सावल्यांच्या कुशीत. भाग - २८
"रात्री काय झालं, मला खरंच काहीच आठवत नाहीये, मला तर मी इथे कसा आलो ते सुद्धा नाही आठवत. या घरात नेमकं काय चाललंय काहीच कळेनासं झालंय मला." सुधाकर वैतागून म्हणाले.
"असू दे बाबा, तुम्ही आराम करा. आठवलं तर आम्हाला सांगा. नाही आठवलं तरी काही हरकत नाही." नीरव म्हणाला.
"पण माझं डोकं खूप ठणकतंय असं वाटतंय की डोक्यावर कोणीतरी खूप जोरात काही तरी जड वस्तू मारली आहे." सुधाकर.
"डॉक्टरांना बोलावू का मग मी परत?" नीरव.
"नको, मी झोपतो... म्हणजे मला बरं वाटेल." सुधाकर.
"ठिक आहे पण तुम्ही इथेच खाली झोपा आणि आरव तू... इथेच बाबांच्या बाजूला बसून अभ्यास कर आणि त्यांच्याकडे लक्ष दे." नीरव म्हणाला आणि त्याची तयारी करायला गेला.
सुधाकर झोपले होते खरं... पण ते अजूनही त्यांच्यासोबत रात्री काय झालं हे आठवण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांना रात्री घडलेला प्रकार आजिबात आठवत नव्हता. डोकं मात्र आतून नुसतं सनकत होतं. खूप वेदना होत होत्या, त्या वेदना कशाने होताय हे ही त्यांना आठवत नव्हते, शेवटी त्यांनी आरवकडून डोक्याची गोळी घेतली आणि ती खाल्ली.नंतर गप्प डोळे मिटून घेतले.
नीरवचं सगळं आटोपून तो शाळेत गेला. पण आज दिवसभर त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं, सारख्या घरी घडणाऱ्या विचित्र गोष्टीच डोक्यात बसल्या होत्या.
पुढचे चार दिवस सुद्धा असंच चालू होतं, आता नीरवला कमी भास होत होते, पण सुधाकर रोज रात्री झोपेत ओरडायचे. ते बघून मंगल सुद्धा खुप घाबरली होती.
मंगल एकटीच बाहेर हाॅलमध्ये विचार करत बसली होती. त्याचवेळी तिथे नीरव आला आणि तिच्याजवळ बसला.
"आई, एवढा विचार नको करू. आपण यावर काहीतरी उपाय काढू, आज शाळेला सुट्टी आहे मी आता वेदिकाला घेऊन येतो. मग या सगळ्या गोष्टींचा उलगडा आपण करू." नीरव.
"नीरव, मला काय वाटतं की आपण काही दिवस शेतातल्या घरी राहायला जाऊया म्हणजे हे सगळं काही चाललंय ते थांबेल." मंगल.
"तुझी इच्छा असेल तर आपण तसंही करू, पण तू जास्त टेन्शन घेऊ नको मी आलोच जाऊन." नीरव म्हणाला आणि तिथून उठला. तोच मंगल सुद्धा उठली.
"नीरव, तू वेदिकाला आणायला चालला आहे ना मग असं मोकळ्या हाताने नको जाऊ, त्यादिवशी वेदिका घाईत गेली त्यामुळे काहीच देता नाही आलं." मंगल म्हणाली आणि आत जाऊन एक लाडूचा डब्बा घेऊन आली.
"यात लाडू आहेत, ते दे वेदिकाच्या माहेरी." मंगल म्हणाली तसं नीरवनेही हलकसं हसत तो डब्बा घेतला आणि वेदिकाला फोन करून तो तिला घ्यायला येत असल्याचे सांगितले आणि बाईक वरून वेदिकाला आणायला गेला.
नीरवचा फोन आला तेव्हा वेदिकाने लगेच तयारी करायला घेतली. तिच्या आईचं तिला हे घेऊन जा, ते घेऊन जा चालूच होते आणि राहायचा आग्रहही करत होती.
"वेदिका, अजून दोन दिवस राहिली असती तर मला बरं वाटलं असतं." संगिता म्हणाली.
"आई, आता राहिले ना मी एवढे दिवस. आता बसं झालं, हवं तर मी नंतर परत येईल." वेदिका.
"तू तुझ्या संसारात चांगली रूळली आहे हे बघून खरंच खूप छान वाटतंय मला." संगिता तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाली तसं वेदिकाने तिला मिठी मारली.
"आई, खरंच मी खुप खुश आहे. माझ्या सासरचे सगळेच चांगले आहे." वेदिका म्हणाली पण त्याच वेळी तिचा हुंदका फुटला आणि डोळ्यातून अश्रू आले. संगिताने तिचा हात हातात घेत तिच्याकडे पाहिलं तर तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. ते बघून संगिताचं हृदय हेलावून गेले.
"हे काय वेदिका, तू खूश आहे म्हणतेय आणि तुझ्या डोळ्यांतून पाणी येतंय. तू नक्की तुझ्या सासरी खूश आहे ना?" संगिताने काळजीने विचारलं.
"आई, मी खुशच आहे... हे आनंदाश्रू आहे." वेदिका नजर फिरवत म्हणाली. त्यामुळे संगिताला तर अजूनच काळजी वाटू लागली.
"नाही वेदिका, तू काहीतरी लपवतेय. सांग मला तुला सासरी नक्की कसला त्रास आहे?" संगिता
"नाही गं आई, तू चुकीचं समजतेय. खरंच मला कसलाही त्रास नाहीये." वेदिका तिचा हात हातात घेत म्हणाली. पण संगिताचं काही समाधान झाले नाही पण वेदिका काही सांगत नाही, त्यामुळे तिनेही जबरदस्ती केली नाही.
थोड्या वेळातच नीरव वेदिकाच्या माहेरी आला. दारातूनच त्याने वेदिकाला आवाज दिला. त्याचा आवाज ऐकून वेदिका धावतच पुढे गेली आणि त्याला आत यायला सांगितले, तेव्हा तो पण आत येऊन सोफ्यावर बसला.
"वेदिका, हे घे आईने लाडू दिले आहे." नीरव हसतच म्हणाला तसं वेदिकाने त्याच्या हातातला डब्बा घेतला आणि तो संगिताकडे दिला. मग त्यांनी नीरवला जेवायचा आग्रह केला.
नीरव घरी आल्यापासून संगिता सारखं सारखं त्याच्याकडेच लक्ष देत होती, त्याचे सगळे हावभाव बघत होती, तो वेदिका सोबत कसा वागतोय, कसा बोलतोय ते जाणून घ्यायचा प्रयत्न करत होती. पण तिला सगळं काही व्यवस्थित दिसत होते, मग वेदिकाचं असं डोळ्यातून पाणी यायचं कारण काय असेल याचाच ती विचार करत होती.
"वेदिका, आपण जायचं का आता? अंधार पडायच्या आत घरी पोहचायला हवे." नीरव.
"हो चालेल, चला... तसंही माझी सगळी तयारी झाली आहे." वेदिका हसत म्हणाली आणि तिच्या आईचा निरोप घेऊन ती नीरव सोबत घरी यायला निघाली.
संध्याकाळच्या वेळी नीरव आणि वेदिका दोघंही घरी आले. तिला बघून मंगल सुद्धा खुश झाली. मग दोघींनी मिळून रात्रीच्या जेवणाची तयारी केली. नीरव बाहेर हाॅलमध्ये शांत बसला होता. घरी आल्यावर त्याच्या डोक्यातले विचार परत चालू झाले. तो विचार करत असताना त्याच्या कानावर पैंजणांचा आवाज पडला, तेव्हा त्याला वाटले की वेदिकाच आली आहे म्हणून त्याने मागे वळून पाहिले पण मागे कोणीच नव्हते. मग त्याने नकारार्थी मान हलवली आणि त्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं. पण थोड्या वेळाने पैंजणांचा आवाज जास्तच येऊ लागला. तेव्हा तो उठला आणि तिथून सरळ बाहेर निघून गेला. आता त्याला हे सगळं नकोसं झालं होतं. त्यामुळे तो आता दुर्लक्ष करू लागला.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा