Login

सावत्र आई भाग 3

About Mother

भावाच्या आग्रहाखातर व भविष्याचा विचार करून, अभयच्या बाबांनी दुसरे लग्न करण्याचे ठरवले.

काही महिन्यातच त्यांना सुमनचे स्थळ एका नातेवाईकांनी सुचवले. सुमनचे अगोदर लग्न झालेले होते व तिला 14 वर्षांची एक मुलगी होती; पण सासरच्या छळाला कंटाळून ती नवऱ्याशी घटस्फोट घेऊन माहेरी राहत होती.


मध्यस्थीच्या मदतीने सर्व विचारपूस व बोलणी झाल्यानंतर,

सुमन व अभयच्या बाबांचे लग्न झाले.
सावत्र आई म्हणून सुमन घरात आली व सुमनच्या मुलीलाही अभयच्या बाबांचे वडील म्हणून छत्र मिळाले.
सावत्र आई विषयीचे अभयचे विचार त्याच्या बाबांना माहीत होते. त्याचे त्याच्या आईवर खूप प्रेम होते. तिची जागा तो कोणालाही देणार नाही. हे ते जाणून होते. 'सुमनला आई म्हणून स्वीकारायला त्याला वेळ लागेल.' या विचाराने ते अभयशी अगोदरसारखेच वागत होते. आता त्यांना अभयलाही सांभाळायचे होते आणि सुमनचा नवरा व तिच्या मुलीचे वडील या ही जबाबदाऱ्या त्यांना पार पाडायच्या होत्या. कोणा एकाची बाजू घेऊन किंवा एकाच्या सुखासाठी दुसऱ्याच्या सुखावर त्यांना अन्याय करता येणार नव्हता.

आपण दुसरे लग्न केले आणि सुमन तिच्या मुलीला घेऊन या घरात आली. हे अभयला आवडले नाही. हे त्यांना जाणवत होते. अभय तसा स्पष्टपणे विरोध दाखवत नव्हता. पण सुमनशी व तिच्या मुलीशी मनमोकळेपणे वागत नव्हता. त्यांच्याशी बोलतही नव्हता. 'आई' म्हणून हाक ही मारत नव्हता. तो एकाच घरात राहूनही अलिप्तपणे, परकेपणाने वागत होता. याउलट सुमन व तिची मुलगी आरती त्याच्याशी छान बोलत होत्या. त्याची काळजी घेत होत्या. 'दादा, दादा...' म्हणून आरती त्याला आवाज देत असायची. सुमनही अभयला आईप्रमाणे जेवणासाठी आणि इतर छोट्या मोठ्या गोष्टींसाठी आवाज देत, प्रेमाने बोलत आपले कर्तव्य पार पाडत होती.

'काही वर्षात मुलाचे लग्न करून सून घरात आली असती आणि यांनी आपले लग्न करून बायको घरात आणली. स्वतःचा विचार केला पण मुलाचा काही विचार केला का? त्याच्यासाठी सावत्र आई व सावत्र बहिण घरात आणली. बिचारा अभय कसा राहत असेल घरात?'

असे गावातील काही लोक म्हणत होते.

तर काही जणांचे म्हणणे होते,

'काही वर्षात मुलाचे लग्न होईल व तो त्याच्या संसारात रमून जाईल. पण अभयच्या बाबांचे पुढचे आयुष्य एकट्यालाच जगावे लागले असते. अजून त्यांची नोकरी आहे व वयही काही जास्त झालेले नाही आणि पैसाही आहे. त्यामुळे त्यांनी दुसरे लग्न केले. यात त्यांनी काही चुकीचे केलेले नाही.'


गावात अशा उलटसुलट चर्चा लोक करत होते.

अभयच्या कानावर या चर्चा येत होत्या.

अगोदरच नाराज असलेले त्याचे मन अजून जास्त उदास होऊ लागले होते.

क्रमश:
नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all