नैराश्य ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे असं मत बऱ्याच लोकांचे आता झाले आहे. घडणाऱ्या घटना, परिस्थितीचे आव्हान, घरी बसण्याची सवय नसणे, आर्थिक चणचण आणि अश्या बऱ्याच गोष्टीतून नैराश्य येते.. तर ह्या स्पर्धेच्या निमित्ताने मी आज तुम्हाला माझ्या जीवनातल्या अशा प्रसंगाबद्दल सांगणार आहे जो मला बरेच काही शिकवून गेला..
माझं कॉलेज चं शेवटचं वर्ष चालू होते (Bsc Biotechnology), खूप अभ्यास, प्रॅक्टिकल, ह्या सगळ्यात खूप कमी वेळ मिळायचा स्वतः साठी.. तरी माझं आयुष्य प्रेमाने भरलेलं होतं. माझा नवरा म्हणजेच तेव्हाचा प्रियकर.. घरी आम्ही सांगितलं होतं कारण दोघंही सज्ञान होतो. आमचे प्रेम कसे झाले? कधी झाले? आम्ही किती रोमँटिक होतो ई. गोष्टी मी सांगत बसणार नाही कारण आयुष्यात प्रेम तुमची वेगळीच परीक्षा घेते त्यावर ठरते तुम्ही किती ठाम आहात. प्रत्येकाला एका phase मधून जावे लागते. माझं आयुष्य सरळ साधं अडचणी शिवाय होतं.. आर्थिक चणचण नाही, अभ्यासाचं टेन्शन नाही का घरच्यांकडून प्रेमात विरोध नाही.. पण…….
ह्या पण ने माझी परीक्षा घेतली. एक दिवस, एक महिना नाही तब्बल ३ वर्ष.. माझ्या प्रेमाचा खरा कस लागला.. माझा होणारा नवरा दुबई ला एका कॉन्फरन्स ला गेला.. त्याचा लहान वयी त्याला खूप मोठी संधी मिळाली होती. दुबई ला एकट जायचं त्यात कोणी ओळखीचं नाही. पण त्याने त्याचा एका दूरच्या नातेवाईकाकडे राहायची सोय केली.. फक्त ५ दिवसांचा प्रश्न होता. दुबई ला उंचच उंच इमारती, हाय स्पीड गाड्या, पहिला एकट्याचा विमान प्रवास त्याने केला(घाबरून) तिथले आटपून तो परत ही आला पण काहीसा अबोल झाला होता.. ४-५ दिवस घराबाहेर पडला नाही का कोणाशी बोलला नाही. फक्त अंथरुणात पडून राहायचा. त्याचा आई बाबांनी मला बोलावले आणि आम्ही त्याला हर एक प्रयत्नाने धीर दिला पण काहीच उपयोग होत नव्हता. हळू हळू त्याचा आत्मविश्वास कमी होत चालला होता. गाडीचा हॉर्न ही त्याला नकोसा वाटत होता. माझं BSc संपून मी आता पदव्युत्तर अभ्यासाला लागले होते. सकाळी ७ ते संध्याकाळी ७ मी कॉलेज मध्ये असायचे. पण नेमके कधीतरी त्याला खूप घाबरुन जायला व्हायचे अशा वेळी मी कुठे म्हणून तो विचारायला लागायचा.. मी संध्याकाळी त्याचा घरी जायचे मी आले हे पाहून तो शांत झोप घ्यायचा.. असा क्रम बरेच महिने चालू होता.. तो आता बराच ठीक झाला होता तरी मधूनच त्याला खूप सांभाळायला लागायचे. माझा अभ्यास, प्रोजेक्ट, ह्या सगळ्यात मी खूप थकायचे.. दुसऱ्या वर्षी माझं शेवटचं वर्ष होतं. त्यानुसार मला माझा प्रोजेक्ट मुंबईला एका नामांकित लॅब मध्ये करायची संधी मिळाली.. रोजचा प्रवास, मानसिक ताण, खायची आबाळ, प्रचंड काम आणि माझ्या आयुष्यातल्या अती महत्त्वाच्या माणसाला जपणं! प्रत्येक गोष्ट आव्हान होते, वेळ पुरत नव्हता.. त्याला धीर देता देता मलाच निराश झाल्यासारखं वाटायला लागलं. मी काही खूप मोठी नव्हते फक्त २२ वं लागलं होतं. माझ्या मैत्रिणी किती मजा करायचा, धमाल आयुष्य, मजा मस्ती, खाणं, सिनेमे पाहणं आणि माझा कायम नकार कारण मला वेळच पुरायचा नाही. एक रविवार तो सुद्धा मी त्याला द्यायचे. कारण अशा परिस्थिती मध्ये त्याला फक्त माझा हात पकडुन बसायचं होतं. त्याला जास्त सुरक्षित वाटायचं. पण मी खूप काही गमावत होते. माझ्या वयाच्या मुलींना मजा करताना पाहून खूप खूप राग यायचा. अगदी काही वेळा का मी ह्याचा प्रेमात पडले अस वाटायचं. काय करू अल्लड होते मी पण.. डिप्रेशन म्हणजे काय असू शकेल त्याची सुरुवात होत होती. कोणाशी बोलणं नाही, काही नाही फक्त यंत्रवत काम.. अशात मला खोकल्याचा खूप त्रास झाला. तरी सुद्धा मला त्याचा बाजूला बसून राहावे लागत होते. माझ्या आई बाबांनाही मी हे सांगत नव्हते कारण मला भीती वाटायची. मैत्रिणी समजवायचा की जरा मोकळी हो पण मला खरंच वेळ नव्हता.. शेवटी ४ दिवस मी एकटी घरात होते, त्याचे फोन वर फोन येत होते. तुम्हाला वाचताना वाटेल काय मूर्खपणा आहे पण हे मी अनुभवलं आहे की मनाची कोंडी कशी होते. माझ्या मैत्रिणी, मित्र हळू हळू दूर होत गेले कारण त्यांनी ठरवलंच होतं ही काही येतच नाही.
ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मी स्वामींचा जप सुरू केला. मनाला एक दिवस समजावलं की कदाचित ही तुझी परीक्षा आहे. लोकांच्या आयुष्यात संकटं येतात. कुठे आधी कुठे नंतर. तुला लहान वयात आलं आहे म्हणजे तुझ्यात तेवढी शक्ती आहे म्हणूनच.. माझ्या प्रिय व्यक्तीचा त्रास मला जास्त होत होता पण वेळीच भान ठेऊन मी स्वतः ला सावरलं.. आत्महत्या आणि इतर विचार आले नाहीत पण स्वतःला काहीतरी अपाय करायची जबरदस्त इच्छा झाली होती काही वेळा.
अशी ईच्छा बऱ्याच लोकांना आयुष्यात एकदा तरी होत असेल. कारणे वेगळी असू शकतात. पण मी माझ्या गुरु स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेऊन स्वतःला एक संधी दिली. माझा नवरा एक वर्षाने ठीक झाला. त्याचा आजाराला फोबिया असं सुंदर नाव होतं डॉक्टर आणि त्यांचा सल्ल्याने तो बरा झाला. मस्करी वाटेल ऐकून पण आजही त्याला उंच काही पाहिलं किंवा उंचावर गेलं की भीती वाटते. पण ते सोडलं तर बाकी आता सगळं काही ठीक आहे. ह्या सगळ्यात त्याला खचून न देण्यासाठी मी खचत गेले होते पण उपयोग नव्हता.
हे सगळं मी तुम्हाला खूप कमी शब्दात व्यक्त केलं आहे कारण लिहायला सांगायला मर्यादा असतात. तात्पर्य एवढंच की कधी ना कधी तुम्ही अशा वळणावर येता जिथे सगळं काही तुमच्या विरुद्ध असतं आणि तुमची साथ सगळे सोडून जातात. त्यामुळे तुमचा लढा तुम्हाला लढायचा असतो. ह्या परिस्थिती मध्ये नामस्मरण तुम्हाला बळ देते. मनात येणारे अविचार दूर फेकून देणे आपल्यालाच करायचे असते त्यात आपली मदत कोणीही करू शकत नाही. अश्या वेळी अजून एक उपाय म्हणजे दुसऱ्याचं दुःख जाणून घ्यायचं म्हणजे आपलं काहीच नाही असं वाटतं (ही माझी अनुभवलेली थिओरी आहे). मन मोकळं करून ऐकणारा कोणी असेल तर छानच पण तोच नसेल किंवा तुम्हाला कोणाला सांगता येत नसले तर आरशासमोर उभ राहून बोला. तुम्ही तरी तुमच नक्की ऐकाल…
(माझ्या आयुष्यातील सत्य घटना मी अती संक्षिप्त स्वरूपात मांडली आहे. काहींना बोअर वाटेल पण ज्याचं जळत त्यालाच कळतं, काहींना हळहळ वाटेल पण जे घडून गेलं ते गेलं असं म्हणायचं आणि फक्त बोध घ्यायचा. आत्ताच्या नकारात्मक परिस्थिती मध्ये सकारात्मक राहून आपली ही परीक्षा आहे असं समजून पुढे जायचं. कारण दोन्ही शब्दात आकार तोच आपल्याला उपयोगी असतो)
नावाशिवाय शेअर करू नका कारण ही कथा नसून माझा अनुभव आहे.
© स्वराली सौरभ कर्वे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा