Login

रक्तपिंडाचा श्राप अंतिम भाग

सहस्त्रपाण्याचा अंत होतो पण कसा, तो परत येऊ शकेल का?
भाग १०७ 

ज्या क्षणी आर्याने आणि राजवीरने आपल्या बाळाला त्याच्या हातात पाहिले, त्यांच्या काळजावर आणखी एक घाव बसला. ते दोघेही रक्तपिंडाच्या किरणांमधून बाहेर पडण्यासाठी जोरजोरात प्रयत्न करु लागले. पण त्या लालसर, आक्राळविक्राळ जाळ्यातून कोणतीही ऊर्जा सुटु शकत नव्हती. हात हलवले जात नव्हते, त्यांची शक्ती नाहीशी होत होती.

ते दोघेही जोरजोरात विव्हळू लागले, आक्रोश करु लागले. अखेरीस, आर्या रडत्या स्वरात ओरडली.

आर्या: "कृपा कर... आमचे बाळ आहे ते... आम्हाला परत दे! आम्ही तुझ्या पाया पडतो!"

राजवीर: "हे बघ, तूला जे हवे ते घे... पण आमचे मूल सोड!"

पण सहस्त्रपाणीचा चेहरा निर्विकार होता.त्याने त्यांच्या ओरड्याकडे लक्षही दिले नाही. त्याने बाळाला त्याच्या पायांनी उलटे धरले आणि त्याचे नाजूक शरीर हवेत अंदाधुंद पणे उचलले.

सहस्त्रपाणी: "हीच तुमची आशा आहे ना? मग पाहा, या आशेचा शेवट मी कसा करतो ते!"

संपूर्ण युद्धभूमीवर हे दृश्य पाहून अनेकजण भयचकित होत होते. पण काहीजण, सहस्त्रपाणीच्या या अमानवी खेळाचा आनंद घेत होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक भेसूर हसू, एक असुरी तृप्ती दिसत होती. त्यांना माहीत होते—हा खेळ आता केवळ रक्ताचा राहिला नाही, तर आर्या,राजवीर, आशय आणि बलदेव यांच्या आत्म्यांवर आघात करण्याचा होता.

सहस्त्रपाणी आता पूर्णतः विकृत आनंदात बुडालेला होता. त्याचे पिशाच्चत्व कुठेच उरलेले नव्हते—तो फक्त एक भस्म करणारा अंधकार बनला होता. आर्या आणि राजवीरचे आक्रोश, महाभूषणचे इशारे आणि बाळाच्या किंकाळ्या—या सगळ्यांकडे तो जणू बहिरा झाला होता. त्याने बाळाला उलटे करून पायांनी धरून हवेत उचलले, जणू ते एखादे खेळणे असावे. त्या निष्पाप बाळाच्या शरीराची हालचाल सुरु झाली, तरी त्याच्या भोवती अजूनही एक अजब तेज पसरलेले होते—जणू एखाद्या देवतेचा अंश झाकला गेला असावा. सहस्त्रपाणी ते तेज पाहून अधिकच वेडसर झाला.

क्षणभर त्याने त्या बाळाला हवेत उंच फेकले—इतके उंच की सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला आणि त्यानंतर त्याचे विकृत कौशल्य दाखवत, ते बाळ हवेतून पडत असतानाच एका हाताने पुन्हा पकडले . जणू हा एक खेळच आहे असे समजून , त्याच्या आसुरी विरंगुळ्याचा भाग म्हणून त्याचा तो विकृत आनंद घेत होता. युद्धभूमीवर उभे असलेले शत्रू आणि मित्र दोघेही स्तब्ध होऊन हे दृश्य पाहू लागले . पण काहीजण—सहस्त्रपाणीचे पथभ्रष्ट सैनिक‌ या क्रौर्याचा आनंद घेत होते. त्यांच्या चेहऱ्यावर नुसते हसू उमटत होते … ते भस्म होत चाललेल्या माणुसकीवर नाचत होते. सहस्त्रपाणीचा हा खेळ आता फक्त विजयाचा नव्हे, तर संपूर्ण जगण्यावर मात करण्याचा बनलेला होता.

ते निष्पाप बाळ आक्रोश करत, थरथरत खाली येत होते. असे तीन ते चार वेळा झाल्यावर पुढच्या वेळी सहस्त्रपाणीने त्याला पकडण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही —जणू आता या क्रौर्यपूर्ण खेळाचा शेवट करायचाच असा निर्धार त्याच्या मनात झालेला होता. क्षणभरासाठी संपूर्ण रणभूमी थांबली. सगळ्यांना वाटले, बाळ आता थेट जमिनीवर आपटणार होते... पण तेवढ्यात काहीतरी विलक्षण घडले.

एक जोरदार वाऱ्याचा झोत उसळला —अचानक, प्रचंड वेगाने वारे वाहू लागले. बाळ थेट जमिनीवर येणार असतानाच, त्या वाऱ्याच्या जोरावर ते हवेत स्थिरावले , अगदी जमिनीपासून दोन बोटांच्या अंतरावर. सर्वत्र धुळीचा वावटळ उठला, मग ते बाळ हळूहळू हवेत तरंगत समोर असलेल्या एका उंच झाडावर जाऊन अलगद विसावले. त्याच्या रडण्याचा आवाज थांबला आणि काही क्षणांत, ते बाळ निरागस पणे हसू लागले—अगदी निरपेक्ष, निष्पाप हास्य. त्या हास्याने रणभूमीत एक अनोखी शांतता पसरवली.

हे दृश्य पाहून सहस्त्रपाणीच्या संतापाला उधाण आले. त्याने ताबडतोब आपल्या सैनिकांना आज्ञा केली.

"त्या झाडावर जा! ते बाळ खाली आणा!".

हे ऐकताच काही सैनिक झाडावर चढले , तेवढ्यात बाळाच्या अवतीभोवती एक चमचमणारे कवच तयार झाले . जसा एका सैनिकाने बाळाला हात लावयचा प्रयत्न केला, त्याच क्षणी त्याला जोरदार विजेचा झटका बसला . तो किंकाळत झाडावरून खाली पडला. इतर सैनिकांना देखील तोच अनुभव येऊ लागला —सगळे जमिनीवर कोसळले , काही जणांना अर्धांगवायूचा झटका बसला आणि त्यांचे हलणे बंद झाले. रणभूमीवर एक भीतीचे, पण अद्भुत असे वातावरण पसरले —जणू या बाळात काहीतरी दैवी सामर्थ्य दडलेले आहे, जे फक्त योग्य वेळी प्रकट होते, असे सगळयांना वाटू लागले.

हे दृश्य पाहताच सहस्त्रपाणीच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला—एक जुने भाकीत, एक इशारा त्याच्या मनात पुन्हा जागा झाला. त्याला आधीच सांगितले गेले होते की राजवीर आणि आर्याच्या समागमातून येणारे बाळ हे साधे बाळ नसेल ; या बाळात असामान्य, दैवी शक्ती दडलेली असेल . हे लक्षात येताच, त्याचे हास्य थांबले आणि चेहऱ्यावर गांभीर्य आले. आता त्याला कळून चुकले की या बाळाची परीक्षा घेण्याऐवजी त्याचा अंत करणे हेच आपले एकमेव उद्दिष्ट असले पाहिजे. अजुन विलंब केल्यास परिणाम विनाशकारी ठरू शकतील, असे त्याला वाटू लागले .

त्याने क्षणार्धात पुन्हा एकदा रक्तपिंड हाताच्यावर तरंगत घेतला. त्या रक्तपिंडातून यावेळी अधिक भयंकर, अधिक धगधगती किरणे बाहेर पडली. त्या रक्तवर्णी किरणांनी संपूर्ण आकाश लालसर करून टाकले. किरणांचा प्रवाह सरळ झाडावर शांतपणे बसलेल्या, हसणाऱ्या त्या लहान बाळाच्या दिशेने एक रेषेत झेपावला,  पण हे बाळ मात्र अजूनही शांत, निष्पाप होते —जणू काही घडतच नाहीय असे त्याला वाटत असावे.

ज्या क्षणी त्या भीषण रक्तकिरणांचा स्पर्श बाळाच्या पावलांना झाला , त्या क्षणी एक अघटित घडले. त्या किरणांनी जणू बाळाच्या आतल्या दैवी ऊर्जेला पुन्हा जागे केले असावे. एक क्षणार्धात त्या किरणांचा मार्ग बदलला . आता ती थेट झाडावरून वळून, वेगाने मागे फिरली आणि रणभूमीतच आधीच्या रक्तपिंडाच्या किरणात अडकून असलेल्या राजवीरच्या शरीरात शिरली !

राजवीरच्या अवतीभोवती एक तेजस्वी कवच तयार झाले. त्याचे बांध तुटले, शरीरावरचा रक्तपिंडाचा ताण नाहीसा झाला. एक प्रचंड वेगाने विस्फोट झाल्यासारखा आवाज झाला आणि राजवीर मुक्त झाला.त्याच्या डोळ्यांत आता आधीपेक्षा वेगळी, गूढ चमक होती —जणू त्या बाळाच्या ऊर्जेचा अंश त्याच्यात उतरलेला होता.

राजवीरच्या अंगावरची किरणांची साखळी तुटताच, त्याच्या डोळ्यांत आधीची आक्रमकता उसळलेली होती.जेव्हा सहस्त्रपाणी पुन्हा एकदा रक्तपिंड वापरण्यासाठी पुढे सरसावला, तेव्हा राजवीरने एक क्षणही वाया न दवडता वीजेसारखी पुढे झेप घेतली  आणि स्वतःच्या लाथेने सहस्त्रपाण्याच्या छातीत एक जबरदस्त धक्का मारला. सहस्त्रपाणी मागे आदळला, आणि त्याच्या हातातले रक्तपिंड खाली जमिनीवर पडले.

राजवीरने ही संधी वाया न दवडता ते रक्तपिंड स्वतःच्या ताब्यात घेतले, रक्तपिंड त्याच्या हातात लगेच विसावले कारण तोच त्याचा खरा मालक होता, पण त्या रत्नाला हात लावताच, काहीतरी भयंकर घडले.

राजवीरच्या चेहऱ्यावर वेदनांचा, क्रोधाचा आणि राक्षसी लालसेचा तडाखा उमटला. त्याचे डोळे संपूर्ण लालसर झाले —जणू रक्ताने भरलेले वाटत होते. त्याच्या नखांखाली काळी धार उमटली, आणि शरीरावरच्या रक्तवाहिन्या अंगावरून स्पष्ट दिसू लागलया. तो आता मानव नव्हता—तो एक राक्षसी, रक्तपिपासू श्वापद बनला होता.

समोर सहस्त्रपाणी अजूनही सावरत होता, पण त्याला उशीर झालेला होता.

राजवीर त्याच्यावर विजेच्या वेगाने झेपावला. हवेत झेप घेत तो सहस्त्रपाण्याच्या दिशेने ओरडला, त्याच्या एका नजरेत त्याचा संपूर्ण संताप झळकत होता. आणि काही क्षणातच, तो सहस्त्रपाण्याच्या खांद्यावर उभा राहिला , त्याच्या हातात उंच धरलेले रक्तपिंड चमकत होते —जणू न्यायाचे अंतिम शस्त्र. रणभूमीवर एक गूढ शांतता पसरली, जणू संपूर्ण जग थांबून हा क्षण पाहत होते.

राजवीरने अखेर रक्तपिंड आकाशात उंच धरले. त्याच्या हातातून निघणारी ऊर्जा इतकी तीव्र होती की संपूर्ण आकाश कडाडून उठले. आणि त्या क्षणाला—राजवीरने रक्तपिंडाचा खडा सहस्त्रपाण्याच्या मस्तिष्कावर मारुन फोडला.

त्या खड्याच्या फुटण्याने अवकाशात एक प्रचंड ऊर्जेची लाट उमटली. रक्तपिंडाचे लालसर तुकडे हवेत विखुरले गेले, आणि त्याच क्षणी सहस्त्रपाण्याच्या अंगावरचे अभेद्य कवच—ती काळी, अंधाराने बनलेली ढाल—भसाभस तुटून जाऊ लागली. एका मागोमाग एक परतणारे तेज त्याच्या शरीरात प्रवेश करत राहिले आणि तो जमिनीवर धाडकन कोसळला.

