Login

श्रावणात असा हा 'ऋतुरंग' बहरला...!

चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 ची गोष्ट
आज दिवसभरातील रोजची कामे सगळी आटोपली तसे काहीतरी चुकल्यासारखे किंवा सतत काहीतरी मिसिंग आहे वाटायला लागले
मगं अचानक लक्ष कॅलेंडरवर गेले आणि लक्षात आली ती आठवड्याभरापूर्वीची ती धावपळ, ते फोन आणि तो सगळा सावळा गोंधळ. आज मात्र हसायला येत असलं तरीही या दोन महिन्यात कित्येक क्षण असे आले होते वाट्याला जिथे नाकीनऊ आले होते अगदीचं आणि वाटतं होते सगळे सोडून द्यावे पण फक्त एकाच गोष्टीने मला बांधून ठेवले होते ते म्हणजे या नव्या कुटुंबाच्या नव्या रेशमी बंधाने.

ईरावर मागच्या वर्षी लेखिका म्हणून प्रवास सुरू झाला आणि चॅम्पियन्स ट्रॉफीने फक्त नवी ओळख नाही तर मला मागच्या वर्षी एक कुटुंब दिलं खूप छान असं आणि त्याच कुटुंबाचे प्रेम घेऊन मी यावर्षीही या स्पर्धेत भाग घेतला, किमान माझ्या त्या कुटुंबातील एखादा सदस्य तरी माझ्या बरोबर असेलचं अशी खात्री बाळगून, किंबहुना आमच्या त्या कुटुंबातील प्रत्येकाला तशी आशाच होती जणू पण या आशेची निराशा त्याच दिवशी झाली त्या दिवशी संघ जाहीर झाले. सुरूवातीला नाव ऐकूनच दचकले जराशी कारण एकही व्यक्ती ओळखीची नाही हा माहित असायला एक नाव ओळखीचे होते फक्त पण बाकी सगळेच नवखे.
वाटलंही एकदा माघार घ्यावी पण माघार घेणं माझ्या स्वभावात नाही मगं कायं संघासोबत ओळख सुरू झाली आणि एकमेकांवर नाव ढकलताना कॅप्टन (संघप्रमुख) नावाची ती जबाबदारी माझ्या गळ्यात येऊन पडली.
एकतर स्पर्धेत प्रथम भाग घेतलेले काही सदस्य, त्यात मला फारशी ओळख नव्हती कोणाची आणि आता सगळ्यात कमी वय असूनही ही जबाबदारी शिवाय कॅप्टन संघ पाहून तर अजूनच घाबरायला झालं पण मागे फिरण्याचा मार्ग नव्हताच आता खिंड लढवायची होती दोन महिने मगं कायं सुरूवात ओळखीपासून केली आणि संघप्रमुख म्हणून एक मात्र अगोदरचं सर्व सदस्यांना सांगितले की, स्पर्धा म्हणून दोन महिने एकत्र रहायचं नाही तर कुटुंब म्हणून रहायचं. हसतं खेळत अनुभवांनी समृद्ध व्हायचं आणि तिथून सुरू झाला प्रवास खरा.
एक एक फेरी येत गेली आणि प्रत्येकवेळी अगदी पहिल्याच फेरीपासून सर्व सदस्यांनी पहिल्यांदाच पण उत्तम प्रयत्न केले रहस्यकथा, प्रेमकथा, अलका लिहायचे. काही सदस्यांनी तर दोन दोन कथा दिल्या मगं संघप्रमुख म्हणून जो उत्साह वाढला तो काही विचारायलाच नको.
सगळे छान चालू राहिले तर ती स्पर्धा कशी नाही का?
खरंतर स्पर्धेत कॅप्टन ही जबाबदारी स्वीकारली तेव्हाच वैयक्तिक आयुष्यात अचानक खूप काही घडले, अडचणी आल्या पण त्या सांभाळून इकडे मी माझी जबाबदारी पार पाडत होते पण इथे मात्र अडचण आली ती स्पर्धेत. एक सदस्य भाग घेऊनही सतत गैरहजर बरं खूपवेळा फोन, मेसेज सगळे करूनही झाले पण त्या व्यक्तीने प्रत्येकवेळी पुढच्या फेरीत भाग घेईन असे उत्तर दिले आणि मी ही स्वभावानुरूप विश्वास ठेवला इथेच तर चुकले. स्पर्धा सुरू होऊन दीड महिना उलटला तरी त्या स्पर्धकाने तोंड दाखवले नाही पण रोज स्टेटस वर मात्र वेगवेगळ्या ठिकाणी फिरणे चालू होते ते पाहून इतर संघ सदस्य ही थोडे नाराज होतील अशी भिती वाटली आणि मगं मी संघ सदस्यांना मत विचारून शेवटी त्या सदस्याला बाहेर काढले आता पुन्हा अडचण नवीन सदस्य कुठला येणार?
एक महिना ज्या कुटुंबात इतकं हसतं खेळत वातावरण ठेवलं ते नवीन सदस्यांमुळे दुषित होऊ नये इतकंच मनांत होतं आणि अशावेळी मागच्या वर्षीच कुटुंब पुन्हा आलं माझ्या मदतीला धावून आणि मागच्या वर्षीच्या मैत्रीची आठवण ठेवून पार्थ धवन सरांनी संघात प्रवेश केला आणि जसे पावसाळ्यात तो इंद्रधनुष्य खुलून येतो सप्तरंगात तसे या टीम ऋतुजा मध्ये हा सातवा रंग अगदी सहज मिसळून गेला.

संघातील सर्वात ज्येष्ठ, अनुभवांनी समृध्द अशा शरयू महाजन ताई अगदी पहिल्या फेरीपासून त्यांनी इतका उत्साह दाखवला कमालीचा की भारावून गेले मी. नाटिकेत मात्र त्यांनी साकारलेली भुमिका, त्यासाठी घेतलेले मेकअपचे कष्ट आणि त्यांनी दाखवलेला अभिनय पाहून त्यांना अभिनयाची सम्राज्ञी म्हणावं वाटलं. याशिवाय ताईंनी अगदी पहिल्या दिवशीपासून ते स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी पर्यंत अलक फेरीत उत्कृष्ट सहभाग दर्शवला.
संघातील दुसर्‍या गोडं आणि सतत हसरा चेहरा, ज्यांच्याकडे पाहूनच उदासी दूर पळेल अशा चित्रा ताई. आपला संसार, क्लासेस सगळे सांभाळून कॅप्टन मला काही जमणार नाही म्हणून अगदी प्रत्येक फेरीत हिरीरीने पुढाकार घेतला त्यांनी. अगदी घरात प्रॉब्लेम असतानाही नाटिका माझ्यामुळे अपूर्ण नको रहायला म्हणून ऐनवेळी घाईघाईत शुट करून उत्साह दर्शवला त्यांनी जे पाहून भरून आलं. अगदी इतक्या समरसून गेल्या संघात की मोठ्या बहिणीची जागा घेतली.
संघातील अजून एक स्वच्छंदी पण थोड्याशा शांत अशा जयश्री ताई.
मला जमेल की नाही लिहायला ठाऊक नाही गं ऋतू असं म्हणून एकापेक्षा एक उत्कृष्ट कथांचे लिखाण ताईंनी केले शिवाय प्रत्येक सदस्याला कायमचं प्रोत्साहन देत राहिल्या.
आता कुटुंब म्हटलं की एखादा मोठा दादा हवा सांभाळून घ्यायला आणि कुटुंबातील दादाची जागा महेश दादाने अगदी चोखपणे बजावली. महेश गायकवाड, वकीली पेशा म्हटलं की व्यक्ती गंभीर आहे असा गैरसमज होतो जो माझाही झालेला सुरूवातीला पण दादाने मात्र मला साफ खोटे ठरवले आणि इतर संघ सदस्यांशी हात मिळवणी करून कधी हे लोक कॅप्टनला त्रास द्यायला लागले कळलेच नाही पण मला मात्र सगळे आवडतं गेले कारण या त्रासात प्रेम होते. दादा या दोन महिन्यात कधी इतका हक्काचा झाला कळलेच नाही अगदी काळजीने जेवणं कर म्हणून फोन करून बजावत राहिला. दादाने प्रत्येक फेरीत उत्कृष्ट सहभाग दाखवला पण रील फेरी मात्र दादा मुळेच पार पडली कारण टेक्निकल गोष्टी मला काहीही माहित नव्हत्या. मला दादाचे विशेष कौतुक यासाठी वाटते की नाटिका फेरीत आजारी असताना ही त्याने शुट पूर्ण करून पाठवले आणि एडिटींग साठी मदत ही केली. बाकी त्याचा मनमोकळा स्वभाव इतका आहे की खरंतर त्याच्यामुळेच आम्ही कायम हसत राहिलो
आता सगळेच गुणी राहिले तर कसे म्हणूनचं आमच्या संघात एक गोड सखी तितकीच हट्टी पण स्वभावाने बिन्धास्त अशी प्रणाली शिंदे.
माझा आणि तिचा स्वभाव एकदम विरुद्ध पण कशी कायं इतकी मैत्री झाली कळलेच नाही. हो थोडीशी हट्टी आहे तशी पण स्वतःच्या स्पर्धा सांभाळून मला कथा एडिटींगसाठी या मुलीने रात्री जागून जागून मदत केली अक्षरशः. नाटिकेत तर जीव ओतावा इतका सुरेख अभिनय की काही बोलायलाच नको.
आता संघात सर्वात उशीरा येऊनही सगळ्या लेखक सदस्यांत समरसून गेलेले पार्थ सर. सरांना मी ओळखत होते एक वर्षापासून त्यांचे लिखाण म्हणजे कमाल अगदी कोणी विचार ही करू शकणार नाही यापलिकडे त्यांच्या कथा सुरू होतात. रील फेरीसाठी एकापेक्षा एक संहिता लिहून देणारे आणि मला कायमचं मॅडम नका काळजी करू म्हणतं धीर देणारे पार्थ सर.

रहस्यकथा, प्रेमकथा, अलक फेरी, अद्भूत फेरी, दीर्घकथा फेरी, रील फेरी आणि ऑप्शनला असलेल्या नाटिका फेरीत ही अगदी शेवटच्या दिवशी फक्त तीन तासांत शुट पूर्ण करून जिथे प्रत्येक संघ एक नाटिका करून आराम करायचा विचार करत होता तिथे कॅप्टन आपण दुसरी नाटिका करूयात संहिता लिहा असे म्हणून अगदी पहिल्या दिवशी असणारा उत्साह शेवटच्या दिवशी दाखवतं मला कायमचं आश्चर्यचकित करणारा माझा हा संघ. खरंच या दोन महिन्यात प्रत्येक सदस्याने कॅप्टन म्हणून मला कुठलाही त्रास होऊ दिलाच नाही पण माझी मजा ही घेतली तितकीच हे खरं आणि त्यामुळेच हसत खेळत कसे दोन महिने सरले काही कळलेच नाही.

एक कुटुंब म्हणून दोन महिन्यात जी अतुट रेशीमगाठ जुळून आली आहे ती अनमोल आहे खरोखर. श्रावणात या सात सदस्यांनी त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाने मला भारावून टाकले आणि या सात सदस्यांच्या प्रेमाने श्रावणात हा ऋतुरंग नव्याने बहरला आहे आयुष्यात नात्यांची हिरवळ घेऊन.

प्रेमाच्या धाग्यांचा अतुट प्रवास
साथ जुळून आली आयुष्यभराची
गोष्ट आहे ही हळूवार फुललेल्या
मैत्री आणि रेशमी विश्वासाची!