शापित अप्सरा भाग 40

एक प्रेमकथा हळूहळू सुरू होतेय.

शापित अप्सरा भाग 40


मागील भागात आपण पाहिले सुगंधा आणि केशर एका अघोरीच्या आत्म्यापासून कमळाचे रक्षण करतात. त्यानंतर पुढे जाताना केशरला एक शिल्प सापडते. सुभानराव पाणवठा शोधायला निघतात आता पाहूया पुढे.


केशर आणि सुगंधाने संरक्षण रिंगण आखले. त्यानंतर सगळे सामान मांडून झाले.

"सैपाक करायला पाणी लागलं,म्या बगून येते." रखमा म्हणाली.


"रखमा थांब,अनोळखी जंगल आहे. केशर आणि मी जातो." सुगंधा तिला थांबवत म्हणाली.


"केशर,पाण्याचा खळखळ आवाज येतोय म्हणजे जवळच झरा असेल." सुगंधाने अंदाज व्यक्त केला.


"हो,जातोच आहोत तर जरा पाण्यात पोहायचा आनंद घेऊ." केशर हसून म्हणाली.


केशर,सुगंधा,रखमा आणि सोबत आणखी दोघी असे पाण्याच्या शोधात निघाले. जंगल प्रचंड दाट होते.


"केशर त्या योगिनी शिल्पाखाली लिहिलेल्या मजकुराचा अर्थ काय असेल? खरच असे काही रहस्य असेल?"

सुगंधा शंका व्यक्त करत होती.


"सुगंधा,योगिनी आणि चेटकीण अमर राहू शकतात असे अनेकजण सांगतात. चेटकीण रक्त पिऊन अमर राहते परंतु योगिनी अमर राहायची विद्या जाणत असे उल्लेख खूप ठिकाणी आहेत."

केशरने उत्तर दिले.


"हो,पण आता आपल्यापैकी कोणाकडे हा मंत्र,विद्या किंवा औषध का नाही? "

सुगंधाने तिच्या मनात अनेक वर्षे असलेला प्रश्न विचारलाच.



"सुगंधा,मातृसत्ताक कुळातील शक्तिशाली वारसा असणाऱ्या प्रमुख स्त्रियांना संपवायचे अनेक मार्ग शोधले गेले. त्यातील ज्या टिकून राहिल्या त्यात योगिनी पंथातील स्त्रिया प्रमुख होत्या. त्यांच्या अनेक विद्या काळाच्या ओघात लुप्त झाल्या."


केशरने उत्तर दिले.


पाण्याचा आवाज जवळ येत होता पण पाणवठा दिसत नव्हता.


"अग बया, निस्ता पाण्याचा आवाज येतोय. पाणी कुठं दिसना?" रखमाच्या बोलण्याने सगळ्याजणी हसू लागल्या.



इकडे सुभानराव पाणवठा शोधत निघाले. थोडे अंतर गेल्यावर पाण्याचा आवाज येऊ लागला. त्या दिशेने गेल्यावर त्यांना समोरच छान तळे आणि त्यातून बाहेर पडणारा झरा दिसला.


"वा,एकदम मस्त जागा आहे. इथे शिकार मिळणारच." सुभानराव मनात म्हणाले.


त्यांनी ते स्वच्छ पाणी पाहिले आणि उतरायचा मोह झाला पण कमळा बरोबर घडलेला प्रसंग आठवून ते मागे फिरणार इतक्यात त्यांना हसण्याचा आवाज ऐकू आला आणि सुभानराव सावध होऊन झाडाच्या मागे लपले.



सुगंधाने समोरचे तळे पाहिले आणि तिला प्रचंड आनंद झाला. स्वतः शीच एक गिरकी घेऊन ती थांबली.


"केशर पाण्यात उतरू या का?" तिने केशरला विचारले.


तेव्हा केशरने आधी ध्यान लावले आणि मग खात्री होताच होकारार्थी मान डोलावली. सुगंधा आणि केशर पाण्यात पोहण्याचा मनसोक्त आनंद घेत होत्या. सुभानराव ओलेत्या सुगंधाचे अप्रतिम सौंदर्य पाहून भान हरपले होते. त्यांनी आपल्या मनाला आवर घातला आणि तिथूनच ते परत फिरले.


"सुगंधा,आता पुरे. आपल्याला मुक्कामाच्या ठिकाणी जायला हवे."

केशर पाण्याच्या बाहेर आली.


"थांब ना थोडा वेळ." सुगंधाने विनवणी केली.


परंतु केशरने तिला पाण्याच्या बाहेर काढले. मुक्कामाच्या ठिकाणी आल्यावर आज केशर आणि सुगंधा दोघींनी स्वयंपाक करायचे ठरवले.


"रखमा,आज तू आराम कर स्वयंपाक आम्ही बनवतो." केशरने तिला सांगितले.


रखमा त्यावर होकार देऊन दुसरी कामे करायला गेली. इकडे स्वयंपाक करत असताना केशर आणि सुगंधा त्या सापडलेल्या शिल्पाबद्दल बोलत होत्या.


"सुगंधा,खरच असे काही असेल ज्याने माणूस अमर होईल?" केशरने विचारले.


"तुलाही आता शंका आली ना? आपण उद्या त्या शिल्पातील मजकुराचा अभ्यास करू."


स्वयंपाक उरकला आणि त्या दोघी जरा आराम करायला गेल्या.



सूर्यास्त झाला आणि मग थोड्या वेळाने केशरला जाग आली.


"रखमा,जेवायला बसायची तयारी कर."तिने आवाज दिला.


सुगंधा आणि केशर आवरून बाहेर आल्या. रखमा जेवण वाढत होती.


"रखमा आज बोलत नाहीय? रोज तर भरपूर बडबड असते तुझी." सुगंधा हसून म्हणाली.


"मघाशी तिला मधमाशी चावली आहे मध खाताना जिभेवर." दुसऱ्या एकीने उत्तर दिले.


"आम्हाला सोडून एकेकटी खात होतीस म्हणून शिक्षा झाली तुला." केशर मुद्दाम थट्टा करत होती.


सगळ्यांची जेवणे आटोपली आणि झोपायची तयारी सुरू झाली. थोड्याच वेळात राहुटीच्या आतील दिवे मालवले.



"खंडोजी,मोजके गडी घ्या. आता थोड्या वेळाने जनावर पाण्यावर येऊ लागतील."

सुभानराव कमरेला तलवार खोचत बोलले.


आठ दहा मोजके लोक घेऊन सुभानराव शिकारीला निघाले. अर्धे अंतर चालून गेल्यावर एका झुडुपात हालचाल जाणवली.


"थांबा,फूड झाडात जनावर हाय आ वाटत."

खंडोजी हळू आवाजात बोलला आणि सगळेजण जागेवर थांबले. सुभानराव आणि खंडोजी एकेक पाऊल टाकत पुढे जाऊ लागले.



झाडातून कोणीतरी कण्हत असल्याचा बारीक आवाज येत होता.


"मालक, जनावर न्हाय,माणूस हाय." खंडोजी बारीक आवाजात खुसपुसला.


त्याबरोबर झाडीत जोरात हालचाल झाली. खंडोजी मशाल घेऊन पुढे झाला. त्याने झाडाची पाने बाजूला केली. तोंड आणि हातपाय बांधलेली एक मध्यमवयीन स्त्री तिथे होती. खंडोजी पटकन पुढे झाला आणि तिला सोडवले.


"सुगंधाला वाचवा. तिचा जीव धोक्यात हाये." रखमाने पहिलेच वाक्य उच्चारले.


" खंडोजी,तिकडे सुगंधाची राहुटी आहे. चला जाऊन बघुया." सुभानराव हळू आवाजात म्हणाले.


"मालक,मशाली विझवा आन माझ्या मागनं या." खंडोजी पुढे झाला.


सुगंधाच्या राहुटीच्या आसपास एकही मशाल नव्हती. सुभानराव सावध होऊन पुढे सरकत होते. पहाऱ्यावर असलेले शिपाई आणि योगिनी झोपलेल्या दिसल्या. काहीतरी दगाफटका असल्याचे खंडोजीने ओळखले.


सुभानराव आणि खंडोजी हळूच तंबूत शिरले. समोरचे दृश्य भयावह होते.


दोघेजण पाठमोरे उभे होते. अगम्य भाषेत मंत्र उच्चारण करत त्यांनी खंजीर उचलले आणि त्याच वेळी खंडोजी आणि सुभानराव दोघांनी तलवारीच्या एकाच वारात त्यांची धडे वेगळी केली.



त्यानंतर सुगंधा आणि केशरच्या अनावृत्त देहांकडे त्यांचे लक्ष गेले. खंडोजी पटकन बाहेर गेला. तोपर्यंत रखमा आत आली होती. तिने दोघींच्या अंगावर पटकन पांघरून घातले.



सुभानराव बाहेर उभे असताना अचानक मागून हल्ला झाला पण सावध खंडोजीने हल्लेखोराचा हात कापला आणि एक बायकी किंचाळी जंगल हादरवून गेली. तोपर्यंत बाकीच्या साथीदारांनी हल्लेखोर पकडला होता. सुभानराव मागे वळले.


ती विलक्षण सुंदर स्त्री पाहून ते स्तब्ध झाले. तेवढ्यात खंडोजी पटकन पुढे आला आणि त्याने तिचे तोंड बांधले.


"मालक चेटकीण हाय ती. हात कापला म्हणून मरणार न्हाय. पर तोंडाने मंत्र म्हणली तर आपल्याला भारी पडल."

खंडोजी तिला जेरबंद करत म्हणाला.


"मालक, तुमी जाऊन आराम करा. म्या हित पहारा देत थांबतो." खंडोजी अदबीने बोलला.


"नाही,सुगंधा जागी होईपर्यंत आम्ही इथून हलणार नाही."इनामदार खाली बसत म्हणाले.


त्या रात्री सुभानराव आणि त्यांची माणसे पहाऱ्यावर थांबली.सकाळी पक्ष्यांच्या आवाजाने जंगल जागे झाले. उन्हाची किरणे जमिनीवर पडू लागली तेव्हा केशरला जाग आली.


आपण इतका वेळ झोपून होतो याचा अर्थ....

केशर पटकन उठली. तिच्या अंगावर फक्त पांघरून होते. बाजूला सुगंधा त्याच अवस्थेत होती. खाली झोपलेल्या रखमाला तिने आवाज दिला.


"रखमा उठ लवकर." केशरचा आवाज ऐकून रखमा जागी झाली.


"रखमा काल रात्री काय घडले? सुगंधाला उठव."


केशर सूचना देतच साडी नेसून तयार झाली. तिने काल सापडलेले शिल्प ठेवलेला पेटारा शोधला. पेटारा रिकामा. केशर धावत सुगंधाकडे गेली.


सुगंधा उठून तयार होत होती.


"सुगंधा आपण काल ठेवलेले शिल्प पेटाऱ्यात नाही." केशर प्रचंड चिंतेत होती.


"केशर,शिल्प सुरक्षित आहे. मला आधीपासूनच शंका येत होती. काल जेवण वाढताना रखमा शांत होती तू पाहिलेस ना?"

सुगंधाने विचारले.


"हो पण तिला मधमाशी चावली होती." केशरने प्रसंग आठवून उत्तर दिले.


"पण ओठाला मधमाशी चावली म्हणून उजव्या हाताने काम करणारी रखमा डाव्या हाताने वाढेल का?

पण मला हे समजले तोपर्यंत मी अन्न खाल्ले होते. त्यामुळे मग आता ते शिल्प वाचवणे आवश्यक होते. काल मी अचानक कपडे बदलायला आत गेले ते उगाच नाही."


सुगंधा हसून म्हणाली. केशर आता बरीच सावरली होती.


"रखमा,तू कुठे होतीस काल? नक्की काय झाले होते?" केशरने पुन्हा विचारले.


"म्या मध घिऊन परत येत व्हते तर अचानक धूर झाला आन मंग मला फुडच कायच दिसेना. त्यानंतर डोळ्यावर अंधार आला. म्या जागी झाले तवा जंगलात हातपाय आन त्वांड बांधून पडले व्हते.


मला जनावरांनी खाल्ल असत पर इनामदार देवावानी धावून आल बगा. त्यांनी हित तुमाला सुदिक वाचवल."


रखमाने सगळा प्रकार सांगून टाकला. सुगंधा लगबगीने बाहेर आली.


"तुम्ही काल केलेल्या मदतीबद्दल आभार." सुगंधा अदबीने बोलत होती.


"फक्त कोरडे आभार नको आम्हाला." इनामदार खट्याळ हसून म्हणाले.

"मग? आणखी काय हवे आहे?" केशरच्या आवाजात नकळत धार आली.


"काही नाही आम्ही महादेवाच्या दर्शनाला जातोय तर तुम्ही सोबत यावे."सुभानरावांनी उत्तर दिले.


"केशर,आम्ही येऊ असे सांग त्यांना." सुगंधा आत जाताना तिरपा कटाक्ष टाकत म्हणाली.

"आम्ही वाट बघतो." सुभानराव त्यांच्या लोकांना घेऊन छावणीकडे निघून गेले.


पकडलेली चेटकीण कोण असेल?

दर्शनाला जाताना काय घडेल?

सुगंधा होकार देईल का?

वाचत रहा.

शापित अप्सरा.

©®प्रशांत कुंजीर

🎭 Series Post

View all