माझ्या सासूबाई पण विधवा होत्या पण आईचे सवाष्ण आणि वैधव्य ही दोन्ही रूपे याची देही याची डोळा पाहिल्याने दुःख अधिक झाले असावे.
वहिनीच्या मनात माझ्याविषयी किंचित का होईना कळवळा दिसत होता. काही दिवस मी तिथेच राहिले. एकदा भिंतीवर लटकलेल्या काही चित्रांवर माझी नजर गेली.
" वहीनी , हे चित्र अगदी हुबेहूब दादाचेच वाटत आहे." मी विचारले.
" अहो नणंदबाई , ते चित्र नाही. त्याला फोटो म्हणतात. एक यंत्र असते त्याने फोटो काढतात. " वहिनीने सांगितले.
" अय्या हो का. हा बाजूला धोती नेसलेला माणूस कोण आहे?" मी विचारले.
" अहो ते खूप मोठे असामी आहेत. बापूजी म्हणतात त्यांना. ते भारताला स्वातंत्र्य मिळवून देणार आहेत." वहिनीने सांगितले.
" स्वातंत्र्य म्हणजे ?" मी विचारले.
" म्हणजे भारतावर इंग्रज राज्य नाही करणार. भारतीय राज्य करतील. " वहिनीने सांगितले.
" देश कधीतरी स्वतंत्र होईलही. स्त्री कधी स्वतंत्र होईल ? तिच्या हातापायात रूढी परंपराच्या बेड्या असतात. त्या कोण तोडणार ?" मी मनातल्या मनात म्हणाले.
***
काही वर्षांनी माझ्या दादानेही दुसरे लग्न थाटले. दुर्दैव म्हणजे आईच्या सांगण्यावरून.
" आई , सवतीचे जे हलाहल विष मी प्राशन केले तेच वहिनीला का देत आहेस ?" मी जाब विचारला.
" वंशाच्या दिव्यासाठी. तुझ्या वहिनीला तीन मुली आहेत. म्हणजे तीनवेळा हुंडा द्यावा लागेल. पंडित म्हणाले की तिच्या नशिबी पुत्रयोग नाही. मला वारस हवाय. वारश्यासाठी प्रत्येक स्त्रीला हे सवतरुपी विष प्राशन करावंच लागत. जग तुला वांझोटी म्हणत. तुला मुली जरी झाल्या असत्या तरीही सवत आणलीच असती जावईबापूंनी. " आई म्हणाली.
***
माझ्या सवतीला दिवस गेले. सासूबाई तिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत. मलाही आनंद झाला होता. नावाने का होईना त्या कुटुंबाचा मी भाग होते. नाहीतर माझी अवस्था एका मोलकरीणसारखीच होती. सवतीला पुत्ररत्न प्राप्त झाले. सवत तशी मनाने चांगली होती. तिने मला बाळाला लाड करू दिले. पण बाळ अचानक आजारी पडले. सासूबाईंनी मी चेटूक केले असा सर्वत्र बोभाटा केला. सुदैवाने बाळ वाचले. सासूबाई काही दिवसानंतर निर्वतल्या. माझी आईही देवाला प्रिय झाली. दोघींमध्ये एक गोष्ट समान होती की दोघींनीही आपल्या सुनांना सवतीचे दुःख दिले होते.
क्रमश...