रियुनिअन ( भाग ८ )

आयुष्याची पन्नास वर्षे उलटून गेलेल्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींची कथा.
रियुनिअन ( भाग ८ )

निलेशने रियुनिअनसाठी खूप ठिकाणे सर्च केली पण अजूनही मनाजोगते ठिकाण त्याला सापडत नव्हते.

निलेशची बायको स्वाती त्याला म्हणाली, " अहो ! तुम्हाला मी काय बोलते ते पटतं का पहा. बघा हां ! तुम्ही महागडे रिसॉर्ट किंवा फार्म हाऊस बुक करणार. तिथे दोन दिवस राहणार. त्यापेक्षा मला असे वाटते की, तुम्ही तुमचे डॉक्टर मित्र शशांक आणि निलिमा यांच्याइथे तुमचे रियुनिअन करावे म्हणजे तुम्हाला निसर्गसौंदर्य देखील अनुभवायला मिळेल कारण त्यांच्या घराच्या चारही बाजूने डोंगर आहेत. आता नुकताच पावसाळा सुरू झाला आहे तर सगळीकडे मस्त हिरवेगार असेल. तुमची मैत्रीण तिथल्या बायकांना मदतीला घेऊन तुम्हा सगळ्यांच्या स्वयंपाकाची सोय करू शकते.
तुम्ही सगळेजण तिथे आदिवासी बांधवांसाठी, त्यांच्या मुलांसाठी काय काय हवे आहे याची लिस्ट बनवून त्या त्या वस्तू घेऊन जाऊ शकता. जे पैसे तुम्ही रिसॉर्ट किंवा फार्म हाऊससाठी देणार तेच पैसे तुम्ही तुमच्या मित्राला देऊ शकता. तिथल्या शाळेत जाणाऱ्या मुलांना आणि तेथील बांधवांना शालेपयोगी वस्तू, कपडे, चादरी, टॉवेल, ब्लॅंकेट, स्वेटर, औषधे तसेच वयात येणाऱ्या मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन ह्या सगळ्या वस्तू तुम्ही सगळे मिळून नेऊ शकता.
एक दिवस तुम्ही त्या आदिवासी बांधवांमध्ये राहा. त्यांच्या हातच्या चुलीवरील जेवणाचा आस्वाद घ्या. तुमचे डॉक्टर मित्र कशी निरपेक्ष सेवा करतात हे स्वतः बघून अनुभव घ्या. म्हणजे काय होईल रियुनिअन पण होईल आणि समाजकार्य देखील होईल.
तिथे दोन दिवस राहायची, खाण्यापिण्याची व्यवस्था होऊ शकते का तुमच्या मित्राला विचारा. अगदीच दोन दिवस सोय होणार नसेल तर एकचं दिवसाच्या रियुनिअनची व्यवस्था करा."

" आईशपथ ! स्वाती तू खरंच किती हुशार आहेस ग. ही तर आमच्या एकाच्याही डोक्यात कल्पना आली नव्हती. खूप छानच कल्पना आहे ही. रियुनिअन पण होईल आणि समाजकार्य देखील होईल. मी आताच तुझी कल्पना ग्रुपमध्ये मांडतो. बघू मित्रमैत्रिणी कसा प्रतिसाद देतात." निलेश खूप खुश होऊन स्वातीला बोलला.

लागलीच निलेशने ग्रुपमध्ये स्वातीचा विचार शेअर केला. निलेशच्या पोस्टवर सगळ्यांनीचं प्रचंड उत्साह दाखवला. सगळ्यांनाच स्वातीची कल्पना खूप आवडली.

निलेशने ताबडतोब डॉक्टर मित्र शशांक याला संपर्क साधला. शशांक आणि निलिमाने देखील निलेशच्या प्रस्तावाला लगेचचं मान्यता दिली.

निलेशने शशांककडून त्याच्या घराचे आणि आजूबाजूच्या परिसराचे फोटो मागवून घेतले आणि ग्रुपमध्ये शेअर केले. तिथल्या निसर्गसौन्दर्याने प्रत्येकाच्या मनाला भुरळ पडली. चारही बाजूने डोंगर आणि पावसामुळे डोंगरातून वाहणारे धबधबे ह्याचे फोटो बघून सगळ्यांनी त्या ठिकाणी जाण्यास लगेच होकार दिला.

जे सहभागी होणार त्यांच्या नावाची लिस्ट काढली गेली. जी रक्कम रिसॉर्टसाठी भरली जाणार होती ती रक्कम शशांकला देण्याचे सगळ्यांनीच ठरवले होते त्याप्रमाणे सर्वांनी रक्कम जमविण्यास सुरुवात केली. रियुनिअनची तारीख ठरवण्यात आली. जवळपास पावणेदोनशे लोकं सहभागी होणार होते.

निलेशच्या बायकोला स्वातीला ग्रुपमधून त्यांच्या रियुनिअनसाठी आमंत्रण आले कारण तिनेच ही कल्पना मांडली होती. स्वातीने सांगितले की, " हे तुम्हा शाळेतल्या मित्रमैत्रिणींचे रियुनिअन होणार आहे. सगळे मिळून मस्त एन्जॉय करा. पुढच्या वेळी पिकनिक वगैरे ठरवाल तर मी नक्की येईन आणि तसं तर कोणाच्या लग्नसमारंभाला, वाढदिवसाला मी येतंच असते. हा रियुनिअनचा दिवस तुमचा असणार आहे. सगळ्यांनी मिळून तो दिवस साजरा करा."


रात्री ग्रुपवर सुषमाचा मेसेज आला की तिच्या सासूबाईंना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले आहे. तिच्या घराजवळ राहणारे ग्रुपमधील किरण, सुभाष आणि रवी यांनी लगेच सुषमाला मदत करण्याची तयारी दर्शवली आणि ते हॉस्पिटलमध्ये पोहचले सुद्धा. सुषमाच्या सासूबाईंना आतड्याचा कॅन्सर झाला होता. तो आता शेवटच्या टप्प्यातला होता. डॉक्टरांनी अपेक्षा सोडल्या होत्या. शेवटी पहाटे त्यांचा मृत्यू झाला.

सुषमासाठी साहजिकच रियुनिअनची तारीख पुढे ढकलली गेली.

सुषमाच्या सासूबाईंचे कार्य पार पडले. सुषमाचा ग्रुपवर मेसेज आला,

\" मित्रमैत्रिणींनो, धन्यवाद.
माझ्या सासूबाईंचे वृत्त ऐकून प्रत्यक्षपणे, अप्रत्यक्षपणे आमच्या कुटुंबाला धीर दिलात, आमचे सांत्वन केले याबद्दल मी तुमची ऋणी आहे. आपली रियुनिअनची तारीख माझ्यासाठी पुढे ढकलण्यात आली त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची दिलगिरी व्यक्त करते.
असं म्हणतात की गेलेल्या व्यक्तीबद्दल वाईटसाईट बोलू नये पण मी माझ्या सासूबाईंबद्दल तुम्हाला सांगणार आहे. माझ्या सासूबाई अतिशय कर्मठ विचारांच्या होत्या. खूप सोवळे - ओवळे त्या पाळत असत. दुसऱ्या जातीचा किंवा धर्माचा त्या अनादर करत.
आमच्या घरी देवाची पूजा सोवळ्यात. मग गौरी येतात त्या देखील सोवळ्या ओवळ्यातल्या. ब्राम्हण स्त्रीशिवाय इतर जातीतल्या बायकांना आमच्या गौरीजवळ जाण्यास सासूबाईंचा मज्जाव असायचा. चुकून एखादी परजातीतली स्त्री गौराईजवळ गेलीच तर पूर्ण घरभर त्या गोमूत्र शिंपडत. मला त्यांचे असे वागणे कधी रुचलेच नव्हते. माझ्या माहेरी इतके निर्बंध कधीच नव्हते. सगळ्या जातीधर्माच्या मैत्रिणी माझ्या घरी यायच्या. माझी आई सगळ्यांचे प्रेमाने करत असे. सगळ्यांना प्रेमाने खाऊपिऊ घालत असे.
सासूबाईंच्या अशा वागण्याने खूप घुसमट व्हायची माझी. घरात पूर्णतः सासूबाईंचे राज्य त्यामुळे त्यांना कोणीचं कधीचं काही बोलले नव्हते तर मी काय बोलणार बापडी ? मनात कितीतरी वेळा बंड पुकारले जायचे पण सासूबाईंसमोर तोंड उघडणे कधीच जमलेचं नाही. माझ्या चुलतदिराने मराठा मुलीशी प्रेमविवाह केला तर त्याला लग्नानंतर सासूबाईंनी घरी बोलावले नाही तरी तो बिचारा काकुला भेटायला म्हणून घरी आला तर त्याच्या बायकोशी माझ्या सासूबाई बोलल्या सुद्धा नाहीत. नवीन नवरी घरी आली आहे म्हणून मी घाबरत घाबरत तिची ओटी भरली. ते लोकं गेल्यावर सासूबाईंनी मला मी तिची ओटी भरली म्हणून केवढेतरी सुनावले. कधीतरी त्यांच्या विचारांमध्ये बदल होईल या आशेवर मी दिवस ढकलले.
आणि तो दिवस आला. त्यादिवशी सासूबाई तोल जाऊन बाथरूममध्ये पडल्या आणि बाथरूममधील नळ डोक्याला आपटून त्यांना भली मोठी खोक पडली. सासूबाई रक्तबंबाळ झाल्या होत्या. दुपारची वेळ असल्याने घरात माझ्याशिवाय कोणीच नव्हते. शेजारीपाजारी देखील कामावर गेले होते. मी घाबरून गेले होते. फॅमिली डॉक्टरांना फोन केला तर त्यांनी लगेचंच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला सांगितले. आमच्या मजल्यावरचे खानचाचा माझ्या मदतीला धावले. अँब्युलन्सची वाट न पाहता त्यांनी त्यांच्या मुलाला मदतीला घेऊन सासूबाईंना त्यांच्या गाडीच्या मागच्या सीटवर अलगद झोपवले आणि ताबडतोब वेगाने गाडी हॉस्पिटलच्या दिशेने नेली.
हॉस्पिटलपर्यंत पोहचेपर्यंत सासूबाईंना जास्त प्रमाणात रक्तस्राव झाला होता त्यामुळे त्यांना रक्त चढवावे लागले.
त्या पूर्ण बऱ्या झाल्यावर मी त्यांना जाणीव करून दिली की, " आई ! तुम्ही जातपात, धर्म यांचा आतापर्यंत अवडंबर केला. जेव्हा तुम्ही रक्ताच्या थारोळ्यात होता तेव्हा खानचाचांनी तुम्हाला त्यांच्या गाडीतून हॉस्पिटलमध्ये नेले. खानचाचांच्या कुटुंबाचा कायम तुम्ही दुस्वास केला तरी त्यांनी माणुसकी दाखवली. तुम्हाला पाच रक्ताच्या बाटल्या चढवाव्या लागल्या. ते रक्त कुठल्या जातीधर्माच्या माणसाचे होते ते ठाऊक नाही पण त्याचं रक्ताने तुम्हाला जीवनदान मिळाले. आई आतातरी तुमचे विचार बदला. माणुसकी हाच खरा श्रेष्ठ धर्म आहे.
माझ्या बोलण्याने त्या अंतर्बाह्य बदलल्या. आता आमच्या घरातील पदार्थ खानचाचांच्या घरी जाऊ लागले. त्यांच्या शिरकुर्म्याने आमच्या घराचा उंबरठा ओलांडला. इतकंच काय तर गणपतीच्या दिवशी आमच्या पंगतीत त्यांच्या कुटुंबाला मानाने जेवायला बसवले.
आईंना कॅन्सर डिटेक्ट झाला तेव्हा देखील खानचाचा आमच्या मदतीला धावले.
मी हे सारं सांगण्याचा उद्देश म्हणजे ज्या माझ्या सासूबाई अतिशय कर्मठ विचारांच्या होत्या त्यांचे मतपरिवर्तन अशा प्रकारे झाले होते. आता मला माझ्या घरात मोकळा श्वास घेता येत होता कारण त्यांनी त्यांचे सोवळे ओवळे बाजूला ठेवले होते. त्यांनी नंतर माणुसकी धर्म जपला. आमच्या मदतनीस बाईंच्या मुलाला जेव्हा दहावीमध्ये ७९% मिळाले तेव्हा त्याच्या शिक्षणासाठी सासूबाईंनी त्याला कायम प्रोत्साहन दिले. त्याच्या शिक्षणाचा खर्च उचलला. आज तो मुलगा ग्रॅज्युएट होऊन एका चांगल्या कंपनीमध्ये कामाला आहे.
खानचाचांच्या मुलीचे लग्न ठरले तर तिला सासूबाईंनी घसघशीत माहेरचा आहेर दिला. तिचे अगदी साग्रसंगीत केळवण देखील केले.\"

सुषमाचा मेसेज वाचून सगळ्यांनी \" माणुसकी धर्म हाच खरा धर्म \" अशी प्रतिक्रिया दिली.

सुषमाच्या सासूबाईंचे निधन होऊन आता एक महिना लोटला होता. आता पुन्हा सगळ्यांना वेध लागले होते रियुनिअनचे. निलेशने तीन बस बुक करून ठेवल्या होत्या. बसमध्ये बसून मनाने तर प्रत्येक जण रियुनिअनच्या ठिकाणी पोहचला देखील होता.

क्रमशः

सौ. नेहा उजाळे
ठाणे

🎭 Series Post

View all