सहस्त्रपाणी आपल्या सिंहासनावर बसलेला असला तरी त्याचे मन रणभूमीच्या विचारांनी व्यापले होते. त्याच्या कानांवर बातमी आली होती की राजवीर, आशय, आणि बलदेव आपले सैन्य घेऊन गडाकडे येत आहेत. त्याने डोळे मिटले, एक सखोल श्वास घेतला आणि क्षणभर विचार केला. मग अचानक त्याच्या ओठांवर एक निर्दयी हास्य उमटले.
"येत आहेत, तर येऊ देत," तो स्वतःशी पुटपुटला. त्याच्या स्वरात आत्मविश्वासाच्या जोडीने क्रौर्य मिसळले होते. त्याच्या मते, ही एक संधी होती—आपल्या सर्व शत्रूंचा एकाच वेळी निःपात करण्याची सुवर्णसंधी! त्याला माहीत होते की त्याचे सैन्य बलाढ्य होते, त्याचे शिष्य कठोर प्रशिक्षित योद्धे होते.
"माझ्या हातात रक्तपिंड आहे की नाही, याने काहीच फरक पडत नाही. या शत्रूंना संपवण्यासाठी माझी शक्ती आणि माझे सैनिक पुरेसे आहेत," तो स्वतःशी बोलला.
त्याने हात हलवताच एका सेवकाने धावत येऊन त्याच्या समोर नतमस्तक होऊन विचारले,
"आज्ञा द्या, महाराज!" सहस्त्रपाणी सिंहासनावरून उठला आणि सभागृहात लावलेल्या मशालींच्या उजेडात त्याचा उग्र चेहरा अधिक भेसूर दिसू लागला. "माझ्या सर्व सेनापतींना आणि सरदारांना बोलवा," त्याने आदेश दिला. "आज रात्री आपण एक इतिहास रचणार आहोत. हे अंतिम युद्ध आहे—माझ्या सत्तेच्या विस्ताराला कोणीही अडथळा आणू शकत नाही. हा गडच त्यांची शेवटची थडगी बनेल!" त्याचा आवाज सभागृहाच्या दगडी भिंतींवर आदळला. सभागृहात उभे असलेले सैनिक आणि सेवक स्तब्ध झाले. त्याला विरोध करण्याची कुणाचीही हिंमत नव्हती. काही क्षणांतच त्याचे सेनापती दरबारात हजर झाले.
दरबारगृहात मशालींचा तेजस्वी उजेड पडला होता. सभोवताली उभे असलेले सैनिक, आणि सिंहासनावर सहस्त्रपाणी बसला होता. त्याच्या समोर सेनापती विनम्रतेने उभा राहिला.
सहस्त्रपाणी (खड्या आवाजात)– सेनापती! वेळ आली आहे. मी तुला इतकी वर्षे जे शिकवत आलो, त्याचा प्रत्यक्ष वापर करण्याचा क्षण अखेर समोर आला आहे. राजवीर आणि त्याची टोळी गडावर आक्रमण करण्यासाठी येत आहे.
सेनापती (थोडा चकित होत, पण गंभीर स्वरात)– महाराज, मला ही बातमी आधीच मिळाली आहे. मी आधीच आपल्या सैन्याला तयारीत ठेवले आहे. पण आपला विचार काय आहे? आपण त्यांच्यावर थेट हल्ला करायचा, की काही दुसरी योजना आहे?
सहस्त्रपाणी (हसत, डोळ्यांत क्रौर्य चमकत) – योजना? माझी एकच योजना आहे – त्यांचा पूर्ण संहार! ते जिथे पोहोचतील, तिथेच त्यांच्या रक्ताच्या नद्या वाहिल्या पाहिजेत. ह्या गडात शिरण्याआधीच त्यांचा शेवट व्हायला हवा.
सेनापती (गंभीरपणे विचार करत) – महाराज, त्यांची ताकद कमी लेखणे आपल्याला महागात पडू शकते. राजवीर फक्त एक योद्धा नाही, तर तो एक चतुर नेतृत्ववान आहे. त्याच्यासोबत आशय आणि बलदेव आहेत. त्यांच्याकडे पिशाच्च शिकारी आणि भक्षक लांडगे देखील आहेत. आपल्याला त्यांच्याशी काट्याची टक्कर द्यावी लागेल.
सहस्त्रपाणी (आक्रमक स्वरात) – हा गड माझा आहे, ही भूमी माझी आहे, आणि हा विजयही माझाच असेल! ते कोणीही असले तरी माझ्या शक्तीपुढे टिकणार नाहीत. जर पिशाच्च शिकारी आले, तर त्यांना आपल्या मायावी जादूने ठार करायचे. जर लांडगे आले, तर त्यांना आगीच्या जाळ्यात भस्म करायचे. आणि जर राजवीर आणि बलदेव समोर आले, तर त्यांना सिंहासनाच्या पायथ्याशी गुडघे टेकायला भाग पाडायचे!
सेनापती (नम्रपणे, पण काळजीच्या सुरात) – महाराज, आपण रक्तपिंडाचा उपयोग करणार नाही का? त्याची शक्ती आपल्या ताब्यात आहे. जर आपण त्याचा योग्य वापर केला, तर हे युद्ध क्षणार्धात संपवता येईल.
सहस्त्रपाणी (डोळ्यांत चमक आली, थंड हसत) – अजून ती वेळ आलेली नाही, सेनापती. रक्तपिंड ही माझी अंतिम ताकद आहे. मी त्याचा उपयोग फक्त तेव्हा करीन, जेव्हा मला आवश्यक वाटेल. पण त्याआधीच त्यांना संपवता आले, तर तो प्रश्नच येणार नाही. मी आणि माझे सैनिक पुरेसे आहोत.
सेनापती (निश्चयाने मुठ वळत) – मग महाराज, मी लगेचच सर्व सैनिकांना तयारीस सांगतो. ते गडाजवळ पोहोचण्याआधीच त्यांच्यावर हल्ला करून त्यांना नष्ट करून टाकु.
सहस्त्रपाणी (हसत, सिंहासनावर मागे रेलत)– उत्तम! आणि ऐक, एक गोष्ट विसरू नकोस. ह्या युद्धात कुणालाही जिवंत सोडायचे नाही. हा गड त्यांच्यासाठी कब्रस्तान बनेल!
सेनापती (नतमस्तक होत) – जी स्वामी! मी तुमच्या आदेशाची अंमलबजावणी करतो.
सेनापती धावत बाहेर गेला, तर सहस्त्रपाणी आपल्या सिंहासनावर बसून क्रूर हसत होता. त्याच्या डोळ्यांत एक दैत्यसदृश चमक दिसत होती – 'लवकरच रक्तपात होणार आहे.'
याचवेळी, दरबारातील काही सरदार आणि प्रधान सभागृहात आले त्यांनी सहस्त्रपाण्याला आदरपूर्वक नमस्कार केला आणि एकाने पुढे येत विचारले, "स्वामी, आम्ही एक विचार मांडू इच्छितो.
प्रधान (गंभीर स्वरात) – महाराज, आपण राजवीर आणि त्याच्या सैन्याला थेट इथे येऊ देण्याची चूक करत आहात. ते सगळे एकत्र आले तर आपल्याला नको इतका प्रतिकार सहन करावा लागेल. आपण अधिक चतुराईने डाव आखला पाहिजे.
सहस्त्रपाणी (हसत, पण कटाक्ष टाकत) – प्रधान, तू मला कधीपासून युद्धकलेचे धडे द्यायला लागलास? राजवीर आणि त्याच्या टोळीचा सामना करण्यासाठी माझ्या सैन्याची आणि माझ्या शक्तीची पुरेशी तयारी आहे. मग एवढा विचार का करायचा?
प्रधान (थोडा पुढे येत, सावध शब्दांत) – महाराज, मला वाटते आपण चुकीच्या शत्रूशी युद्ध करण्याच्या तयारीत आहात. राजवीर हा आपला खरा शत्रू नाही, खरे सामर्थ्य तर आर्याच्या गर्भात आहे!
सहस्त्रपाणी (डोळे थोडे मोठे करत, लक्षपूर्वक ऐकत)– आर्या?
प्रधान (खांदे पुढे झुकवत, खड्या आवाजात)– होय, महाराज! आपण सतत राजवीर, आशय, आणि त्यांच्या सैन्याशी लढण्याचा विचार करत आहात. पण खरा धोका त्या गर्भात आहे. आर्याच्या पोटात असलेले ते मायावी बाळ हे आपल्या अस्तित्वाला सर्वांत मोठा धोका आहे. जर ते जन्माला आले, तर आपल्या सर्व शक्तींपेक्षा ते प्रबळ ठरेल. आपण राजवीर आणि त्याच्या सैन्याला इथे येऊन त्यांच्याशी लढा देण्याऐवजी, त्याच्या मागे असलेल्या गावावर थेट हल्ला केला पाहिजे!
सहस्त्रपाणी (गंभीर होत, सिंहासनावरून उठत) – पुढे सांग...
प्रधान (आक्रमकपणे समजावत) – आपण जर गडावर बसून राजवीरशी लढलो, तर हे युद्ध लांबेल आणि आपण अनावश्यक सैनिक गमावू. पण जर आपण गावावर थेट हल्ला केला आणि आर्याला व तिच्या पोटातील बाळाला संपवले, तर हे युद्ध लढायची गरजच राहणार नाही!
सहस्त्रपाणी (गंभीरतेने विचार करत) – पण आर्याच्या बचावासाठी कोणी असेल तर?
प्रधान (हसत, आत्मविश्वासाने) – महाराज, विचार करा. राजवीर, आशय, आणि बलदेव गडावर येत आहेत. त्यांनी त्यांच्या सर्वांत बलवान योद्ध्यांना आपल्या सोबत घेतले असेल. मग गावाचे संरक्षण करायला कोण उरले असेल? काही कमजोर सैनिक आणि अर्धवट प्रशिक्षित रक्षक! आपण तिथे थेट हल्ला केला, तर आर्या आणि तिचे बाळ एका झटक्यात नष्ट होईल.
सहस्त्रपाणी (हसत, क्रूरतेने डोळे चमकवत) – तू म्हणतोस ते खरे आहे, प्रधान. जर हे बाळ नष्ट झाले, तर मला कुणाशीही युद्ध करण्याची गरज उरणार नाही, आणि राजवीर तर स्वतः येथे अडकायला येत आहे.
प्रधान (पुढे होत, अधिक जोरकसपणे)– महाराज, रक्तपिंड आपल्या ताब्यात आहे. पण आपण त्याचा उपयोग न करता हे युद्ध जिंकू शकतो. आपण फक्त योग्य दिशेने आपली ताकद वापरली पाहिजे. सध्या राजवीरचा पराभव करूनही काही उपयोग नाही, जर ते बाळ जिवंत राहिले तर तेच आपल्याला संपवेल. त्यामुळे राजवीरच्या येण्याची वाट पाहण्याऐवजी आपण गावावर तुटून पडले पाहिजे.
सहस्त्रपाणी (मोठ्याने हसत, निश्चयाने मुठ वळत) – योग्य आहे! आपण हेच करू. राजवीर आणि त्याच्या सैनिकांना फसवण्यासाठी गडावर काही सैन्य ठेवू, पण मी स्वतः माझ्या शक्तिशाली सैनिकांसह गावाकडे जाईन.
प्रधान (हसत, समाधानाने माना डोलावत) – हा योग्य निर्णय आहे, महाराज.
सहस्त्रपाणी (सैनिकांकडे पाहत, गर्जनेने) – तयारी करा! आपण लगेच गावावर हल्ला करू! आर्याचे बाळ जन्माला येण्याआधीच त्याचा शेवट झाला पाहिजे!
सभागृहात सहस्त्रपाणीच्या आदेशावर गर्जना झाली. सैनिक तयारीला लागले. प्रधान डोळ्यात विजयाची चमक घेऊन सिंहासनासमोर झुकला. युध्दाची खरी दिशा आता बदलली होती...
क्रमशः
सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे इरा फेसबुक पेज वर येतील, त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा.
ता क: ही कथा पुस्तक काल्पनिक आहे. यातील नावे, पात्रे, स्थळे आणि घटना या लेखकाच्या कल्पनेचा अविष्कार आहेत किंवा काल्पनिक पद्धतीने ती योजली आहेत. कोणाही जिवंत वा मृत व्यक्तीशी, घटना प्रसंगाशी किंवा ठिकाणांशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
सर्व हक्क राखीव आहेत, लेखकाच्या स्पष्ट लेखी परवानगीशिवाय या प्रकाशनाचा कोणताही भाग कोणत्याही स्वरूपात किंवा कोणत्याही प्रकारे पुनरुत्पादित किंवा कॉपी केला जाऊ शकत नाही किंवा कोणत्याही डिस्क, टेप, मीडिया किंवा इतर माहिती स्टोरेज डिव्हाइसवर हस्तांतरित किंवा पुनरुत्पादित केला जाऊ शकत नाही. पुस्तक परीक्षणातील संक्षिप्त अवतरण वगळता.
copyright: ©®
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा