सहस्त्रपाणी सिंहासनावर बसलेला असतानाच एक संदेश घेऊन त्याचा विश्वासू गुप्तहेर धापा टाकत आला. त्याच्या चेहऱ्यावर घामाचे थेंब होते, आणि डोळ्यांत भीती स्पष्ट दिसत होती.
"महाराज... आर्या वाचली आहे... आणि तिचे बाळही जन्माला आले आहे," त्याने चाचरत सांगितले. क्षणभरासाठी शांतता पसरली. सहस्त्रपाण्याचे डोळे निखाऱ्यासारखे लाल झाले, चेहरा रागाने थरथरू लागला.
"म्हणजे मी स्वतः घातलेला घावदेखील तिला संपवू शकला नाही?" त्याने सिंहासनावरून उभे राहत गुरगुरत विचारले. त्या क्षणी त्याच्या मनात केवळ एकच विचार घोळत होता—या सगळ्याचा एकदाच कायमचा शेवट करायचा.
"रक्तपिंड आता माझ्या ताब्यात आहे," तो स्वतःशी पुटपुटला.
"त्यामुळे कोणाचीही ताकद आता माझ्याशी तुलना करू शकणार नाही." त्याने लगेच आपल्या सेनापतीला बोलावण्याचे आदेश दिले. काही क्षणातच, एक कठोर आणि शिस्तबद्ध चेहरा सभागृहात हजर झाला.
सहस्त्रपाण्याच्या गडाच्या विशाल सभागृहात, संध्याकाळचे काळे-सावळे रंग उमटत होते. मशालींच्या उजेडात सहस्त्रपाणी आपल्या सिंहासनावर बसला होता, तर त्याचा सेनापती, एक बलदंड आणि कठोर चेहऱ्याचा योद्धा, समोर उभा होता त्याच्या देहबोलीत कठोरतेची छाया होती. दोघांचे संवाद, लवकरच साऱ्या गावाचे भविष्य ठरवणार होते.
सहस्त्रपाण्याने गंभीर स्वरात सुरुवात केली.
"आता वेळ आलेली आहे. त्या गावावर—जिथे आर्या, राजवीर आणि त्यांचे साथीदारी राहत आहेत—तिथे पुन्हा एकदा हल्ला करायचा आहे. पण ह्या वेळेस कोणताही जीव वाचायला नको. त्या गावाचा, त्या लोकांचा, त्यांच्या इतिहासाचाही—संपूर्ण शेवट पाहिजे मला."
सेनापतीच्या चेहऱ्यावर एक कठोर हसू उमटले.
"महाराज, माझ्या तलवारीने कित्येक राक्षसांची मान मी कापली आहे. जिथे मी जातो, तिथे रक्ताच्या धारा वाहतात. तुमचे फर्मान फक्त एक संकेत आहे—आता त्या गावाचे अस्तित्व इतिहास ठरेल."
सहस्त्रपाणीने आपले दोन्ही हात सिंहासनावर टेकवत, उठून उभे राहत म्हटले,
"या वेळी मी स्वतःदेखील तुमच्या सोबत येणार आहे. मला त्या मुलाचे अस्तित्व माझ्या डोळ्यांनी पाहायचे आहे आणि त्याचा शेवटही. जर तो माझ्या हातून सुटला, तर आपली काळोखी सृष्टी आपल्याला माफ करणार नाही."
सेनापतीने एका गुर्मीत, अभिमानी मान हलवली.
"तुमचे आगमन म्हणजे आमच्या सैन्याच्या मनोधैर्याला आग असेल, महाराज. आम्ही लवकरच लढण्यासाठी सज्ज होऊ. आपले हजार सैनिक, दहा युद्धरथ, आणि अग्नीबाण घेऊन आम्ही त्या गावावर चाल करून जाऊ. कोणतेही प्राणी, कोणतीही शक्ती आमच्या मार्गात उभी राहु शकणार नाही!"
सहस्त्रपाणीने थेट त्याच्या डोळ्यांत बघत फर्मान दिले.
"उद्या सूर्योदयाच्या आधी सर्व तयारी पूर्ण कर. ही लढाई केवळ गावावर नाही—ती या जगाच्या भविष्यावर आहे."
सेनापतीने दोन्ही हात छातीवर ठेवत आदराने मान झुकवली.
"महाराज, तुमची आज्ञा आमच्यासाठी आदेश आहे. आणि तुमचा आदेश म्हणजे आमचे आयुध. आम्ही चाललो आहोत—विनाश घडवायला. मी माझ्या नवीन आणि अधिक ताकदवान दलासह लगेच निघतो. या वेळेस कोणताही प्रतिकार उरू देणार नाही."
सभागृहात पुन्हा शांतता पसरली. पण त्या शांततेखाली उठणाऱ्या युद्धाच्या धगांचा आवाज अगोदरच जाणवू लागला होता.
गडावरचे नगारे वाजायला लागले. सेनापतीने आपल्या नवीन दमाच्या दलाला जमवले—ते नव्या दमाचे होते पण त्यांच्या डोळ्यांत ज्वाळा होत्या. त्याने एका उंच दगडावर उभे राहत मोठ्या आवाजात गर्जना केली,
"हे वीर योद्ध्यांनो! आता वेळ आली आहे! तुम्हाला महाराजांचा अभिमान साकार करायचा आहे! आपण ज्या गावावर चालून जाणार आहोत—तेथे केवळ राख शिल्लक राहीली पाहिजे!"
घोड्यांच्या टापांनी आणि नगाऱ्यांच्या आवाजांनी हवेत तणाव भरला होता. सहस्त्रपाणी स्वतः सर्वात पुढे होता—त्याच्या चेहऱ्यावर पराभवाचे कोणतेही चिन्ह नव्हते. मागे एक विशाल सैन्य त्याच्या मागोमाग चाल करत होते. रस्त्यावर धुळ उडत होती, आणि आकाशात काळसर ढग गोळा होत होते—जणू निसर्गही या युद्धाच्या भयावहतेची साक्ष देत होता.
पण कोणालाच ठाऊक नव्हते की या हल्ल्याने जे काही उलगडणार आहे, ते फक्त एका गावाचा विध्वंस नाही, तर संपूर्ण सृष्टीचे भविष्य ठरवणारा निर्णायक संघर्ष ठरणार आहे.
-----
जंगल घनदाट होते, पण तितकेच स्तब्धही. सहस्त्रपाणी आणि त्याच्या सेनापतीसह असंख्य सैनिक, शिस्तबद्धतेने, घातकी शांततेत जंगलातून वाट काढत होते. त्यांच्या बूटांचा एकसुरी आवाज जणू जंगलाच्या छातीवर तुडवून चालल्यासारखा वाटत होता. प्रत्येक टवटवीत झुडूप, प्रत्येक मोठी वेल, त्यांच्या उपस्थितीने थरथरत होती. जंगलातले निसर्गाचे गाणे— पक्ष्यांची किलबिल, कीटकांची किरकिर, किंवा हरणांची नाजूक पावले— सगळे काही बंद झाले होते.
कारण सहस्त्रपाण्याच्या सैन्याचा मार्ग म्हणजे मृत्यूचा रस्ता झाला होता. कुठलाही प्राणी त्यांच्या समोर आला, की क्षणार्धात त्याच्या प्राणावर संकट यायचे. त्यामुळे आता कोणतेही जनावर त्यांच्या मार्गात येण्याचा विचारही करत नव्हते. बिबटे, अस्वल, साप, वानर – जे जिथे होते, तिथेच लपून बसले होते. आकाशातून उडणारे पक्षीदेखील त्यांच्या डोक्यांवरून उडण्याऐवजी बाजूने मोठ्या वळणाने जात होते. झाडांच्या फांद्यांवर बसलेले कावळेही गप्प झाले होते. जणू संपूर्ण जंगलाने श्वास रोखून धरला होता या तांडवाच्या माऱ्याला टाळण्यासाठी.
गावच्या आकाशात अचानक पक्ष्यांचा थवा जमा झाला. असंख्य रंगीबेरंगी पक्षी, काही ओळखीचे तर काही अगदी अनोळखी — ते गावाच्या झाडांवर, घरांच्या कौलांवर, आणि अंगणात उतरू लागले. त्यांच्या आवाजांनी संपूर्ण परिसर भरून गेला होता. गावकरी चकित होऊन हे दृश्य पाहत होते. हे पक्षी तेच होते जे सामान्यतः घनदाट जंगलात राहत असत आणि गावाच्या सीमेवरसुद्धा कधी येत नसत. पण आज ते थेट गावाच्या मध्यभागी येऊन बसले होते, जणू काही एखाद्या अनामिक संकटाची जाणीव करून देत होते. त्यांच्या किलबिलाटामागे एक प्रकारची अस्वस्थता होती — गोंधळ नाही, तर इशारा.
-------
आशयला समोरचे दृश्य पाहून क्षणात सगळे कळून चुकले होते—गडाच्या दिशेने धूर उसळत होता, पक्षी अकारण घाबरून उडत होते, आणि दूरवर आकाशात एक काळसर सावली डोकावत होती. तो काही क्षण एकटक आकाशाकडे पाहत राहिला. त्याच्या मनात काहीतरी खोल विचार उसळत होते. अखेर त्याने पुटपुटतच सांगितले,
“हे नक्कीच सहस्त्रपाण्याच्या आगमनाची लक्षणे आहेत.” त्याचा स्वर शांत होता, पण चेहऱ्यावर काळजीची स्पष्ट छाया उमटली होती. त्याने क्षणाचाही विलंब न करता निर्णय घेतला—संपूर्ण गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी, डोंगरावरच्या जुन्या गुहांमध्ये पोहोचवायचे. त्याची नेहमीची शांत संयम वृत्ती आता एक निर्णायक कृती मध्ये उतरली होती.
