प्रत्येकाला आयुष्यात हव ते ध्येय मिळविण्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो. ध्येय प्राप्त करण्यासाठी अंगी चिकाटी, जिद्द असावी लागते. ही कथा आहे एका जिद्दी मुलीची, सीमा तीचे नाव. सीमाचा जन्म एका छोट्याशा गावात झाला. सीमाच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. आई वडील मोलमजुरी करुन पोट भरत असे. सीमाला ५भावंडे होती. सीमा सर्वात लहान होती. सीमाच्या वडीलांना दारुचे व्यसन होते. सीमाला लहानपणापासूनच शिक्षणाची खूप आवड होती. पण तीच्या वडीलांना तिने शाळेत जाऊन शिक्षण घेणे आवडत नव्हते म्हणून सीमाच्या आईने तिला तिच्या मामाच्या गावाला शाळेत प्रवेश घेतला. सीमा मामाकडे राहू लागली. सीमा रोज शाळेत जायची, मन लावून अभ्यास करायची. तिला आईची खूप आठवण यायची पण काय करणार दुसरा पर्यायच नव्हता. सीमाची मामी सीमाचा खूप रागराग करायची. सीमाला सतत धारेवर धरायची. सीमाचा मामा मात्र तीला खूप जीव लावायचा. सीमा अभ्यासात खूप हुशार होती. शाळेत सर्व शिक्षकांची ती आवडती विदयार्थीनी होती. सीमाला शिक्षण घेऊन स्वत च्या पायावर उभे राहायचे होते. सीमाची आई तीला भेटायला २-३ महिन्यातून एकदा यायची. सीमाची मामी तीला नेहमी शिळे पाके अन्न खायला द्यायची. घरातील सर्व कामे करायला लावायची. सीमा गपचूप सगळ सहन करायची. सीमा ४थीत असताना तीच्या मामाचा मृत्यू झाला. सीमाच्या मामीने सीमाला घरात राहण्यासाठी मनाई केली, तीच्या आईला सांगितले की, तुमच्या मुलीला येथून घेऊन जा. दुसरा काही पर्याय नसल्याने नाईलाजास्तव सीमाची आई तीला घरी घेऊन जाते. सीमा तीच्या गावातील शाळेतच जाऊ लागली. शाळा तीच्या घरापासून ३किमी अंतरावर होती, ती पायी चालत शाळेत जायची. वडील रोज रात्री दारु पिऊन येऊन वाद घालायचे, सीमाला व तीच्या आईला मारायचे, त्यांना सीमाचे शाळेत जाणे पटत नव्हते. तरी अशाही परिस्थितीत सीमा अभ्यास करायची. एक दिवस तर कहरच झाला, सीमाच्या वडीलांनी दारुच्या नशेत तीचे सर्व पुस्तके जाळून टाकली आणि सीमाला व तिच्या आईला घराबाहेर काढले. सीमाच्या आईने मन खंबीर केले व सीमाला घेऊन गाव सोडले. तीच्या आईने ठरवले होते की जे आपल्या सोबत घडतय ते आपल्या मुलीच्या बाबतीत घडू द्यायचे नाही, तीला खूप शिकवायचे. सीमा व तिची आई मजल दरमजल करत शहरात पोहचल्या. या अनोळखी शहरात राहणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते. एका हॉटेलच्या मालकाने सीमाच्या आईला काम दिले आणि रहायला जागाही दिली, त्यांच्याच मदतीने सीमाला जवळच असलेल्या शाळेत प्रवेश मिळाला. सीमा मन लावून अभ्यास करु लागली आणि जमेल तशी आईला कामातही मदत करत होती. अशाच रीतीने सीमा मोठी होऊ लागली. सीमा दहावीच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. सीमाची आई खूप कष्ट करायची. सर्व काही सुरळीत चालू होते पण म्हणतात ना नियतीच्या मनात काही वेगळेच चालू असते. सीमा १२ वीत असताना तीच्या आईला कर्करोगाचे निदान झाले. सीमा खूप हादरली होती कारण तीच्या आयुष्यात तीची आई सोडली तर तीच्या जवळच म्हणाव अस कोणीच नव्हते. सीमा कडून आईने वचन घेतले की काहीही झाले तरी शिक्षण सोडायचे नाही. एवढी बिकट परिस्थिती असताना सुद्धा सीमा १२ वीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. थोडयाच दिवसात सीमाची आई हे जग सोडून गेली. सीमाच्या डोक्यावरचे मायेचे छप्पर उडाले होते, सीमा पोरकी झाली होती. सीमाची आई जिथे काम करायची त्या हॉटेल मालकाने सीमाला मदत देऊ केली पण सीमा खूप स्वाभिमानी होती तीने फुकटची मदत नाकारली, ती हॉटेल मध्ये हिशोबाचे काम करु लागली. सीमाने पोलीस भरतीसाठी अर्ज भरला व त्यात तीची निवड झाली. सीमाने सोबतच शिक्षणही चालू ठेवले. सीमाच्या आईची इच्छा आज पूर्ण झाली होती पण हे यश बघायला तीची आई नव्हती.
सीमा प्रमाणेच आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी येतात पण जिद्दीने, धैर्याने परिस्थितीला सामोरे गेलो तर यश नक्कीच मिळते.