Login

सुखाची अपेक्षा भाग 4

About Happiness

सर्व काही मनासारखे होत होते. हौसमौज, आनंद व सुख सर्व काही मनासारखे!

'सुख म्हणजे नक्की काय असतं? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे आपण जे सुख उपभोगत आहोत तेच तर आहे. आपल्या मनातील इच्छा आपण आपल्या कष्टांनी व हुशारीने पूर्ण केल्या आहेत.
'अंथरुण पाहून पाय पसरावे.'
असे म्हणतात. पण अंथरूण थोडे मोठे केले तर? आणि आपण तेच तर केले. किती दिवस आपल्या मनातील सुखांना व इच्छांना आपण दाबून आयुष्य जगायचे? सर्व सुखांचा उपभोग घेण्याचा अधिकार सर्वांना आहे व आपण तो घेतलाच पाहिजे. हाच तर मनुष्यप्राणी व इतर प्राण्यांत फरक आहे.'

असे कविता व संदीपचे म्हणणे होते. आणि त्यानुसार ते प्रगती करीत होते.
त्यांची सुखाची लालसा वाढत होती. आता राहत्या घरापेक्षा अजून मोठे व सुख सुविधांनी युक्त असे घर घ्यावे, व्यवसायही वाढवावा. या उद्देशाने त्यांनी पुढे उडी घेतली. यासाठी कर्ज घेतले व आपल्या मनातील इच्छा पूर्ण केल्या.

सर्व काही छान सुरळीत सुरू होते. सगळीकडे आनंदी आनंदच होता.

पण सुख जसे सर्व बाजूंनी येते तसेच दुःखही एकदमच येते.

असेच काहीसे कविता व संदीप यांच्या बाबतीत घडत होते.


पैशाच्या अधिक लोभाने त्यांनी शेअर बाजारात खूप सारे पैसे गुंतवले होते. पण अचानक शेअर बाजारात मंदी आली आणि यांचे खूप नुकसान झाले. या धक्क्याबरोबरच अजून एक धक्का त्यांना बसला होता. त्यांनी ज्या नवीन व्यवसायासाठी कर्ज घेतले होते, तो व्यवसाय बुडाला. त्यांची सर्व बाजूंनी कोंडी झाली. घरात टेन्शन वाढले. एकमेकांवर राग व चिडचिड सुरू झाली.

संदीपला वाटत होते,

'आज नोकरी असती तर निदान मिळकत तरी राहिली असती. आता व्यवसायातून जे काही उत्पन्न मिळते आहे ते, कर्जाचा हप्ता भरण्यात जात आहे. आपला राहणीमानाचा दर्जा समाजात कायम ठेवण्यासाठी, तसा घर खर्च इतर गोष्टींचा खर्च तर सुरूच होता.'

'बडा घर पोकळ वासा'

अशी गोष्ट झाली होती. सुखाच्या अपेक्षेने एवढे सारे केले होते आणि ते सुखच आता जीवनात नव्हते.


'आपण कॉलेज जीवनात,
'सुख म्हणजे नक्की काय असतं?'

'चित्ती असावी समाधान'

'आनंदाचे डोही आनंद तरंग'

अशा सुखावरील व आनंदावरील विषयांवर, निबंध लिहून बक्षीसे मिळवली; पण या सर्व गोष्टींचा जीवनात कसा उपयोग करायचा? हे मात्र आपल्याला जमले नाही.'

असा विचार कविताच्या मनात येऊन गेला.

बागेत बसलेल्या कविताला आजपर्यंतचा आपला प्रवास आठवत होता आणि मनात प्रश्न होते
'आपण सुखाच्या अपेक्षेने आजपर्यंत जे केले ते बरोबर की चूक?

सुख म्हणजे नक्की काय असत?'