शीर्षक:- सहवास-प्रवास प्रेमाचा
भाग-३ (अंतिम भाग)
मागील भागात-
अजिंक्य मृणालला आयुषबद्दल माहिती काढण्याचे आश्वासन देतो.
दिवसभर तिला करमत नसल्याने ती जाॅब करायचे त्याला म्हणते.
आता पुढे-
"जाॅब करण्यापेक्षा तू तुझ्या पुढच्या शिक्षणाचा विचार कर. असही तुला पुढे शिकायचे आहेच ना. एंटरन्सच्या एक्सामची तयारी कर. पाहिजे ती मदत करेन मी तुला." त्याने तिला सल्ला दिला त्यावर ती विचार करत म्हणाली,"हा, हे पण चालेल. थँक्स. "
तेव्हापासून तो ऑफिसला गेला की घरचं सर्व आवरून झालं की ती लॅपटॉपवर इंटरनेटच्या मदतीने अभ्यास करू लागली.
असेच एका महिन्यानंतर कोर्टाकडून त्यांना बोलवण्यात आले. तेव्हा सहा महिने त्यांना एकत्र राहण्यास सांगितले. त्यानंतरही त्यांना एकत्र राहायचे नसेल तर त्यांचा डिव्होर्स मंजूर करण्यात येईल तोपर्यंत त्यांना जाणून घेण्यासाठी एकत्र सहवास करावा लागेल. दोघांनी मान्य केले.
अशातच दोन महिने निघून गेले. आयुषचा पत्ता लागताच त्याला भेटवण्यासाठी त्याच्या पत्त्यावर अजिंक्य तिला घेऊन गेला. खूप खूश होती ती. त्याला न सांगताच ते दोघे त्याला भेटायला आले. तिने खुशीतच दारावरची बेल वाजवली. दार उघताच तिने सरप्राईज म्हणत ओरडली पण समोर एका तरूणीला पाहून तिचं हसू मावळलं.
"कोण आहे, नताशा? " असे म्हणत आयुष आतल्या रूममधून बाहेर आला.
समोर मृणालला पाहून तो चकितच झाला. तिच्यासोबत अजिंक्यला पाहून तो चक्रावला.
"अरे, कोण आहेत हे?" नताशा त्याच्या स्तब्ध राहण्याने म्हणाली.
"तुम्ही कोण?" मृणाल तिला न्याहाळत म्हणाली.
"मी याची बायको आहे." नताशा म्हणाली तेव्हा मृणालच्या पायाखालची जमीनच सरकली. डोळ्यांसमोर अंधार पसरला. ती पडणार तोच अजिंक्यने तिला सावरले.
आपण काय ऐकले ते खरेच आहे का? यावर तिचा विश्वास बसत नव्हता. काय बोलावं हेच तिला कळेना. ती भरल्या डोळ्यांने आयुषवर एक कटाक्ष टाकून झटकन तिथून निघून गेली. तिच्यापाठोपाठ अजिंक्य व आयुषही बाहेर आले.
आयुष तिच्यासमोर येत म्हणाला,"तू इथे कशी? "
"का यायला नको होतं का? का फसवलंस मला? मी तर मनापासून तुझ्यावर प्रेम केले होते आणि तूही करत होतास मग? का केलेस असे? " ती रडत त्याचं काॅलर हातात धरून त्याला जाब विचारू लागली.
तेव्हा तो तिचा हात सोडवून घेत एक कुत्सित हसत म्हणाला," बरं झालं तुला हे सर्व कळलं. मग का केलं ते पण ऐक. मी तुझ्यावर कधीच प्रेम केल नाही. माझी श्रीमंत बनवण्याची एक सीढी पाहिजे होतीस तू. पण तुझ्या खडूस बापाला कसं सगळं कळलं माहिती नाही. मला पोलिसांच्या ताब्यात देणार होता तो, त्याची नजर चुकवून पसार झालो. बरं झालं एका अर्थाने ते. नाही तर नताशा मला भेटली नसती. तुझ्यापेक्षा कितीतरी पटीने ती श्रीमंत आणि हाॅट आहे." त्याने निर्जलज्जपणे डोळा मारला.
तो पुढे काही बोलणार तोच एक जबरदस्त चपराक त्याच्या कानाखाली पडली. इतकी जोरात की त्याला दिवसा तारे दिसू लागले होते. त्याने गालाला हात लावत समोर पाहिले तर नताशा रागाने लालबुंद होत त्याला पाहत होती.
"इन्स्पेक्टर, घेऊन जा या नालायक माणसाला. मृणालला व मला आणि अजून किती जणांना याने फसवलय काय माहिती?" नताशा इन्स्पेक्टरला म्हणाली.
नताशा त्याच्याबद्दल थोडी कुणकुण लागली होती. आता तिला खात्रीही झाली होती. दोन दिवसापूर्वीच तिला सगळे माहिती झाले होते. ती योग्य वेळेची वाट पाहत होती. तिनेच इन्स्पेक्टरला बोलावले होते.
आयुष गयावया करू लागला. इन्स्पेक्टर त्याच्या शोधात होते. तो आज त्यांच्या हाती लागला होता म्हणून त्यांनी अजिंक्य व नताशा यांचे आभार मानले व आयुषला ताब्यात घेऊन निघून गेले.
आयुष जे वागला ते ऐकून मृणालला धक्का बसला होता. त्याचबरोबर अजिंक्यने हे सर्व समोर आणले म्हणजे त्याला आधीपासूनच त्याच्याबद्दल माहिती होते तर त्याने आधी का सांगितले नाही म्हणून तिला राग आला. ती रडतच तिथून निघून गेली. तोही घरी आला. तिला समजावू लागला.
"स्वतःला समजा कोण तुम्ही? हा सांगा ना. का सांगितले नाही तुम्ही आधी मला त्याच्याबद्दल ?" तिने रागाने धुसफुसत त्याला जाब विचारले.
"खरं तर मलाही आधी हे माहिती नव्हते. जेव्हा तू त्याच्या गाडीचा नंबर सांगितला तेव्हा मी माझ्या मित्राला माहिती काढायला सांगितली जो की डिटेक्टिव्ह आहे. त्याने मला सगळे सांगितले. नंतर मी तुझ्या बाबांनाही विचारल्यावर त्यांनीही तेच सांगितले. तुला सांगणार होतो पण तू तुझ्या बाबांवर विश्वास ठेवला नाहीस मग माझ्यावर कसा विश्वास ठेवणार होतीस. तुझ्या डोळ्यांवर तर त्याच्या प्रेमाची पट्टी होती. ते दूर करण्यासाठी मला तुला तिथे घेऊन जावं लागलं. तुला हर्ट करण्याचा कोणताही हेतू नव्हता."
"प्रेम काय असतं हे मलाही माहिती आहे. मला मिळालं नाही ते पण तुला मिळावं असे मला मनापासून वाटत होतं. म्हणून मी तुझा आनंद शोधून देणार होतो. पण तो तर फसवा निघाला." तो नाराज होतं पुढे म्हणाला.
त्याचे बोलणे ऐकून तिने चमकून त्याच्याकडे पाहत म्हणाली,"म्हणून तुम्ही म्हणाल होतात का की तुमचं लग्न मनाविरुद्ध झालंय. कोण होती ती? का ती सोडून गेली तुम्हाला? तुम्ही तर इतके चांगले आहात?"
"होती एक पण आमची जात आमच्या प्रेमात आडवी आली. तिच्या वडिलांना ते मंजूर नव्हतं. मी खूप विनवणी केली. पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही. त्यांनी तिचं दुसऱ्याशी लग्न लावून दिलं. तीही म्हणाली की तिला विसरून जा. मला तिच्यापेक्षा चांगली मुलगी मिळेल. ती गेली लग्न करून पण मी मात्र स्वतः तिच्या आठवणीत झुरु लागलो. तब्बेत खालावत गेली. आईवडिलांनी तेव्हा मला सावरलं. त्यातून बाहेर काढेल. तुझे स्थळ आले तेव्हा लग्न कर म्हणून मागे लागले त्यांच्यासाठी लग्न केलं." त्यांच बोलणं ऐकून ती शांत झाली.
तिच्या मनात असलेला तिचा बाबांबद्दलचा राग नाहीसा झाला. तिने तिच्या बाबांची माफी मागितली. त्यांनीही मोठ्या मनाने माफ केले.
असेच काही दिवस निघून गेले. अजिंक्यबद्दल तिच्या मनात आदर आदर वाढला. त्याचा चांगुलपणा तिला भावला. त्याचा सहवास तिला हवाहवासा वाटू लागला. त्याच सहवासाने त्या दोघांच्या मनात प्रेमाची पालवी फुटली.
सहा महिन्यांनी कोर्टात बोलावल्यावर दोघांनी डिव्होर्स नको म्हणून सांगितले. त्यांना संसार हवा आहे म्हणताच कोर्टाने आनंदाने ते त्यांच्या संसाराला संमती दिली. आता आनंदाने संसासात रममाण झाले. त्यांचा सहवास हा त्यांचा प्रेमाचा प्रवास ठरला.
समाप्त-
आईवडील नेहमी मुलांच्या चांगल्याचा विचार करतात. त्यांचे निर्णय योग्यच असतात.
प्रेम सहवासाने होते हेच खरे.
©️ जयश्री शिंदे
सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे. जीवीत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा