शुभारंभ
सकाळ ची वेळ .. साधारण सकाळचे ७ वाजले होते . प्राजक्ता सकाळीच उठून अंघोळ करून स्वयंपाक घरात वावरत होती . सकाळचा चहा नाश्ता आणि मुलांचे डबे बनवत होती . तिचा नवरा अजून झोपलाच होता . सासू बाईंची अंघोळ झाली होती आणि त्या पूजे ला बसल्या होत्या त्यामुळे घरात मस्त उदबत्ती चा सुवास होता .. इकडे फोडण्याचा वास त्या उदबत्तीच्या वासात मिसळला होता .
तेवढ्यात दारा ची बेल वाजली .. प्राजक्ता पोळ्या करत असल्याने तिचे दोन्ही हात पिठाचे होते . पण दार उघडायला तिच्या शिवाय कोणीच नव्हते . शेवटी हात धुवून कपड्याला हात पुसत पुसत दार उघडले तर रेखा आली ..
प्राजक्ता " आलीस का ??"
कामवाली(रेखा) " हो .. "
रेखा " म्हणायला कामवाली पण गेले दहा वर्ष त्यांच्याकडे ती काम करतेय त्यामुळे जशी काय आता या घरातली एक मेम्बरच होऊन गेलेली . सकाळ सकाळी हसरा चेहरा घेऊनच ती घरात प्रवेश करायची आणि घरकाम करून जायची .
रेखा भांडी घासायला लागली तोपर्यंत प्राजक्ताने तिघींसाठी मस्त चहा टाकला .. कामवाली आली कि ती नेहमी चहा टाकायची .. एक कप सासू साठी .. एक कप रेखा साठी आणि एक कप स्वतः साठी. प्राजक्ता हा चहा मात्र मस्त बसून आरामात घ्यायची.
पोळ्या झाल्या दोघांचे डबे भरले .. आणि मग एकेकाला उठवायला लागली .. आधी मुलीला अंघोळीला पाठवली .. ती ची अंघोळ होतेय तर मुलाला उठवली. त्याची आंघोळ होई पर्यंत मुलीच्या केसांच्या वेण्या घातल्या ... आणि तिला नाश्त्याला बसवली .. मग मुलाला युनिफॉर्म घाल , त्याचे केस विंचर असे चालू होते.
दोघांच्या बॅगेत वॉटर बॅग, डबा , सॅन्क्स , सगळे भरले आणि दोघांना देवाला नमस्कार लावला आणि मग तिच्या नवऱ्याला उठवायला गेली .
प्राजक्ता " ओम उठ.. "
ओम कडून काहीच हालचाल नाही
प्राजक्ता " ओम उठ ना .. मुलांना शाळेत सोडायला जाणार आहेस का ? उठ ना .. अरे रोजचा उशीर होतो त्यांना "
ओम ने घड्याळात बघितले आता उठायलाच पाहिजे या हिशेबाने उठला आणि तोंडावर पाणी मारून तसाच मुलांनां सोडायला गेला . ओम येई पर्यंत प्राजक्ताने ओम चा डबा करून भरून ठेवला . आणि त्याची ऑफिस ची तयारी करून ठेवली .
ओम चे आवरल्यावर तिघे सासुबाई , ओम आणि प्राजक्ता तिघे नाश्ता ला बसले . ओम नाश्ता करता करता न्यूज पेपर वाचत होता . सासू बाई त्यांची जपाची माळ ओढत होत्या आणि प्राजक्ता एक घास खायची आणि चहा ला उकळी आली का बघायला जायची .. पुन्हा दोन घास खायचे आणि मग चहात दूध टाकायला जायची .. आणि फायनली अजून दोन घास खाल्ले कि चहाचे कप घेऊन नाश्त्याला बसायची ..
ओम चा नाश्ता झाला कि त्याच्या हातात डबा , बॉटल , रुमाल , मोबाईल , पाकीट द्यायचा किंवा मग त्याने हे सगळे घेतल कि नाही ते चेक करायचं आणि तो ऑफिस ला जाई पर्यंत त्याच्या मागे मागे घुटमळत रहायचे .. म्हणजे त्याने काही मागितलेच तर द्यायला तत्पर र .. उगाच काही मिळाले नाही म्हणून शोधण्यात वेळ नको जायला .
ओम शूज घालतो .. बॅग घेतो आणि घरातून बाहेर पडून जातो ..
गेले दहा वर्षांचे हे प्राजक्ताचे सकाळचे रुटीन .. रोज त्याला दारापर्यँत सोडायला जाते पण ओम तिच्याकडे बघून तिला "बाय "या सुद्धा बोलत नाही .. आणि तो हे बोलत नाही याची आता तिला पण सवय झालेली .
ओम गेल्यावर बाकीची कामं तर असायचीच .. कपडे मशीन ला लावाय चे .. किचन ओटा साफ करायचा .. मुलांची खोली आवरायची .बेडरूम आवरायची , वाळलेले कपडे घडी घालून ज्याच्या त्याच्या कप्प्यात ठेवायचे .. थोडा वेळ मध्ये गेला कि लगेच दुपारचे जेवण बनवायचे .. जेवण होतंय तर मुलांना शाळेतून आणायला जायचे .. मुले घरी आली कि त्याच्या नाश्ता , त्यांच्या होमवर्क , त्यांचे क्लास त्याला सोडा आणा , मग संध्याकाळचे जेवण ओम घरी यायच्या आत अल्मोस्ट तयार ठेवायचे . ओम आला कि गरम पोळ्या करायला घ्यायच्या .. बाकी सगळ्यांची जेवणे झाली कि मग स्वतःचे ताट वाढून घ्यायची आणि मग टीव्ही बघत आरामात जेवत बसायची .
जेवणे झाली कि लगेच उद्याची तयारी .. सकाळी कसली भाजी , कोणता नाश्ता बनवायचा याची तयारी करून ठेवायची .
मुलांना दामटवून झोपायचे आणि मग प्राजक्ता चा दिवस संपलेला असायचा .
बेडरूम मध्ये येई पर्यंत ओम एकतर लॅपटॉप वर काम करत बसलेला असायचा . जर लॅपटॉप ओपन असेल तर समजा आज २ वाजेपर्यंत लाईट बंद करता येणार नाही किंवा तो दमल्यामुळे झोपून गेलेला असायचा . ..
पुन्हा सकाळी उठल्यावर तेच .. काल च्या सारखाच आज असायचा त्यात काही बदल नसायचा.
ना पैशांची चणचण , ना कसले टेन्शन , ना काही प्रॉब्लेम , ना भांडण ना तंटा , ना चिडा चीड , ना सासू चा जाच , ना नणंदेचे टोमणे , ना नवऱ्याची अरेरावी , ना मुलांचा त्रास .. काहीच प्रॉब्लेम नाही . त्यामुळे तिला कसली तक्रार पण नव्हती.
अगदी कसे सगळे परफेक्ट होते . दिवाळीला दिवाळी , दसऱ्याला दसरा आणि शिमग्याला शिमगा असे सण पण साजरे होत असायचे .. लग्न ,कार्यांत मस्त नटून थटून मिरवायला पण मिळायचे .. चार चौघात छान उठून दिसेल असे रूप पण होते .. १०वर्षांचा संसार असल्यामुळे अंगकाठी ला बाईपण आले होते .. एक प्रकारची गोलाई पण आलेली ..
मुळात सध्या प्रश्न आहे कि सुखात आनंद आहे कि आनंदात सुख आहे याचा शोध लागला पाहिजे . जे प्राजक्ता कडे ऑलरेडी आहे ते मिळवण्या करताच कोणा कोणाला संघर्ष करावा लागतो . प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो . प्रत्येकाची सुखाची आणि आनंदाची व्याख्या वेगळी असते . कधी कधी संघर्ष अन्न , वस्त्र , निवारा यासाठी असतो तर कधी संघर्ष स्वतःच्या अस्तित्वाचा असतो तर कधी संघर्ष सुख वस्तू मिळवण्याचा असतो .
चला तर मग या प्राजक्ताच्या आयुष्यात थोडेसे डोकावून बघू .. तिचा नक्की संघर्ष कसला आहे ते पाहू
प्राजक्ता चे लाईफ एकदम सेटल होती . नवरा चांगल्या पगारावर काम करत होता . त्यांचा स्वतःचा फ्लॅट होता . दोन मुले ते सुद्धा एक मुलगा एक मुलगी होती . घरात वडील माणूस पाहिजे तर सासूबाई होतीच . दोघांचे जरी खास असे रोजच्या रुटीन मध्ये बोलणं होत नसले तरी तसा काही प्रॉब्लेम नव्हता . त्याला माहित होते कि हि कुठे जात नाही आणि हिला पण खात्री होती कि ह्याच्याहि मनात फक्त तीच आहे त्यामुळे तसाही काही मानसिक त्रास नव्हता .
प्राजक्ताला मुख्य प्रश्न होता तो म्हणजे नोकरीचा . लग्नाच्या आधी पासून ती नोकरी करणारी होती . स्वतःच्या पायावर उभी राहिलेली .. स्वतःचे असे मत असलेली , स्वावलंबी मुलगी होती . स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायची तिची कुवत होती . पण जशी मुलं झाली तशी तिने जे २४ तासांचे आई पण स्वीकारले ते स्वीकारलेच . एकदा जो जॉब सोडला तो पुन्हा तिला धरताच आला नाही . मोठी मुलगी ४ वर्षांची होते नाहीतर लगेच च दुसरा नंबर लावला त्यामुळे पुन्हा तेच .. १० वर्षे झाली त्यांच्या लग्नाला पण त्यातली ८ वर्षे प्राजक्ता घरीच आहे . सकाळी सगळे उठून कामाला गेले कि प्राजक्ताचा जीव नुसता कासावीस होयचा . तिला वाटायचे कि मी घ रा त बसून काय करतेय .. सगळे कामाला जातात .. मी च घरात बसून आहे .. या गोष्टीचा तिला स्वतःला त्रास होण्याचा . तिने हि गोष्ट ओम ला कितीदा तरी बोलून पण दाखवली पण ओम नेहमी म्हणायचा अग मुलांना वाऱ्यावर टाकून तू कशाला जातेस कामावर .. शिवाय आई चे पण आता वय झालेय
एक मन तिला असेच वाटायचे ओम म्हणतो ते हि अगदी खरच आहे . मी जॉब ला जाणार म्हणजे घरात माझ्या पेक्षा कामवाल्यांचा वावर जास्त होणार . आत कसे मी जातीने त्यांच्याकडे लक्ष देते . मुलांचा अभ्यास घेते . त्यांना क्लास ला सोडते हे सगळे कसे होणार मग ..प्रिया तशी मोठी होतेय म्हणून तिला मी पाहिजे आणि प्रथमेश अजून तसा लहान आहे तर त्यालाही मीच पाहिजे .. त्यामुले जे आहे ते असेच चालू दे . असे म्हणायची आणि विषय सोडून द्यायची तर अशी तिची दोलायमान स्थिती होती .
ओम ला खरं तर तिने घेतलेला हा निर्णय खूप आवडला होता . त्याला असे वाटायचे कि मुलांना डे केअर किंवा बाहेर ठेवण्यापेक्षा प्राजक्ता नेच पाहावे आणि त्याचे यात काहीच चुकत नव्हते .त्याच्या पगारात त्यांचे सर्व भागत पण होते त्यामुळे प्राजक्ताने नोकरीला जाऊच नये असे त्याचे ठाम मत झाले होते . ओम ला दुखवून किंवा त्याच्या अगेन्स्ट जाऊन प्राजक्ता पण काही नोकरी करण्याचा अट्टाहास पण नव्हता . तू खुश तर मी खुश आणि आपण खुश तर आपले घर खुश . शेवटी संसार करताना दोघांचे काय मत आहे हे महत्वाचे .
पण आता घरात बसल्या बसल्या करायचे काय ? म्हणून मग पेपर मधली शब्द कोडी सोडवायची , सुडोकू सोडवायचे , एखादा सिनेमा बघायचा , एखादी ठरलेली सिरीयल बघायची , कधी किटी पार्टी , हे असले सगळे उद्योग करत प्राजक्ता स्वतःला रमवायाची .
कधी आई ला फोन लावायचा आणि तासन तास बोलत बसायचे .. कुणाच्या काका , कुणाच्या मामा , कुणाची काकाची पुतणी तिचे काय झाले अश्या फालतू गप्पा मारत बसायच्या ..
मुलं मुलांच्यात , सासू बाई देवांच्यात आणि ओम ऑफिस च्या कामात मग्न होयचा पण हिला असे हक्काचे असे घरकाम सोडले तर काहीच काम नाही . आणि घरकामाचा ना मोबदला मिळतो .. ना रिस्पेक्ट मिळतो . भाजी जर उत्तम झाली तर एकदा च्या ऐवजी दोनदा मागून खाल्ली जाईल पण असा शब्द पण कोणी म्हणणार नाही कि " वाह ! आज भाजी छान झालीय " कारण ती उत्तम जेवण करते ह्यात काही नवल नाही . हे रोजचेच आहे त्याची वेगळी नोंद कोण कशाला घेईल . पण एकदा जर मीठ जास्त झाले तर तर सगळे म्हणतील " काय खारट भाजी केलीस ग " ह्या गोष्टीची नोंद मात्र लगेच घेतली जाते ..
तर हि अशी सांसारिक प्राजक्ता वेगळे असे स्वतःचे अस्तित्व निर्माण करू शकेल का ? हा आहे एका गृहिणीच्या अस्तित्वाचा संघर्ष !! आणि त्यातून अनेक गृहिणींना त्यांचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रेरणा मिळेल हि आशा व्यक्त करून प्राजक्ताची कहाणी सुरु करू.