मागच्या भागात आपण पाहिले कि, आज्जीच्या मागण्यांची शृंखला काही केल्या संपतच नव्हती. आणि त्या एकट्याच बोलत होत्या कोणीच त्यांच्या बोलण्याला विरोध दर्शवत नव्हते.
निशांत पण शांत होता.मग याची पण या सर्व गोष्टींना मुक संमती असावी असा केतकीला संशय आला. मग तिला राहवले नाही. म्हणून ती पुढे बोलली ते या भागात..
निशांत हे जे चालले आहे त्यावर तुमचे मत काय. का तुम्ही चुप आहात म्हणजे याला तुमची मुक संमती?..केतकीने सरळ सरळ निशांतलाच विचारले.
आज्जी मी आपली माफी मागते. पण आज माझ्या आईबाबांनी जरी तुमच्या सगळ्या अटी मान्य केल्या असल्या तरीही, मला त्या मान्य नाहीत.
हे सर्व तेही त्यांच्या एकुलत्या एक मुलीच्या प्रेमापोटीच मान्य करत आहेत.
प्रथमतः मुख्य म्हणजे आमचे मोठे कुटुंब नाही. त्यामुळे मला जास्त कामाची सवय नाही.
त्यापेक्षा मला ते जबाबदारीने करावे लागले नाही.
कारण घरच्यांनी माझ्या शिक्षणाला पहिले प्राधान्य दिले.त्यामुळे मी आज इथपर्यंत पोंहचलं.
ठीक आहे तुमच्या घरी पै, पाव्हणा येणार जाणार भरपूर. सगळे मी व्यवस्थित करेल कोठेही तक्रारीला जागा नसेल.
पण एक माझ्या करीअरच्या नियमात जर यामुळे अडसर आला तर क्षमा करा आज्जी, मला ते जमणार नाही.कारण पहिली माझी नोकरी मग दुनियादारी.
कारण अथक प्रयत्नाने मी इथवर पोंहचलं आहे. आणि मी एकुलती एक आहे माझ्यावर माझ्या आईवडीलांची पण तेवढीच जबाबदारी असणार आहे. ते कितीही नाही म्हणाले तरी ते माझे आद्य कर्तव्य असणार.
दुसरे म्हणजे घरातील कामे मलाही करायला आवडतील. मी ते करीनही पण जिथे मला योग्य वाटेल तिथे,मी निशांतची मदत घेणार.
अगदी कधी कधी भांडी घासण्यापासून ते पोळ्या लाटण्या पर्यंत.कारण मी ही थकूनच येणार. त्याचा खांद्याला खांदा लावून मी सुद्धा कमावते.
तिसरी गोष्ट राहिली दागिण्याची.माझे कुटुंब मध्यमवर्गीय आहे .पै,पै जमवून त्यांनी माझ्या लग्नासाठी तरतूद केली.
आई तर छोटी भीशी सुध्दा सोनाराकडे लावत होती. त्यातूनच जमेल तेवढे सोनं त्यांनी करून ठेवले.
त्यांच्या इच्छेनुसार मग ते मला देतील.तुम्ही म्हणाल इतकेच, तितकेच ते होणार नाही. कारण माझ्या शिक्षणाला पण बराच खर्च झाला आहे.मुख्य म्हणजे अडीअडचणीला त्यांनाही काही हाताशी असायला हवे ना!
एक महत्त्वाचा मुद्दा.मी तुम्हांला आधीच सांगितले आहे. माझं कुटुंब माझी जबाबदारी आहे. त्या संदर्भात थोडेसे!..
कारण मी एकटीच आहे. ऊद्या वयोमानानुसार ते थकतील. वार्धक्यात त्यांना मी वृध्द आश्रमात पाठवणार नाही. त्यांना माझ्या समेवत ठेवणार. याला तुमची काही हरकत?
शेवटचा मुद्दा वरमाई म्हणून निशांतच्या आईचे जेवढे कोडकौतुक केले जाईल.ते माझे आईबाबा विनातक्रार करतीलच. पण माझ्या आईचे पण वधूमाय म्हणून कराल का? कारण मी पण एकुलती एकच हो! बस्स एवढेच.
लहान तोंडी मोठा घास घेतला क्षमस्व. कारण वेळीच स्पष्टता आणि पारदर्शकता ठेवली कि, सगळ्या गोष्टी क्लियर होऊन गैरसमज मिटतात असे मला तरी वाटते.
निशांत मी खुप बोलले.मला माफ करा. चला आई बाबा आपण आता निघूया. आता इथे अडकण्याची गरज मला तरी वाटत नाही. आजोबा ही काठी धरा.माझा हात पण धरा.
आजोबांचा हात धरून केतकी बाहेर पडली.तर केतकीचे आई बाबां निशांतच्या आईबाबांना म्हणाले.
आमची लेक थोडी जास्त बोलली तिच्या वतीने आम्ही क्षमा मागतो. लहान आहे. भल्या बुऱ्याची तेवढी जान कमी आहे तिला.
पण एवढे खरे कि,कायम स्वाभिमानाने जगली आमची पोर तिला तिच्या तो अस्तित्वाचा स्वाभिमान आहे.तोच दुखावला गेला एवढे मात्र खरं. बघा काय निरोप असेल ते कळवा. येतो आम्ही.!..
स्वाभिमानी लेकीच्या पाठमोर्या छबीकडे बघत ते दोघेही तिच्या पाठीमागे चालू लागले. निशांतकडील निरोप काय येणार हे पाहूया
पुढील भागात...
क्रमश:
भाग - ३
©️®️ सौ. ऊज्वला रवींद्र राहणे