संस्कार ..

About Sansakaras
संस्कार

'सुखाचा संसार
करावा सद्गुणांनी
व आपली ओळख
जपावी संस्कारांनी '


आईवडिलांनी सांगितलेला हा विचार मनाशी ठेवून सुचित्रा लग्न करून सासरी आली होती.

संस्कार म्हटले की, लगेच डोळ्यासमोर येतात ते आईवडिल! मुलांना संस्कारांचे बाळकडू आईवडिलांकडूनच मिळत असते.
मुले कशी वागतात? यावरून त्यांच्यावर कसे संस्कार झालेले असतात, हे समजते.

सासरी गेलेल्या मुलीने सासरी चांगले वागण्यासाठी,तिच्या आईवडिलांनी तिच्यावर चांगले संस्कार केले पाहिजे. असे सर्वांना वाटत असते आणि त्यात सासरच्या लोकांची जास्तच अपेक्षा असते...
सासुरवाशीणीच्या वागण्यात जाणते- अजाणतेपणी काही चूक झाली की, सासरच्या लोकांची वाक्ये ठरलेली असतात,

\" हे चं का संस्कार तुझ्या माहेरचे? \" ,

\"आईवडिलांनी काही चांगले संस्कार केले की नाही तुझ्यावर? \" ,

\"आईवडिलांनाच संस्कार नसतील म्हणून तर मुलीलाही नाही चांगले संस्कार . \"

असे बोलणाऱ्यांना आपली मुलगी तिच्या सासरी कोणते गुण ..कोणते संस्कार दाखवत असते , हे माहित असते का ?

सुचित्रा ही इंजीनियर होती. लग्नाअगोदर ती जॉब करत होती व लग्नानंतरही ती जॉब करणार हे सासरच्यांनी मान्य केल्याने , ती लग्नानंतरही जॉब करत होती.

सुचित्राच्या आईवडिलांनी तिला व तिच्या मोठ्या बहिणीला म्हणजे आपल्या दोघी मुलींना चांगले शिक्षण तर दिलेच होते पण चांगले संस्कार ही दिले होते.

बऱ्याच लोकांना वाटत होते की, \" मुली जास्त शिकल्या की बिघडतात, आपले संस्कार विसरतात.\"

आणि असे लोक सुचित्राच्या आईवडिलांना टोमणे मारायचे.
पण त्यांनी लोकांच्या या बोलण्याकडे कानाडोळा करून आपल्या मुलींना शिकवले व जीवन चांगले जगण्यासाठी संस्कारांची शिदोरीही दिली.

आईवडिलांचा आपल्या मुलींवर व आपण दिलेल्या संस्कारांवर विश्वास होता.
आपण केलेल्या संस्कारांचा पाया इतका मजबूत आहे की, त्या संस्कारांवर कोणत्याही वाईट गोष्टींचा परिणाम होणार नाही, याची त्यांना खात्री होती.

सुचित्राला सुरूवातीला सासरी सगळे काही नवीन होते. त्यामुळे सर्व गोष्टी समजून घेण्यास वेळ लागत होता.सर्वांच्या सवयी, स्वभाव, गुण ,वागणे वगैरे.
हे सर्व समजून घेतांना तिला काही गोष्टी आवडत होत्या तर काही गोष्टी खटकतही होत्या.

तिच्या जाऊबाई जास्त शिकलेल्या नव्हत्या आणि स्वभावानेही त्या खूप गरीब ,भोळ्या वाटत होत्या.घरात त्या घाबरून, दबून राहत होत्या. सासूबाईंच्या धाकाखाली वावरत होत्या.

मोठ्या सुनेप्रमाणे सासूबाईंनी सुचित्राशीही तसेच वागण्याचा प्रयत्न केला, पण ..
\" सर्वांशी प्रेमाने,आदराने वागावे \"
या संस्कारांबरोबर
\"आपली काही चूक नसताना ,अन्याय व अत्याचार सहन करू नये. चुकीच्या गोष्टींचे समर्थन करू नये.न्यायाने वागावे.\"

हे संस्कार ही आईवडिलांनी सुचित्राला दिलेले होते.
त्यामुळे तिला सासूबाईंच्या वागण्याचा राग यायचा.

सूनांना मत नसतं,त्यांनी फक्त घरात जसे सांगितलं जातं ,तसचं करायचं असतं, स्वतःच्या आवडीनिवडी, स्वतः च मत हे कधी सांगायच नसतं, इतरांच्या सुखातच आपलं सुख मानायच असतं.

हे सर्व मान्य करणारी व त्याप्रमाणे वागणारी सून म्हणजे \"संस्कारी सून \" .
व हे सर्व न स्विकारता आपल्या मर्जीने वागणारी सून म्हणजे
\"संस्कार नसलेली सून \".

सुचित्राला सासूबाईंचे वागणे पटत नव्हते. त्यांच्या सासूबाई त्यांच्याशी कठोर वागल्या म्हणून त्यांनीही आपल्याशी असे का वागावे? आपले काही चुकत नसले तरी उगाच फक्त सासूपणा दाखवण्यासाठी आपल्याला चुकीचं ठरवायचं,शिक्षण, संस्कार या गोष्टींवरून नको ते बोलून अपमानित करायचं.

सुचित्राला हे सहन होत नव्हतं.

वयाने,अनुभवाने व मानाने मोठे असणाऱ्या सर्वांचा, सून आदर करते,मान ठेवते , त्यांचे ऐकून घेते याचा अर्थ असा नाही की..
मोठ्यांचे नेहमीच सर्व बरोबर असते आणि सून ही नेहमी चुकीची असते.

सूनेकडून चांगल्या संस्कारांची अपेक्षा ठेवणाऱ्या सासूबाई आपले चांगले संस्कार का विसरतात ?

"आम्ही आमच्या मुलीवर चांगले संस्कार केले आहे, तिला आईवडील या नात्याने काही कमी पडू दिले नाही. लग्नानंतर ही आम्ही तिला नेहमीच काही ना काही घेत असतो, देत असतो. जावईबापूंना घेणेदेणे सुरू असते. तिच्या सासरच्या लोकांचा ही नेहमी मानपान ठेवत असतो. म्हणून माझी मुलगी सासरी किती सुखात असते."

सासूबाईंचे हे बोलणे नेहमीचे ठरलेले होते.
सुचित्राचे नुकतेचं लग्न झालेले होते ,तिला हे सर्व कळावे आणि तिने आपल्या आईवडिलांना हे सर्व सांगावे. हा त्या मागचा उद्देश.

जाऊबाईंच्या माहेराची परिस्थिती एवढी चांगली नव्हती. त्यामुळे त्यांचे आईवडिल , सासूबाईंच्या म्हणण्यानुसार घेण्यादेण्याचे संस्कार पूर्ण करू शकत नव्हते.
ते त्यांच्या पद्धतीने करत होते पण सासूबाई त्यातही चुका काढत होत्या.व सूनेला सारखे सारखे बोलून तिच्या माहेरच्या संस्कारांविषयी नको ते बोलायच्या.

सुचित्राला हे सर्व ऐकून वाटायचे,

एखाद्या व्यक्तीला आपण भेटवस्तू देत असतो, तर ते आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी. त्या भेटवस्तूच्या किंमतीपेक्षा, ती देण्यामागची भावना महत्त्वाची असते.
परंपरा ,रीतीरिवाज म्हणून लग्नकार्यात देणेघेणे असते.आणि
देण्याघेण्यातूनचं आपले संस्कार दिसतात का ?
जर आपण कोणाशी चांगले वागत नसू तर त्या भेटवस्तूंना तरी काय अर्थ उरतो?

संस्कार हे आपल्या वागण्याबोलण्यातून, आपल्या विचारांतून कळत असतात.
आपले चरित्र कसे आहे , हे आपले संस्कार सांगत असतात.

संस्कार म्हणजे असा एक साचा नाही की, ज्यात आपण कोणाला बसवले तर तो संस्कारी होतो.

संस्कार ही प्रवृत्ती आहे ,ती पिढीनं पिढी चालत आलेली असते. काळानुरूप काही संस्कार बदलत ही असतात.

माणसातील माणुसकी जिंवत असणे, म्हणजेचं संस्कार!

आपल्या आयुष्याची जी नीती मूल्ये असतात, ज्यामुळे आपले आयुष्य तर चांगले होतेचं पण आपल्या मुळे इतरांना ही काही त्रास न होता,त्यांचेही जीवन सुखाचे होण्यास मदत होते...ते म्हणजे ..संस्कार!

सुचित्रा सकाळचे सर्व काम करून ऑफिसला जायची व संध्याकाळी घरी आली की,आपली वाटणीची कामे करायची. घरची कामे करून ऑफिसचेही काम करणारी सुचित्रा व फक्त ऑफिसचे काम करणारा तिचा नवरा हे दोघे संध्याकाळी घरी बरोबर आले की, सुचित्राने नवऱ्याला पाणी, चहा हातात देणे आणि कधीतरी सुचित्राने नवऱ्याला सांगितले असेल की,

\"तू किचनमध्ये आहेस तर पाणी देतो का मला ? \"

या वाक्यावर तिला पाणी तर कधी मिळायचे नाही, पण सासूबाईंचे बोलणे मात्र ऐकायला मिळायचे आणि नवराही सासूबाईंच्या संस्कारांत वाढलेला. त्यामुळे बायको कितीही शिकलेली असो, नोकरी करणारी असो ,चांगली संस्कारी असो, तिची जागा ठरलेली असते...

स्त्री म्हणजे पुरूषाची दासी,पायातील वहाण,एक उपभोगण्याची गोष्ट !

हे सर्व पुरूषांना का शिकवले जाते किंवा त्यांच्या मनात का बिंबवले जाते?
असे चुकीचे संस्कार का त्यांच्यावर केले जातात?

\"पती हा परमेश्वर! \"

असे पत्नीला सांगितले जाते.
मग

\"पत्नी ही गृहलक्ष्मी असते.\"
असे पती लोकांना का सांगितले जात नाही.

जसे मुलीला एक चांगली पत्नी, सून ,आई होण्यासाठी चांगले संस्कार शिकवले जातात. तसेच मुलांना ही चांगला जोडीदार होण्यासाठी चांगले संस्कार का शिकवले जात नाही ?

नवरा व्यसनी, भांडखोर, संशयी कसाही असला तरी बायकोने आपले संस्कार जपून संसार करावा.
नवऱ्याने सर्व मर्यादा ओलांडल्या तरी चालेल पण बायकोने कोणी परपुरुषाशी बोलले ,मैत्री केली तरी तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले जातात. तिचे संस्कार चुकीचे ठरविले जातात.

मुलींनी असेचं राहवे,तसे राहू नये.
मुलींनी हे करावं, ते करू नये
म्हणजे सर्व संस्कार मुलींसाठीच !

मग आईवडील आपल्या मुलींवर जसे संस्कार करतात तसेच मुलांवरही चांगले संस्कार झाले पाहिजे. त्यांना सांगितले पाहिजे,

प्रत्येक स्त्रीरुपाचा आदर करावा. घाणेरड्या वासनापोटी कोणत्याही स्त्रीच्या भावनांशी खेळू नये,स्त्री हे पुरूषाच्या हातचे खेळणे नसते.
स्त्रीलाही मन असते,भावना असतात, तिचं एक अस्तित्व असतं.तिच्या शरीरावर ,तिच्या मनावर अत्याचार करणे म्हणजे तिच्यातील देवीरूपाचाच अपमान करणे !


लहान बाळावर जसे संस्कार होत जातात, तसे त्याचे आयुष्य घडत जाते.
घरात चांगले संस्कार असतील,मित्रपरिवार चांगला असेल ,चांगल्या गोष्टींची आवड असेल तर चांगल्या संस्कारांमुळे आयुष्यही चांगले घडत जाते.
पण घरातूनच वाईट संस्कार मिळत असतील,आजूबाजूचे मित्र चांगले नसतील,वाईट व्यसने असतील तर आयुष्य चांगले घडेल का?

चांगल्या बीपासून चांगलेच रोप तयार होते आणि त्याला चांगले पोषक वातावरण मिळाले की ते अजून बहरते, छान फुल,फळ देते.
विचार, संस्कार चांगले असतील तर आयुष्यात चांगलेच कर्म घडते व त्याचे फळही गोडच मिळते.

आपण कोणतीही जी कृती करतो,ती अगोदर आपल्या विचारात येते आणि विचार कुठून येतात ? विचार मनातून किंवा बुद्धितून येत असतात.
जर आपल्या मन व बुद्धी या दोघांवर चांगले संस्कार असतील तर विचार ही चांगलेच येतील व कृतीही चांगलीच घडते.

मन व बुद्धी यांच्यावर वाईट गोष्टींचा अंमल होण्यापूर्वीच त्यांना चांगल्या गोष्टींची सवय करून द्यायला हवी. चांगले संस्कार द्यायला हवे.
चांगले संस्कार हे आध्यात्मातून,महान व थोर व्यक्तिंच्या जीवनचरित्रातून ,पूर्वापार चालत आलेल्या चांगल्या परंपरा, संस्कृतीतून तसेच रोजच्या जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींतूनही होऊ शकतात.

आपल्यासाठी काय चांगले आणि काय वाईट याची ओळख करून देणे म्हणजेचं संस्कार !

सुचित्राला कळून चुकले होते की, व्यक्ती वाईट नसते तिच्या वर होणारे संस्कार तिला वाईट बनवतात.

सासूबाई ,नवरा हे वाईट नाही. तर ते ज्या वातावरणात ,ज्या संस्कारात वाढले , तसे त्यांचे वागणे बनत गेले.


आपल्याला त्यांच्या वागण्याचा राग येतो,त्रास होतो कारण आपले संस्कार त्यांच्या सारखे नाही त्यामुळे.

प्रत्येक गोष्टीला घटस्फोट किंवा माहेरी राहणे हा पर्याय असू शकत नाही.
आपण यांना थोडे बदलवण्याचा प्रयत्न केला तर...
या विचाराने तिने सासूबाईंना वाचनासाठी आध्यात्माबरोबर महान व्यक्तींचे पुस्तके आणून दिली.त्यांच्या वयाच्या व चांगले कार्य करणाऱ्या स्त्रियांशी ओळख करून दिली.
जाऊबाईंमध्ये ही आत्मविश्वास निर्माण केला.
घरात तिने आपल्या वागण्यातून,बोलण्यातून सर्वांची मने जिंकत आपल्या संस्कारांची ओळख करून दिली.
घरात सर्वांना तिचे वागणे,बोलणे आणि तिचे संस्कार आवडू लागले.
सर्वांमध्ये हळूहळू बदल होत गेला.

चांगल्या गोष्टीचा नेहमीच वाईट गोष्टीवर विजय होत असतो.

हे सुचित्राला जाणवू लागले
आणि तिला गीतकार सुधीर फडके यांच्या गाण्याच्या ओळी आठवतात,

'तेज स्पर्शाने दूर होई अंधार
जैसा मुळांचा वृक्षास असे आधार
शिल्पास आकारी जैसा शिल्पकार
मना घडवी संस्कार '


नलिनी बहाळकर