गावात हालचाल सुरू झाली होती. घराघरांतून सामान भरून काढले जाऊ लागले. लहान मुलांचे रडणारे आवाज, वृद्धांचा थकलेला श्वास, आणि तरुणांच्या तोंडावरील तणाव—या सगळ्यांतून एकाच वेळी घबराट आणि धैर्य उमटत होते. राजवीर, बलदेव आणि इतर तरुण आशयच्या आदेशांनुसार हालचाली करत होते.
काहींनी गुहांमध्ये आधी जाऊन व्यवस्था लावायला सुरुवात केली होती. कुणी पाण्याचे माठ घेतले, कुणी अन्नधान्य गोण्यांमध्ये भरले. या धावपळीत, आशयचा चेहरा मात्र अजूनही स्थिर होता. संकट समोर आले होते, पण त्याच्या डोळ्यांत भीती नव्हती—होती ती एक दृढ जाणीव, की ही लढाई आता केवळ रणांगणावरची राहणार नव्हती, तर ती प्रत्येकाच्या अंतर्मनाशी असणारी झुंज ठरणार होती.
गावामध्ये सगळीकडे सैरभैर झालेले वातावरण होते, पण त्यात एक प्रकारचे एकत्रित धैर्यही दिसत होते. गावकरी आपापल्या घरातली वर्षानुवर्षं जपलेली संपत्ती, आठवणी, आणि गरजेचे सामान एकत्र करत होते. लहान मुले आईच्या पदराला धरून रडत होती, वृद्धांनी डोळ्यांतले अश्रू पिळून आपली चूल विझवली होती, आणि तरुणांना आता घाबरण्याची परवानगी नव्हती.
प्रत्येकाच्या हालचालीत घाई होती, पण त्यात एक उद्देशही होता—गाव वाचवायचे होते. गुहांच्या दिशेने चालणाऱ्या पावलांमध्ये थकवा नव्हता, होता तो फक्त भार. बलदेव आणि त्याचे काही सहकारी आधीच गुहेत पोहोचून मुलभूत गोष्टींची तयारी करत होते—पाण्याचे घडे भरले जात होते, जमिनीवर पांघरूणे अंथरली जात होती, आणि प्रवेशद्वार मजबूत केले जात होते.
या गडबडीत राजवीर फक्त एका ठिकाणी उभा होता—गावाच्या चौकात. त्याच्या नजरा सगळीकडे फिरत होत्या, पण चेहरा विलक्षण शांत होता. संकट त्याच्या समोर उभे होते, जाणूनही त्याच्या चेहऱ्यावर घाबरटपणा नव्हता, उलट एक विचित्र ठामपणा होता. त्याला ठाऊक होते की येणारी लढाई हत्तींची लढाई होती, पण त्याने गावकऱ्यांत जी आशा आणि संघटनेची भावना रुजवली होती, ती त्याला पराभूत होऊ देणार नव्हती.
ही लढाई तलवारींनी नाही, तर मनोबलाने जिंकायची होती. त्याला जाणवत होते—गाव वाचवणे म्हणजे केवळ शत्रूला हरवणे नव्हे, तर गावकऱ्यांच्या मनातली भीती मोडून, त्यांना त्यांच्या सामर्थ्याची जाणीव करून देणे होते.
क्रमशः
सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे इरा फेसबुक पेज वर येतील, त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा.
ता क: ही कथा पुस्तक काल्पनिक आहे. यातील नावे, पात्रे, स्थळे आणि घटना या लेखकाच्या कल्पनेचा अविष्कार आहेत किंवा काल्पनिक पद्धतीने ती योजली आहेत. कोणाही जिवंत वा मृत व्यक्तीशी, घटना प्रसंगाशी किंवा ठिकाणांशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
सर्व हक्क राखीव आहेत, लेखकाच्या स्पष्ट लेखी परवानगीशिवाय या प्रकाशनाचा कोणताही भाग कोणत्याही स्वरूपात किंवा कोणत्याही प्रकारे पुनरुत्पादित किंवा कॉपी केला जाऊ शकत नाही किंवा कोणत्याही डिस्क, टेप, मीडिया किंवा इतर माहिती स्टोरेज डिव्हाइसवर हस्तांतरित किंवा पुनरुत्पादित केला जाऊ शकत नाही. पुस्तक परीक्षणातील संक्षिप्त अवतरण वगळता.
copyright: ©®