भाग ४:
ती रात्र फार थंड होती. आभाळात ढग दाटले होते, वारा सुटलेला, आणि घराच्या कोपऱ्यातील देवघरात सौदामिनी ताई शांतपणे बसलेली होती. समोर एक छोटीशी पिशवी ठेवलेली होती. त्यात काही कपडे, एक जुनी फोटोफ्रेम, आईवडिलांच्या चित्रांचा संच, आणि संजयननशसाठी लिहिलेली एक चिठ्ठी होती.
दोन दिवसांपूर्वीच संजयने तिला स्पष्टपणे सांगितले होते—
“ताई, आता आम्हाला थोडे स्वातंत्र्य हवे आहे. तु कुठे तरी बाहेरचा विचार कर. तुझ्यासाठी एखादा वृद्धाश्रम चांगलाच असेल. आमचे प्रेम कायम आहे तुझ्यावर, पण तु आता आमच्या आयुष्याचा भाग नसावे, असे मला वाटते”
त्या वेळी ताईने काहीच प्रतिक्रिया दिली नाही . ती फक्त आपल्या खोलीत जाऊन बसली होती . त्या रात्री तीच्या डोळ्यांतून काही थेंब गालावरून ओघळले होते — पण ते रडणे नव्हते , ते फक्त एका आयुष्याचे विसर्जन होते.
तिच्या मनात अनेक चित्र उमटत होती — संजयचे लहानपणीचे हात धरून शाळेत नेणे, त्याचे पहिले अपयश, पहिले यश, लग्नातल्या तयारीच्या आठवणी, आणि नंतरचा हळूहळू वाढत गेलेला अबोला.
तीने शांतपणे निर्णय घेतला.
त्या दिवशी पहाटे, जेव्हा घर सगळे झोपेत होते, ताईने आपल्या खोलीच्या खिडकीतून दिसणाऱ्या देवळाच्या कळसाला शेवटचा नमस्कार केला. कपाटातून तीने पिशवी घेतली, आणि कुणालाही न उठवता घराबाहेर पडली.
ती एकटीच गावातल्या बस स्टँडवर आली. तिथे एका बाकावर बसली. वय झालेले नसले तरी, चेहऱ्यावर थकवा होता, पण डोळ्यांत अजूनही एक तेज दिसत होते.
ती बसची वाट पाहत होती, जी तिला तिच्या नव्या ठिकाणी घेऊन जाणार होती — कुठे? ते माहित नव्हते. पण तिला आता घरात परतायचे नव्हते. जिथे आपली किंमत राहिलेली नाही, तिथे राहून माणूस रोज थोडा थोडा का होइना मरत राहतो — हे तिला पुरेसे उमगलेले होते.
* *
दुसऱ्या दिवशी सकाळी संजय उठला. ताईची खोली उघडी होती, पण ताई नव्हती. त्याने हाक मारली , “ताई…? ताई, कुठे आहेस ?”
सुषमा म्हणाली, “आज सकाळपासून माझ्यासमोरून गेल्याचे आठवत नाही ? मला वाटले देवघरात असतील.”
संजय घाबरला. त्यांनी घरभर शोध घेतला. पण कुठेही काहीच नव्हते. टेबलावर एक चिठ्ठी होती:
“संजय,
मी गेल्याचे कळल्यावर अस्वस्थ होऊ नको. मी चोरून जात नाहीये, फक्त न सांगता जात आहे.
मी जे करायला जन्म घेतला, ते पूर्ण झाले. तू मोठा झालास, तुझा संसार सुरु झाला , तुझे आयुष्य उभे राहिले — आता माझे इथले काम संपले.
मी तुमच्यावर रागावलेली नाही. उलट, मी तुमचे उपकार मानते — कारण तुमच्या शब्दांनी मला स्वतःचे अस्तित्व आठवून दिले. मी तुमच्यात इतकी गुरफटले होते की स्वतःला देखील विसरले होते. आता मला पुन्हा स्वतःकडे वळायचे आहे.
तुमचे घर, तुमचे आयुष्य, आणि मी — फक्त एक गतकाळ होता. आता सगळ्यांना पुढे जावेच लागेल.
सौदामिनी ताई”
सुषमा चूप होती. संजय निःशब्द झाला. पहिल्यांदाच त्याला ताईचा खरा त्याग कळला होता. तीच्या घरातुन गेलेल्याचे दुःख त्याला जेवढे झाले नाही — तेवढे त्यांच्या मनातून मागे फिरून गेलेल्या आपुलकीचे दुःख त्याला होत होते .
* *
ताई लांब एका गावाच्या आश्रमात दाखल झाली. ती जागा छोटी होती, पण स्वच्छ होती. तिथे अनेक ज्येष्ठ नागरिक होते — काहींना मुले विसरून गेली होती, काहींनी स्वतःच घर सोडले होते. ताई लवकरच त्या वातावरणात मिसळून गेली. ती इतरांशी गप्पा मारे , भजने गाई , आणि सकाळ-संध्याकाळ पुस्तके वाचत सगळ्यांना ऐकवत असे.
आश्रमातल्या लोकांमध्ये ती फार लवकर प्रिय झाली.
“ताई, तुम्ही किती गोड बोलता!”
“तुमचे जेवण तर आईसारखे लागते!”
“तुमच्या तोंडुन गोष्टी ऐकायला मजा येते.”
तिला पुन्हा वाटू लागले, की आपले अस्तित्व इथे लोकांच्या मदतीसाठी च आहे तिने तिथल्या महिलांसाठी रामायणाचे वाचन सुरू केले. तरुण स्वयंसेवक त्यांना “सौदामिनी मावशी” म्हणून संबोधू लागले. असेच दिवस पुढे पुढे जाऊ लागले.
* *
एक दिवस, आश्रमात काही मुलांनी भेट द्यायचा कार्यक्रम ठरवला. दूरच्या गावातल्या महाविद्यालयातील मुले आली. संजयचा मुलगा, आरव देखील त्यात होता.
जेव्हा त्यांनी सांगितले, “आमच्याकडे सौदामिनी मावशी आहेत त्यांना येथील सगळे माहित आहे तुम्ही त्यांना एकदा तरी अवश्य भेटा,”
सौदामिनीला पाहताच आरव आश्चर्यचकित झाला. “माझी आत्या ?” त्याच्या तोंडून शब्द फुटले.
सौदामिनीला पाहताच आरव आश्चर्यचकित झाला. “माझी आत्या ?” त्याच्या तोंडून शब्द फुटले.
तो धावत ताईजवळ गेला, आणि त्याची ओळख सांगितली, त्याला पाहून ताईचे डोळे भरून आले. पण ती शांतपणे म्हणाली, “आरव... कसा आहेस रे बाळा?”
तो गळ्यात पडला. “आत्या, घरी चल ना! आई-बाबा तुला किती वर्षे शोधतायत.”
पण ताईने डोके हलवले, “बाळा, आता हेच माझे घर आहे.”
ताई कुठे आहे हे कळताच, त्याच दिवशी संजय आणि सुषमा दोघेही आश्रमात आले. ताईला पाहून त्यांचे मन भरून आले. दोघेही गहिवरले.
संजय म्हणाला, “ताई, परत चल. आम्ही चुकलो. तुझे घरातील स्थान आम्हाला उशिरा समजले”
सुषमाही डोळे पुसत म्हणाली, “माफ कर ताई. मी अज्ञानात वागले. घर तुझ्याशिवाय अतिशय निर्जिव आहे.”
पण ताई फक्त हसली. ती एका देवळाच्या समोर उभी राहिली होती. सूर्य त्या वेळी तिच्या मागून येत होता, आणि तिच्या चेहऱ्यावर एक तेज पसरले होते.
“बाळांनो,” ताईने मृदू आवाजात सांगितले, “माफीने सगळे मोकळे होते. मी गेले, हे तुमच्यासाठी चांगले होते. आणि मी इथे आहे, हे माझ्यासाठी चांगले आहे. आता आपण दोघेही योग्य ठिकाणी आहोत.”
संजय गप्प झाला. त्याला एकाच वेळी अपराध आणि समाधान वाटत होते. सुषमा पुढे सरसावली, पण ताईने हलक्याच हाताने तिचे कपाळ थोपटले.
“संपले ग, सगळे राग, दुःख, अपेक्षा… आता फक्त शांती हवी आहे.”
* *
ताई आता त्या वृद्धाश्रमातच आयुष्य घालवत होती. पण ती कुणावरही रागावलेली नव्हती . तीच्या डोळ्यांत अजूनही प्रेम होते — पण ते आता स्वतःवर होते, आश्रमातील गरजवंत लोकांवर होते.
कधी कधी आपण इतके दुसऱ्यांमध्ये हरवतो, की स्वतःला विसरतो. पण सौदामिनीने स्वतःला पुन्हा गवसले होते — आणि आता ती स्वतःच्या आयुष्याच्या उत्तरार्धात, शांततेने आणि आत्मसन्मानाने जगत होती.
क्रमशः
©®भालचंद्र नरेंद्र देव
जलद लेखन स्पर्धा मे २०२५
जलद लेखन स्पर्धा मे २०२५
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा