संघर्ष अस्तित्वाचा ३

--------

संघर्ष अस्तित्वाचा ३ @ प्रेरणादायी कथा 

( आडावरून पाणी घेवून आलेल्या कावेरीने मोहन आणि सासूबाई च बोलणं ऐकलं. ज्यात मोहनच दुसरं लग्न आणि कावेरी घर सोडून जात नसल्याने तिला विहिरीत ढकलून देण्याची योजना. डोळ्यात अश्रू घेऊन उभी कावेरी हे ऐकून दुःखात बुडून गेली. )


मोहन आणि सासूबाई च बोलणं ऐकून दुःखात बुडालेली कावेरीला रात्रभर झोपली नव्हती. रात्रभर विचार करत होती की काय पाप केले होते म्हणून बापच प्रेम नाही, नवरा जीव लावत नाही उलट हुंड्यासाठी जीवघेण्यासाठी तयार आहे. सासरचं प्रेम नाही नक्की काय चुकलं ?  काय चुकतंय?  घर सोडून जाणार तरी कुठे..?  काय करावं.?  

आता कावेरी अजून घाबरून राहू लागली. पाण्याला जाताना नेहमी कोणी ना कोणी बरोबर असल्याशिवाय जायला टाळाटाळ करायची किंवा दुसरं काम काढायची. सासूबाई मात्र फार चिडचिड करू लागल्या. त्यांना मालदार स्थळ हातातून जाईल अशी भीती वाटू लागली. त्यामुळे दुसरा मार्ग कोणता काढायचा यावर त्या विचार करू लागल्या. 

एका रात्री कावेरी झोपेत असताना तिला काही जोरात खाली पडल्याचा आवाज येतो. आणि आवाजाने दचकून ती जागी होते. समोर मोहन हातात कोयता घेवून उभा होता. मागून सासूबाई येताना काहीतरी पडलं आणि त्या आवाजाने कावेरीला जाग आली होती. हे सर्व पाहून कावेरी प्रचंड घाबरली. आणि तेवढ्यात कावेरीवर मोहनने वार केला. कावेरीने तो वार चुकवला, दुसरा कावेरीच्या हातावर बसला मोठी जखम झाली, रक्त वाहू लागलं. सासूबाई कावेरीला पकडू लागल्या आणि मोहन कावेरीवर तिसरा वार करणार, तोच कावेरी मोहनला जोरात धक्का देवून बाहेर पळते. रात्रीच्या अंधारात कावेरी वाट मिळेल तिकडे धावू लागते. ती धावत धावत गावाची वेस ओलांडून बरीच पुढे आली होती. एका मोठ्या वडाच्या झाडामागे जावून लपून बसते. साडीचा पदर फाडून तो जखमेवर बांधते. तिची छाती अजून धडधडत होती. आणि झालेल्या घटना आठवून तोंडात पदराचा बोळा कोंबून रडत होती. 

मोहन आणि त्याच्या घरचे कावेरीला अंधारात बराच वेळ शोधात होते. बराच वेळ कावेरी सापडत नाही पाहून मोहनची आई घाबरते. म्हणते, " तिला विहिरीत ढकलायला मिळत नाही म्हणून ही योजना केली. रात्री दरोडेखोरांचा हल्ला घरावर त्यात कावेरीवर त्यांनी हल्ला केला, आणि घरातल्या काही पैसे, दागिने लुटले असं सांगणार होतो आपण गावकर्यांना. आता तीने पोलीस मध्ये तक्रार केली तर..? "  
मोहन, " त्याआधी आपणच गावकर्यांना ती घरातील दागिने आणि पैसे घेवून पळून गेली असे सांगू. "

एवढ्या रात्री मोहन आणि त्याच्या घरचे सरपंचांच्या घरी गेले आणि मोहन रागाने तर त्याची आई रडून कावेरी रात्री घरातून दागिने आणि पैसे घेवून पळून गेली. तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही तिला घरात घेतलं पण ती आम्हालाच लुटून गेली म्हणू लागले. गावकर्यांनाही त्यांचं बोलणं पटू लागलं. 

दुसऱ्या दिवशी सकाळी रडून आणि वेदनेने कळवळून झोप लागलेल्या कावेरीला पाखरं च्या किलबिलाटाने जाग आली. रात्री झालेला प्रसंग तिच्या समोर तरळून गेला. हाताला झालेल्या जखमेपेक्षा मनाला झालेले जखम ठसठसत होती.  कावेरी उठून उभी राहिली आणि पुढची वाट धरून वाट जाईल तिकडे जाऊ लागली. कावेरी विचार करू लागली.  खरंच काय नशीब घेवून जन्मली आहे मी. जन्मापासून नकोशीचा ठसा, शिक्षण अर्धवट सोडवून लग्न, दिवसरात्र घरासाठी राबले, अर्ध पोटी राहीले. बापाने लग्न लावून घराचं दार बंद केलं. मी कोणालाच नको आहे. ना माहेरी ना सासरी.  असं जगणं काय कामाचं ?  असं जीवन ज्यात मी कोणालाच नकोय असं करू याचं मी. त्यापेक्षा हे संपवून टाकावं. पुढे तिला एका नदीवर पूल लागतो. कावेरी त्यावर उभी राहून सर्व आठवू लागते. आता होतं ते सर्व संपलं, आणि उरलेलं मी संपवून टाकणार. 

क्रमश....... 

संघर्ष अस्तित्वाचा १ @ प्रेरणादायी कथा 

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-1_3347

संघर्ष अस्तित्वाचा २ @ प्रेरणादायी कथा 

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-2_3384

🎭 Series Post

View all