"अभय काय झाले रे बाळा? का रडतो आहेस? आईची आठवण येते आहे का?"
मीराताईंनी अभयला विचारले.
"मावशी, माझी आई का गेली गं मला सोडून? मला तिची खूप आठवण येते गं. माझ्यावर खूप प्रेम करायची ती. एवढी आजारी होती पण तरी तिचे लक्ष माझ्याकडे असायचे. माझी विचारपूस करायची. माझी काळजी घ्यायची. तिचे हे सर्व प्रेम..तिचा तो मायेचा स्पर्श हे सर्व मी नाही विसरू शकत. तिची आठवण मला कायम येत राहील."
अभय रडत रडत मीराताईंना म्हणाला.
"खरं आहे रे तुझं. आईच्या मायेला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची सर येत नाही आणि तुझी आई खरंच खूप चांगली होती. तिचे आपल्या संसारावर, तुझ्यावर व तुझ्या बाबांवर खूप प्रेम होते. सुखाचा संसार करत होती; पण तिच्या सुखाला कोणाची नजर लागली माहित नाही. तिला आजारातून देवाने बरे केले नाही आणि घेऊन गेला तो तिला कायमची. आजारातून चांगली होण्याची तिची खूप इच्छा होती. तुझ्या वडिलांनी तिला वाचवण्याचे खूप प्रयत्न केले. त्यांचे तिच्यावर खूप प्रेम होते पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. तुझ्या आईचे खूप स्वप्न होते पण ते स्वप्न पूर्ण न होताच ती हे जग सोडून चालली गेली. 'माझ्या अभयकडे लक्ष दे.' असे मला नेहमी सांगायची."
मीराताई आपल्या डोळ्यातील अश्रू लपवत अभयला म्हणाल्या.
"मावशी, आई गेल्याचे मला खूप दुःख झाले आहे आणि माझ्या बाबांनी ही खूप दुःख झाले आहे. ते एकटे असतात तेव्हा ते रडत असतात. मी त्यांना रडताना पाहिले आहे. आम्ही दोघे आईला कधी विसरणार नाही. पण मावशी मी ऐकले आहे की, माझे काका माझ्या बाबांना दुसरे लग्न करण्याचे सांगत आहेत. माझे काका माझा व बाबांचा विचार करत आहेत. आमच्या दोघांची काळजी घेण्यासाठी आणि आमच्या घराला घरपण आणण्यासाठी बाबांनी दुसरे लग्न करावे असे काकांना वाटते आहे. मावशी, माझे काका जरी आमच्या चांगल्यासाठी असे सांगत असले तरी, माझ्या आईची जागा कोण्या दुसऱ्या स्त्रीने घेतलेली माझ्या मनाला पटत नाही. बाबांच्या आयुष्यात ती स्त्री बायको म्हणून येईल; पण ती स्त्री माझी आई कशी होऊ शकते? ती माझ्यावर आईसारखे प्रेम करेल का? ती माझी सावत्र आईचं म्हटली जाईल ना?"
अभय मीरा मावशीला म्हणाला.
क्रमश:
नलिनी बहाळकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा