गोष्ट भागाकाराची

Story Telling The Fun Of Division
एका गावात दोन भाऊ राहत होते. थोरला होता सतरा-अठरा वर्षाचा, दशमान आणि धाकटा होता दहा-अकरावाचा गुणवान. दशमान गणितात अगदी पक्का होता. मोठ-मोठ्या बेरजा-वजाबाक्या तो अगदी चुटकीसरशी सोडवी. व्यवहारातही मोठ- मोठाले हिशोब तो अगदी तोंडी सोडवी. पण लहाना गुणवान मात्र गणितात अगदीच कच्चा होता. साध्या-साध्या बेरजा वजाबाक्या त्याला अजीबात जमत नव्हत्या.
त्या दोन्ही भावांचे आई-वडील त्यांची वडीलोपार्जीत दोन एकर शेती कसुन स्वतःचा आणि आपल्या मुलांचा कासातरी सांभाळ करत होते. मोठ्या मुलाची गणितातील गती आणि अभ्यासवृत्ती बघुन त्याच्या वडीलांनी दशमानला दहावी नंतर तालुक्याच्या गावी शिकण्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला, परंतु लहान्या गुणवानसाठी मात्र त्यांना नेहमीच घोर लागुन राही.

गुणवानला अभ्यासात अजीबात रुची नव्हती. शाळा ,गृहापाठ, परिक्षा अशी नावं ऐकली की त्याला कापर भरे. दिवसभर तो गावभर खेळत राही. कधी वीटी-दांडु , कधी कंच्या, कधी धाबा- धुबी , कधी लपा- छपी खेळे. गावाच्या मुलांना एकत्र करून सांघीक खेळ खेळायला गुणवानला फार आवडे. गुणवान आता दहा वर्षाचा झाला होता‌, परंतु शाळा आणि अभ्यासाचं तो अजीबात नाव घेत नसे त्यातच महामारीची साथ झाली आणि दशमानचे आई- वडील त्या महामारीत देवाघरी गेले आणि दोघेही भाऊ अनाथ झाले.

आई-वडील गेल्यामुळे घराची , शेतीची आणि गुणवानची सगळी जबाबदारी दशमान वर आली होती. शेतीतून मिळणारे उत्पन्न हा अगदीच तुटपुंज असल्याने , दशमान गावच्या पाटलाच्या शेतीचा हिशेब लिहून द्यायला पाटलाकडे जाऊ लागला. घरातली सगळी कामं दशमान करायचा. झाड -लोट , धुणी - भांडी, सकाळचा चहा पण , स्वयंपाक मात्र त्याला फारसा जमत नसे. त्याने स्वतःची ही अडचण आणि भुकेमुळे होणारे हाल एकदा पाटलाला सांगितले.

दशमान - "मालक तुम्ही मला तुमच्या घरी हिशोबाचे काम दिलं त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. पण माझी एक अडचण आहे , मला स्वयंपाक अजिबात बनवता येत नाही त्यामुळे, माझी आणि गुणांवाची काही दिवसापासून उपासमार होते आहे. आमच्या जेवणाची व्यवस्था जर तुम्ही कुठे करून दिली तर तुमचे फार उपकार होतील.

पाटील - "अरे एवढीशी गोष्ट सांगायला एवढा घाबरतोस कशाला एक काम कर आजपासून तू आणि गुणवान सकाळी वाड्यावरचं जेवत जा! पाटलीण बाई ऐकलत का? आजपासून दशमान आणि गुणवान सकाळी आपल्या वाड्यावरचं जेवतील बरं का!"

पाटलीण बाई -"बरं बरं ठीक आहे! दशमान इतके दिवस उपासमार सहन करण्यापेक्षा मला एका शब्दाने तरी सांगायचं होतं ना! आता आजपासून सकाळी वाड्यावरचं जेवत जा , काही हवं नको असेल तर आपलेपणाने सांग हो!"

दशमान - "तुमचे खूप खूप आभार पाटलीन बाई मी जातो आता हिशेब लिहायला."


पाटील मनानं फारच चांगला माणूस होता आणि पाटलीण बाई सुध्दा, त्यामुळे दशमान आणि गुणवानची सकाळची जेवणाची सोय पाटलाच्या वाड्यावर झाली, तरी रात्रीच्या जेवणाचा प्रश्न होताच.

मोठ्या दशमानचा मनमिळाऊ स्वभाव , सगळ्यांना मदत करण्याची वृत्ती ,आणि समजूतदारी बघून त्या गावातले सगळेच गावकरी त्या दोघा भावांना सर्वतोपरी मदत करायचे. त्यामुळे रात्रीच्या जेवणाची दोन्ही भावांची व्यवस्था कुठे ना कुठे नक्की व्हायची.


रात्रीच्या जेवणा करता ज्या गावकर्‍याने बोलावले असेल त्याच्याकडे दशमान गुणवानला पाठवून देई. रात्री जे काही खायला मिळेल त्याचा अर्धा वाटा किंवा अर्धा हिस्सा दशमान , गुणवानला देऊन टाकी. कधी दोन भाकरी मिळाल्या तर एक भाकर स्वतः ठेवून एक गुणवान ला देत असे. तर कधी पानगे मिळाले तर अर्धे पानगे गुणवानला देई. एखाद्याने अंगणातली फळ दिली तर जितकी फळ असतील त्याच्या अर्धी फळ तो गुणवानला देई. म्हणजे केळी किंवा आंबे किंवा पेरू काहीही मिळू देत दशमान अर्धा वाटा गुणवानला देऊन टाके.

रोज रात्रीच्या अनुभवावरून गुणवानही हे समजून चुकला की, रात्रीच्या जेवणात काहीही मिळाले तरी अर्धा वाटा दादा आपल्याला देणारच.

दिवसामागून दिवस जात होते . दशमानला घरकाम , पाटलाच्या शेतीचा हिशेब , आणि घरची शेती यातून अभ्यासाकरिता वेळच मिळत नव्हता. दशमानला पुढे खूप शिकायचे होते . मोठा सनदी अधिकारी बनून आपल्या दिवंगत आई-वडील आणि गावाचे नाव मोठे करायचं होते. दशमानची हे अभ्यासाविषयीची तळमळ पाटील जवळून पहात होते. आणि त्यांनाही मनापासून वाटे की दशमानने पुढे खूप शिकावे आणि गावाचे नाव मोठे करावे. म्हणूनच पाटलांनी दशमानचे नाव तालुक्याच्या कनिष्ठ महाविद्यालयात घातले होते. तिथल्या प्राचार्यांशी बोलून दशमान ला घरूनच परीक्षा देण्याची परवानगीही मिळवली होती.


पाटील - " दशमान मला माहिती आहे की, तुला शिकून खूप मोठे व्हायचं आहे .आपल्या गावाचं आणि तुझ्या आई वडिलांचे नाव मोठं करायचं आहे म्हणूनच, मी तुझं नाव तालुक्याच्या कनिष्ठ महाविद्यालयात घालून आलो आहे, आणि तिथल्या प्राचार्यांनी तुला घरून परीक्षा देण्याची मुभा ही दिली आहे. त्यामुळे तुला आता रोज तालुक्याला कॉलेज करता जावे लागणार नाही."

दशमान - "मालक तुमचं माझ्यावर आभाळाएवढे उपकार झाले तर मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहीन."

पाटील -"बरं बरं आता तू आणि गुणवान जेवून घ्या दुपार केव्हाच टळली आहे."

दशमान रोज रात्री स्वतः अभ्यास करे आणि सोबतीला आपल्या लहान भावाला गुणवान लाही घेऊन बसे. पण गणितात गुणवानचे अजिबात लक्ष लागत नव्हते. रोज न चुकता पाढे लिहूनही गुणवान गुणाकार - भागाकार चुकवीत असे.

गणितातली आपल्या लहान भावाची ही सुमार प्रगती बघून दशमान मात्र काळजी पडे, तर कधी कधी तो गुणवान ला रागे ही भरे.

दशमान - "गुणवान झाले का पाढे पाठ? चल बरं सतराचा आणि नवाचा पाढा म्हण."

गुणवान -" दादा मी रोज पाढे लिहितो, पण मला सातचा आणि नवाचा पाढा अजिबात लक्षात राहत नाही . खूप प्रयत्न करतो मी पण, काय करू हे दोन्ही पाढे मी विसरुन जातो."

दशमान -"बरं एक काम कर , तू दिवसभर घेळतो ना ! तर रोज तू एक पाढा पाठ कर आणि खेळता-खेळता जमिनीवर , भिंतीवर, मंदिराच्या पारावर जिथे जागा मिळेल तिथे पूर्ण पाढा लिहून काढ."

गुणवान -"अरे वा दादा छान युक्ती सांगितली मी आता असंच करेन आणि पाढे पाठ करीन."

गुणवानला दादाची कल्पना खूपच आवडली आणि दिवसभर खेळता-खेळता तो पाढे पाठ करू लागला . त्याला दहा पर्यंत पाढे पाठ करायला तब्बल दोन महिने लागले पण गुणवान आता पाढे मात्र अगदी न चुकता लिहू लागला होता.

दशमान -"गुणवान आता दहा पर्यंत पाढे तू छान पाठ केले आहेस . चल आज मी तुला भागाकार शिकवतो. भागाकार म्हणजे मोठ्या संख्येला दिलेल्या लहान संख्येने लहान संख्येच्या पटीत कमी करणे ."

(खरेतर दशमान चे बोलणे आणि भागाकार हे गुणवानला काहीच कळले नाही. पण तरीही त्याने केवळ होकारार्थी मान डोलावली.)

गुणवान जेव्हा आपण एखाद्या संख्येला दोनने भाग तो तेव्हा आपण त्या संख्येचे अर्धे करीत असतो. म्हणजे बघ रात्री जेवणात काही मिळाले तर मी तुला अर्धे देतो म्हणजेच मी मिळालेल्या वस्तूला दोनने भागतो.


दशमानचे हे बोलणे ऐकता ऐकता गुणवान कधी झोपला हे गुणवान ला स्वतःला आणि दशमान दोघांनाही कळलेच नाही.

दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा होता. पाटलांना काहीतरी काम होते म्हणून ते आणि पाटलीण बाईची आई आजारी असल्याने त्याही भल्या सकाळीच तालुक्याला निघून गेल्या. सणाचा दिवस आणि पाटील घरी नाही दशमानला कसेतरीच वाटले पण त्याने दिवसभर पाटलाचा हिशेब लिहिला आणि संध्याकाळी तो घरी परतला.

सकाळपासून घरचं ,शेतीचं काम करुन आणि पाटलाच्या शेतीचा हिशेब लिहून दशमान फार थकून गेला होता. भुकेने त्याच्या पोटात कावळे ओरडत होते. पण त्याचा नाईलाज होता. दशमान मुळातच स्वाभिमानी स्वभावाचा होता, त्यामुळे त्याने गावात कुणालाच काहीच खायला मागितले नाही , संध्याकाळी मात्र जेव्हा रामू , गणू , विनू आणि भागाबाईने जेव्हा जेवणा करता बोलावले तेव्हा त्याने गुणवानला लगेच त्यांच्याकडे पाठवले.

सणाचा दिवस असल्याने सगळ्यांनीच गुणवान ला चार- चार साटोऱ्या दिल्या.( साटोऱ्या म्हणजे मैद्याच्या आवरणात खारीक, खोबरं, काजू मनुके यांचा चुरा भरून केलेली गोड पुरी.)

दशमान प्रमाणेच गुणवान ही दिवसभराचा उपाशी होता. त्यामुळे त्याला मिळालेल्या साटोऱ्यांकडे गुणवान अगदी आधाश्या शांत नजरेने बघत होता. रस्त्याने चालता चालता गुणवानने त्या साटोऱ्या मोजल्या त्या होत्या सोळा. गुणवानने मनाशी विचार केला

गुणवान -"घरी गेल्यावर नाहीतरी दादा मला अर्धा वाटा देणारच आहे , त्यामुळे मी माझा अर्धा वाटा आत्ताच खाऊन घेतो." आणि गुणवान ने आठ साटोऱ्या फस्त केल्या.

साटोऱ्या खरंच खूपच रुचकर होत्या त्यामुळे, उरलेल्या आठ साटोऱ्यांकडे पाहून गुणवानला त्या आठ साटोऱ्यातील अर्धा वाटा खावासा वाटला, आणि त्याने चार साटोर्‍या खाल्ल्या. आता त्याच्या हातात केवळ चार साटोर्‍या उरल्या होत्या, गुणवानला अजूनही थोडी भूक होतीच म्हणून, त्याने उरलेल्या चार साटोऱ्यातल्या दोन साटोऱ्या खाऊन घेतल्या. आता गुणांच्या हातात केवळ दोनच साटोऱ्या बाकी होत्या आणि घरही जवळ आलं होतं. त्यामुळे इच्छा असूनही गुणवान येत्या दोन साटोऱ्या खाल्ल्या नाही आणि तो घरात गेला.

दशमान -"काय रे आज घरी यायला एवढा उशीर? आणि या सणाचा दिवस असूनही तुझ्या हातात केवळ दोनच साटोऱ्या?"

गुणवान -"दादा तू म्हणाला होतास ना की, एखाद्या संख्येला दोन ने भागणे म्हणजे त्याचे अर्धे करणे, मला सोळा साटोऱ्या मिळाल्या होत्या, खूप भूक लागल्याने मी अर्ध्या खाल्ल्या राहिल्या आठ , पण मला अजूनही भूक होती मग मी अजून खाल्ल्या राहिल्या चार, तरीही माझ्या पोटात थोडीशी भूक होतीच म्हणून मी अजून अर्ध्या खाल्ल्या राहिल्या दोन, आता ह्या दोन साटोर्‍यातला माझा अर्धा हिस्सा मला पाहिजे आहे ".

असं म्हणून गुणवानने उरलेल्या त्या दोन साटोऱ्या पैकी एक साटोरी खाल्ली आणि दशमानला मिळाली केवळ एक साटोरी.

त्या दिवशी दिवसभर उपाशी राहून सुद्धा त्या एका साठविणे दशमान पोट लगेच भरलं कारण दोन ने भागणे म्हणजे दिलेल्या संख्येचे अर्धे करणे हे आज गुणवानला खूप चांगल्याप्रकारे कळलं होतं आणि समजलं होतं.




समाप्त


****************************"*****************


सदर कथा ही एक काल्पनिक कथा असून या कथेतील घटनांचा आणि पात्रांचा वास्तवात कोणाशीही कुठलाही संबंध नाही तसा तो आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.


सदर कथा राखी भावसार भांडेकर यांनी लिहिलेली असून या कथेचे सर्व हक्क लेखीकेकडे सुरक्षित आहेत.


वाचकांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्की कळवा तुमच्या अभिप्राय यांच्या प्रतीक्षेत.