सौजन्याची ऐशी तैशी !

सौजन्य दाखवावे अहो पण किती त्याने स्वतःला तरी गोत्यात आणू नये!

मालतीबाई स्वयंपाकघरातल सगळं आटपून दुपारी बाहेर आल्या न आल्या तोच घराची बेल वाजली. 

आता  तुमच्या आमच्या  सारख्याना वाटेल " कोण आलं  दुपारचं कडमडायला ?" पण मालतीबाई ? छे छे  अजिबातच नाही. सकाळी, दुपारी, संध्याकाळी , रात्री कधीही कोणीही, अगदी चुकून वरच्या मजल्यावरचे आलेले पाहुणे असू देत, नाहीतर फेरीवाले, रद्दीवाला  किंवा कचरावाला,   दार ठोठावलं  तरी त्यांचं स्वागत  हसत मुखानं  होई. 
अगदी एखादा  कुरियरवाला आला तर "दुपारची वेळ आहे, वाईच जरा  बसा, थोडं पाणी घ्या, गूळ  घ्या " असं  सर्व  साग्रसंगीत  चाले . 
म्हणजे फक्त दरवाज्यावर आलेल्यांसाठीच नाही तर त्यांचं ते नेहेमीचंच! सळसळत  सौजन्य!!
घरात  दोनच आंबे असतील आणि घरी कोणी आलं  तर ह्या लगेच त्यांना आवडतात म्हणून ते आंबे कापायला घेणार . मग  बाहेर ५००रु  डझन  का असेना आंबा!
बरं  आत्ता वय झालं म्हणून आलेल्या हळवेपणाने  करत असतील तर तसही नाही. पूर्वीपासून हे असच चालू  आहे. 
एकदा कामवाल्या बाईची कंबर धरली. अक्ख्या बिल्डिंग मध्ये तिला दुसरं कोणी नाही तर मालती बाईंचच घर मिळालं. 
"ताई कंबर जाम धरलिया. काय उसण भरली कोणास ठाऊक ?"
मालतीबाईंनी लगेच सतरंजी काढून दिली आणि आपल्या बाजूलाच खेळणाऱ्या लेकीला सांगितलं. 
 "बघ ग  जरा तिला आयोडेक्स लावायला मदत कर. मी पोळ्या करतीये तोपर्यंत. " आईची आज्ञा मानत लेकीनेही कामवाल्या मावशीला मदत केली. 
दुसऱ्या दिवशी हि परत हजर. मालती बाईंची परत लेकीला  हाक. 
लेक पुटपुटली, "ऊस गॉड लागला कि लोकं मुळापासून खायला बघतात." मालतीबाईंनी तिलाच गप्प केलं. आणि मावशीचं वयातच फावलं. 

वर्षानु वर्ष हे अस चालू आहे. घरातलं काही संपलंय उसनं मागायला  मालती बाईंचं घर , जागा वापरायला  पाहिजे  मालतीबाईंनी जागा , बाहेर जायचंय छोट्या मुलाला एकट घरी कुठे ठेवणार, राहा कि थोडा वेळ मालतीबाईंकडे  हे आणि अस वर्षोन वर्ष चालू आहे. 


हा तर परत गोष्टीकडे वळू या. बाहेरच्याच खोलीत माधवराव पेपर वाचत बसले होते.. नव्हे चांगलेच पेंगुळले होते. मालतीबाईंच्या  हातच इतकं सुग्रास  जेवल्यानंतर आराम खुर्चीवर बसल्यावर डोळा लागायचाच. नेहेमी प्रमाणे माधवराव ढिम्म  हल्ले  नाहीत. मालती बाईचं "काय तरी बाई दार तरी उघडायचं .." असं  पुटपुटत  दाराशी गेल्या. दार उघडलं  तर दोन  मुलं. विद्यार्थी असावेत . त्यातला एक मुलगा माहिती  सांगायला  लागला. 
आता वास्तविक दुपारच्या वेळी त्यांनी चेन लावून दार उघडायला  हवं होत, किंवा अनोळखी लोक  आहेत तर नसत उघडलं  तरी चाललं असत. कित्येक वेळा लेकाने, आणि लेकीने त्यांना समजावण्याचा व्यर्थ  प्रयत्न केला होता. 
दुसर्याने त्यान्च्याकडे पाणी मागितले, तशा त्या लगबगीने स्वयंपाक घरात गेल्या. फुलपात्र  शोधून माठातलं थंडगार पाणी काढतायत  तोच माधवरावांच्या आरडाओरड्याने  त्या तातडीने बाहेर आल्या . बघतात तो ती मुलं  गायब, आणि माधराव हि दिसेनात. थोड्या पुढे  होऊन बघतायत  तोच माधवराव धापा टाकत आले.  
"अग विद्यार्थी कसले ? भुरटे चोर होते ते . तू आता गेल्यावर त्यांनी दाराजवळच्या टेबलावरचा  लॅपटॉप, आणि दोन्ही घड्याळ घेतली आणि पोबारा केला .  माझ्या लक्षात येऊन मी उठून काही बोलायच्या आत ती दोघे  पसार झाली. तरी गेलो त्यांच्या मागे पळत. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मालतीबाई  तुमच्या ह्या सौजन्याला आता तरी आवरत घ्या, नशीब बलवत्तर म्हणून लॅपटॉवरच निभावलं नाही तर केवढ्याला पडलं  असत ते आपल्या म्हातारा म्हातारीला ! "
आणि कधी नव्हे ते मालतीबाईंनी माधवरावांपुढे मौनाची गोळी घेतली.