सावल्यांच्या कुशीत. भाग - २७
सुधाकर किंचाळले तेव्हा त्यांच्या कानावर परत हसण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. त्यांनी दोन्ही हातांनी कान बंद करून घेतले, आणि समोर बघू लागले तर समोर त्यांना एक विचित्र आकृती दिसली, तिचा अर्धा चेहरा काळा पडल्यासारखा वाटत होता, डोळ्यांतून रक्तासारखं काहीतरी ओघळत होतं. ते बघून सुधाकर अजूनच घाबरले.
"कोण आहेस तू? आणि मी तुझं काय बिघडवलं आहे?" सुधाकर घाबरतच त...त...फ...फ करत विचारू लागले. पण ती आकृती फक्त हसतच होती. सुधाकर परत काही तरी बोलणार तेवढ्यात घरातलं घड्याळ त्यांच्या अंगावर पडलं. त्यामुळे सुधाकर उठून पळायला लागले. पण त्यांच्या पायांखालची जमिनही हलायला लागली होती. घर जणू एका जिवंत सापासारखं हालत होतं. दारं आपोआप उघडत-बंद होत होती. खिडक्यांतून जोराचा वाराही येत होता. हे खरोखरच घडतंय की त्यांना भासत होतं हे त्यांचं त्यांनाच कळत नव्हते.
वाऱ्याच्या वेगाने सुधाकर या भिंतीवरून त्या भिंतीकडे फेकले जात होते. ते खूप ओरडत होते आणि आता मदतीसाठी नीरव आणि आरवला हाका मारत होते. पण त्यांची हाक कोणा पर्यंतच पोहचत नव्हती.
सुधाकर भिंतीवर आपटत असतानाच जमिनीवर कोसळले. त्यांचं डोकं गरगरायला लागलं होतं, नजर धुसर होऊ लागली होती. पण त्या धुसर नजरेतूनही त्यांनी पाहिलं, ती आकृती समोर उभी होती.
तिचे डोळे आता जळजळीत लाल होते, जणू रक्ताने भरलेले. चेहरा विद्रूप झाला होता, एक डोळा वर सरकलेला तर केस विस्कटलेले आणि मातीने भरलेले होते. तिच्याकडे पाहताना तिची नजर आपला जीव घेईल की काय असे सुधाकरला वाटले.
"कोण आहेस तू? आणि मी तुझं काय बिघडवलं आहे?" सुधाकरने परत एकदा थरथरत विचारलं. यावेळी ती आकृती धीटपणे पुढे आली, तिचा चेहरा आता सुधाकरच्या अगदी समोर होता.
"तू विसरलास… पण मी नाही विसरले! माझं आयुष्य संपवलंस तू! आणि आता… तुझं आयुष्य माझं आहे! मी आता तुझा जीव घेणार." पुर्ण वाड्यात फक्त तिचा आवाज घुमला, त्या आवाजाने सुधाकर बेशुद्धच झाले ती आकृती परत एकदा त्यांच्याकडे बघून क्रूरपणे हसली आणि त्याचवेळी तिच्या मागे एक काळसर धूर जमा होऊ लागला. त्या धुरातून हळूहळू ती बाहेर निघून गेली.
सकाळपर्यंत सुधाकर तिथेच पायऱ्यांच्या खाली बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते, त्यांच्या डोक्यालाही मार लागला होता. रात्री नेमकं काय झालं ते सकाळपर्यंत कोणालाही माहीत नव्हते.
सकाळी मंगल झोपेतून उठून खाली येत असताना तिला सुधाकर पायऱ्यांच्या खाली पडलेले दिसले, त्यांना बघून ती जोराने ओरडली....
अहो sss काय झालं तुम्हाला? नीरव sss आरव sss लवकर बाहेर या!" मंगलची हाक कानावर पडताच नीरव आणि आरव धावतच बाहेर आले. समोर सुधाकरला पडलेलं बघून ते दोघेही घाबरले.
"आई... बाबा इथे असं कसं पडले आहे आणि काय झालंय त्यांना?" नीरवने काळजीने घाबरतच विचारले. मंगलला तर काहीच सुचत नव्हते, तिच्या डोळ्यातून पाणी येत होते.
"मलाही नाही माहीत, मी आताच झोपेतून उठली. मला हे खोलीत दिसले नाही म्हणून मी त्यांना बघायला म्हणून आले तर हे असं खाली पडलेले दिसले." मंगलने रडतच सांगितले. तसं नीरव खाली बसला आणि सुधाकरला उठवू लागला.
"बाबा, उठा.... बाबा...." नीरव आवाज देत होता, हलवत होता पण सुधाकर काही उठत नव्हते, ते बघून आता सगळ्यांनाच काळजी वाटू लागली. मग नीरवने आरवला डाॅक्टरांना फोन करून बोलावायला सांगितले. त्यानंतर त्या दोघांनी त्यांना उचलून खालीच हाॅलमध्ये एक लोखंडी काॅट असते, त्यावर ठेवलं. थोड्या वेळाने डाॅक्टर आले आणि त्यांनी सुधाकरला चेक केले.
"डॉक्टर, बाबांना काय झालंय नेमकं?" नीरवने विचारलं तेव्हा डॉक्टर सुधाकरकडे शांतपणे बघत होते. डॉक्टर शांत आहे हे बघून नीरवला अजूनच काळजी वाटली.
"डॉक्टर, काही सिरियस आहे का? प्लीज काय आहे ते स्पष्टपणे सांगा!" नीरव.
"नीरव, यांचा बीपी नाॅर्मल आहे आणि बाकी सगळं सुद्धा ठिक दिसतंय मग हे बेशुद्ध का पडले? आणि अजूनही ते का उठत नाहीये हेच समजत नाही. मला सांगा.... ते पडले तेव्हा त्यांच्याजवळ कोणी होतं का?" डॉक्टरांनी नीरवला विचारलं.
"नाही, आम्ही सगळे झोपलेलो होतो... ते कधी पडले हेच आम्हाला माहीत नाही." नीरव.
"बरं ठिक आहे, थोडा वेळ वाट बघा... ते जर नाहीच उठले तर त्यांना हाॅस्पीटलमध्ये न्यावं लागेल." डॉक्टर म्हणाले आणि निघून गेले. ते गेल्यानंतर मात्र मंगल मोठमोठ्याने रडू लागली.
"नीरव, काय झालं असेल रे तुझ्या बाबांना? अजूनही ते उठत नाहीये!" मंगल रडता रडताच म्हणाली. तसं ते दोघेही तिला धीर देऊ लागले.
"आई, काही नाही होणार बाबांना पण तू अशी धीर सोडू नकोस." नीरव म्हणाला आणि सुधाकर कडे बघू लागला. तितक्याच त्याला त्यांची हालचाल जाणवली. तसं तो पटकन त्यांच्याजवळ बसला आणि त्यांचा हात हातात घेतला. त्याचवेळी सुधाकर दचकले.
"ए... हात सोड माझा, लांब हो माझ्यापासून." सुधाकर घाबरून म्हणाले पण त्यांचं असं बोलणं ऐकून सगळेच घाबरले. तरी सुद्धा नीरवने धीर करून त्यांचा हात घट्ट पकडला.
"बाबा, घाबरू नका... मी आहे तुमचा नीरव. हे बघा... समोर माझ्याकडे बघा जरा." नीरव शांतपणे बोलला तसं सुधाकर सुद्धा शांत होत त्याच्याकडे बघू लागले.
"आता ठिक वाटतंय ना तुम्हाला?" नीरवने काळजीने विचारलं.
"मी ठिक आहे पण मी इथे कसा आलो? मी तर आमच्या खोलीत झोपलो होतो ना!" सुधाकर यांनी गोंधळलेल्या नजरेने बघत विचारलं. आता मात्र मंगल अजूनच घाबरली.
"अहो... तुम्हाला आठवत नाही का तुम्ही खाली कसं आलात ते?" मंगल.
"नाही, मला काहीच आठवत नाहीये पण माझं डोकं खुप दुखतंय. असं वाटतंय की डोक्यात कोणीतरी काहीतरी मारलंय." सुधाकर दोन्ही हातांनी डोकं गच्च धरून ठेवत म्हणाले.
"बापरे, म्हणजे आपल्या घरात चोर तर नसतील ना आले आणि त्यांनीच बाबांना मारलं असेल तर....?" आरव.
"गप्प बस आरव, काहीही नको बोलू. चोर आले असते तर घरातल्या वस्तू अस्ताव्यस्त पसरलेल्या असत्या आणि ते त्यांना हवं ते घेऊन गेले असते, असं बाबांना कशाला मारलं असतं? आणि जरी मारलं असतं तर आपल्याला आवाज आला असता." नीरव.
"हो हे पण बरोबर आहे मग बाबांसोबत नेमकं घडलंय काय?" आरव.
"बाबा, तुम्ही नीट आठवून सांगता का रात्री नेमकं काय घडलं होतं?" नीरव म्हणाला तसं सुधाकर रात्री काय घडलं ते आठवण्याचा प्रयत्न करू लागले.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा