भाग ५:
शरद ऋतू संपत आला होता. झाडांची पाने गळत होती, हवेत गारवा होता. सौदामिनी ताईंना वृद्धाश्रमात राहून किती वर्षे झाली होती ते त्यांना देखील लक्षात नव्हते. त्या वृद्ध झाल्या होत्या, पण चेहऱ्यावर एक वेगळे समाधान उतरलेले होते. आयुष्यभर दुसऱ्यांसाठी जगणाऱ्या स्त्रीने शेवटी दुसऱ्यासाठी जगता जगता स्वतःसाठी देखील जगायला शिकले होते.
प्रत्येक सकाळी त्या आश्रमातील देवघरात बसून प्रार्थना करत. मग बागेत फिरायला जात, फुलांशी बोलायचे त्यांना फार आवडायचे. आश्रमातील कार्यकर्त्यांना त्या आईसारख्या वाटायच्या. अनेकजण त्यांच्या सल्ल्याने आयुष्यात सावरले होते.
कधी एखादी आजी दुःखात असेल, तर ताई तिच्या शेजारी बसून तिचा हात हातात धरे. कधी एखाद्या आजोबांना भूतकाळ आठवत असेल, तर ताई त्यांच्या आठवणींमध्ये समरस होत असत. त्यांनी आश्रमाचे रूपच बदलून टाकले होते.
आता शरीर थकू लागले होते, पण मन काही मानत नव्हते. एका थंड दिवशी ताईंना जास्त थकवा जाणवू लागला. त्यांना अंथरुणातुन उठता येईना. त्यांना ताप होता. डॉक्टरांना बोलावण्यात आले. तपासणी करून डॉक्टरांनी हळू आवाजात सांगितले,
“वय, थकवा … यांचे एकत्रित दुष्परिणाम आहेत. आता फार काळ नाही... आराम करू देत त्यांना."
आश्रमातील सगळे कर्मचारी आणि रहिवासी जणू एका आईला गमावण्याच्या दुःखात आधीच बुडाले होते. दररोज कोणी ना कोणी त्यांच्या खोलीत येई, त्यांच्याजवळ बसत त्यांची विचारपूस करे.
एके दिवशी, ताईंनी आश्रमाच्या प्रमुखाला सांगितले, “माझे एकच मागणे आहे. माझ्या शेवटच्या क्षणी मला माझा पुतण्या आणि माझी पुतणी जवळ असावी, फक्त एकदा.”
त्यांनी आरवचा नंबर फिरवला. आरव आता इंजिनियर झाला होता. तसा तो महिन्यातून एकदा तरी येत असे पण जेव्हा त्याने आजीबद्दल ऐकले, तो क्षणाचाही विलंब न करता आई आणि वडिलांना घेऊन आला.
ती वेळ होती दुपारची. ताई शांतपणे अंथरुणावर पडलेल्या होत्या. डोळे अर्धवट मिटलेले, चेहऱ्यावर शांत हास्य.
आरव दारातून धावत आत आला.
“आत्या आत्या … आत्या … मी आलोय. बघ, मी आलोय.”
ताईंनी डोळे उघडले. त्या एक क्षणभर थबकल्या. मग ओळखल्यासारखे त्यांच्या चेहऱ्यावर एक उभारी आली.
“आरव… माझे बाळ... !”
संजय आणि सुषमा मागे उभे होते. दोघांच्याही डोळ्यांत पश्चात्ताप होता. सुषमा पुढे सरसावली. तिने ताईचा हात पकडला.
“ताई… माफ करा. तुमच्याविना घर अधुरे होते. आम्हाला ते उशीराने समजले… .”
ताईंनी फक्त हसत डोके हलवले.
“माफ करायला काही उरले नाही गं. मी गेले त्या दिवशी, माझे मन साफ झाले. मी इथे आले आणि इथे मला माझे खरे अस्तित्व सापडले.”
संजयच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते.
“ताई… एकदा तरी परत चल... माझ्या मुलांनी आत्या म्हणून तुझ्या मांडीवर डोके ठेवावे असे मला नेहमी वाटायचे. मी तुझे काही ऋण फेडू शकणार नाही, पण राहिलेले आयुष्य तुझ्यासोबत घालवू दे ना.”
ताई हलकेच हसल्या.
