स्त्रीशक्ती

आम्ही मुलगा मुलगी समान मानतो असे म्हणणारे, आपली मुलगी सातच्या आताच घरात आली पाहिजे असा अट्टाहा

नमस्कार ईरा वाचक आणि लेखक मित्र मैत्रिणींनो...
स्त्रीशक्ती या विषयावर आपल्याच लेखक मित्र मैत्रिणींनीं खूप छान सुंदर व्हिडिओज बनवले.
मीही स्वतःला रोखू शकलो नाही आणि एक छोटासा लेख लिहिण्याचा मी प्रयत्न केला.
तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा करतो.


        लहानपणापासून आपण ऐकत वाचत आलो. कि, स्त्री हि आदिशक्तीचे रूप आहे. तिचा आदर केला पाहिजे. सन्मान केला पाहिजे. पण आपण जरा डोळसपणे आपल्या आजूबाजूला पाहिलं तर, खरंच असं घडताना दिसतं का? घरामध्ये एखादा निर्णय घेताना खरंच स्त्रियांच्या मताचा विचार केला जातो का? अजूनही पुरुषप्रधान संस्कृतीच्या नावाखाली स्त्रियांचे अधिकार, मतं डावलली जातात. स्त्री आणि पुरुष संसाराच्या गाड्याची दोन चाकं म्हणतात. पण खरंच स्त्री नावाच्या त्या चाकाला तेवढं महत्व देतो का हो? खरं सांगायचं तर, संसाररूपी गाडा स्त्रीच तर तोलून धरत असते.

        आम्ही मुलगा मुलगी समान मानतो असे म्हणणारे, आपली मुलगी सातच्या आताच घरात आली पाहिजे असा अट्टाहास करतात. मुलांनी कधी यावं, कधी जावं, कुठेही जावं. यावर बंधनं नाहीत. मुलींच्या बाबतीतच का? मान्य आहे कि, समाजात असणाऱ्या काही विकृत नराधमांच्या नजरेतून स्त्रीचं रक्षण केलं पाहिजे. पण त्याची सुरुवात आपल्या घरातूनच का होऊ नये. आपल्या मुलांना चांगले संस्कार देण्याची जबाबदारी पालकांची असू नये का? कि पुरुष आहे म्हणून त्याला सगळ्या सवलती!

        आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. आपलं वेगळं अस्तित्व दाखवून देत आहेत. स्त्री हि पुरुषापेक्षा कमी नाहीये किंवा दोघेही सामान आहेत. हे वेळोवेळो का सिद्ध करावं! जागतिक महिला दिन साजरा करण्याची गरजच का पडावी! एकीकडे स्त्री शक्ती आहे म्हणायचं आणि दुसरीकडे स्त्री हि लाचार आहे, दुबळी आहे, तिचं रक्षण केलं पाहिजे! हा दुटप्पीपणा का? कशामुळे? मुलींनी महिलांनी कोणते कपडे घालावे किंवा तिच्या कपड्यांवरून तिचं शील का ठरावं?

        पालकांनीही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आपल्या मुलांवर चांगले संस्कार तर झालेच पाहिजेत. त्या बरोबर आपल्या मुलींना कराटे आणि कुस्तीचे धडे लहानपनापासूनच मिळाले पाहिजेत याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपली मुलगी एवढी कणखर असायला हवी कि, समोर येणाऱ्याला आडवं करण्याची धमक तिच्यामध्ये असली पाहिजे.

          संसाराबद्दल बहिणाबाई चौधरी यांची एक खूप सुंदर, आणि विचार करायला लावणारी कविता आहे. वेळ मिळाला तर नक्की वाचा.

अरे संसार संसार । नाही रडणं कुडनं ।
येड्या गळ्यातला हार । म्हणू नको रे लोढणं ।

लेखक शिक्षिका सौ. गीताताई सूर्यभान यांच्या सुंदर ओळी,

जागव तुझे स्त्रीत्व... सोडून दे हा मत्सर...
जागव तुझी शक्ती... सोडून दे हि ईर्षा...
फक्त कधी कुठल्या स्त्रीची,
होऊ नकोस तू वैरी...
होऊ नकोस तू वैरी...

तसेच त्यांचा स्त्री शक्ती या विषयावर असलेला तेवढाच सुंदर विडिओ नक्की बघा.
https://www.facebook.com/581606972323826/posts/1076996162784902/?sfnsn=wiwspmo&d=n&vh=e

धन्यवाद...

जय जिजाऊ ...
जय शिवराय...
जय शंभूराजे...

~ ईश्वर त्रिंबक आगम