भाग २:
संजयचं शिक्षण पूर्ण झाले होते. पुण्यात त्याला मोठ्या कंपनीत नोकरी देखील लागली. ताईने आपल्या हाताच्या फोडासारखा वाढवलेला भाऊ आता स्वतःच्या पायांवर उभा राहिल्याचे पाहुन मोकळा श्वास घेतला. ती कोणत्याही आईसारखी भारावली होती. तिच्या डोळ्यांत समाधानाचे अश्रू होते.
संजयने ताईंला फोन करून सांगितले, “ताई, मी आता स्थिर झालोय. तुझ्या कष्टाचे फळ मिळाले. आता तुझे लग्न लावूया. तुझे घर, तुझे सुख, सगळे पाहायचे आहे मला.”
ताई गप्प झाली. एक दीर्घ शांतता पसरली, मग हसत म्हणाली, “बाळा, आता उशीर झालाय. ही वयाची वाट निघून गेली. तुझे सुख हेच माझे सुख आहे.”
संजय काही बोलू शकला नाही. त्याला जाणवले, की ताई खरंच लग्नाच्या पलिकडे गेलेली आहे. तीने फक्त एक भूमिका निभावली नाही, तर स्वतःचे संपूर्ण अस्तित्व त्याच्यासाठी समर्पित करून टाकले होते.
काही महिन्यांनी संजयचे लग्न ठरले. नवरी होती सुषमा — शिकलेली, देखणी, आणि थोडीशी नखरेल. लग्न मोठ्या थाटामाटात झाले. ताईने संपूर्ण जबाबदारी घेतली, अगदी आईच्या जागी उभी राहिली. पाहुण्यांच्या हातात पाणी देणे, जेवणात लक्ष ठेवणे, सुषमाला आदराने साडी नेसवून देणे — हे सर्व तीच करत होती.
लग्नाच्या रात्री सुषमा म्हणाली, “ताई, तूम्ही आज खरंच भरपुर काम केले आहे. आता तुम्ही विश्रांती घ्या.”
ताई केवळ हसली. तिचा हसरा चेहरा काहीतरी लपवत होता — एक पोकळी, एक सुन्नता.
संजय आणि सुषमा लग्नानंतर गावीच राहायला आले. त्यांनी गावातच छोटे घर बांधले. सुषमा सुरुवातीला ताई बरोबर फार आदराने वागत असे. सकाळी उठून तिच्या पाया पडायची, “ताई, काय करू आज?” असे विचारायची. ताईला खूप छान वाटायचे, तिला वाटे “आता माझ्या कष्टांना फळ मिळाले आहे.”
घरात हळूहळू पुतणा पुतणी आले. ताई त्यांच्यासाठी आईपेक्षाही जास्त होती. त्यांना झोपवणे, खेळवणे, अभ्यास घेणे — तिच करु लागली. सुषमा मात्र बाहेरच्या लोकांमध्ये व्यस्त असायची – महिला मंडळ, सांस्कृतिक कार्यक्रम, फॅशन. ताई मात्र घराच्या चार भिंतींत अडकलेली राहायची.
ताईसाठी संजयनं घरात एक छोटीशी खोली दिली होती — आत देवघर, एक कपाट, एक लाकडी पलंग आणि खिडकीतून दिसणारा देवळाचा कळस. तिथे बसून ती सकाळचा सूर्य बघायची, जरा जुने एखादे पुस्तक वाचायची, आणि संध्याकाळी देवासमोर दिवा लावायची.
गावात लोक म्हणायचे, “अहो, सौदामिनी ताईचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. ती आहे म्हणून हे घर टिकून आहे.”
पण आता ताईचे कौतुक घरात कुणालाच विशेष वाटत नव्हते. ती एक गृहित धरलेली उपस्थिती झाली होती — ना तिचे मत, ना तिचे स्थान.
सुषमा आता घरात बदल घडवू लागली — नवीन पडदे, नवीन भांडी, नवे नियम. एके दिवशी तिने ताईंना म्हटले, “ताई, तुम्ही जेवणात फार तेल घालता. हल्ली मुलांसाठी ते चांगले नाही. तुम्ही फक्त पोळ्या करा, बाकी मी बघते.”
ताई गप्प झाली. तिच्या हातचे जेवण खाऊन मोठे झालेले कुटुंब आज तिच्या चवीलाच नाकारू लागले होते. पण ती काहीच बोलली नाही.
एक दिवस सुषमा आपल्या मैत्रिणीशी फोनवर बोलत होती, “काय सांगू गं, आमच्याकडे सगळे ताईचे राज्य आहे. कुठेही हात घालू म्हटले तरी त्यांचे 'मी करेन' सुरू असते. कधी कधी वाटते, आता त्या आम्हाला श्वास घ्यायलाही जागा देत नाही.”
हे वाक्य सौदामिनीने ऐकले आणि ती शांतपणे तोंड फिरवून आपल्या खोलीत निघुन गेली. खिडकीतून दिसणाऱ्या देवळाच्या कळसाकडे पाहून म्हणाली, “देवा, एवढे का माझे असणे जड झाले आहे हिला?”
त्या रात्री संजय घरी उशिरा आला. सौदामिनीने त्याला पाणी दिले, विचारले, “बाळा, थकला असशील ना.”
संजयने हलकेसे हसून मान हलवली. पण त्याच्या नजरेत आता ती पुर्वी सारखी "आईसारखी ताई" राहिली नव्हती, फक्त एक जुनी सवय वाटत होती.
संजयने हलकेसे हसून मान हलवली. पण त्याच्या नजरेत आता ती पुर्वी सारखी "आईसारखी ताई" राहिली नव्हती, फक्त एक जुनी सवय वाटत होती.
तिला तो बदल जाणवला होता. घरात सगळे होते— सुख, पैसा, चैन. पण तिचे स्थान आता एका कोपऱ्यात राहीले होते– तिच्या खोली एवढे मर्यादित झाले होते.
ती अजूनही काही बोलत नव्हती, फक्त मनात दररोज एक विचार यायचा — “आपण इतकी वर्षं घरच्या साठी दिली.. पण आता आपण कुणासाठी जगत आहोत?”
क्रमशः
©®भालचंद्र नरेंद्र देव
जलद लेखन स्पर्धा मे २०२५
जलद लेखन स्पर्धा मे २०२५
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा