर डायरीत लिहून घेतले आणि मग एकेकाला फोन सुरू झाला. त्यातील एकाचे नुकतेच लग्न झाले होते. एकाने लग्नाचा विचार काढून टाकला होता.
नवी पहाट … भाग २७


मागील भागात आपण बघितले…

"भाऊजी आमच्या सगळ्यांचा निर्णय एकच आहे. उगाच समजावण्याचा प्रयत्न करू नका आणि विषय काही वाढवू नका." नीरजा बोलली.


त्या रात्री काका थांबले पण ते नाराजच होते.

"आलं काही लक्षात तर सांगेल अजून." म्हणत काका निघून गेले.


आता पुढे …


नंदिनीसाठी जोडीदार ह्या वेळी सहजासहजी मिळणार नव्हता. हे सगळ्यांना माहीत होते. पण काल आलेल्या मुलाला बघून सगळेच मनातून जरा घाबरले.
मुलीचे दुसरे लग्न करणे म्हणजे गुन्हा आहे का? समाज कशा नजरेने बघतो? तिला त्या चुकीची शिक्षा मिळते जी तिने केलीच नाही. कधी बदलेल ही विचारसरणी?


पुढे बऱ्याच स्थळांचा निरोप आला. पण सगळे असेच. दहा पंधरा वर्ष मोठे, एक - दोन मुल असलेले. काहींना नावासाठी लग्न करायचे होते, काहींना फक्त गरज पूर्ण करायची होती. पण ह्यावेळी दीपकराव आधीच सगळी माहिती विचारून घेत. नंदिनीने सांगितलेल्या अटीत जर मुलगा बसत असेल तर बघायला बोलवू असे त्यांचे ठरले होते. त्यामुळे ते फोनवर माहिती घेत आणि नाही पटले की, तिथेच नकार देत होते.
उगाच ज्या मार्गाला जायचं नाही त्याचा विचार कशाला करायचा? अशा मुलांना बघायला बोलावून त्यांना नंदिनीचे मन दुखवायचे नव्हते.


एक दिवस दीपकराव आणि नीरजा नेटवर नंदिनीसाठी उपवर शोधत बसले होते. तितक्यात दीपकरावांच्या फोनची घंटी वाजली.

एका मुलाचा फोन होता. वयाने नंदिनी पेक्षा वीस वर्ष मोठा होता. मुलबाळ नव्हते. पण बहिणीचा मुलगा दत्तक घेतलेला होता आणि बहिणीची मुलगी दत्तक घ्यायची होती. पण एकटा पुरुषाला मुलगी दत्तक घेता येत नाही, म्हणून लग्न करायचे होते त्याला.
दीपकरावांनी बहिणीचे मुल दत्तक घेण्याचे कारण विचारले. तर त्याने सांगितले की,
"बहिणीची आर्थिक स्थिती बरोबर नाही. त्यामुळे मुलांच्या पालन पोषणाची जबाबदारी त्याने घेतली आहे. बहिण दुसऱ्या गावी राहते. मग मुलांचा सांभाळ करणारी घरातील व्यक्ती हवी आणि मुलगी देखील दत्तक घेता येईल म्हणून लग्न करायचे आहे."

दीपकरावांनी त्याचे बोलणे ऐकून घेतले.
"वाह तुम्ही खूपच पुण्याचे काम करत आहात. आज काल स्वतः चा विचार करतात सगळे तुम्ही तर तुमच्या मुलांसाठी बहिणीसाठी लग्न करत आहात. कौतुकच आहे तुमचे. पण तुमचे आणि आमचे सुर जुळतील असे मला वाटत नाही. त्यामुळे बघायला येऊन आपण दोघांचा वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही. असे मला वाटते." असे म्हणून दीपकरावांनी त्याला नकार दिला आणि फोन ठेवला.


"नीरजा चहा कर मग भाऊला फोन करून कळवतो की बोलणें झाले म्हणून." दीपकराव फोन ठेवल्यावर नीरजाला बोलले.

नीरजा चहा करायला निघून गेली. ती परत येत नाही तोच पुढील पाच मिनिटात दीपकरावांना फोन आला.


"हॅलो, नमस्कार भाऊ." दीपकराव बोलले.


"नमस्कार." समोरील व्यक्ती म्हणजे नात्यातील एक काका बोलले.


जुजबी हाल हवाल विचारून त्यानी विषयाला सुरुवात केली.


"भाऊ मी नंदिनी साठी एका मुलाला नंबर दिला होता तुमचा. काय झाले त्याचे?" काका बोलले.


"हो भाऊ आला होता त्यांचा फोन आत्ताच. चहा घेऊन करणार होतो तुम्हाला फोन." दीपकराव शांत आवाजात बोलत होते.


"काय, तुम्हाला मुलीचे लग्न करायचे आहे की नाही? तुम्हाला नकार द्यायचा होता तर बघून गेल्यावर द्यायचा होता. असा लगेच फोनवर नकार कसा दिला तुम्ही? आता नंदिनीला जरा तडजोड करावी लागेल. हे तुम्ही तिला समजावून सांगण्यापेक्षा तुम्हीच तिच्या अटी मान्य करता." काका रागात बोलत होते.


"भाऊ जे पटत नाही त्यांना बोलावून दाखवण्याचा कार्यक्रम करायला माझी मुलगी काय शो पिस आहे का? उठसूठ कोणाला पण मी मुलगी दाखवणार नाही आणि तिच्या अटी त्याचं आमच्या अटी आहेत. माझी मुलगी मला ओझं नाही. त्यामुळे असे स्थळ पाठवू नका ज्यांना फोनवर नकार द्यावा लागेल." दीपकराव स्पष्ट बोलले.


दोघांनी पण फोन ठेवला.

नीरजा सगळं ऐकत होती.

"जाऊद्या हो. असे अनुभव येतील याची आपली मानसिक तयारी होती ना. मग का मनाला लावून घेता?" दीपकरावांच्या चेहेऱ्यावर उमटलेली चिंतेची लकीर बघत नीरजा बोलली.

"हो. पण अशा लोकांचा राग येतो मला. त्यांना आपल्या अटी आधीच सांगितलेल्या आहेत, तरी असे स्थळ पाठवतात म्हणजे काय बोलावं? कधी कधी तर वाटतं मुद्दाम वागतात हे लोकं असं. जेणेकरून आपल्याला त्रास झाला पाहिजे." दीपकराव वैतागलेल्या स्वरात बोलत होते.


"असेल ही तसं, पण आपण त्रागा करून त्यांची इच्छा का पूर्ण करायची? मी तर देवाचे आभार मानते, की ह्या प्रसंगांतून माणसं खरी कशी आहेत आपल्याला कळत आहे. कालपर्यंत एका ताटात जेवायला तयार असलेली माणसं आज कशी आपली खिल्ली उडवत आहेत हे बघायला मिळते आहे. आता इथून पुढे कोणाला किती जवळ करायचे आणि किती नाही हे आपण ठरवू शकतो." नीरजा बोलत होती.


"हे मात्र खरं. म्हणतात ना परिस्थिती आली की, माणसाचे खरे रूप समोर येते. कोण आपला, कोण परका ह्याची ओळख होते आणि सगळे भ्रम तुटतात." दीपकराव नीरजाच्या बोलण्याला दुजोरा देत बोलले.


चहा घेऊन झाल्यावर दोघांनी परत नेटवर उपवर शोधण्यास सुरुवात केली. त्या दिवसाची शोध मोहीम जवळ जवळ तासाभराने थांबली. काही नावे आणि त्यांचे फोननंबर डायरीत लिहून घेतले आणि मग एकेकाला फोन सुरू झाला. त्यातील एकाचे नुकतेच लग्न झाले होते. एकाने लग्नाचा विचार काढून टाकला होता. एकाचा फोन बंद होता. सरते शेवटी हातात काहीच नाही म्हणून दीपकराव आणि नीरजा जरा नाराज झाले. दोन दिवसांनी पुन्हा शोधू असा निर्धार करून त्यानी नंदिनी घरी यायच्या आता विषय संपवला. तितक्यात नंदिनी आली.


"काय झाली का शोध मोहीम?" नंदिनी दीपकराव आणि नीरजाकडे बघून हसून विचारात होती.


"तुला गंमत सुचते आहे ना?" नीरजा लाडाने नंदिनीचा एक गाल ओढत बोलली.


"मग काय? कशाला इतकी मेहनत आणि वेळ वाया घालवत आहात? नाद सोडून द्या. मला खरंच लग्न करायची इच्छा नाहीये." नंदिनी बोलली.


"अरे बेटा तुला नाही म्हणत आम्ही काही. आम्ही बघतो की, आम्हाला कासला त्रास नाही. तुझी गाडी लाईनीला लागली की, आम्हाला समाधान." दीपकराव बोलले.


"बरं तुला कसं कळलं की, आम्ही शोध मोहीमवर होतो?" नीरजा बोलली.

"आई, तुम्ही आई वडील असलात तरी मी तुमची मुलगी आहे. तुमचे पडलेले चेहरे बघून समजलं की, आज पण तुमच्या हातात काहीच आलं नाही.

आई बाबा, इतकं सोपं नाहीये हे सगळं. उगाच तुम्हाला मनस्ताप होईल." नांदिनी काळजीने बोलत होती.


"ते आम्ही बघू तू तुझं काम कर आणि एक अनुभव वाईट आला म्हणून सगळेच काही वाईट नसतात रे बाळा." नीरजा परत नंदिनीच्या पाठीवर थाप मारत बोलली.


पुढे खूप दिवस गेले. पण मनासारखे काही दिसत नव्हते. जसजसे दिवस उलट होते, नीरजा आणि दीपकराव अधिकच हताश होत होते.

समर आणि वृंदा देखील त्याच्या परीने शोध घेत होते. पण कोणाच्या हातात काहीच येत नव्हते. घरात सगळ्यांना होणाऱ्या त्रासामुळे नंदिनी अस्वस्थ होत होती.

अजून एक वर्ष उलटून गेले. नंदिनीची नोकरी सुरू होती. ती आत्मनिर्भर होती. स्वतः च्या पायावर उभी होती.

"नंदिनी तुझ्या सोबत कोणी काम करणारे सर असतील किंवा ओळखीत कोणी असेल तर आम्हाला काही हरकत नाहीये हे लक्षात ठेव." एक दिवस नीरजा नंदिनीला बोलली.


"आई असा कोणीच नाही गं माझ्या नजरेत. पण तुमच्यासाठी म्हणून सांगते की, इथूनपुढे कोणी असा काही विषय केला माझ्याजवळ तर तुम्हाला मी नक्की सांगेल." आईची काळजी लक्षात घेत नंदिनी बोलली.


काही दिवसांनी नेटवर एक मुलगा त्यांना आवडला. अर्थात त्या मुलानेच नंदिनीची प्रोफाईल बघून मेसेज केला होता.


बघुया ह्यावेळी तरी नंदिनीचे तार जुळले जातील का? कसा असेल तो मुलगा? कसा अनुभव येईल नंदिनीला? वाचत रहा नवी पहाट.


क्रमशः
@वर्षाराज

🎭 Series Post

View all