स्त्रीत्व भाग ३

Story Of Women Faces Tough Situation
स्त्रीत्व भाग ३
क्रमश : भाग २
रात्रीचे जेवण झाल्यावर संगीता आणि स्पृहा दोघी किचन आवरून भांडी घासत होत्या . एक जण घासायची आणि एक जण धुवून घ्यायची ..
संगीता " स्पृहा .. कसला विचार करतेय बाळा .. काही प्रॉब्लेम आहे का तुला ? असेल तर वेळेत सांग ? काही लपवून नको ठेऊस "
स्पृहा " लपवेल कशाला मी आई ? काही पण असते तुझे ?"
संगीता " मला फक्त हेच सांगायचंय कि जे काही आहे ते मनात ठेवू नकोस .. वेळ आहे तर सांगून टाक ? तू घरी येई पर्यंत जिवात जीव नसतो माझ्या ? हल्ली चे दिवस कसे आहेत ? आपण आपले सावधान सतर्क असेलेले चांगले "
स्पृहा " आई .. निहारिका आणि सागर असतात ना माझ्या बरोबर .. अशी कुठे मी एकटी जातेय .. आणि आम्ही ज्या ट्रेन चे जातो ना त्या लेडीज डब्ब्यात तर किती जणी ओळखीच्या झाल्यात .. असे वाटतं एक फॅमिलीच बरोबर असते जाता येताना "
संगीता " हमम .. ठीक आहे .. जा आता .. हि राहिलेली मी उरकते .. तू आजीच्या पायाला तेल लावून दे "
स्पृहा ने हात धुतला आणि काश्याची वाटीत तेल गरम करायला घेतले .. कोमट तेल घेऊन आजीच्या पायाला लावायला गेली
आजी " स्पृहा .. आलीस का ? झाली का भांडी ?"
स्पृहा " होत आलीत .. आई म्हणाली तू जा म्हणून मी आले "
आजी " स्पृहा एक गोष्ट लक्षात ठेव बाळा .. स्त्रीने स्त्री चे स्त्रीत्व टिकवून ठेवल पाहिजे ?"
स्पृहा " आजी म्हणजे काय ?"
आजी " अग बाळा .. देवाने ना बनवताना आपल्या ला स्त्री बनवले याच्या इतके भाग्य नाही .. स्त्री ने जोपर्यंत तिचे स्त्रीत्व जपून ठेवलय ना तोपर्यंत हे जग आहे .. "
स्पृहा " आजी तू ना काय बोलतेस कधी कधी मला संमजतच नाही "
आजी " हे बघ .. स्त्री म्हणजे एक नदी आहे .. नदीचे पाणी गोडं पाणी असते .. प्यायलं कि शांत वाटतं .. बघितले कि छान वाटते .. नदीच्या पाण्यावर शेती होते .. सुंदर असते .. शीतल असते .. पवित्र असते .. संथ वाहत असते . ठेहराव असतो .. तेच पुरुषत्व म्हणजे समुद्र .. खाऱ्या पाण्याचा असतो तो .. खळखळ असते .. उसळणाऱ्या लाटा असतात .. स्वभावच तसा असतो कधी रौद्र रूप धारण करेल सांगू नाही शकत .. समुद्राचे पाणी नदीत नाही येऊ शकत .. तशी रचनाच नाहीये सृष्टीची .. पण नदीला ओढ असते ती समुद्राची .. कुठून कुठून वाहत जाऊन नदी समुद्रला मिळते .. एक जीव होऊन जाते आपले अस्तित्व विसरून जाते ..
पण बघ हा उद्या जर समुद्राचे पाणी उलटे फिरले आणि नदीला मिसळले तर तर काय होईल माहितेय ? जगाचा विनाश होईल .. ईश्वरीय रचनाच तशी आहे बाळा .. तुम्ही म्हणता ना स्त्री पुरुष समानता .. हि समानता होऊच नाही शकत बाळा . तशी रचना आहे "
स्पृहा ला आजीचे हे सगळे विचार फार जुने आणि बुरसटलेले वाटत होते ..
स्पृहा " आजी .. अग मुली चंद्रावर गेल्यात .. कोणत्याही क्षेत्रांत मागे नाहीयेत .. "
आजी " हो मग .. आहेच स्त्री हि शक्तीच आहे .. प्रतेय्क स्त्री हि आदिशक्तीचा अवतार आहे "
स्पृहा ला आता हसायलाच येत होते
स्पृहा " आजी .. गुड नाईट .. झोप आता .. बाकीचे आपण उद्या बोलू "
-----------------------------------
रागिणी प्रसाद ची वाट बघत बघत सोफ्यावरच झोपली होती .. आज डिनर पण राहिले तिचे .. घड्याळात बघितले तर रात्रीचे १२ वाजले होते .. तिने काळजीने प्रसाद ला कॉल केला
रागिणी " हॅलो .. अरे प्रसाद .. कुठेय आहे तू ? कसा आहेस ? १२ वाजून गेले अजून आला नाहीस घरी ?"
प्रसाद " हॅलो "
\" हॅलो \" वरूनच तिला कळले कि हा ड्रिंक्स घेतोय
प्रसाद " हॅलो .. तू .. तू झोपली नाहीस अजून ? तू झोपून जा.. मी येईन माझी पार्टी संपली कि "
रागिणी च्या डोळ्यांत पाणी तरळले
सकाळी आठ वाजताच घरातून ती बाहेर पडते .. घरी येई पर्यंत संध्यकाळचे ७ वाजतात .. लग्न होऊन आज महिना झाला .. एकेमेकांना बघायला ,भेटायला सुद्धा होत नव्हते.. त्यात हा असा मुद्दामून उशिरा यायला लागला .. रात्री रागिणी झोपून गेली कि यायचा आणि ती सकाळी निघून गेली कि उठायचा .. त्यामुळे काही खास असे बोलणे पण होयचं नाही ..
आज तरी निदान .. पण नाहीच ..
फोन कट करून भरल्या डोळ्यांनी स्वतःला आरशात बघू लागली .. काय कमी आहे माझ्यात ? का माझा नवरा मला अशी वागणूक देतो ? माझे काय चुकलंय ? काही पटत नसेल तर मला सांगायचं ना .. मी बदल केला असता .. पण का ? मी का बदलू मला ? कारण नसताना मला त्रास देण्याचा अधिकार ह्याला कोणी दिला ?नव्हतं लग्न करायचं तर मी काय मागे लागले होते का ? नकार द्यायचा ना ? स्वतःच्या आई बाबांच्या समोर तोंड उघडायला घाबरतो आणि मला उगाच छळतोय ..
असा मनात विचार करत करत तिने साडी बदलली .. नाईट ड्रेस घातला .. तोंडावर गार पाण्याचे हबके मारले .. आणि सरळ स्वतःला ताट वाढून घेतले .. आणि रागा रागात जेवली ..
मनात काय आले माहित नाही मोबाईल वर मेसेज टाकला प्रसादला
"हॅलो प्रसाद .. हे आजच शेवटचं .. उद्या संध्याकाळी ७ वाजता जर तू घरी आला नाहीस तर हे घर तुझ्यासाठी बंद .. आता जिथे कुठे आहेस तिकडेच कायमचा राहिलास तरी चालेल .. डिवोर्स पेपर मी साईन करून देईन .. लवकर पाठव आणि मोकळा हो आणि मला मोकळी कर .. हेच तुला माझ्या करून आपल्या लग्नाच्या पहिल्या महिन्याच्या अनिव्हर्सरी चं गिफ्ट "
रडत रडत बेड वर झोपून गेली.
-------------------------------------
सागर आणि निहारिका रोज संध्यकाळी राऊंड मारायला बाहेर जायचे तसे बाहेर पडले .. त्यांच्या घरा जवळच्या मंदिरात संध्याकाळच्या आरतीला एकत्र जायचे .. आजू बाजूची बरीच लोक त्या आरतीला यायची ..टाळ मृदूंगाच्या आवाजाने छान गणपती बाप्पाच्या आरत्या झाला कि प्रसाद घेऊन हे दोघे मंदिराच्या बाहेर पाणीपुरीच्या गाड्या असायच्या तिथे रोज पाणीपुरी . भेळ , दाबेली पैकी काहीतरी खायचे ..
निहारिकाच्या अखंड गप्पा चालू असायच्या आणि सागर फक्त ऐकत असायचा .. तिच्या मनात येणारा प्रत्येक विचार ती सागरला सांगायची .. तिची स्वप्न .. तिचे करिअर .. तिच्या भावना .. सगळे सगळे बोलायची .. जीवा भावाचा मित्र होता तो तिचा .. तिच्या दृष्टीने अजून तरी निखळ मैत्रीचं होती .. लहान पणा पासून एकत्र शाळेत गेले .. आता कॉलेजला जात होते .. संध्याकळी गणपती आरती हे असे रुटीन गेले कित्येक वर्ष दोघे एकत्र करत होते.
सागरच्या मनात मात्र निहारिका कायमचं घर करून बसली होती आणि आता तिला कायमची घरी कधी आणि कशी आणायची यावर तो विचार करत होता ..
सागरच्या वडिलांचा स्वतःचा स्मॉल स्केल बिझनेस होता.. आधी सायकल वर .. मग टू व्हीलर आणि आता फोर व्हीलर पर्यंत असे हळू हळू सेटल होत गेले .. सागर त्यांचा एकुलता एक मुलगा आणि जे काही आहे ते आता सगळे मुलालाच सांभाळायचं आहे त्यामुळे सागरची लाईफ सेटल होती .. रो हौस टाईप घर होते .. आई शिकलेली बाबांना बिझनेस मध्ये मंदत करायची ..ऑफिसचे सगळे अकाऊंट्स त्याच बघायच्या .. फक्त योग्य वेळेंची तो वाट बघत होता ..
दोन पोनी बांधून फिरणाऱ्या निहारिका पासून तो तिला बघत होता आणि तिच्या आजू बाजूला कोणाला फिरकूच दिले नाही त्याने .. आता MBA झाले कि लग्न मग जसा आई आणि बाबांनी दोघांनी मिळून बिझनेस वाढवला .. सांभाळला तसा मी आणि निहारिका दोघे मिळून सांभाळू हेच त्याचे स्वप्न .. आता सत्यात उतरण्याच्या अगदी जवळ आले होते
निहारिकाने एक पाणीपुरी तोंडात टाकली .. आणि तोंडात घास असतानाच ती बोलली
निहारिका " सागर .. मी ना दिल्ली युनिव्हर्सिटी ला PHD साठी अप्लाय केलंय .. बघूया माझे सिलेक्शन होते का ? मी पाठवलेला इनिशियल रिसर्च पेपर जर सिलेक्ट झाला ना तर किती मज्जा येईल ना .. आय एम जस्ट वेटिंग फॉर दयाट "
सागरच्या तोंडात त्याने घातलेली पाणीपुरी त्याच्या घशातच अडकली
सागर " व्हॉट ??? हे काय ? आणि कधी ठरले ? तू आधी काहीच कधीच बोलली नाहीस "
निहारिका " तुला मी म्हटले ना .. मला ना असे घरा पासून लांब हॉस्टेलला वगैरे कधी जायला मिळालेच नाही .. कसली भारी लाईफ असते ना हॉस्टेल वर राहून शिक्षण घेणाऱ्यांची .. आणि आता मला हा चान्स मिळणार आहे .. सागर " अरे .. निहारिका .. दिल्ल्ली .. इट्स फार अवे .. शिवाय नॉर्थ साईडला थोडे कल्चर वेगळे आहे ग ? दिल्ली कशाला ? इकडे महाराष्ट्ट्रात बघ ना "
निहारिका " सागर .. प्लिज .. तू पण आता पप्पांसारखा बोलू नकोस .. यार इट्स कॅपिटल सिटी .. किती मस्त आहे .. मला जायचंय ना तिकडे .. सागर तू बोल ना पप्पांशी .. पप्पा ऐकतात तुझे ?"
सागर " मी स्वतःच नको म्हणतोय .. पप्पा बरोबर सांगतायत .. हे बघ .. महाराष्ट च्या बाहेर नाही जायचं .. "
निहारिका " सागर .. मुली बाहेरच्या देशांत एकट्या जाऊन शिकतायत .. आणि मी साधे दिल्ली ला नाही जाऊ शकत का ?आणि तू पण असा विचार करणारा असशील असे वाटले नव्हते .. "
बोलता बोलता दोघे पाणी पुरी वाल्याचे पैसे देऊन घराकडे निघाले
आज पहिल्यांदाच कोणत्या तरी विषयावर डिसअग्रीमेंट झाले होते दोघांचे .. सागर खूपच अस्वथ झाला होता .. तिच्या डोळ्यांत दिल्लीला जायची भूख त्याला स्पष्ट दिसत होती जे कि त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने चांगली नव्हती.

🎭 Series Post

View all