सकाळचे गडद धुके अजूनही गावावर दाटलेले होते, पण ते धुकेच आता एका भयानक वादळाची नांदी ठरत होते. दूरवर, पर्वतरांगेच्या कड्यांतून सहस्त्रपाणीच्या सैन्याचा एक विशाल ढग खाली सरकत होता—जणू काळाचे सैन्यच गाव गिळण्यासाठी चाल करून येत होते. सहस्त्रपाणी आपल्या काळसर अश्वावर आरूढ होता, त्याच्या मागे अचूक शिस्तीत उभ्या असलेल्या एक हजार सशस्त्र सैनिकांची रांग दचकवणारी होती. तलवारींचा टणतणाट, ढालींची घर्षणे, आणि त्या राक्षसी जमावाच्या डरकाळ्यांनी पूर्ण परिसर थरथरत होता.
गावात आता फक्त निवडक लढवय्ये शिल्लक होते—आशय आणि त्याचे पिशाच्य शिकाऱी, बलदेव आणि त्याचे नरभक्षक लांडगे , राजवीर, आर्या, आणि गावातील काही धाडसी युवक. अंधाराचा हा अखेरचा युद्धघोष होताच, सर्वजण आपापल्या शस्त्रासह रणभूमीत उतरले. आशयने आपल्या तिक्ष्ण बाणांचा सढळ वापर करत सहस्त्रपाणीच्या पुढच्या तुकड्यांवर तुफानी हल्ला चढवला. बलदेव आणि त्याचे लांडगे झपाट्याने सैन्यात घुसून गोंधळ उडवु लागले. पण तरीही सहस्त्रपाण्याच्या सैन्याची ताकद अवाढव्य होती.
राजवीर आपल्या दोन तलवारींनी एका मागोमाग एक सैनिक जमिनीवर पाडत होता. पण लढाईचे खऱ्या अर्थाने केंद्रबिंदू होती—ती म्हणजे आर्या.
ती आता पूर्णपणे आपल्या नव्याने जागृत झालेल्या पिशाच्य शक्तींनी भरलेली होती. तिचे डोळे लालसर प्रकाशात झळकत होते, आणि तिचे अंग जणू एका दिव्य ऊर्जेचा वाहक बनले होते. एकाच क्षणात ती तीन सैनिकांवर तुटून पडत होती. एका सैनिकाला तिने हवेत उचलून फेकून दिले, दुसऱ्याच्या छातीवर पंजा रोवून त्याला भिरकावले, तर तिसऱ्याच्या मानेत आपले तीव्र दात रोवून त्याला निष्प्रभ केले होते.तिच्या समोर कुणीही टिकू शकत नव्हते.
"ही मुलगी मानव नाही," एक सैनिक ओरडत आपली शस्त्रे खाली टाकत तीथुन दुर पळु लागला, "ही मृत्यू आहे!" पण आर्याच्या चेहऱ्यावर संतापाच्या जागी आता एक विचित्र शांतता होती. ती केवळ रक्षणासाठी लढत होती—स्वतःसाठी नव्हे, तर आपल्या अपत्यासाठी आणि संपूर्ण जगासाठी.
दुसरीकडे, बलदेव आणि त्याचे सारे मित्र आपल्या लांडग्यांच्या रूपात युद्धभूमीवर प्रकट झाले होते. त्यांच्या अंगात रागाची धग उसळलेली होती, आणि डोळ्यांत सूडाचा वणवा पेटलेला होता. प्रत्येक लांडगा एका साहसी योद्ध्यासारखा प्रत्येक शत्रूच्या अंगावर धावून जात होता. त्यांनी केवळ शस्त्रांनी नव्हे, तर आपल्या जबड्यातील ताकदीने आणि नखांच्या भेदक वारांनी सैनिकांचे मेंदू गार केले होते. अनेक शत्रू सैनिकांचे मस्तक आपल्या जबड्यात धरुन त्यांना त्यांच्या धडांपासून वेगळे करत ते आवाज करत होते आणि रक्ताचा मोठा सडा जमिनीवर झडत होता.
या राक्षसी चकमकीत काही लांडगे ही गारद झाले होते. त्यांच्या अंगावर तलवारीचे खोल वार झाले होते, काहींच्या अंगात विषारी बाण घुसले होते. पण गावातील धाडसी तरुण आणि बलवान मंडळी त्यांना युद्धभूमीवरून हळूहळू गुपचुप उचलून घेऊन जात होती. कोणी खांद्यावर टाकून, तर कोणी एकमेकांच्या मदतीने त्यांना गावातील रिकाम्या घरात पोहोचवत होते.
गावात पोहोचल्यावर लढलेल्यांवर उपचारांची धावपळ सुरू झाली होती. औषधी द्रव्यांच्या लहान कुप्यांतून औषधी लेप त्यांच्या जखमांवर लावले जात होते, तर कोणी शुद्ध हळद गरम करून त्या घावांवर थापत होते. त्या लढणाऱ्या लांडग्यांच्या डोळ्यांत, वेदनेपलीकडची एक शौर्याची चमक होती—जणू ते सांगत होते की, "आपण जीव गमावला तरी चालेल, पण ही भूमी, हे गाव, आणि हे सत्य नष्ट होऊ द्यायचे नाही!"
राजवीर देखील पूर्ण भरात होता. सहस्त्रपाणीच्या सैन्यातील मोठमोठ्या, तगड्या आणि युद्धात निपुण योद्ध्यांना तो एकामागोमाग शोधून शोधून संपवत होता. त्याच्या डोळ्यांत आग होती—केवळ युद्धाची नाही, तर आपल्या प्रियजनांच्या रक्षणाची देखील. प्रत्येक शत्रूचा शेवट होईपर्यंत तो त्याच्या मागे लागलेलाच असायचा, जणू काळच त्यांच्यामागे धावत होता.
त्याचे वार अचूक होते, हालचाली वेगवान आणि बुद्धीची धार युद्धातही लख्ख दिसत होती. कुठलाही सैनिक त्याच्या समोर जास्त वेळ टिकु शकत नव्हता. सहस्त्रपाणीच्या सैन्यात आता भीतीची सावली पसरू लागली होती—"राजवीर कुठेही येऊ शकतो आणि कुणालाही संपवू शकतो!" हे त्यांच्या समोरून पळून जाणाऱ्यांच्या तोंडातून भीतीचे स्वर निघत होते.
त्याच्यात उरलेली प्रत्येक ताकद, प्रत्येक श्वास, आता एकच उद्दिष्ट घेऊन पेटला होता—हा अंधार संपवणे आणि आर्या व तिच्या अपत्याला सुरक्षित ठेवणे.
निशब्द पहाटेच्या अंधारात गावाच्या सीमेवर काही मोक्याच्या जागा निवडून आशय आणि त्याचे पिशाच्च शिकारी दबा धरून बसले होते. त्यांच्या हातात आता धनुष्य आणि बाण होते, पण प्रत्येक निशाणावर अचूक भेदकता होती. हवेत गूढ शांतता होती आणि त्यातच—फटाक्! फटाके करून निनाद होते होते. आशयच्या आणि इतरांच्या धनुष्याचे बाण हवेतून विजेसारखे झेपावत थेट शत्रूच्या सैन्याच्या पुढे असलेल्या सैनिकाच्या छातीला भेदून जात होते.एकही बाण अपयशी होत नव्हता.
एकामागून एक बाण झेपावत गेल्यामुळे— शत्रूच्या रांगा गोंधळल्या. त्यांच्या चेहऱ्यांवर भीती उमटू लागली. पण हाच क्षण होता जिथे सहस्त्रपाण्याचा सेनापती, तो राक्षसी ताकदीचा योद्धा, बाण कुठुन येत आहेत याचे अचुक निरिक्षण करुन, आशयच्या हालचाली पाहुन आणि ओळखून त्याच्या मागे येऊन पोहोचला.
"आता तु संपलास!" अशी एक गर्जन करत त्याने आशयला मागून जोरात लाथ मारली. आशय पुढे पाहत असल्याने आपल्या मागे कोण येत आहे याबद्दल त्याला काहीही कल्पना नव्हती. सेनापतीच्या लाथेने आशय दूर फेकला गेला आणि जमिनीवर आदळला. पण क्षणाचाही विलंब न लावता तो क्षणार्धात उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर वेदना नव्हत्या, फक्त एकाग्रता आणि संताप होता.
त्याने तलवार बाहेर काढली—एक तेजस्वी, काळजीपूर्वक धार लावलेली तलवार. आणि लगेचच सेनापतीच्या समोर उभा ठाकला.
दोघांचे घनघोर युद्ध सुरू झाले .
सेनापतीचे वार वेगवान आणि निर्दयी होते. पण आशयची प्रतिक्रिया त्याहून अधिक गतिशील दिसत होती. प्रत्येक वार त्याने अचूकपणे रोखला होता. कधी आपल्या तलवारीने, तर कधी अचूक पावलांचा वापर करून तो सेनापतीचे सगळे वार चुकवत होता. आजूबाजूचे पिशाच्च शिकारीही आता इतर सैनिकांना अडवत होते, पण आशयच्या लढाईकडेच सर्वांची नजर लागली होती.
सेनापतीने अखेर आपली गदेसारखी भारी दातेरी तलवार उचलली आणि एक जबरदस्त घाव घालायचा प्रयत्न केला. पण आशयला वेळेआधीच लक्षात आले. त्याने झपकन उजव्या बाजूला होत, स्वतःच्या तलवारीच्या एका झटक्याने सेनापतीच्या हातातले शस्त्र हवेत फेकून दिले.
सेनापती शस्त्रहीन झाला असला तरी घाबरला नव्हता तो आपल्या मुठींनी आशयाला जोरदार टक्कर देत होता पण काही वेळातच एक जोरदार टिचकीसारखा आवाज झाला—"छर्र!" आशयच्या तलवारीचा अंतिम वार सेनापतीच्या छातीत घुसला. त्या क्षणी संपूर्ण रणांगण स्तब्ध झाले.
सेनापतीच्या छातीत तलवार घुसताच त्याच्या चेहऱ्यावर एक क्षणभर आश्चर्य व वेदनेची हलकी छटा उमटली. त्याने काहीतरी बोलायचा प्रयत्न केला, पण त्याच्या तोंडातून फक्त रक्ताचे थेंब ओघळले. त्याची नजर अजूनही आशयवर खिळलेली होती—त्याने आपल्या अखेरच्या क्षणी खऱ्या योद्ध्याला ओळखले होते, हे कुणालाही उमगले नाही. शरीर मागे झुकत गेले आणि मोठ्या गजरात ते धाडकन रणभूमीवर कोसळणे, एखाद्या पर्वताच्या कोसळण्यासारखे सगळ्यांना वाटून गेले. त्या पडद्याने रणात गडगडाट निर्माण झाला नाही, उलट एक भयचकित शांतता पसरली.
क्षणभर सगळे काही थांबल्यासारखे वाटले—धुळीचे कण हवेत स्थिरावले, घोड्यांचे टाप थांबले, आणि तलवारींचा आवाज गेला. सेनापतीचा मृत्यू हा केवळ एका योद्ध्याचा अंत नव्हता; तो एक संकल्प, एक अहंकार, आणि एक काळ संपल्याची घोषणा होती. आशय अजूनही न हलता तसाच उभा होता, त्याच्या छातीचा श्वास खोल आणि स्थिर होत होता. रणांगणावरील सैनिक त्याच्याकडे पाहत होते—कोणी स्तब्धतेने, कोणी भयाने, तर कोणी नव्याने उमटणाऱ्या श्रद्धेने.
त्या तलवारीच्या वारासोबतच युद्धाचा प्रवाहही वळला होता. शत्रूच्या सैनिकांच्या चेहऱ्यावर आता भीती स्पष्ट दिसत होती. आशयने तलवार उंच केली आणि एक घणघणीत गर्जना केली.
"हा विजय न्यायाचा आहे. अजून बरेच काही बाकी आहे!"
त्या रात्री पिशाच्च शिकाऱ्यांच्या शौर्याची आणि आशयच्या असीम धाडसाची आठवण गावातल्या प्रत्येकाच्या मनात कोरली गेली होती.
क्रमशः
सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे इरा फेसबुक पेज वर येतील, त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा.
ता क: ही कथा पुस्तक काल्पनिक आहे. यातील नावे, पात्रे, स्थळे आणि घटना या लेखकाच्या कल्पनेचा अविष्कार आहेत किंवा काल्पनिक पद्धतीने ती योजली आहेत. कोणाही जिवंत वा मृत व्यक्तीशी, घटना प्रसंगाशी किंवा ठिकाणांशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
सर्व हक्क राखीव आहेत, लेखकाच्या स्पष्ट लेखी परवानगीशिवाय या प्रकाशनाचा कोणताही भाग कोणत्याही स्वरूपात किंवा कोणत्याही प्रकारे पुनरुत्पादित किंवा कॉपी केला जाऊ शकत नाही किंवा कोणत्याही डिस्क, टेप, मीडिया किंवा इतर माहिती स्टोरेज डिव्हाइसवर हस्तांतरित किंवा पुनरुत्पादित केला जाऊ शकत नाही. पुस्तक परीक्षणातील संक्षिप्त अवतरण वगळता.
copyright: ©®
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा