नवी पहाट... भाग २६

साधारण एक वर्ष उलटून गेले होते. नीरजा आणि दीपकराव आता वेगळ्या चिंतेत होते. दरम्यान घरात एका नव्?

नवी पहाट… भाग २६


मागील भागात बघितले…

"बरं केलं नंदिनी तूच मारलं त्याला नाहीतरी माझ्या हातचा मार त्यानी आज नक्कीच खाल्ला असता." समर बोलला.


"तू नाहीतर ताईच्या हातून का होईना, म्हणजे त्याचा आज मारखायचा दिवस होता हे नक्की." स्वरा हसत बोलली.



आता पुढे ..


साधारण एक वर्ष उलटून गेले होते. नीरजा आणि दीपकराव आता वेगळ्या चिंतेत होते. दरम्यान घरात एका नव्या पाहुण्याचे आगमन झाले होते. इवल्याशा पावलांनी दुडू दुडू धावणारी परी घरात खेळत होती. परी म्हणजे समर आणि वृंदाची कन्या. पण त्यांच्या पेक्षा ती नीरजा, दीपकराव आणि दोन्ही आत्यांच्या अंगावर जास्तं होती. स्वरा नंतर इतक्या वर्षांनी घरात लहान कोणी आलं होते. त्यामुळे सगळ्यांचा एकदम लाडोबा.

एक दिवस नीरजा आणि दीपकराव बोलत होते.


"अहो, बोलावं का आता नंदिनीशी? बरी सावरली आहे ती आता." नीरजा दीपकरावांना बोलली.


"हो आता हरकत नाही बोलायला. उद्या रविवार आहे. सगळे घरीच असू. तेव्हा सगळ्यांच्या समोर बोलू आपण." दीपकराव बोलले.

दुसऱ्यादिवशी सकाळी नाश्ता झाल्यावर सगळे गप्पा मारत बसले होते. वेळ पाहून हळूच दीपकरावांनी विषय काढला. वृंदा आणि समरला विषयाची कल्पना आधीच होती त्यामुळे ते देखील तयारीत होते.


"नंदिनी पुढे काय विचार केला आहेस?" दीपकरावांनी हळूच चेंडू फेकला.


"आता पुढे काही वर्ष निकरी करून अनुभव मिळवायचा आणि मग पी. एच. डी करायचा विचार आहे बाबा." दीपक रावांच्या बोलण्याचा अर्थ नंदिनीला समजला नव्हता.


"नंदिनी, आम्हाला माहीत आहे तू कोणत्या परिस्थितीतून आली आहेस. पण असे एकटीने आयुष्य कसे जगता येईल? त्यामुळे स्पष्टच सांगायचं तर मला आणि तुझ्या आईला वाटतं की, तू परत लग्नाचा विचार करावा." दीपकराव आता जरा स्पष्ट बोलले.


"अहो बाबा, मी एकटी कुठे? तुम्ही आहात की सगळे माझ्या बरोबर." नंदिनी हसत बोलली.


"आम्ही आहोतच. पण बघ समरला त्याचे कुटुंब आहे. आज ना उद्या स्वरा देखील तिच्या आयुष्यात मग्न होईल आणि आम्ही किती दिवस असू ते आम्हाला पण माहीत नाही. मग तू एकटी पडणार. म्हणून आमच्या समोर तू तुझ्या संसारात रमालीस की आम्ही निश्चिंत होवू." दीपकराव बोलले.


"नाही बाबा. माझी इच्छाच होत नाहीये. खरं सांगू तर हिम्मत नाही माझ्यात परत डाव मांडायची. मला असच जगुद्या मोकळेपणाने." नंदिनी बोलली.


"नंदिनी, आता स्वरा साठी देखील स्थळ येत आहेत. पण तुझ्या आधी तिच्या लग्नाचा विचार नाही करणार आम्ही. तशी ती लहान आहे अजून. पण तिचे सुद्धा वय वाढेल जर तू उशीर केलास तर." नीरजा बोलली.


"मी लग्नं करणार नाहीये. तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही. माणसांवरून विश्वास उठला माझा आणि तुम्ही काही ही काय बोलता? किती दिवस आहोत माहीत नाही म्हणे. काहीही होणार नाही तुम्हाला." दीपकरावांच्या बोलण्याने पाणावलेले स्वराचे डोळे भरून आले. स्वरा गाल फुगावत थोडी रागावत बोलली.


"अगं वेडा बाई. आम्ही काय आयुष्यभर तुमच्या सोबत राहणार आहोत काय?" दीपकराव स्वराची समजूत काढत, तिचे डोळे पुसत बोलले.

"नाही. असं नाही बोलायचं. मुळीच नाही." त्यांच्या बोलण्याने स्वरा अजूनच रडायला लागली.

सगळेच भावूक झाले होते. सगळ्यांच्याच डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.


"बरं. नाही बोलणार. मग तर झालं?" दीपकराव विषय बदलवत बोलले.

स्वराने डोळे पुसत मान डोलावली आणि परत दीपकरावांच्या मिठीत शिरली.

"नंदिनी तुझ्यावर जबरदस्ती नाहीये. तू आम्हाला जड नाहीस. तुला जो मुलगा आवडेल त्याच्याशी लग्न कर. सगळेच वाईट नसतात अगं." समर बोलला.


सगळ्यांनी खूप समजल्यावर नंदिनी तयार झाली.

"ठिक आहे पण ह्यावेळी माझ्या काही अटी आहेत. त्या म्हणजे,
पहिली अट: जोपर्यंत माझ्या मनासारखा मुलगा भेटणार नाही तोपर्यंत मी लग्नाला होकार देणार नाही.
दुसरी अट: मुलगा वयाने खूप जास्त नको. म्हणजे माझ्या आणि त्याच्या वयातील अंतर जास्त नको.
तिसरी अट: त्याला मुलं बाळ नको.

ह्या अटी पूर्ण होतील त्याचं मुलाशी लग्न करेल मी." नंदिनी बोलली.


तिच्या बोलण्याने सगळेच आनंदले.
मग सुरू झाला उपवर शोधण्याचा प्रवास. नंदिनीचा दिनक्रम रोजच्या सारखा सुरू होता. पण ह्या शोधाच्या प्रवासात नंदिनीच नव्हे तर घरातील सगळ्यांनाच वेग वेगळे अनुभव येणार होते.


आता परिस्थिती आधी सारखी नव्हती. नंदिनीचे दुसरे लग्नं होते त्यामुळे शोध जरा जास्तच कठीण होता. त्यामुळे दीपकरावांनी तिचे नाव ऑनलाईन विवाह मंडळात नोंदवले.


अजूनही समाजात घटस्फोटित मुलींकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेला नाही. मग त्यात तिची चूक नसली तरी, तिचं वाईट कशी आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न समाज मात्र चोख बजावत असतो.


नीरजा आणि दीपकरावांचा उपवर शोध सुरू होता. त्यात एक स्थळ सांगून आले. ते ही एका नातलगांच्या माध्यमातून. त्यांच्या नात्यातील तो मुलगा होता. नंदिनी घटस्फोटित म्हणजे मुलगा देखील तसाच किंवा विधुर असणार होता. त्यानुसार ती मुलगा देखील विधुर होता. पण बाकी काही माहिती अजून मिळालेली नव्हती.


तो सुट्टीचा दिवस होता. त्या दिवशी मुलाच्या घरचे आणि नात्यातील ते काका नंदिनीच्या घरी गेले. अगदी अचानक. कोणतीही पूर्व सूचना न देता.



आता आलेल्या पाहुण्याचे स्वागत करण्याची नंदिनीच्या घरची रीत होती. त्यानुसार पाहुण्यांचे स्वागत झाले.
इच्छा नसताना नंदिनी साडी घालून तयार झाली. सगळी मंडळी बसली. मुलाला बघताच घरातील सगळ्यांचा चेहेरा पडला.


"आधी सूचना दिली असती तर, आम्ही तयारीत राहिलो असतो." दीपकराव काकांना बोलले.


"संगणारच होतो पण अचानक ठरलं आमचं. इथे एका लग्नाला आलो होतो म्हणून म्हटलं जाऊन यावं तुमच्या कडे पण. म्हणून सूचना देता आली नाही आणि घर आपलाच आहे तर इथे यायला आढे वेढे कसले? नाही का रे दीपक?" दीपकराव काकांपेक्षा लहान होते त्यामुळे ते त्यांना नावानेच हाक मारत.



"हो घर तुझाच आहे दादा. पण आधी सांगितलं असतं तर आदरातिथ्य नीट करता आलं असतं." दीपकराव हसून बोलले.



" ते जाऊदे. नंदिनीला तयार व्हायला सांग. ह्या लोकांकडे वेळ नाहीये परत जायचे आहे त्यांना नाशिकला. मी आज इथेच आहे राहायला." म्हणत काकांनी जवळ जवळ आदेशच सोडला आणि पाहुण्यांची ओळख करून दिली.


दरम्यान नंदिनी तयार झाली होती. खरं तर हे कोणालाच पटत नव्हतं पण तरी कोणाचा अपमान होणार नाही असे वागावे ह्या त्यांच्या नियमाचे पालन सुरू होते.


थोड्यावेळात नंदिनी बाहेर आली. मुलाच्या चेहेऱ्यावर नंदिनी त्याला आवडली होती हे दिसत होते.


पाचाच मिनिटात दीपक रावांनी नजरेनेच नीरजाला खूनावून नंदिनीला आत घेऊन जा असे सांगितले आणि नंदिनी आत निघून गेली. नावापुरती नंदिनी बाहेर आली होती. मात्र ह्यावेळेस तिने मुलाला नीट बघितले होते आणि तिला देखील मुलगा आवडला नव्हता.



"काय करता आपण?" दीपकरावांनी मुलाला विचारले.


एका प्रायव्हेट कंपनी मध्ये नोकरीला असल्याचे मुलाने सांगितले.


दीपकरावांनी सगळी विचारणा केली. त्यातून लक्षात आले की मूलगा नंदिनी पेक्षा किमान पंधरा वर्षांनी मोठा होता. अर्थात त्याच्या चेहेऱ्यावरून त्याच्या वयाचा अंदाज सगळ्यांना आला होता.


सगळी विचारणा झाल्यावर मुलाने त्याच्या काही अटी सांगितल्या. त्यातली एक अट ऐकून सगळेच स्तब्ध झाले. म्हणजे फक्त दीपकराव आणि त्यांचे कुटुंब. इतक्या वेळ विचारलेल्या माहितीत त्या मुलाने एक उल्लेख केलाच नव्हता.


"हे बघा. मला नंदिनी आवडली आहे. पण माझ्या काही अटी आहेत.

१. मला नोकरी केलेली चालणार नाही.
२. माझ्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे.
३. मी मुलं बाळ होऊ देणार नाही त्यामुळे तिला लग्ना नंतर ऑपरेशन करून घ्यावे लागेल.
सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे
४. मला दोन मुलं आहेत. मुलगी दहावीत आणि मुलगा सातवीत आहे. त्यांनाच मुलं म्हणून सांभाळावे लागेल.
आता तुमच्या लक्षात आले असेल की, मी मुलं बाळ का होई देणार नाही. माझ्या पहिल्या बायकोचा दुर्भाग्य वश मृत्यू झाला. मी जर दुसऱ्या बायको ला आपत्या दिले तर माझ्या मुलांचा सांभाळ ती नीट करणार नाही आणि त्यांचे बापाचे प्रेम वाटले जाईल ते वेगळेच.

ह्या अटी मान्य सतील तर उद्याच लग्नाला मी तयार आहे." वयाच्या पंचेचाळिशीत असलेला तो, डोक्यावर टिळा लावलेला, लांब वाढविलेल्या दाढी मिशिवर ताव मारत असा बोलत जसा लग्नं करून तो नंदिनी वर आणि तिच्या घरच्यांवर उपकार करत होता.


दीपक राव ह्यावर काहीच बोलले नाही. त्यांनी नुसता नमस्कार केला आणि पाहुणे निघून गेले. त्यांना बाहेर पर्यंत सोडून काका आत आले. दीपक राव त्यांना सोडायला बाहेर देखील गेले नाही ह्याचा काकांना राग आला होता.


"काय रे, बाहेर पण आला नाहीस त्यांना सोडायला." काका तवा तावत बोलत होते.


"कशाला येऊ. आपल्याला पुढे जायचं नाहीये तर उगाच जास्तीची तोल तोल काढला करू त्यांची." दीपक राव स्पष्ट बोलले.


"पुढे जायचे नाही ? अरे त्या साठीच थांबलो मी. की आज सगळं ठरवून देतो आणि तू पुढे जायचे नाही म्हणतोस! कारण सांगशील का मला?" काका अजूनच भडकले.


"एक नाही अनेक कारणं आहेत. एक तर मुलगा वयाने नंदिनी पेक्षा पंधरा वर्षांनी मोठा आहे, त्याला दोन मुलं आहेत. ह्याचा त्याने संपूर्ण चर्चेत आधी कुठेच उल्लेख केला नाही. तो दुसरं मुलं बाळ होऊ देणार नाही म्हणतो. हे सगळं तुम्ही देखील ऐकलं ना? त्यात भर म्हणजे दिसायला देखील चांगला नाही. म्हणून मी मुलगी तिथे देणार नाही. त्यांना लगेच नकार कळवून द्या." दीपक राव देखील चिडले होते.


"दीपक आता ती काही पहिल्यांदा लग्नं करत नाहीये की, तिच्यासाठी असच मुलगा हवा आणि तसाच मुलगा हवा असे तू म्हणशील. दुसरं लग्न आहे तिचं. घटस्फोटित मुलांना देखील पहिल्या लग्नाच्या मुली मिळतात पण मुलींना नाही. त्यामुळे जे आहे ते चांगलं आहे. हो म्हण आणि उतरव ओझ डोक्यावरचं. बाकी ती आणि तिचं नशीब." काका बोलत होते आणि दीपक राव नीरजा आश्चर्याने त्यांच्या कडे बघत होते


"मला काही माझी मुलगी जर नाही. मिळेलच तिला चांगला मुलगा. नाही मिळाला तर राहील एकटीच. पण हे असं काहीही तिच्या गळ्यात बांधणार नाही मी." दीपक राव त्यांच्या निर्णयावर ठाम होते.


"नंदिनी तू तरी समजून सांग तूझ्या बाबांना. तूझ्या बहिणी चा विचार कर." काकांनी आता नंदिनी कडे मोर्चा वळवला.


" नाही काका मी हे असं लग्नं करणार नाही. त्यापेक्षा मी एकटी राहील." कधी ही न बोलणारी नंदिनी इतकी बोलते हे बघून काकांना नवल वाटत होते. तिचे नवीन रूप त्यांच्या समोर पहिल्या वेळेस येत होते.


"हे बघ, तुला हे असच स्थळ मिळेल. तुला तडजोड करावीच लागेल. दुसरं लग्न करणाऱ्या मुलींना असच आयुष्य जगावं लागतं. तुला देखील हेच करावं लागेल. तुझं दुसरं लग्न आहे हे विसरू नको. तुला काही आता राजकुमार मिळणार नाहीये." नंदिनी क्या बोलण्यावर काका चिडून बोलले.


"ठिक आहे. असं असेल तर मी लग्न करणारच नाही. मी खुश आहे अशीच." नंदिनी तनक्यात बोलून आत निघून गेली.


काका नीरजा कडे बघत होते. त्यांची नजर नीरजा ने ओळखली.


"भाऊजी आमच्या सगळ्यांचा निर्णय एकच आहे. उगाच समजावण्याचा प्रयत्न करू नका आणि विषय काही वाढवू नका." नीरजा बोलली.


त्या रात्री काका थांबले पण ते नाराजच होते.

"आलं काही लक्षात तर सांगेल अजून." म्हणत काका निघून गेले.


पुढील भागात बघू अजून काय होणार? नंदिनी लग्नं करेल का? वाचत रहा नवी पहाट



क्रमशः
© वर्षाराज




प्रिय वाचक मित्रांनो ही कथा काल्पनिक नसून सत्य घटनेवर आधारित आहे. ह्यात लिहिले जाणारे प्रसंगाचे वाचनाच्या दृष्टीने नाटकीय रूपांतर केले आहे. तरी कथेतून कोणाला दुखावण्याचा हेतू नाही. कोणी दुखावले गेल्यास क्षमा असावी. ही घटना एका व्यक्तीची आहे. कोणीही वयक्तिक संदर्भ लावू नये. तुम्हाला माझी कथा कशी वाटली. हे नक्की कळवा. तुमचा अभिप्राय लेखकासाठी मोलाचा असतो. पुढे काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा नवी पहाट. आणि लाईक करायला विसरू नका.



 

🎭 Series Post

View all