Login

सावत्र ताई भाग १ (परकी)

जेव्हा सावत्र ताई सख्या आईपेक्षा जास्त करते.
भाग १

कधी काळी एका मध्यमवर्गीय गावात एक छोटंसे कुटुंब राहत होते. बाबूजी, त्यांची दुसरी पत्नी सुमती, तिच्या पोटचा मुलगा संजय आणि बाबूजींच्या पहिल्या पत्नीपासूनची मुलगी – सौदामिनी, जिला सगळीकडे “ताई” म्हणूनच ओळखले जायचे. सौदामिनीच्या चेहऱ्यावर एक निरागस शांतता होती आणि डोळ्यांत कुठलीतरी खोल, स्थिर तडफड. वय तेव्हा फार नसावे – दहा अकरा वर्षांची असेल.

सौदामिनीची आई लहानपणीच गेली होती. त्यानंतर बाबूजींनी पुन्हा लग्न केले आणि नवीन संसार सुरू केला. सौदामिनीने कधीच कसलीही तक्रार केली नाही. तिने सुमतीलाही आईच मानले आणि संजयलाही लहान भाऊ म्हणून मायेने वाढवले. पण काळ फार कठीण होता. बाबूजी एक किरकोळ सरकारी नोकरी करत आणि घर चालवायला महिन्याच्या शेवटी ओढाताण होत असे.

सौदामिनी शाळेत हुशार होती. तिचे स्वप्न होते, शिकून मोठे व्हायचे, शिक्षक व्हायचे. पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते. एके दिवशी बाबूजी अचानक आजारी पडले. डॉक्टरांनी दिलेल्या औषधांनी काम केले नाही आणि काही दिवसांतच ते गेले. घरावर दु:खाचं मोठे सावट पसरले. संजय तेव्हा अवघा पाच वर्षांचा होता.

सुमती एकटी पडली, तीने बाबुजींचा ध्यास घेतला आणि पक्षाघात होऊन खाटेवर पडली. ना तिच्या माहेरून आधार, ना कुटुंबाला उत्पन्नाचे साधन, त्या वेळी फक्त एक हात पुढे आला – तो म्हणजे सौदामिनीचा.

"आई, तू काळजी करू नकोस. मी आहे ना," असं म्हणून सौदामिनीने सगळे सांभाळायला सुरुवात केली.

महाविद्यालय सोडले, एक घरकाम मिळवले. सकाळी उठून स्वयंपाक, मग संजयला शाळेत पाठवायचे, आणि मग घराघरांत कामे. संध्याकाळी परत आली‌ कि पुन्हा स्वयंपाक, धुणे, आवराआवर. ती फक्त सतरा वर्षांची होती, पण तिच्या वागण्यात फार मोठी परिपक्वता होती.

संजय मोठा होऊ लागला. त्याच्या वह्या, कपडे, फी सुमतीची औषधे– सर्व काही ताईच पाहायची. तिने सुमतीला कधी काही करण्याचे जास्त ओझे दिले नाही. उलट तिलाही "आई" म्हणत राहिली.

गावातले लोक म्हणायचे, "ही मुलगी आयुष्यात फार मोठी झाली असती, पण स्वतःचे आयुष्य तिने बाजूला ठेवलंय."

असे करता करता वर्षं उलटत गेली. संजय दहावीला आला. ताईने दिवसरात्र काम केले, त्याचे शिक्षण थांबू नये म्हणून. स्वतःची सर्वच स्वप्न विसरली होती – लग्न, संसार, छानसा जोडीदार… काहीच मागणे नव्हते.

तिच्या लग्नाची चर्चा कधी घरात झाली नाही. कुणीतरी विचारले की सुमती तिची आई म्हणायची, "काय करणार? वेळ नाही, आता तर वयही जातंय. आम्ही तिला पाठिशी घेवून चाललो आहोत, एवढेच पुरे आहे."

ताईच्या मनात अधूनमधून वेदना उठत असे, पण ती कधी कुणालाच काही बोलली नाही. तिचे समाधान एकातच होते– संजय शिकतोय, मोठा होतोय, हीच तिच्या साठी जमेची बाजू होती.

एक दिवस संजयने तिला सांगितले, "ताई, मला शहरात कॉलेजला जायचंय. इंजिनिअर व्हायचंय."

ताईच्या चेहऱ्यावर एका क्षणासाठी काळजी तर उमटली, पण लगेच ती म्हणाली, "जा रे बाळा. आपल्याकडे पैसा कमी आहे, पण हिम्मत नाही."

ती पुन्हा कामे वाढवू लागली. अजून दोन घरी धुणी, एका घरात पोळ्या, असे करत करत संजयची फी, हॉस्टेल खर्च, सर्व तीच भागवत होती. त्याचे शिक्षण पूर्ण झाले, चांगली नोकरी लागली.

आता सौदामिनी चाळीस वर्षांची आहे कृश आणि अशक्त. संजय अजूनही तिला "ताई" म्हणतो, तिच्या बद्दल त्याला खूप आदर वाटतो. घरात एक खोली तिच्यासाठी राखून ठेवलेली आहे – तेच तिचे विश्व. ती सध्या घरीच असते, स्वयंपाक करते, सुमतीची देखभाल करते.

पण तिच्या चेहऱ्यावर आता थकवा दिसतो. न बोललेली एक वेदना डोळ्यांच्या किनाऱ्यावरून ओघळत असते. तिचे आयुष्य इतरांसाठी जगून झाले आहे, पण तिच्याजवळ स्वतःसाठी काहीच उरले नाही.

तरीही ती कुणाकडे काहीही मागत नाही. रोज देवासमोर बसते, संजयसाठी प्रार्थना करते, आणि वाळलेल्या गुलाबाच्या फुलासारखी त्या घरात निवांत पडून असते.

क्रमशः


©®भालचंद्र नरेंद्र देव
जलद लेखन स्पर्धा मे २०२५


🎭 Series Post

View all