सगळी जबाबदारी तिचीच कशी... भाग 5 अंतिम
वयोमानाने मंजुषा ताईंना उठणं बसणं होत नव्हतं, त्यांना आता कुठलंच स्वतःचही काम होत नसे. रीमाने सासू साठी एक वेगळी बाई ठेवली. ती सासूचा दिवसभर सगळं करून देत असे. एकदा असं सासूबाईला बरं नव्हतं त्यांच्या अंगात खूप ताप होता. बाईजवळ बसलेली असूनही त्या वारंवार रीमाचं नाव घेत होत्या. त्या रीमा कुठे आहे रीमा कुठे असे विचारत होत्या.काही वेळाने रिमा घरी आली काय कुणास ठाऊक पण त्या तिच्याशी खूप प्रेमाने बोलल्या.
“कुठे गेली होती रीमा? कधीची तुला हाका मारते.”
“आई मी बाहेर गेले होते, बोला ना काही होतंय का तुम्हाला?”
“तू त्या बाईला ठेवलंस माझ्याजवळ पण तिच्यात तो आपलेपणा नाहीये गं, तू आजूबाजूला असलीस की कसं सुरक्षित वाटतं मला. ती बाई असली की मला सुरक्षित नाही वाटत. तू माझ्याजवळ राहशील दिवसभर?”
“माफ करा आई, मला खरंच तेवढा वेळ नाहीये मला वेळ असता ना तर मी नक्की तुमच्याजवळ थांबले असते. दिवसभर पण मलाही माझी स्वतःची कामे असतात म्हणून मी सगळ्या कामाला बाई ठेवली आहे.”
“मला माहिती आहे रीमा मी तुला खूप त्रास दिला ना म्हणून तुला आता माझी सेवा करायची नाहीये. हो ना? मला कळतंय मी तुला खूप त्रास दिला. तुला नको नको ते बोलले, तुला कुठल्याच कामात कधीच मदत केली नाही. म्हणून तू असं वागतेस माझ्याशी.”
“नाही आई तुम्ही असा विचार का करताय मी असे का वागेल तुमच्याशी? असं खरंच काही नाहीये.”
“रीमा एक विचारू?”
“बोला ना.”
“आजचा दिवस मला भरवशील?” रीमाने होकारार्थी मान हलवली.
रीमाने त्यांना जेवण भरवलं.
“तुला माहिती आहे रीमा आज का कुणास ठाऊक खूप दिवसांनी पोट भरल्यासारखं वाटतंय ग.” त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला.
रीमा तिच्या खोलीत निघून गेली, आज पहिल्यांदा सासूबाईंनी डोक्यावर हात ठेवला म्हणून रीमाला खूप बरं वाटलं.
काही महिन्यांनी सासूबाई मरण पावल्या, त्यानंतर रिमा आणि प्रशांत दोघच असायचे. रीमा पूर्णवेळ स्वतःला द्यायला लागली स्वतःपुरतं जगायला लागली...
समाप्त:
आयुष्यात नात्यांना खूप महत्त्व आहे, एकमेकांची सोबत खूप गरजेची आहे. एकमेकांना साथ देणे,सोबत देणे हेही गरजेचे आहे.
मंजुषा ताईंनी थोडं रीमाला समजून घेतलं असतं, तिला मदत केली असती तर गोष्टी सोप्या झाल्या असत्या.
आपण चोवीस तासातला काही वेळ स्वतःसाठी ठेवावा. घरची जबाबदारी आहेच तीही निभवायला हवी पण म्हणून घरातलं काम कुणी एकानेच करावं हे बरोबर नाही, घर सर्वांच आहे तर जबाबदारी पण सर्वांची असायला हवी. सगळी जबाबदारी तिचीच कशी?...