रिलेशन्स..८

मैत्रीतला विश्वास अढळ असावा लागतो..ती जपणं आणि निभावणं दोन्ही बाजूंनी व्हावं एकतर्फी नात्याला काहीच अर्थ रहात नाही.. निभावणं जमणारच नसेल तर फसवणूक तरी करु नये कुणाची.. वेळीच सावध होणं अशा नात्यांत गरजेचं..toxic रिलेशन्स सांभाळणं सोडूनच द्यावं..


नको असणं हा मर्मभेदीच शब्द तसा ....
अलगद तुमच्या भावनांचा कडेलोट करणारा ...
विद्धता ही नेमकी जिव्हारी लागते ....
कुणाची अगतिकता इतकी असावी
की नको असणं ही कबूल न करता यावं ...?
जबरदस्तीनं लादलेल्या नात्याचा अंत ही तसाच ....व्हावा का ...?
यावरचं उत्तर हो ही आहे नाही ही ...
कितीतरी प्रसंग असे येतात .समोरचा अगदी नको होतो डोळ्यासमोर किंवा त्याची प्रत्येक गोष्टच खटकायला लागते ...
तो सहज,साधं वागत असला तरी आपण तिसरेच अर्थ काढत रहातो ...
कोणी ,कुणाशी ,कसं वागावं हे परिस्थिती तरी ठरवते नाहीतर त्याच्या बद्दलचे आपले अंदाज किंवा पूर्वग्रह ...
यात गंमत अशी असते की समोरच्याला कल्पनाच नसते की, आपल्या वागण्याचा त्रास होतोय लोकांना तो अनभिज्ञच असतो.
मैत्रीत ,प्रेमात ही हेच होत असावं ...कितीही उत्कटतेनं तुम्ही भावना व्यक्त करा मनापासून समोरच्यात ती भावनाच उत्पन्न होत नसेल तर ..?
जबरदस्तीनं केलेलं प्रेम फुलत नाही ...एकमेकांना वेळ देणं ,आधी समजून घेणं ,आवडी निवडी ,स्वभाव सगळंच ..बघावं
या गोष्टी हातात नाहीत ,जुळवून घ्यावंच लागतं पण ते ही तिरस्कार आणि नाईलाजास्तव का असावं ...?
एकदा मानलं आपलं की थोडा व्यवहारही असावा ,थोडी गुंतवणूक ही असावी ...
त्याग ही कधीतरी करावाच त्या शिवाय नात्याला अर्थ रहात नाही .मी म्हणेन ते ,मी म्हणेन तसं असं होणार नाही .दुसऱ्याचा विचारही करावाच लागतो .
एखाद्याला अव्हेरणं हे ही खूप क्लेशदायक असू शकतं ... माझं तुझ्यावर प्रेम नाहीये म्हणणं खूप सोपं आहे पण, समोरचा कोसळू शकतो ...स्पष्टता तर हवीच ,पण समजावून देता आलं पाहिजे .निसटून जाणारं सारंच असतं पण ते ही सावरता आलं पाहिजे ...
समोरच्याला संयमित,शांतपणे कसं सांगता येईल .त्याच्या भावना,त्याचा स्वाभिमान न दुखवता त्याला पटवून दिलं तर कदाचित नुसतं मैत्रीचं नातंही टीकवता येतं, येऊ शकेल..
संवाद महत्वाचा ...मोकळेपणानं बोललं पाहीजे ..स्वतःचं मत मांडणं केंव्हाही चांगलं ..
फक्त स्वतःची सोडवणूक करवून घेणं कितपत योग्य आहे ?...आपल्या एका निर्णयानं
कदाचित मोकळे होऊ आपण पण आपल्यावर विश्वास ठेवून ज्यानं कदाचित जीव ही ओवाळून टाकला असेल त्याला सांभाळायचं कोणी ..? सावरायचं कोणी ...?
बेभरवंशाचं आहे सगळं ,प्रेम ही अपवाद का असावं याला ...अलिकडे पाहीलं तर ब्रेकअप होणं हे ही फँड झालंय ...आज हा उद्या तो परवा तिसरंच कुणीतरी....कुठे थांबावं कळत नाही ...तुमचं भावनिक गुंतणं होणार केंव्हा ...? एकनिष्ठ ( loyal ) असणं हा शब्द इतिहास जमाच व्हावा का ...? वेगवेगळे विकल्प( options) शोधत रहायचं ..कंटाळा यायला लागला की समोरच्याला एकतर block करायचं किंवा ghost .
यांत तुमच्या मानसिक अस्थिरतेचा पुरावा तुम्ही नकळतच देता..एखादं नातं जपायची ,सांभाळायची तुमची कुवत नाही किंवा तुमची ईच्छा च नाहीये फक्त आत्ताचा क्षण उपभोगायचा ही मानसिकता दिसते.. मग ते शारिरीक,मानसिक,भावनिक तिन्हीं पातळ्यांवर असतं.. कुठेतरी आपण अडकु ही भीती कायम मनांत घर करते..मानसिक अस्वाथ्य ओढवून घेणं..आणि अशात नकळत चूकांवर चूका हातून होत जातांत..या परिस्थितीतून बाहेर पडायचे मार्ग काही वेळा घातकी असतात..
अशा रिलेशन्स मध्ये भावनिक गुंतवणूक जवळ जवळ नसतेच.. फक्त शारिरीक आकर्षण इथ पर्यंतच या गोष्टी असतात..
उडत चाललेला एकमेकांवरचा विश्वास ही कुठल्यातरी मोठ्या संकटाची चाहूल वाटते.. जबाबदारी न घेण्याची कारणं अनेक असतात भावनिक ,मानसिक स्थैर्य या अशा वागण्यांत मिळू शकतं का..? संपुर्ण समाधानी या अशा नात्यांत आहात का..? हा विचार ही व्हावा.
आणि अशा आपल्याच भावनांच्या अस्थिरतेतून काही वेळा खूप मोठ्या चूका घडतात हांतून..एकतर आपल्याच प्रेमावर विश्वास नसतो कींवा समोरचा आपला राहीलच यांवर..मग या उद्वेगांत काही वेळा नको त्या गोष्टी नको त्या माणसा समोर बोलल्या जातांत..आणि सांवरता सांवरता नाके नऊ होतं..आपणच ओढवून घेतलेली संकटं ही ..त्राही माम करायची वेळ येते..
नात्यांत असुरक्षित वाटणं यांतून भलभलते भ्रम उत्पन्न होतांत.. मुळांत ज्याचा आपल्यावर संपुर्ण विश्वास आहे त्याला स्पष्टीकरणाची गरजच नसते.. तुमचं सोबत असणं यावरच त्यानं त्याचं आयुष्य पणाला लावलेलं असतं या उलट ज्याला गमवायची भीती असते तो मनानं अस्थिर असल्याची दवंडी सगळीकडे पिटत रहातो ..आपल्या विश्वासांतल्यांना सतत खोटी माहिती आणि मनोरंजित काहितरी सांगत असतो..मानसिक स्वास्थ्य गमावून बसणं आणि कधीतरी खरं खोटं बाहेर येईल या भीतीनंच गर्भगळीत झालेला असतो..
मनाचा संयम आणि परिस्थितीचा स्विकार करणं जो पर्यंत होत नाही अशा दोलायमान अवस्थेत रहाणंच होतं..
नात्यातला ठहराव हा तुमच्या संपुर्ण आयुष्याला नवीन दिशा देणारा असतो.. स्वतः कुणाचा तरी विश्वास होणं आणि त्याच्यावर संपूर्ण विश्वास ठेवणं यासारखं समाधान दुसरं नाही..
©लीना राजीव.





🎭 Series Post

View all