“मी आता कुठेच जात नाही, बाळा. मी याच ठिकाणी समाधानी आहे. घर काय फक्त भिंतीचे असते का? जिथे प्रेम असते, तिथेच खरे घर असते. इथे सगळे मला मनापासून ताई म्हणतात… हेच माझे खरे घर आहे आता.”
* *
दुसऱ्या दिवशी पहाटे, आकाशात गुलाबी किरणे पसरलेली होती. आश्रमात शांतता होती. ताईंनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रसन्न हास्य होते. जणू काही त्यांच्या आयुष्यात काहीही अपूर्ण राहिले नव्हते, सगळे पूर्ण करून त्या इहलोकीच्या यात्रेवर निघून गेल्या होत्या.
त्यांच्या बाजूला अजूनही आरवने दिलेले गुलाबाचे फूल होते. त्या ज्या अंथरुणावर झोपल्या होत्या, त्यावर हळुवारपणे कापड घातले गेले. आश्रमातील सगळे एकत्र जमले होते. कोणीच जोरात रडत नव्हते, पण प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी होते.
मुख्य सेवकाने सगळ्यांसमोर उभे राहून सांगितले.
“सौदामिनी ताई फक्त आमच्या आश्रमाच्या नुसत्या ताई नव्हत्या. त्या आम्हाला ‘स्वतःसाठी जगणे’ शिकवून गेल्या. त्यांनी आम्हाला प्रेम, क्षमा आणि शांती काय असते, हे दाखवून जगायला शिकवले.”
तिचे शेवटचे अंतिम दर्शन घेताना संजय खूप वेळ तिच्या शेजारी बसून राहिला. तिच्या पायांवर डोके ठेवले.
“ताई… तु आयुष्यभर माझे सगळे केले… आणि मी मात्र तुला एखाद्या परक्या माणसासारखे वागवले … पण मी वचन देतो — तुझे कार्य मी पुढे नेईन. जे तु इथे सुरू केले, ते कायम राहील.”
त्यांनी आश्रमासाठी नियमित देणगी द्यायचे ठरवले, आणि तिच्या नावाने एका “सौदामिनी सेवा केंद्रा”ची स्थापना करायचे ठरवले, जी रस्त्यावर परके म्हणून सोडणाऱ्या नातेवाईकांना एक प्रेमळ आणि हक्काचे घर देईल.
आरवने ताईसाठी एक छोटे गाणे देखील लिहिले आणि त्या दिवशी सगळ्यांपुढे ते वाजवले. त्या ओळी आजही आश्रमाच्या भिंतींवर कोरलेल्या आहेत:
“आत्या सारखे प्रेम कुणी दिले नाही,
मूक त्याग कुणी दाखवला नाही.
घर सोडून प्रेम मिळवले
आत्मसन्मानाचे खरे घर बनवले…”
मूक त्याग कुणी दाखवला नाही.
घर सोडून प्रेम मिळवले
आत्मसन्मानाचे खरे घर बनवले…”
* *
सौदामिनी ताई गेल्या, पण त्या ज्या ज्या माणसांचे आयुष्य बदलून गेल्या — त्यांची मने आजही त्यांच्या आठवणीत फिरत राहतात.
संजयच्या घरी एका भिंतीवर ताईचा फोटो आहे — त्यावर लिहिले आहे,
“स्वतःला विसरून दुसऱ्यांचे आयुष्य घडवणारी आई .”
आरव दरवर्षी आत्याच्या पुण्यतिथीला आश्रमात जातो, तिथे इतर आजीआजोबांसोबत दिवसभर राहतो. त्याला आत्याच्या कुशीत लपून बसलेल्या त्या लहानग्या दिवसांची आठवण येत राहते.
* *
सावत्र, परकी म्हणुन घरातुन निघालेल्या सौदामिनी ताईंनी प्रेम मिळवायचे थांबवले नाही, फक्त ते मिळवण्यासाठी त्यांनी घर बदलले,
आणि शेवटी त्या जिथे होत्या, तिथेच त्यांना सगळ्यांत मोठे घर सापडले — त्यांच्या माणसांच्या हृदयात.
---
समाप्त
©®भालचंद्र नरेंद्र देव
जलद लेखन स्पर्धा मे २०२५
जलद लेखन स्पर्धा मे २०२५
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा