सुमन...मुलगी म्हणून ती 'नकोशी' च होती. हुशार होती, समंजस होती. पण कौतुकाची थाप कधी तिच्या पाठीवर पडलीच नाही. सावत्र आई, आणि सख्ख्या बापानं माया कधीच लावली नाही.
कधी प्रेमाचे दोन शब्द ही वाट्याला आले तर नशीबच.. दोन भाऊ होते, पण ते ही नावापुरतेच.
श्री कृष्ण,तिचा जिवाभावाचा सखा. तिच्या सुख, दुःखाचा वाटेकरी. सर्व इच्छा,राग,आनंद,सल या भावना केवळ त्या समोरच व्यक्त करता येत.
त्याच्या डोळ्यात तिला प्रेम ,माया दिसे.
त्याच्या भक्तीत ती सर्व जग विसरून जाई.
यथावकाश शाळा संपून सुमनने कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. खूप शिकायचं होतं तिला .पण शिक्षण पूर्ण होण्याआधीच आई बापानं संसाराचा फॉर्म भरून दिला. लग्न झालं. मनावर दडपण आल सासर मात्र मनान, मानान आणि पैशांनी श्रीमंत मिळालं.घरचा व्यवसाय होता. शांत ,समंजस नवरा. सासू सासरे प्रेमळ होते ...आणि काय हवं?
मन समाधानान भरून आल. तिचा आपल्या देवावरचा विश्वास आणखी दृढ झाला .सासू सासरे, आई ,वडील झाले.. आणि नवरा आयुष्याचा नवा सखा ,सोबती.
माहेर केव्हाच मागे पडले.
लग्ना नंतर काही काळातच नवऱ्याचा व्यवसाय जोमाने वाढला. लक्ष्मीचं म्हंटले त्याने सुमनला. वर्षातच गोड बातमी आली.दोन छोटूकली घरात आली. घर आनंदाने, सुखा समाधानाने न्हाऊन निघाले.
दिवस सरत होते..
सारे काही सुरळीत चालू होते. अचानक एक दिवस नवऱ्याच्या अपघाताची वार्ता आली.सगळे घाबरून गेले. तिने श्री कृष्णाला साकडे घातले.
नवऱ्याचा जीव वाचला. पण तो पुन्हा उभ्याने काम करु शकणार नव्हता. कोलमडून गेली ती . पिल्लांना कुशीत घेऊन रडत राहिली..
अखेर सावरली..हिमतीने.
आपल्या सख्या समोर हात जोडून उभी राहिली...भारवल्यासारखी. किती तरी वेळ...कुठल्याशा निर्धाराने मन पेटून उठले. घरासाठी , मुलांसाठी उभी राहणार होती ती.
तिने खूप विचार करून घरचा व्यवसाय पुढे नेण्याचा निर्णय घेतला. तुला व्यवसायातील गोष्टी काय कळणार? हे जमणारच नाही तुला.असे म्हणून दोन्हीं भाऊ यात पडू पाहत होते. मात्र आपल्या विचारांवर ती ठाम होती.
सासू ,सासऱ्यांनी डोक्यावर आशिर्वादाचे हात ठेवले. पाठबळ दिले.
एक वेगळाच आत्मविश्वास तिच्यात येऊ पाहत होता,त्यात नवीन जबाबदारीची जाणीव होती.
आता ती मागे हटणार नव्हती.
आपल्या नवऱ्या कडून सारे शिकून घेताना ती एक वेगळाच आनंद अनुभवत होती. तिचे नवीन जग तयार होत होते .कितीतरी वेळा धडपडली, हरली पण नेटाने लढली. अखेर जिंकली .स्वतः ला सिद्ध केले तिने. व्यवसाय वाढवला..पुन्हा भरभराटीस आला. स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. वागण्या - बोलण्यात आत्मविश्वास आला..तो चेहेऱ्यावर दिसू लागला.
आता मात्र माहेरची माणसे तिचे लाड,कौतुक करू लागली. हवीहवीशी वाटू लागली त्यांना ती. तिने दुर्लक्ष केले. मनाचा कप्पा कधीच बंद केला होता त्यांच्यासाठी..
वर्षे मागे पडली. मुलांची लग्नं झाली.
मुला, सूनांनी व्यवसायात भर घातली. घराचे गोकुळ झाले. मने पुन्हा आनंदाने भरून गेली.. आजवरच्या
कष्टांचे चीज झाले..खूप काही कमावले .गमावले देखील..आता मागे वळून पाहताना तिला पूर्वीची सुमन आठवते. जी खूप वर्षा पासून ती मनाच्या एका कप्प्यात बंद आहे ...
स्त्री आलेल्या परिस्थितीशी धैर्याने सामना करते. संकटात खंबीरपणें उभी राहते.यासाठी तिला केवळ आपल्या माणसांकडून पाठिंबा हवा असतो आणि प्रेमाचे दोन शब्द..