लघुकथा
विषय - सासुरवाशीण
"अहो, आपल्या मेघनाचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले. मला वाटतं आता तिचं लग्न उरकून टाकायला हवं."सुशीलाताई संतोषरावांना म्हणाल्या.
"अगं सुशीला, एवढी कसली लग्नाची घाई? मेघनाला शिक्षणाची आवड आहे. घेऊ दे तिला पुढचे शिक्षण."संतोषराव सुशीलाताईंची गोष्ट टाळण्याच्या उद्देशाने म्हणाले.
"अहो, ती जेवढी जास्त शिकेल तेवढा मुलगाही शिकलेला बघावा लागेल आणि देण्याघेण्याचीही तयारी ठेवावी लागेल." त्यापेक्षा आताच स्थळ पाहायला सुरुवात करा तुम्ही.
रोज सकाळी उठल्यापासून सुशीलाताईंची मेघनाच्या बाबांसमोर म्हणजे संतोषरावांसमोर भुणभुण सुरू व्हायची.
मेघना सुस्वरूप, हुशार व शांत स्वभावाची मुलगी. घरकामातही तिचा हातखंडा. तिला पुढे शिकण्याची खूप इच्छा होती पण आई-बाबांपुढे ती काहीच बोलू शकत नव्हती कारण घरच्या परिस्थितीची तिला पूर्ण जाणीव होती.
एकदा एक चांगले स्थळ मेघनासाठी चालून आले. समीर आई वडिलांचा एकुलता एक मुलगा. चांगली नोकरी. एकंदरीत घरची आर्थिक परिस्थिती उत्तम. समीरला मेघना पाहता क्षणीच आवडली. मेघनालाही समीर आवडला. आता पसंती तर झालीच होती. परंतु श्वेताताईने म्हणजे समीरच्या आईने देण्या घेण्याचा प्रश्न उपस्थित केला.
समीरच्या वडिलांनी तिला शांत राहण्यास खुणावले.समीरनेही आईला समजावले.अशा रीतीने मेघना व समीरचा विवाह पार पडला.
मेघनाला मुळातच घरकाम, स्वयंपाक याची आवड. सासू-सासऱ्यांचा मानसन्मान, आल्या गेल्यांचा मानसन्मान या सर्व गोष्टी ती अगदी हसत खेळत, मनापासून करायची.
श्वेता ताई मात्र आपल्या स्वभावाप्रमाणे तिच्या प्रत्येक गोष्टीत उणीव दाखवायच्या. सतत खोचक बोलायच्या. कारण त्यांचा स्वभावच तसा होता. पण मेघना मात्र त्याकडे दुर्लक्ष करायची.
समीरला मात्र या गोष्टीचे वाईट वाटायचे. एक दिवस समीर मेघनाला म्हणाला."माझी आई सतत तुला काही नां काही बोलत असते. तुझे दोष दाखवत असते. पण माझाही नाईलाज आहे गं. मी तिला नाही दुखवू शकत. तू समजून घे.
मेघना समीरला हसत हसत उत्तर द्यायची. "नाही हो, माझी आई नाही कां मला चांगल्या गोष्टीसाठी बोलायची. त्याप्रमाणे माझ्या सासुबाई मला माझ्या आईसारख्याच आहेत. माझे दोष काढून, मला बोलून त्यांचं जर समाधान होत असेल, त्या जर खुश राहत असतील तर चांगलचं आहे. घरचं वातावरणही त्यामुळे चांगलं राहतं. आणि हो "कुणाच्या बोलण्याने अंगाला छिद्र थोडीच पडतात. उलट आपल्यात सुधारणा होते." अशी माझी आई मला नेहमी म्हणायची. मेघनाच्या या समजूतदारपणाचे समीरला खूप कौतुक वाटायचे.
हळूहळू शेजारणी सुद्धा कुजबूज करायच्या. "अहो देशमुखांची सून अजिबात बाहेर दिसत नाही."
दुसरी म्हणायची, "तिची सासू खूपच फटकळ आहे हो बोलायला."
तिसरी म्हणायची, हो नां "सासुरवाशीण बिचारी."
अशातच मेघनाला दिवस गेले. सर्वांना खूप आनंद झाला. आता आपण आजी होणार या विचाराने श्वेता ताई खूप सुखावल्या. मेघनाला सातवा महिना लागला. एक दिवस श्वेता ताई मेघनाला म्हणाल्या. मेघना, पहिले बाळंतपण आईकडे असते बरं. यावर मेघना काहीच बोलली नाही.
श्वेताताईंनी हीच गोष्ट समीर जवळ सुद्धा काढली."पण आई, मेघनाची ट्रीटमेंट इथली सुरू आहे आणि तिच्या माहेरची परिस्थिती सुद्धा नाजूक आहे. तेव्हा मला वाटतं बाळंतपणासाठी तिने इथेच राहावं."
त्यामुळे समीरला मात्र आईची बरीच बोलणी सहन करावी लागली. पण समीर मात्र आपल्या निर्णयावर ठाम होता.
नऊ महिने पूर्ण झाले. मेघनाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. पण मेघनाचा सासुरवास मात्र कमी झाला नाही. एक दिवस तर श्वेता ताईंनी मेघनावर दागिन्यांच्या चोरीचा आळ घेतला. एवढेच नव्हे तर "तू माहेरची भिकारडी आहेस. तूचं माझे दागिने चोरले. तुला तुझ्या माहेरी पैसे देऊन द्यायचे असतील." असे काहीबाही त्या बोलायला लागल्या.
मात्र आपल्या माहेरचा जेव्हा उल्लेख झाला. ही गोष्ट मेघनाला सहन झाली नाही. ती आपल्या सासूबाईंना म्हणाली,"आई,तुम्ही मला रोज काही ना काही बोलत असता. सतत माझे दोष दाखवत असता. पण मी कधी अवाक्षरही काढले नाही. पण आज माझ्या माहेरच्या विषयी बोललेलं मात्र मला अजिबात आवडलेलं नाही.
परंतु आपली चूक कबूल न करता श्वेताताईंनी तिच्यावर बरेच तोंड सुख घेतले.
समीर घरी आल्यावर मेघनाने ही गोष्ट समीरला सांगितली. त्याला या गोष्टीचे खूप वाईट वाटले. आपल्या आईचा असा स्वभाव त्याला माहिती होता. नेहमीच ती तिच्या वस्तू जरा कुठे इकडे तिकडे झाल्या तर ती कुणावरही आळ घेते हे त्याला माहीत होते. तो सरळ आईकडे गेला. आईला काय झाले विचारले. श्वेता ताईंनी घडलेली गोष्ट सांगितली.
"अगं आई, तुझे दागिने काल तू टेबलवर ठेवले होते म्हणून मी ते उचलून परत तुझ्या कपाटात ठेवून दिले. जरा तुझं कपाट उघडून पहा आधी. श्वेता ताईला ते दागिने दिसले. त्यांना ओशाळल्यागत झाले. परंतु हार मानणाऱ्यांपैकी त्या नव्हत्या.
मेघनाची मुलगी आराध्या ही आता एक वर्षाची झाली होती. अशातच एके दिवशी श्वेताताईंना पॅरालिसिसचा अटॅक आला. खूप उपचार झाले. परंतु यश आले नाही. आता मात्र आपल्याला पूर्णपणे मेघनावरच अवलंबून राहावे लागणार. आता आपले कसे होईल? ही चिंता त्यांना सतावायची. मेघना मात्र जणू काही घडलेच नाही. एक कर्तव्य म्हणून आपण आपल्या सासुबाईंची काळजी घेतलीच पाहिजे असे म्हणून ती त्यांची सेवा करायची. अगदी हसतमुखाने. श्वेता ताईंना मात्र हळूहळू आपल्या कृत्याचा पश्चाताप व्हायला लागला.
आपण एवढा सासुरवास करूनही मेघना आपल्या मुलीसारखी आपली सेवा करत आहे. तिने मेघनाला जवळ घेतले. " मेघना मला माफ कर. खरंच तू माझी सून नसून मुलगी आहेस. खूप सहन केला गं तू. मी पूर्वजन्मी काहीतरी पुण्य केलं असणार म्हणूनच तुझ्यासारखी सून मला मिळाली. आणि दोघींनीही आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
त्यावेळी मला कुठेतरी वाचलेल्या ओळी आठवल्या.
सासवांनो, देण्यापेक्षा सुनांना सोन्याचे साज,
फिरवा त्यांच्या पाठीवरून मायेचा हात.
नका येऊ देवू त्यांना आठवण माहेराची,
करतील त्या आपणावर बरसात सुखाची.
फिरवा त्यांच्या पाठीवरून मायेचा हात.
नका येऊ देवू त्यांना आठवण माहेराची,
करतील त्या आपणावर बरसात सुखाची.
सुनांनो, सासरी येता ठेवा सतत समोरच्यांचा मान,
मग मिरवाल तुम्ही आयुष्यभर त्याची शान,
झेपेल तेवढे करू द्या सासूबाईंना काम,
नका घेऊ तुम्ही काढून त्यांचा मान.
मग मिरवाल तुम्ही आयुष्यभर त्याची शान,
झेपेल तेवढे करू द्या सासूबाईंना काम,
नका घेऊ तुम्ही काढून त्यांचा मान.
समाप्त