आमच्या शाळेत आज सगळेच खूप आनंदात होते कारण आमची सहल पुढच्याच आठवड्यात एका शेतात जाणार होती. सगळ्यांनाच शेती बघता यावी, सुगीचे दिवस पाहता यावेत म्हणून खास आमच्या वर्ग शिक्षकांनी शिफारस केल्याने आम्हाला हा अनुभव घेता येणार होता. या आठवडाभरात आम्हाला सरांनी शेतीविषयी माहिती गोळा करून ठेवायला सांगितली होती. बघता बघता आठवडा सरला आणि आम्ही सगळे ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी सहलीसाठी निघालो. बस मधून जाताना धम्माल मस्ती करत आमचा प्रवास सुरु होता. प्रवासादरम्यान आमचे वर्गशिक्षक बाहेर दिसणाऱ्या शेतीची माहिती देखील देत होते. हे सगळं बघता बघता आम्हाला सगळ्यांनाच कधी एकदा शेतात पोहोचतोय असं झालं होतं. अखेर काही तासांच्या प्रवासानंतर आम्ही एका शेताच्या बाहेर आलो. सगळ्यांनी रांगेत उतरून सावकाश चाला अशी सरांची सूचना आल्याबरोबर आम्ही लगेच बसमधून उतरलो.
आजूबाजूला भरपूर हिरवळ आणि वातावरणात असणारा गारवा जाणवत होता. आम्ही सगळेच पहिल्यांदाच प्रत्यक्ष शेती बघणार होतो. एक शेतकरी काका आम्हाला घ्यायला आले होते त्यांच्या मागे आम्ही सगळे जाऊ लागलो. पायवाटेने जाताना शेतीत काढलेले कालवे, ठिबक सिंचन, पेरणी केलेल्या पिकांची माहिती आणि बऱ्याच गोष्टी ते सांगत होते. थोडं अंतर चालून झाल्यावर आम्ही एका लहान झोपडीवजा घराजवळ आलो.
शेतकरी काकांनी त्यांच्याच शेतात त्यांची राहायची सोय केलेली होती. सगळ्यांना त्यांनी विहिरीवर हातपाय धुवून यायला सांगितलं आणि ते आमच्या खाऊची व्यवस्था करायला गेले. माझ्या मनात खूप कुतूहल असल्याने मीही त्यांचा पाठलाग केला आणि त्यांच्यासोबत गेले. आम्ही शेतातून काही फळं आणि कोवळी कणसं गोळा करत होतो. मला त्यांच्याविषयी अजून जाणून घ्यायचं होतं म्हणून त्यांना मी त्यांच्या कामाबद्दल विचारायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी त्यांचं मनोगत माझ्यासमोर व्यक्त केलं.
"आम्ही शेतकरी माणसं. आमची ही काळी मातीच आमची आई. आमचा दिवस भल्या पहाटे सुरू होतो. दिवस सुरू झाल्यापासून कामाला सुरुवात होते. प्रत्येक ऋतूनुसार कामे वेगवेगळी असतात. कधी पेरणी, कापणी, पाखडणी अशी एक ना अनेक कामे आम्ही करत असतो. स्वतःच्या पोटच्या मुलासारखी शेतीची काळजी घेतो, प्राण्यांची काळजी घेतो. तुम्हा शहरातल्या लोकांचे कसे काय तो तुमचा मोबाईल आणि लॅपटॉप असल्याशिवाय काम होत नाही तसेच आमचे काम निसर्गाची कृपा आणि आमच्या जिवापेक्षा जास्त मौल्यवान असणाऱ्या आमच्या बैल, गायी, कोंबड्या यांच्याशिवाय होत नाही. शेतात जेव्हा धान्य उगवतं आणि वाऱ्यावर डोलतं ना तेव्हा तर खूप छान वाटतं कारण ते फक्त धान्य नाही तर माझे आणि तुमच्यासारख्या कित्येक लोकांचे पोट भरण्याचे साधन असते. कित्येक दिवस आणि प्रसंगी रात्री केलेली मेहनत त्या पिकाच्या रूपाने डोलत असते. पिकं तयार झाली की आम्ही बाजारात नेऊन ती विकतो. सगळं काही सुरळीत झालं तर ती त्या निसर्ग राजाची कृपा असते पण कधीतरी अगदी हातातोंडाशी आलेला घास निसटून जातो. अचानक झालेला अवकाळी पाऊस, वादळ, टोळ धाड, दुष्काळ यातील काही संकट आलं तर एवढे कष्ट तर वाया जातातच शिवाय शेतीत गुंतवलेला पैसाही मातीमोल होतो.
काही शेतकरी बांधव अश्या प्रसंगांनी इतके हताश होतात की स्वतःचं अमूल्य जीवन एका क्षणात संपवतात. अर्थात यात त्यांनाही पूर्णपणे दोष नाही देता येणार कारण त्यांनी शेतीच्या, निसर्गाच्या जीवावर सावकाराकडून कर्ज घेतलेले असते आणि नेमके पीक खराब झाले की कर्ज परतफेडीचा मार्गच संपतो. आत्ता आत्ता शेतकरी नवीन नवीन योजनांचा लाभ घेत आहेत पण तरीही असे काही शेतकरी बांधव आहेत ज्यांना दुर्दैवाने याबद्दल काही माहितीच नसते.
पूर्वी माझे आजोबा, बाबा आणि मीही बाजारात ज्याला जास्त किंमत असेल ते पीक घेत होतो. सगळ्याच शेतकऱ्यांची तशी विचारसरणी असल्याने नेमके त्या पिकांचे भाव उतरायचे. आता माझा भाचा शेतीचा मोठा तज्ज्ञ झाला आहे त्याच्या सल्ल्यानुसार मी पीक घेतो. मृदा परीक्षण, आलटून पालटून पिके घेणे आणि सेंद्रिय खते वापरणे यामुळे आता माझ्या शेतातल्या जमिनीचा पोत सुधारला आहे. हल्ली सरकारच्या बऱ्याच योजना आहेत ज्या गावात पोहोचल्या आहेत. काही मंडळी गावात येऊन आम्हाला त्याबद्दल मार्गदर्शन करतात आणि म्हणूनच आमच्या उत्पादनात वाढ झाली आहे.
मागच्याच आठवड्यात माझ्या भाच्याने शेतात नवनवीन प्रयोग कसे करायचे याचं सगळ्यांना मार्गदर्शन केलं. तुम्हा शहरातल्या लोकांच्या कामाच्या ठिकाणी कशी वेळोवेळी शिकवणी होत असते तशीच शिकवणी आता माझा भाचा घेतो. आम्ही आता शेतातच शेण खत, गांडूळ खत तयार करतो. वेगवेगळ्या प्रकारची कलमे करायला शिकल्यामुळे आम्हाला याचा फायदा होतोय.
पूर्वी शेतकरी अज्ञानी होता पण आता बऱ्याच प्रमाणात ते अज्ञान कमी होतंय याचं समाधान आहे. माझा मुलगा दहावीत शिकतोय. त्याला कोरोना काळात मोबाईल घेऊन दिला होता त्याचा सदुपयोग करत तो आमचा माल थेट ग्राहकाला विकतोय त्यामुळे नफाही वाढला आहे. आम्ही सगळे शेतकरी मित्र दर आठवड्याला एकत्र येऊन आपापले प्रयोग एकमेकांना सांगतो. यामुळे नवीन माहिती मिळते आणि सगळ्यांचाच फायदा होतोय.
आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे आणि भारतावर निसर्गाची असीम कृपा आहे. आपल्या देशात सर्वच सर्वोत्कृष्ट आहे मग ते जगाच्या काना कोपऱ्यात देखील पोहोचायला हवे ना? म्हणूनच लवकरच आम्ही आमच्या शेतातील उत्पादन थेट बाहेरच्या देशात कसे पाठवता येईल यासाठी प्रयत्न करणार आहोत.
काळानुरूप शेतीत बऱ्याच सुधारणा झाल्या आहेत. खंत फक्त एकच आहे अजूनही काही मुलांना शेती करण्यात रस नाही. स्वतःची शेती असली तरीही त्यांना शहरात जाऊन नोकरी करायची आहे. शेतीत चांगले करिअर करता येत नाही असाच समज आत्तापर्यंत अनेक जणांचा आहे. आता तंत्रज्ञान भरपूर विकसित झाले आहे आणि त्यामुळे शेतीतही अनेक चांगल्या संधी उपलब्ध आहेत याकडे बरेचजण कानाडोळा करतात.
आपल्या पूर्वजांनी पोटाला अन्न मिळावे आणि सतत इतरत्र भटकंती करावी लागू नये यासाठी शेतीचे तंत्र विकसित केले मात्र माणसाने जशी विज्ञानात प्रगती केली तशी त्याला शेतीच नको वाटू लागली. हातात पैसा खेळू लागल्यावर आपण काहीही विकत घेऊ शकतो हा समज माणसात निर्माण झाला आणि त्याने या काळया आईकडे पाठ फिरवली मात्र सोन्याच्या ताटात देखील अन्नच लागते हे तो विसरला.
माझी किंबहुना प्रत्येक शेतकरी माणसाची एकच इच्छा असते त्याची पिढीजात चालत आलेली शेती मुलाबाळांनी मोठी करावी. कोरोना काळात तर सगळ्यांनी अनुभवलं सात्विक आणि भेसळ मुक्त आहार किती महत्त्वाचा आहे ते म्हणूनच शेतीकडे आजच्या पिढीने सकारात्मक दृष्टीने पाहून यात नवे नवे प्रयोग केले तर देशातला पैसा देशात तर राहीलच शिवाय आपला भारत देश शेतमाल निर्यातीत अव्वल स्थानी येईल. तुमच्या पिढीने शेतीकडे जर गांभीर्याने लक्ष घातले तर हा सोन्याचा दिवस दूर नसेल. खऱ्या अर्थाने आपल्या देशातून पुन्हा सोन्याचा धूर निघेल. असो! सगळं काही तो जाणतोच. चल लवकर सगळ्यांना भूक लागली असेल."
एवढं बोलून शेतकरी काका बोलायचे थांबले आणि आम्ही पुन्हा सगळे जिथे होते तिथे येऊन पोहोचलो. शेतकरी काका जे काही बोलले त्यांचे ते शब्द माझ्या मनात ठसले होते. खरंच शेती आणि शेतकरी यांच्याशिवाय कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था कार्य करूच शकत नाही. जर आपल्या देशावर निसर्गाची एवढी कृपा आणि विज्ञानाची साथ आहे तर शेतीला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवणे ही आपली जबाबदारी नाही काय?
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा