शिवकाव्य कौस्तुभ भाग -२०

Shivkavya Kaustubh Part 20
संत श्री.रामदास स्वामी यांनी योग्य तो उपदेश राजांना केला. 'हाती घेतलेले कार्य, जिद्दीने तडीस न्यावे. विवेक जागा ठेवून राज्य करावे.'

'छत्रपति शिवाजी महाराज यांना "भारतीय नौदलाचे जनक" म्हटले जाते.'
अगदी बरोबर आहे.
स्वराज्याचा आणि मराठी साम्राज्याचा विस्तार हा हळूहळू वाढतच होता.म्हणुन सागरी सीमांचे संरक्षण करण्यासाठी शक्तीशाली आरमार उभे केले होते. म्हणूनच त्यांना भारतीय नौदलाचे जनक मानले जाते.

हिंदवी स्वराज्यासाठी लढणारे 'विश्वासू हात' हेच राजांचे वैभव होते. या हातामुळेच त्यांनी बारा मावळात हा व्याप वाढवला होता. नुसता वाढवून चालणार नव्हते.त्यांची सुरक्षितता ही तितकीच महत्त्वाची होती. आणि म्हणूनच त्यांची चाणाक्ष नजर पश्चिमेकडील कोकणपट्टीवर पडली. तिकडे असलेला अथांग समुद्र हा या राज्यासाठी घातकही ठरू शकतो. तिकडूनही शत्रू आपल्यावर वार, हल्ला करू शकतील. किंवा परकीय म्हणजे इंग्रज, डच, पोर्तुगीज हे आपले वर्चस्व तेथे हळूहळू स्थापित करतील.
'ज्याच्याजवळ समुद्र त्याचीच सत्ता समुद्रावर' असेच होते. स्वराज्य निर्मितीच्याच वेळी त्यांनी हेरले होते म्हणून आता या गोष्टीकडे त्यांनी लक्ष द्यायचे ठरवली जहाज बांधणी, यासाठी सुरक्षित बंदरे, जहाजावर कार्य करण्यासाठी प्रशिक्षित आरमारी सैनिक, पर्यायाने आरमारी सैन्य.याच्याही तयारीला ते लागले होते.
मराठा आरमारासाठी मजबुत आणि लढाऊ जहाजे तयार करण्याचे, कारखाने त्यांनी उभे केले.
समुद्रावर वर्चस्व प्रस्थापित केले, तरच सागर किनारा आणि कोकणपट्टी ही सुरक्षित राहील.
आणि स्वराज्यासाठीही धोका राहणार नाही.पर्यायाने याने स्वराज्यावरचे संकटं कमी व्हायला मदत होईल.
कारण येथुन येणाऱ्या परकीयांची मुजोरी वाढत चालली होती. तीलाही आळा बसणार आहे.
या बरोबरच त्यांनी नवकिल्ल्यांच्या निर्मिती कडेही पुरक लक्ष देऊन सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, विजयदुर्ग इ.किल्ले बांधुन घेतले.

पाहुया पुढील काव्यात काय गुंफलेले आहे.

*आरमार*
सह्याद्रीच्या सिंहास ओढ
लागली सागर तटाची,
कोकणपट्टी ही प्रतिक्षा करू
लागली भगव्या झेंड्याची।।धृ।।

खुणवू लागले कोकणातील बंदरे,
नाही तर वाढेल येथे परक्यांचे पसारे,
आता करावी तयारी किनारपट्टीवरील स्वारीची।।
कोकणपट्टी ही प्रतिक्षा करू लागली भगव्या झेंड्याची।।१।।

कुच करून रायगड घेतला जिंकून,
नंतर दाभोळ बंदरी लावले निशण, जंजिऱ्याच्या सिद्धीलाही चव कळली शिवाजीच्या मावळ्यांची।।
कोकणपट्टी ही प्रतिक्षा करू लागली भगव्या झेंड्याची।।२।।

कल्याण भिवंडी सर केली हिमतीनं,
माहुली गडीही निशाण लागलं मानानं,
सर्व बंदरात सत्ता असावी
आपल्या हिंदवी राज्याची॥
कोकणपट्टी ही प्रतिक्षा करू लागली भगव्या झेंड्याची।।३।।

स्वराज्याची गलबत डोलती आनंदात,
भगवा झेंडा ही तेव्हा तरळला सागरात,
पराक्रमाने दिलीप पावती
मावळ्यांना विजयाची।।
कोकणपट्टी ही प्रतिक्षा करू लागली भगव्या झेंड्याची।।४।।


पाहून अफाट असा दर्यासारंग,
फुलले मावळ्यांचे अंग अंग,
सागरालाही तिथं आली भरती
जणू त्यांच्या प्रेमाची।।
कोकणपट्टी ही प्रतिक्षा करू लागली भगव्या झेंड्याची।।५।।

शिवबाही मनोमनी हरखला,
लाभली दौलत ही राज्याला,
करावी जतन हिला, लावून बाजी प्राणाची।।
कोकणपट्टी ही प्रतिक्षा करू लागली भगव्या झेंड्याची।।६।।
शुभांगी सुहास जुजगर.

(संदर्भ -बाबासाहेब पुरंदरे.)



🎭 Series Post

View all