सहस्त्रपाण्याचा चेहरा आता विव्हळलेला, संपूर्ण थकलेला आणि माणसासारखा निर्बल दिसत होता. जणू त्याचे अमरत्व त्या फुटलेल्या रक्तपिंडासोबतच भस्मसात झाले होते. कधी काळी अखंड सत्ता गाजवणारा तो राक्षस, आता एका सामान्य माणसासारखा निष्प्रभ आणि विवश होऊन जमिनीवर पडलेला होता.

त्या विस्फोटक क्षणाच्या धक्क्याने  राजवीरच्या शरीरात झालेले सगळे अमानवी बदल मागे फिरले. त्याचा चेहरा परत शांत आणि साधा झाला, डोळ्यांतील रक्तलाल लखलखाट निवु लागला. त्याचा श्वास स्थिर झाला.

रक्तपिंड फुटल्यामुळे निर्माण झालेल्या उर्जेच्या लाटा अखेरच्या वेळेस आर्या, आशय आणि बलदेवभोवती फिरल्या, आणि काही क्षणांतच त्यांच्या भोवतालचे राक्षसी बंधन तुटून गेले. सर्वजण थरथरत मुक्त झाले.

आर्या धावतच समोर असलेल्या झाडाकडे गेली. तिचे डोळे अश्रूंनी भरलेले होते, पण त्यात भीती नव्हती—ते आशेने ओथंबलेले होते. त्या झाडावर, एक अगदी लहानशी छाया निष्कपट हास्य करत बसलेली होती—तिचे निरागस बाळ.

झाडाच्या फांदीवरून ते बाळ हसत होते, जणू या सगळ्या राक्षसी अंधारातही त्याचे मन निखळ आणि शांत आहे हे दर्शवत होते. रक्त, हिंसा आणि युध्दाने भरलेल्या या रणभूमीवर त्या बाळाचे हास्य म्हणजे एक दिव्य श्वास ठरले, जणू निसर्ग स्वतः पुन्हा नव्याने सुरूवात करत आहे हे सांगत होते.

आणि त्या क्षणी, आर्याच्या मनात एक विचार चमकून गेला—"ज्याला संपूर्ण जगाने विनाशक ठरवले होते... तोच या सृष्टीचा खरा तारक ठरला."

रक्ताने माखलेल्या पृथ्वीवर, त्या बाळाचे हास्य म्हणजे नवजीवनाचे व्रत होते. त्या निष्पाप हास्यातूनच पुढचा भविष्यकाळ आकार घेणार होता—जिथे शाप संपलेला होता, आणि नवे युग उदयाला येणार होते

रणभूमीवर एक खोल श्वास घेण्यासारखी शांतता पसरली.अंधाराच्या काळात एक आशेची पहाट उतरू लागली आणि सहस्त्रपाण्याचे राहिलेले सैनिक तेथून पळून गेले.

समाप्त


सदर कथा आज पूर्ण झाली,माझ्या पुढील कथांसाठी इरा फेसबुक पेजला फॉलो करून ठेवा.

ता क: ही कथा पुस्तक काल्पनिक आहे. यातील नावे, पात्रे, स्थळे आणि घटना या लेखकाच्या कल्पनेचा अविष्कार आहेत किंवा काल्पनिक पद्धतीने ती योजली आहेत. कोणाही जिवंत वा मृत व्यक्तीशी, घटना प्रसंगाशी किंवा ठिकाणांशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

सर्व हक्क राखीव आहेत, लेखकाच्या स्पष्ट लेखी परवानगीशिवाय या प्रकाशनाचा कोणताही भाग कोणत्याही स्वरूपात किंवा कोणत्याही प्रकारे पुनरुत्पादित किंवा कॉपी केला जाऊ शकत नाही किंवा कोणत्याही डिस्क, टेप, मीडिया किंवा इतर माहिती स्टोरेज डिव्हाइसवर हस्तांतरित किंवा पुनरुत्पादित केला जाऊ शकत नाही. पुस्तक परीक्षणातील संक्षिप्त अवतरण वगळता.