Login

सहवास-प्रवास प्रेमाचा (भाग-२)

लग्नाच्या पहिल्या रात्रीच डिव्होर्स मागणाऱ्या व नंतर सहवासाने प्रेमात पडणाऱ्या अजिंक्य व मृणाल यांच्या प्रेमाच्या प्रवासाची कथा
शीर्षक:- सहवास-प्रवास प्रेमाचा

भाग-२

मागील भागात-

अजिंक्य आणि मृणाल यांचे लग्न होते. ते लग्न तिच्या मनाविरुद्ध झाल्याने ती पहिल्याच रात्री त्याला डिव्होर्सची मागणी करते.

आता पुढे:-

दोन दिवसांनी अजिंक्य व मृणाल दोघे पुण्याला रवाना झाले. तिथे त्याचा टू बी एच के फ्लॅट होता. तिथे राहायला आले.

"आज आपण दोघेही थकले आहोत तर जेवणं मी बाहेरून मागवतो पण उद्यापासून तू जेवणं बनवं." तो तिला म्हणाला.

"ओय, मी जेवणं बनवणार नाही." ती एकदम जोरात म्हणाली.

"काय ! का बरं जेवणं बनवणार नाही?" तो आश्चर्याने म्हणाला.

"मला काहीच बनवता येत नाही, ब्रेड जॅम शिवाय." ती नाक मुरडत म्हणाली.

"देवा ! कर्म माझे. जेवण बनवयचा प्रयत्न तरी कर हवं तर मी मदत करतो, रोजचे बाहेरचे जेवण मला परवडणारं नाही." तो नाराजीने तिच्याकडे पाहत म्हणाला.

तिने होकारार्थी मान डोलावली. डिव्होर्सबद्दल तिने पुन्हा आठवण करून दिली. तेव्हा जेवताना तिला म्हणाला,"हो, माझ्या लक्षात आहे. उद्या संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर डिव्होर्सबद्दल विचारायला एका वकिलांकडे जाऊ मी आधीच तसे कळवले आहे त्यांना. तू सांगितलेल्या पत्त्यावर ये." तो जेवताना तिला म्हणाला.

तिने होकारार्थी मान डोलावली.

दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे ते दोघे वकिलाकडे गेले. लग्न होऊन आठ दिवस झाले नाही तर हे डिव्होर्सबद्दल याचिका करत आहेत याचे वकिलाला आश्चर्य वाटले. त्यांनी रीतसर कागदपत्रे तयार करून दिली. कोर्टाकडून बोलावणे आले की या म्हणाले.

दोघे तेथून निघाले, तिला गेटबाहेर थांबायला सांगून तो पार्किंग एरियामधून त्याची बाईक आणायला गेला. बाईक घेऊन तो बाहेर आला पण ती त्याला कुठेच दिसली नाही. तिला फोन लावला तिचा फोनही नाॅट रिचेबल सांगत होता. त्याने इकडे तिकडे विचारपूस केली कोणीही तिला पाहिले नव्हते. तो पुरता घाबरला. नंतर तो सावरला, ती घरी गेली असेल असा विचार करून बाईक वेगाने चालवत घरी आला. घरी येऊन पाहतो तर ती तिथेही नव्हती. आता त्याला टेन्शन आलं. थोडावेळ थांबून पुन्हा  त्याने फोन लावला. आताही फोन लागला नाही. ती या शहरात नवीन आहे. काही झालं तर नसेल ना? अनेक विचारांनी त्याच्या मनात थैमान घालायला सुरूवात केली. बराच वेळ उलटून गेला तेव्हा शेवटी विचारून करून लग्नाच्या अल्बममधला फोटो काढून घेतला व थेट पोलिस स्टेशन गाठलं. ती हरवल्याची तक्रार नोंदवून तो घरी आला. दार बंद करून मटकन सोफ्यावर मागे डोके टेकवून डोळे बंद करून बसला. तेवढ्यात त्याला मुसमुसण्याचा आवाज आला. तेव्हा गडबडून उठला, आवाजाच्या दिशेने गेला तर ती बेडरूममध्ये एका कोपऱ्यात दोन्ही गुडघ्यात तोंड ठेवून रडत असताना त्याला दिसली. तिला पाहून त्याच्या जीवात जीव आला. पण तिने असे काही न सांगता जाणे त्याला न पटल्याने तो चिडला.

"तुला काही अक्कल आहे का नाही. असे न सांगता कोठे गेली होतीस तू? माहिती तरी आहे का तुला? किती टेन्शन आले होते मला. काय झाले रडायला आता सांगशील? एक तर स्वतः असे निघून जायचं आणि पुन्हा स्वतःच रडायचं. याला काय अर्थ आहे? " तो चिडत बडबडत होता. ती मात्र त्याच्या बोलण्याने आणखी रडू लागली.

त्याने स्वतःच्या केसांतून अस्वस्थपणे हात फिरवला व शांत होतं तिला विचारलं,"मृणाल, काय झालं सांग?"

"तो मला दिसला होता. त्याला खूप हाका मारल्या  पण त्याला ऐकू गेले नाही. त्याच्या मागे पळताना मी धडपडले. तो निघून गेला." ती मुसमुसत नाक ओढत म्हणाली.

"ओह, तो म्हणजे आयुष?" तो प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणाला.

तिने होकारार्थी मान डोलावली.

"तोही या शहरातच आहे तर बघतो मी. तू शांत हो आधी. त्याचा गाडीचा नंबर आठवतो का तुला सांग शोधून काढेन त्याला? " तो तिला म्हणाला.

तिने आठवून तो नंबर सांगितला. त्याने कोणाला तरी काॅल लावून त्याबद्दल माहिती काढायला सांगितले. त्याआधी त्याने ती घरी आल्याचे पोलिसांना कळवले.

"तू काळजी करू नकोस. माझ्या मित्राला सांगितले आहे, त्याबद्दल तो माहिती काढेल. तू फ्रेश हो, आपण जेवण करू." तो तिला पाहत दिलासा देत म्हणाला.

" जेवण तयार नाही." ती तोंड बारीक करून म्हणाली.

"माहिती मला, तू हो फ्रेश मी पटकन खिचडी भात बनवतो. दहा मिनिटांत होईल ते." तो एक नजर तिच्याकडे टाकत हातातील घड्याळ काढून टेबलावर ठेवत म्हणाला.

तिला त्याच्या अशा वागण्याचे आश्चर्य वाटले. आता तर काही वेळापूर्वी किती चिडला होता नंतर इतक्या शांतपणे बोलत आपल्याच बायकोच्या प्रियकराबद्दल माहिती काढायला सांगतो म्हणजे नेमकं काय आहे याच्या मनात. ती त्याच्याबद्दल मनात विचार करत होती.

त्याने पटकन खिचडी बनवली. ते खाऊन झोपी गेले. खाताना ती त्याला साॅरी म्हणाली तेव्हा ठीक आहे असे मान डोलावली. 

दोन दिवसांनी त्याच्या मित्राने गाडीचा नंबरवरून त्याची माहिती काढली. ती गाडी दुसऱ्या कोणाच्या तरी नावावर होती. त्या माणसाचा पत्ता आणि नंबर त्याला दिला. त्याने जाऊन चौकशी केल्यावरच तिला सांगू असा विचार केला.

त्या माणसाकडून कळले की आयुष त्याचा मित्र असून त्याचा बिझनेस पार्टनरपण आहे. तो सध्या बिझनेस संदर्भात परदेशात गेला असून एक दोन महिन्याने परत येईल. तिथे नेटवर्क इशू असल्याने फोन लागणार नाही.

अजिंक्यने मृणालला त्या माणसाकडून मिळेलेली  माहिती सांगितली. तिच्याकडे त्याचा काॅन्टॅक्ट होता जो लागत नव्हता. आता त्याच्याबाबतीत कळल्यावर तिला आनंद झाला.

"मृणाल, एक-दोन महिन्याचा प्रश्न आहे. तो पर्यंत तू माझी जबाबदारी आहेस. आयुष भेटला की तुला त्याला सोपवून देईन. तू नेहमी सुखी, आनंदी राहावी हीच माझी इच्छा आहे. तो पर्यंत आपण मित्र म्हणून राहू या का? " तो तिच्याकडे मैत्रीसाठी हात पुढे करत म्हणाला.

तिने हसत हात पुढे केला.

तो रोज सकाळी लवकर उठून बरीच कामे करायचा. ती त्याचं निरिक्षण करायची. त्याला मदत करायची. हळूहळू थोडं फार जेवण बनवयचा ती शिकली.

अशातच पंधरा वीस दिवस निघून गेले.

तो त्याच्या जाॅबवर गेल्यावर तिला करमत नसायचे दिवसभर घरात बसून ती पुरती कंटाळली होती. तिलाही एखादा जाॅब करावा हा विचार तिच्या मनात आला. संध्याकाळी आल्यावर या विषयावर त्याच्याशी बोलायचे तिने ठरवले.

"अहो, मला घरात बसून कंटाळा येतो. मी एखादं जाॅब शोधू का?" ती संध्याकाळी तो ऑफिसमधून आल्यावर त्याला म्हणाली.

क्रमशः-

भेटेल का आयुष तिला? अजिंक्य तिला जाॅब करू देईल का ?

©️ जयश्री शिंदे

प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे. जीवीत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

🎭 Series Post

View all