सावल्यांच्या कुशीत. भाग - २९
रात्रीच्या जेवणाची वेळ झाली तेव्हा वेदिका नीरवला बघायला बाहेर गेली तर तो एका जागी शांत उभा असतो, ते बघून वेदिका त्याच्या मागे गेली आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तोच नीरवने दचकून मागे वळून पाहिले, वेदिकाला समोर बघून त्याने एक दिर्घ श्वास घेतला.
"मीच आहे नीरव, किती घाबरलात तुम्ही... चला जेवायला, सगळे बसलेत तुमचीच वाट बघताय!" वेदिका म्हणाली तेव्हा नीरवने हलकेच मान हलवली आणि ते दोघेही आत गेले.
सगळेच एकत्र जेवायला बसले होते पण आज कोणीच काही बोलत नव्हते, प्रत्येक जण शांतच होता. जेवताना रोजची आरवची बडबड चालू असायची, आज तो ही खाली मान घालून जेवत होता. सगळ्यांना शांत बघून वेदिकाला टेन्शन आले होते, आपण नसताना इथे काही घडलंय की काय असा विचार तिच्या मनात आला पण तिने कोणालाही काही विचारलं नाही.
जेवण झाल्यावर सगळं आवरून ती जेव्हा तिच्या खोलीत गेली तेव्हा नीरव पण शांत शांतच होता. मग ती पण त्याच्या बाजूला बेडवर येऊन बसली.
"नीरव, मी आल्यापासून बघतेय घरातले सगळेच खूप शांत आहे, बाबा तर एक शब्दही बोलले नाही माझ्याशी. घरात काही घडलंय का?" वेदिकाने काळजीने विचारलं.
"हो वेदिका, तू गेल्यापासून बाबांसोबत सारखं विचित्र काहीतरी घडतंय पण ते काय घडतंय हेच त्यांना सांगता येत नाही. रात्री घडलेला प्रकार ते सकाळी लगेच विसरतात पण काहीतरी होतंय हे नक्की, कारण रोज त्यांचं डोकं दुखत असतं." नीरव.
"खूप भयंकर आहे हे नीरव, आपल्याला यावर लवकरच काहीतरी उपाय काढावा लागणार आहे. अजून किती दिवस असं चालायचं!" वेदिका.
"हो आई म्हणाली की आपण हा वाडा सोडून काही दिवस शेतातल्या घरी राहायला जाऊया, पण तिथे गेल्यावर हे प्रकार कमी होतील हे कशावरून?" नीरव.
"प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे, कदाचित जागा बदलली तर हे प्रकार थांबतील ही." वेदिका.
"काय माहीत, वेदिका... काही गोष्टी अशा असतात की त्या आयुष्यभर आपला पाठलाग सोडत नाही. मग कुठेही जा त्या आपल्या सोबतच सावली म्हणून राहतात." नीरव उदास होऊन बोलतो.
"नेमकं कशाबद्दल बोलताय तुम्ही हे? आणि असा निगेटिव्ह विचार का करताय?" वेदिका.
"वेदिका, माझ्या भुतकाळात एक गोष्ट घडून गेली आहे आणि ती मी तुला सांगितली नाही. खरं तर भुतकाळ हा तिथेच संपला होता पण आता असं वाटतंय की तुला सांगणं गरजेचं आहे, माझा भुतकाळ ऐकून तू माझी साथ तर सोडणार नाही ना!" नीरव म्हणाला तोच वेदिकाने त्याचा हात हातात घेतला.
"मला तुमची साथ सोडायची असती तर, या घरात आल्यापासून माझ्या बाबतीत जे काही घडत होतं तेव्हाच मी माहेरी गेली असती. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुमच्या भुतकाळात काहीही झालं असलं तरी तुमचं माझ्यावर खरं प्रेम आहे हे माहित आहे मला, त्यामुळे मी कधीच तुमची साथ सोडणार नाही तेव्हा तुम्ही बिनधास्त सांगा, तेवढंच तुम्हाला हलकं वाटेल." वेदिका.
"वेदिका, मी जेव्हा काॅलेजला होतो तेव्हा माझं एका मुलीवर प्रेम होतं, अन्वी नाव होतं तिचं, ती सुद्धा माझ्यावर खूप प्रेम करायची. आम्ही दोघांनीही ठरवलं होतं की मी शिक्षक झालो की घरी आमच्याबद्दल सांगायचं आणि घरच्यांच्या परवानगीनेच लग्न करायचं." नीरव.
"मग पुढे काय झालं?" वेदिका.
"ठरल्याप्रमाणे आम्ही दोघांनी पण घरी सांगितलं, अन्वीच्या घरी फक्त तिची आईच असते त्यामुळे तिला लगेच परवानगी मिळाली होती पण बाबांनी आमच्या लग्नाला नकार दिला. कारण होतं ते म्हणजे जात, ती वेगळ्या जातीची होती. पण मला हे आजिबात नाही आवडलं, मी तेव्हा बाबांबरोबर खूप वाद घातले, त्यांना खूप पटवून दिले की जात महत्वाची नसते तर माणूस महत्वाचा असतो. आईने सुद्धा त्यावेळी मला सपोर्ट केला, बाबांना समजावलं. अन्वीचं वागणं बोलणं आईला खूप आवडत होते. तिने बाबांच्या मागे सारखाच तगादा लावला. मग नंतर काही दिवसांनी त्यांनाही हे पटलं आणि त्यांनी पण आमच्या लग्नाला परवानगी दिली." नीरव.
"मग का नाही केलं तुम्ही दोघांनी लग्न?" वेदिका.
"कारण एक दिवस अन्वी अचानक घरी आली आणि मला म्हणाली की मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. तू मला कायमचा विसरून जा, आजपासून आपले दोघांचे मार्ग वेगळे! तिच्या बोलण्याने मला खूप धक्का बसला, मी तिला खुप थांबवण्याचा प्रयत्न केला पण ती थांबली नाही, त्या दिवशी मी तिला किती फोन केले पण तिने माझा एकही फोन घेतला नाही. दुसऱ्या दिवशी मी तिच्या घरी गेलो तर ती आणि तिची आई घरीच नव्हत्या. खूप दिवस मी तिची वाट पाहिली पण ती नाही आली. काही दिवसांनी तिची आई आली पण त्यांनीही मला तिच्याबद्दल काहीच सांगितलं नाही." नीरव.
"असं कसं पण... तिचं प्रेम खरं होतं ना मग ती अशी का वागली? तुम्ही तिला जाब विचारला नाही का?" वेदिका.
"तिने जाब विचारायची संधीच नाही दिली मला. तर कसं जाब विचारणार मी! तिच्या आईला सुद्धा खूप विचारलं, त्यांनी सुद्धा मला सांगितले की तुम्ही दोघं कधीच एक होऊ शकत नाही. मग नंतर मी ही रागाने तिचा विचार मनातून काढून टाकला, मी विचार केला की जर तिलाच माझ्या प्रेमाची किंमत नाहीये तर मी का तिच्या प्रेमात झुरत राहू!" नीरव.
"तुमचंही बरोबर आहे पण मला अन्वीच्या अशा वागण्याचा अर्थ नाही लागत, तिचं प्रेम असूनही तिने असं का केलं असेल? तिच्यावर कोणी दबाव आणला असेल का?" वेदिका काहीतरी विचार करून म्हणाली.
"छे असं कसं कोण दबाव आणेल! तसं असतं तर तिने मला सांगितले असते." नीरव.
"हम्म्म ते पण आहेच... पण एवढ्या दिवसांत तुम्हाला मला आजच ही गोष्ट का सांगावीशी वाटली?" वेदिका.
"कारण हल्ली ती माझ्या स्वप्नात येत असते!" नीरव शांतपणे म्हणाला.
"तुम्ही तिचा विचार करत असाल म्हणून तसं होत असेल, सहसा आपल्या स्वप्नात फक्त मेलेल्याच व्यक्ती येतात असं म्हणतात पण माझा काही या गोष्टीवर विश्वास नाहीये." वेदिका म्हणाली तसं नीरव तिच्याकडे बघू लागला.
"म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं आहे वेदिका? अन्वी या जगात नाही, असं काही बोलायचं आहे का तुला?" नीरव थोडा रागाने बोलला. त्यावर वेदिका घाबरून खाली मान घालून बसली.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा