आपण मागील भागात पाहिले की साधना सुमनच्या दोन्ही मुलींना एका बागेत बोलावते.. दोघीही तिथे जातात.. तिथे साधना त्या दोघींना समजावून सांगते.. सुमनच्या मुली सुरूवातीला तयार होत नाहीत.. पण नंतर त्यांना साधनाचे म्हणणे पटते.. आता पुढे..
प्रिया आणि सेजल घरी जातात.. आणि साधना ऑफिसला जाते.. साधना ऑफिसला गेल्यावर सुमन तिच्याशी बोलत नाही.. साधना पण समजून घेऊन गप्प राहते.. त्यादिवशी सगळं शांतच वातावरण पसरले होते.. ऑफिस सुटल्यावर सगळे घरी जातात..
सुमन घरी आल्यावर तिच्या मुली तिला समजावतात.. ते पाहून सुमनला समजेना की यांना आता काय झालं??
"आई, तुला खूप दिवसांपासून एक सांगायचं होतं ग.." प्रिया
"बोल ना.. काय झालंय??" सुमन
"आई, तू आमच्यासाठी खूप काही केलंस ग.. तू आम्हाला आईबाबा दोघांचे प्रेम दिलेस.. तू सारं काही आमच्यासाठी केलंस.. कशाचीही कमतरता भासू दिली नाहीस.. पण तरीही एक कमी आम्हाला कायम भासली ग.." प्रिया
"कोणती ग??" सुमन
"हे बघ आई, तू वाईट वाटून घेऊ नकोस.. पण आम्हाला बाबांची कमी भासली ग.. शाळेत असताना एखादी मैत्रीण जर तिच्या बाबांबद्दल सांगू लागली तर मला वाटे, माझे पण बाबा असते तर मी पण त्यांच्या बद्दल सांगितले असते.. मी शाळा, काॅलेजमध्ये असताना मला वडील नाहीत ते वारले आहेत असे कधीच सांगितले नाही ग.. कारण जर तसे सांगितले तर सहानुभूती मिळत असे.. ती मला नको होती.. काहींना नंतर आपोआप कळाली तेव्हा मी न सांगितल्याबद्दल ते खूप नाराज झाले..
जर देवाने मला विचारलं असतं की ‘तुला काय पाहिजे माग’ तर मी मागितल असत की ‘माझ्या लग्नात फक्त एकदा माझ्या बाबांना भेटू दे.. मला सासरी जाताना एकदाच त्यांच्या मिठीत जाऊन भरपूर रडायचे आहे..’
एखाद्या मैत्रिणीच्या लग्नाला गेले तर तिच्या बाबांकडे बघून मला सारखं वाटायचं की.. माझ्या लग्नात माझे बाबा येतील का? असेच मायेने, प्रेमाने मला कुशीत घेऊन डोक्यावर हात ठेवतील का?" असे म्हणून प्रिया रडू लागली.. अगदी तिला रडताना हुंदकाच आला..
प्रिया रडताना सुमन आणि सेजल सुध्दा रडू लागले..
"मी नाही करू शकले.. माझं चुकलं.. मी तुम्हाला बाबांचं प्रेम देऊ शकले नाही.. मी खूप प्रयत्न केले.. पण मला यश आले नाही.. खरंच मुलांना आईबाबा दोघांचे प्रेम मिळणे गरजेचे आहे.. माझाच मोठा आत्मविश्वास होता की बाबा बनून तुम्हाला बाबांचं प्रेम देऊ शकेन.. पण मी साफ चुकले.. मी नाही तुमचा बाबा बनू शकले.. मला माफ करा.." असे म्हणून सुमन रडू लागली..
"नाही ग आई, तुझं काहीच चुकलं नाही.. तू तर खूप प्रेम दिलेस.. आम्हाला बाबांची आठवण येऊ दिली नाहीस.. तशी कधीच कमतरता भासली नाही ग.. पण इतर मुलींचे बाबा बघून थोडी आठवण यायची.. तू तर ग्रेट आहेसच ग आई.. एकटीने इतकं सगळं करायचं म्हणजे धाडसच लागत.. पण इथून पुढे तू एकटी कसं करणार ग??" प्रिया
"कसं म्हणजे?? आतापर्यंत केले तसंच.." सुमन
"अगं म्हणजे आता आम्ही लग्न करून सासरी गेल्यावर तुला कोण सोबत??" प्रिया
"कोण कशाला हव?? तुम्ही अधूनमधून यालच की.." सुमन
"हो आम्ही येऊच ग.. पण म्हातारपणात साथ ही हवीच ग.. कुणीतरी बोलायला आपल्याला समजून घ्यायला.. एकटीने म्हातारपण घालवण खूप अवघड ग.. आम्ही कायमचं इथे तुझ्यासोबत असतो तर गोष्ट वेगळी होती.. पण आम्ही पण लग्न करून गेल्यावर तुला खूपच अवघड जाणार ग.. आम्हाला तुझी काळजी वाटते.." प्रिया
"माझी काळजी सोडा.. तुम्ही खूश असला की मी पण खूश असेन त्यात काय एवढं??" सुमन
"अगं आई हे तात्पुरते झाले.. पण तुला कायमचं सुखी आनंदी बघायचं आहे ग.." प्रिया
"बरं मग तूच सांग काय करू मी??" सुमन
"लग्न कर.." प्रिया
"वेड बिड लागलंय का तुला?? लग्न आणि या वयात.." सुमन
"का?? लग्न करायला वयाच बंधन आहे का?? कोणीही आपल्या आयुष्यात कधीही लग्न करू शकतो.. साथीदाराची गरज तर लागतेच ना ग.." प्रिया
"अगं वेडाबाई.. बोलणं सोपं असतं ग.. करणं खूप अवघड.. आणि समाज मान्यता देईल का??" सुमन
"समाज असाही बोलतो आणि तसाही बोलतो.. आपण समाज घडवायचा आहे.. त्यांना काय मान्य आहे आणि काय नाही हे पहात बसलो तर समाज कधीच सुधारणार नाही.." प्रिया
"खूप छान ग.. तुम्हाला असे पुढारलेले बघून मी दिलेल्या शिकवणूचे सार्थ झाल्याचे वाटते.." सुमन
"मग तो स्वतः आत्मसाद करायचा असतो.." साधना आणि मोहन येऊन सुमनला बोलतात..
"ते शक्य नाही.." सुमन
"का शक्य नाही?? केलं की सगळं शक्य होतं.. सुरूवात तू कर.." साधना
"नाही हं.." सुमन
"उपदेश करणं सोपं असतं ग.. पण आत्मसाद करणं अवघड.. हे तू सांगतेस पण तुझ्यावर वेळ आली की घाबरून बसतेस.. मग असल्या गोष्टी बोलू नकोस.." साधना चिडून बोलते..
"घाबरले नाही ग.." सुमन
"मग काय करत आहेस?? घाबरतच आहेस.." साधना
अशाप्रकारे सगळे मिळून सुमनला समजावतात.. आणि फायनली तिला लग्नासाठी तयार करतातच.. ती पण समाज कुठे तरी घडावा यासाठी तयार होते.. आणि सुमन आणि मोहनचे लग्न होते..
सुमन आणि मोहन अगदी साध्या पद्धतीने लग्न करतात.. सुमनच्या मुली त्यांच्याजवळच राहतात.. काही लोकं सुरूवातीला नावं ठेवतात.. पण नंतर सगळं विसरून जातात.. त्यांच्या नात्याला आता नावं मिळालं होत.. सुमन आता सौभाग्यवती झाली होती.. तिला आयुष्याच्या उतरती काळात एक साथीदार मिळाला होता.. सगळेच खूप खूश होते..
या गोष्टी वरून एकच समजते की विधवा स्त्रीच्या व्यथा कधी संपणार?? तिला समजून घेतलं तिला उमजून घेतलं की नक्कीच काहीतरी गोष्टी कमी होतील.. तिचा त्रास थोड्या प्रमाणात का होईना पण कमी होईल.. तिला सगळ्या परिस्थितीशी तोंड देता देता जो त्रास सहन करावा लागतो तो कमी होईल.. तिच्याकडे एक माणूस म्हणून बघा..
जर बायको मेलेला पुरूष असेल तर त्याला प्रत्येक कार्यक्रमात जो मान मिळतो तो एखाद्या विधवेला कधीच मिळत नाही.. पण जर तसा मान तिलाही मिळाला तर तिचे आयुष्य कदाचित सुखकर बनेल.. तिच्या कित्येक वाटा मोकळ्या होतील.. म्हणूनच विधवा स्त्रीला समजून घ्या.. जर ती एखाद्या कार्यक्रमात आली तर अपशकुनी म्हणून तिची अवहेलना करू नका.. तिला आदर द्या.. तिला सन्मान द्या.. तिला भावनिक आधाराची गरज असते.. तिचं सगळंच म्हणजे आयुष्यच तिने गमावलेले असते म्हणून तिला भावनिक आधाराची गरज असते.. तिला समजून घ्या..
समाप्त..
या कथेला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद.. खरं तर ही माझी पहिलीच सामाजिक कथा.. पण तुम्ही त्याला दाद दिली.. यापुढील माझ्या कथा वाचण्यासाठी मला फाॅलो करायला नक्कीच विसरू नका..
धन्यवाद
आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका..