सुख म्हणजे नक्की काय असतं ?

It's A Experience Of My Beloved Granpraents Love


सुख म्हणजे नक्की काय असतं?

सुख हे नक्की कशात असतं?
छोट्या मोठ्या नातवांचे लाड आजोबाने करणे असते की,
नेहमी लेकीची विचारपूस करणारा हळवा बाप असतो तर मग "तुझं माझं जमेना" करत शेवटी मुलाचा आनंदासाठी झटणारा नाना असतो,तर बायकोचं कोड कौतुक आणि हक्काने चेष्टा करणारा प्रेमळ नवरा असतो...

जेव्हा 45 वर्षांपूर्वी मी या भरल्या घरात लग्नं करून आले तेव्हा ह्या घरात नेहमी आनंद, उत्साह भरभरून वाहत होता मग हा आनंद उत्साह टिकवून ठेवणे हेच माझं एकमेव ध्येय होतं...गेली 45 वर्ष कसं मी शिंदे कुटुंबाला आपलसं करून घेतलं कळालच नाही. सासु सासरे, नवरा ,दिर ,भाऊजाया ,पोरं, पुतणे यांच्यामूळे कधी मी एकटी पडलीच नाही.... पण हा संसाराचा रहाट गाडगा चालवणे एवढं सोप्प नव्हतं..पण अशक्य मात्र कधी नव्हतं कारण सोबतीला होते आमचे हे ...माझं सौभाग्य....यांनी मला, मुलांना , सासू सासर्यांना कधी काही कमी पडू दिलंच नाही...

एस.टी बस डेपो मध्ये दिवसरात्रं कामं करायचे पण एक सुद्धा असा दिवस गेला नाही की त्यांनी आमच्या मुलांना येतांनी काही खाऊ आणला नाही ....मुलांचे लाडके हे " नाना "....जेव्हा जेव्हा घरी येत तेव्हा तेव्हा सगळी चिल्लर पार्टी नानांच्या अवती भवती जमा होयची आणि नाना , नाना करत नानांनी आणलेला खाऊ कधी लंपास करायचे कळतही नव्हते... तरी मी म्हणायचे " तुम्ही मुलांचे फालतू लाड करणं बंद करा नाहीतर मुले मोठी झाल्यावर आपल्या डोक्यावर मिर्या वाटतील " पण त्यावर ते बोलायचे "आहो, पोरं आपली आहेत त्यांना आपण घडवलेले असू त्यामुळे त्यांना आपल्या कष्टांची जाण नक्की असेल"... आज सगळी मुले ,मुली मार्गी लागली.. सगळे आपल्या संसारात व्यस्त झाले पण एकाही मुलीच्या घरून नानांच्या संस्कारावर कोणी बोट नाही दाखवले....


या घड्याळाच्या काट्याप्रमाणे धावणाऱ्या दुनियेत अनेक चढ उतार आले आमच्या संसारात पण, नाना काही डगमगले नाही.. त्यांनी येणाऱ्या प्रत्येक संकटाना त्यांच्या पाठीवर घेतले आणि संकटांची झळ अजिबात एकाही मुलावर नाही येऊ दिली...

नाना प्रमाणे आमचे भाऊजी देखील सगळ्यांचे लाडके मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व... मुलांना आदर्श वाटायचा त्यांच्या काकांचा....कुंदा काकू , सुनील काका म्हणजे माझ्या वाटेला आलेले साक्षात लक्ष्मण आणि उर्मिला यांचा जोडा ... जसं राम आणि लक्ष्मणाच नातं होतं अगदी तसंच नाना आणि अप्पांच एकमेकां विषयी खूप आपुलकी, जिव्हाळा, ओढ होती.... ते दोघे होते म्हणून आम्ही सगळे खूप आनंदात होतो.... या भावंडांच प्रेम इतकं होतं की दोघेही काळाच्या कचाट्यात सोबतच सापडले आणि दोघेही सोबतच वैकुंठाला गेले... आम्हाला परकं केलं दोघांनी, जणू आमचा आधारच गेला असं वाटलं, पण नंतर विचार केला आलेली वेळ टाळता कधीच येत नसते जे होणार आहे ते घडतच ..समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकामध्ये म्हंटलेच आहे की,
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे।
अकस्मात तोही पुढे जात आहे॥
पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते।
म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते।।

पण या परिस्थितीवर आम्ही हतबल झालो तर मुलांना नातवंडांना कोण पाहणार ... आणि वरतून नाना, आप्पा आम्हला असं रडताना पाहून त्यांना आनंद होईल का?..नाहीना?.. मग नाही आता रडत बसणार आम्ही... काय झालं आज नाना आणि आप्पा सोबत नाही तर , त्यांच्या कधीही न संपणाऱ्या आठवणी खूप आहेत आणि त्या दोघांनि दिलेली शिकवण पण सोबतीला आहे ... पण राहून राहून सारखं वाटतं या मनाला की नाना आणि आप्पा आम्हला तुम्ही आजही हवे होता ... अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आम्हला तुमची साथ हवी होती...????


_ समस्त शिंदे परिवार...