शिवकाव्य कौस्तुभ -भाग २१

Shivkavya Kaustubh Part 21
दिवसेंदिवस, स्वराज्याचा विस्तार वाढत होता. लवाजमही वाढत होता.
आरमाराच्या निर्मितीनंतर बराचसा भाग हा स्वराज्यात जोडला गेला. कोकणचा उत्तर भाग एक एक करत, जिंकून घेत स्वराज्यात दाखल होत होता. तेथील क्रूर, चिवट फिरंगी आणि सिद्धी तेही यांच्या पराक्रमाने घाबरली. दक्षिणेकडील विजयदुर्ग या किल्ल्यावरही भगवा मानाने फडकू लागला. अवघ्याच किनारपट्टी वर महाराजांचा चांगलाधाक,
दरारा बसला होता.

या सर्व विजयाच्या वार्ता, नव्हे शिवबाच्या पराक्रमाच्या वार्ता एका नंतर एक अशा, विजापुरी येऊन धडकत होत्या .त्यामुळे रोजच दरबारात चिंतेचे सावट येऊ लागले होते. दरबारापेक्षा बादशाही महालात या बातम्यांची चिंता जास्त वाढली होती. बादशहापेक्षा त्याची आईच म्हणजे बडी बेगम जास्त बेचैन होती. शिवबाचे प्रताप ऐकून. किल्ले, कोकण किनारपट्टी असे एका नंतर एक हिंदवी स्वराज्यात सामील होत आहेत. हे ऐकून तिचा संताप वाढत होता.
ही बडी बेगम म्हणजे बादशहाची आई. तीच सर्व राज्यकारभार पाहत होती. एक चांगलाच दरारा तिचा विजापूरच्या दरबारात होता. त्यामुळे सर्वजण तिला भीत होते.
शिवबांचे ही उपद्व्याप ऐकून ती फारच चिडली. याला मुळासकट उपटून काढायला पाहिजे. असेच तिने ठरविले.
'एवढेसे ही पोर पण याचे पराक्रम किती थोर' नाही नाही हे थांबलेच पाहिजे. याला लगाम घातलाच पाहिजे. अशी तिच्या मनाची व्यवस्था झाली.
या विचारानेच तिची झोप उडाली होती.
खूप मोठे मोठे आणि पराक्रमी सरदार विजापूरच्या दरबारी चाकरीला होते.
नेमके कोणाला या कामगिरीवर पाठवावे? जेणेकरून शिवा हा जेरबंद होईल?? किंवा त्याच्या या बंडाळ्याला आळा बसेल…??

सगळेच दरबारी सरदार हे महापराक्रमी आहेत.हा येवढासा कालचा पोरगा आहे.अन् त्याच्या बंदोबस्तासाठी या दरबारातील सरदार पाठवायचे म्हणजे…?जरा अवघड होते.
पण या कामगिरीवर कोणाला तरी पाठवणे आवश्यकच होते.नाहीतर उद्या …नाही हे नको व्हायलाऽऽ..हा मनातला संघर्ष तिने थांबवला.आणि एक निर्णय घेतला.
म्हणून तिने एके दिवशी दरबार भरवला. खास सरदारांना बोलवण्यात आले. खास म्हणजे विश्वासू, विश्वासातले आणि पराक्रमीही, अशांनाच दरबारात आमंत्रित करण्यात आले.
दरबारात तबकामध्ये विडे मांडण्यात आले. आणि सांगितले, 'हा विडा त्यानेच उचलायचा…'
सगळा दरबार निशब्द झाला होता.एकहि पराक्रमी सरदार पुढे येईना!
या पुढील काव्यात…

*पैजेचा विडा*

गच्च आदिलशाही दरबार भरला,
तबकामध्ये पैजेचा विडा मांडिला।।धृ।।
ऐकुन बातमी कोकण गेल्याची,
मुठ आवळली त्यांनी हाताची,
कमतरता सरदारांना कश्याच?
शिवाने राजरोस हा धुमाकूळ घातला।।
तबकामध्ये पैजेचा विडा मांडिला।।१।।

पकडुनी मावळ्यांच्या सरदाराला,
डांबावे अंधार कोठडीत त्याला,
उचलुनी पैजेच्य या विड्याला,
बडी बेगम साहिबाने हुकुम हा सोडिला।।
तबकामध्ये पैजेचा विडा मांडिला।।२।।

सर्व दरबार हा शांत झाला,
होईना धीर कोणाला,
जावे कुणी मरणाच्या दाराला,
कोई नहीं यहाँ, जान की बाजी लगाने वाला।।
तबकामध्ये पैजेचा विडा मांडिला।।३।।

एवढ्यात रपरप पाऊले टाकीत,
विडा तबकातला उचलीत,
गरजला मोठ्या आवाजात,
'मै लावुंगा , हुजुरी पकडुन त्या शिवाला।।
तबकामध्ये पैजेचा विडा मांडिला।।४।।

बोल अफजल खानाचे ऐकुन,
हुश्श!! केले दरबारानं,
होईल काम यांच्या कडुन,
आणिल हा सत्यात आपल्या शब्दाला।।
तबकामध्ये पैजेचा विडा मांडिला।।५।।

उचलता विडा पैजेचा,
मिळाला हार पदकांचा,
तुरा डोईवर मोत्यांचा,
जयजयकारांच्या घोषाने पुरता मोहरला।।
तबकामध्ये पैजेचा विडा मांडिला।।६।।

शुभांगी सुहास जुजगर.
(संदर्भ -बाबासाहेब पुरंदरे.)





🎭 Series Post

View all