Login

रक्तपिंडाचा श्राप भाग ९८

राजवीर योग्य वेळेत गावात पोहचेल का?

पहाटेच्या कोवळ्या उन्हात गडाच्या कड्यांवर तलवारींचा खणखणाट घुमत होता. राजवीरने तलवार उंचावली, उन्हाचा त्रास लपवायला गडाच्या अंधारात शिरला आणि जोरात गर्जना केली, "आज या रक्तपिपासू राक्षसाचा शेवट करण्याचा दिवस आहे!"

आशय आणि त्याचे साथीदार गडावर आक्रमण करण्यासाठी सज्ज होते. बलदेवच्या भक्षक लांडग्यांनी पुढे धाव घेतली आणि एका झडपेत तटबंदीवर उभ्या सैनिकांना खाली खेचले. लांडग्यांच्या धारदार सुळ्यांनी आणि भेदक पंज्यांनी सैनिक भयभीत होऊन किंचाळत होते. एका लांडग्यांने एका सैनिकाच्या छातीवर उडी मारून त्याला खाली पाडले आणि त्याचा फडशा पाडला.

गडाच्या तटबंदीवर नरसंहार उभा राहिला होता. लांडग्यांचे रक्तलांच्छित सुळे सैनिकांच्या देहात रुतत होते, त्यांच्या भेदक किंचाळ्या आकाशाला भिडत होत्या. काही सैनिकांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण भक्षक लांडग्यांची चपळता आणि क्रूरता यांच्यासमोर त्यांचा निभाव लागेना.

एका लांडग्याने उडी मारत एका सैनिकाच्या हातातून तलवार खाली पडली आणि स्वतःच्या पंजाच्या नखांनी त्याचा गळा चिरला. दुसऱ्या एका लांडग्याने आपल्या पंजांनी एका योद्ध्याचे छातीवरील कवच फाडून त्याच्या छातीत इतका खोल वार केला की रक्ताच्या फवाऱ्याने आजूबाजूचा दगडही लालसर झाला.

आशय आणि त्याच्या योद्ध्यांनीही मागे हटायचे नाव घेतले नाही. त्याच्या तलवारीचा वेग इतका जबरदस्त होता की प्रत्येक वाराला प्रतिसाद द्यायच्या आधीच एकएक सैनिक जमिनीवर कोसळत होता. आशयचे पिशाच्च शिकारी अंधारातून अचानक प्रकट होत होते, एका झटक्यात दुश्मन सैनिकांना गळ्यापासून फाडत होते आणि पुन्हा सावलीत विलीन होत होते.

बलदेव स्वतः एका महाकाय लांडग्याच्या रूपात बदलला होता, आणि त्याने एका झटक्यात समोरच्या तीन सैनिकांना आपल्या विशाल पायांच्या पंजांनी उडवून दिले होते. गडावर हाहाकार माजला होता—सहस्त्रपाण्याच्या सैन्याचा प्रतिकार क्षीण होत चालला होता, आणि राजवीरच्या सेनानींच्या तुफान हल्ल्यासमोर ते टिकणार की नाही, हा मोठाच प्रश्न निर्माण झाला होता.

राजवीरने आपला रौद्र अवतार धारण केला होता. त्याच्या डोळ्यात भीषण आग होती. त्याच्या समोर येणाऱ्या प्रत्येक सैनिकाचा तो निर्दयीपणे सामना करत होता. त्याच्या हातातील तलवार अंगावर लालसर रक्त सांडत होती, आणि त्याचा प्रत्येक वार मृत्यू घेऊनच येत होता. काही वेळातच गडावरील सैन्य कोलमडू लागले. त्यांच्या प्रतिकाराला आता काही अर्थ उरला नव्हता.

गडाचा ताबा घेतल्यानंतर, राजवीर थेट गडाच्या आतल्या सभागृहात गेला. त्याचे डोळे सभोवतालचा शोध घेत होते—सहस्त्रपाणी कुठे आहे? त्याचे सिंहासन रिकामे होते. राजवीरने सिंहासनाच्या सभोवताली नजर फिरवली. इथे नुकताच संघर्ष झाला होता, पण तरीही सभागृहात एक विचित्र शांतता होती. रक्ताचा वास हवेत तरळत होता.

मशालींचा उजेड दगडी भिंतींवर नर्तन करत होता. त्याने सिंहासनाजवळ जाऊन खाली वाकून पाहिले. त्याने पूर्वी गडावरून पळून जाताना इथेच रक्तपिंडाचा खडा लपवून ठेवला होता, पण आता तिथे काहीच नव्हते. एका क्षणासाठी त्याच्या मनात एक विचार चमकून गेला—सहस्त्रपाणी आधीच पुढचा डाव खेळून गेला आहे. त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

"सहस्त्रपाण्याला रक्तपिंड सापडला आहे.?.. तो इथे नाही... मग तो आहे कुठे?"

त्या क्षणी, आशय आणि बलदेवही तिथे पोहोचले. आशयच्या चेहऱ्यावरही संभ्रम होता.

"राजवीर, हे काहीतरी चुकतंय... इतका मोठा गड, पण संरक्षणासाठी एवढे कमी सैन्य? असे का?"

राजवीर सिंहासनाजवळ उभा होता, त्याचा श्वास वेगवान झाला होता, आणि हातातली तलवार अजूनही रक्ताने माखलेली होती. पण आशयच्या बोलण्याने तो काही क्षणांसाठी थबकला. त्याने सभोवार नजर फिरवली—खरंच, इतका मोठा गड असूनही येथे केवळ काही सैनिकच तैनात होते. सहस्त्रपाणी एवढा हुशार आहे, मग त्याने गडाची सुरक्षा एवढी दुर्बळ का ठेवली असावी? त्याने आपल्या आतल्या भीतीला दडवत आशयकडे पाहिले. बलदेवही त्यांच्या संवादाकडे लक्ष देत होता, त्याचा चेहरा गंभीर झाला होता.

"हे काहीतरी कपट आहे," आशयने गडाच्या मोकळ्या प्रांगणात पाहत म्हटले. "जर ही खरी युद्धभूमी असती, तर सहस्त्रपाणी स्वतः इथे असता, त्याचे बलाढ्य योद्धे इथे असते... पण ते कुठे आहेत?" त्याचा आवाज शंका आणि संताप याने भरलेला होता. त्या क्षणीच त्यांना कळून चुकले की सहस्त्रपाण्याची खरी योजना काहीतरी वेगळीच आहे.

बलदेवने जखमी सैनिकाला खेचत उभे केले आणि त्याच्या गळ्यावर तलवार ठेवली. "सांग! सहस्त्रपाणी कुठे आहे?" तो सैनिक आधी काही बोलायचे टाळत होता, पण बलदेवाने थोडा अधिक जोर दिल्यावर त्याच्या तोंडून सत्य बाहेर आले—"तो तुमच्या गावात गेला आहे... आर्याच्या अपत्याचा नाश करायला!"

गडाच्या अंधाऱ्या सभागृहात, रक्त आणि धूळ यांचा वास अजूनही दरवळत होता. राजवीर सिंहासनाजवळ उभा होता, त्याच्या डोळ्यांमध्ये संतापाच्या ठिणग्या चमकत होत्या. समोर रिकामे सिंहासन आणि गायब झालेले रक्तपिंड पाहून त्याचे मन क्षणभर सुन्न झाले. पण जेंव्हा बलदेवने अर्धमृत सैनिकाकडून सत्य बाहेर काढले—की सहस्त्रपाणी गडावरून निघून आपल्या गावावर चाल करून गेला आहे—तेव्हा राजवीरच्या चेहऱ्यावरचा संताप धगधगणाऱ्या ज्वाळेत रूपांतरित झाला.

राजवीरच्या मनात जणू वीज चमकली. त्याने क्षणाचाही विलंब न लावता आदेश दिला,

"गड सोडा! लगेच गाव गाठा! हे युद्ध अजून संपलेले नाही किंबहुना हे युद्ध नव्हतेच, हा आपल्याला फसवण्यासाठी सहस्त्रपाण्याचा डाव होता आणि आपण त्यात अडकलो आहोत." त्याने आवेशात ओरडत तलवार जमिनीवर आपटली. त्याला हे युद्ध जिंकल्याचा आनंद झाला नव्हता, कारण खरी लढाई तर गडावर नव्हे, तर गावी सुरू होणार होती.

हे ऐकताच आशय आणि बलदेवच्या चेहऱ्यावर भीतीची लकेर उमटली. त्यांना आता समजले होते की सहस्त्रपाणीने हा गड एक सापळा म्हणून वापरला. त्यांना गडाच्या लढाईत गुंतवून, त्याने आपल्या सर्वात मोठ्या उद्दिष्टाकडे कूच केली होती—आर्याच्या पोटी वाढत असलेल्या त्या गूढ शक्तीच्या नाशासाठी!

आशयने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याचा स्वर गंभीर होता, पण डोळ्यात निर्धार होता.

"अजून वेळ गेलेली नाही, राजवीर. सहस्त्रपाणीने आपल्याला दिशाभूल केले आहे, पण आपल्याकडे अजून संधी आहे. आपण त्वरित गावाकडे निघायला हवे. आर्या आणि तिच्या अपत्याला वाचवणे हेच आपल्या युद्धाचं खरे ध्येय आहे."

बलदेवही समोर आला, त्याचे लांडगे गुरगुरत होते, जणू काही तेही लढाईसाठी व्याकुळ झाले होते. क्षणाचाही विलंब न करता, तिघे एकमेकांकडे पाहून निघाले—एका नव्या युद्धासाठी, जे या संपूर्ण सृष्टीच्या भवितव्याला दिशा देणार होते.

"माझे लांडगे आपल्याला लवकर पोहोचवतील," बलदेव म्हणाला. "आणि जर सहस्त्रपाणी आर्याच्या दिशेने चाललाच असेल, तर त्याला रोखण्यासाठी आपल्याला आताच निघावे लागेल!"

वेळ वाया घालवणे यापुढे महाघातक ठरू शकत होते. त्याने एक तीव्र हाक मारली आणि त्याचे राक्षसी लांडगे, ज्यांची नजर दूर अंतरावर घोंगावणाऱ्या वाऱ्यासारखी तीव्र होती, धावून आले.

"तुम्ही सगळे आमच्या पाठीवर बसा," बलदेवने आशय आणि पिशाच्च शिकाऱ्यांकडे पाहत शांत पण अधिकारशाली आवाजात म्हटले,

"आता वेळ उरलेली नाही. आपण आर्याला वाचवायला लवकरात लवकर गावात पोहचायला हवे ".

आशयने एक नजर राजवीरकडे टाकली, आणि त्याच्या नजरेतले गांभीर्य पाहून तो म्हणाला,

"हो. आता एक क्षणही उशीर नको." त्याच्या शब्दांत काळजी नव्हती, तर निर्धार होता. सगळ्यांनी झपाट्याने बलदेवाच्या लांडग्यांच्या पाठीवर स्थान घेतले. त्या भव्य, भेसूर प्राण्यांची पाठ एका शक्तिशाली युद्धघोड्यासारखी उबदार आणि विश्वासार्ह वाटत होती. वाऱ्याचा वेग झेलत, ते सर्वजण गडाच्या अरुंद वाटा ओलांडत, खडकांवरून झेपावत, जंगलाच्या दिशेने सरकत होते.

धूळ आणि वाऱ्याच्या सोबतीने, त्यांच्या डोळ्यांसमोर आता एकच लक्ष्य होते—गाव आणि आर्या. त्या बाळाचे संरक्षण हे आता त्यांच्या अस्तित्वासाठीचे लढणे होते.राजवीरने एकदा मागे गडावर नजर टाकली. त्याच्या डोळ्यात आता केवळ एकच गोष्ट होती—सहस्त्रपाणीचा संपूर्ण विनाश! आणि त्या विनाशाची वेळ आता जवळ आली होती.

"सगळे एकत्र रहा! आपण गावावर तुटून पडू!" राजवीरने आदेश दिला आणि संपूर्ण परिसर त्याच्या गर्जनेने हादरला.

क्रमशः

सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे इरा फेसबुक पेज वर येतील, त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा.


ता क: ही कथा पुस्तक काल्पनिक आहे. यातील नावे, पात्रे, स्थळे आणि घटना या लेखकाच्या कल्पनेचा अविष्कार आहेत किंवा काल्पनिक पद्धतीने ती योजली आहेत. कोणाही जिवंत वा मृत व्यक्तीशी, घटना प्रसंगाशी किंवा ठिकाणांशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.


सर्व हक्क राखीव आहेत, लेखकाच्या स्पष्ट लेखी परवानगीशिवाय या प्रकाशनाचा कोणताही भाग कोणत्याही स्वरूपात किंवा कोणत्याही प्रकारे पुनरुत्पादित किंवा कॉपी केला जाऊ शकत नाही किंवा कोणत्याही डिस्क, टेप, मीडिया किंवा इतर माहिती स्टोरेज डिव्हाइसवर हस्तांतरित किंवा पुनरुत्पादित केला जाऊ शकत नाही. पुस्तक परीक्षणातील संक्षिप्त अवतरण वगळता.