आर्याच्या मानेवर कट्यार घुसताच तिच्या शरीरातून रक्ताचा ओघ सुरू झाला. ती जमिनीवर पडताच एका क्षणासाठी गावात शांतता पसरली, जणू काळ स्वतः काही क्षण थांबला होता. सहस्त्रपाण्याच्या चेहऱ्यावर एक घृणास्पद आनंद झळकला—तो विजयाच्या भ्रमात होता. त्याच्या दृष्टीने, हे फक्त एका स्त्रीचे नव्हे तर भविष्यातील संभाव्य संकटाचे समूळ उच्चाटन होते.सहस्त्रपाणीच्या चेहऱ्यावर विजयाचे अघोषित हास्य झळकत होते.
“शत्रू संपला!” तो गर्जला, आणि आपल्या मागे उभ्या असलेल्या सैनिकांबरोबर तो गावाबाहेर निघून गेला. त्याच्या पावलांमध्ये अभिमान होता, पण त्याला अजिबात कल्पना नव्हती की जे काही त्याने संपवले, ते खरेतर संपलेले नव्हते—तर ते फक्त गूढ स्वरूपात जागृत होत होते. पराभवाचे सावट त्या मातीवर अजूनही थरथरत होते, पण सहस्त्रपाणीच्या मनात आता एकच भावना होती—सत्ता. त्याला वाटत होते की आता कोणीही त्याला थोपवू शकणार नाही.पण त्याला हे माहीत नव्हते की हा फक्त शांततेचा भास होता, खरे वादळ अजून यायचेच होते. रक्ताचा प्रत्येक थेंब जमिनीत मिसळत असताना, त्या भूमीखालून एक नवी ऊर्जा साकार होऊ लागली होती—जे सहस्त्रपाण्याच्या विध्वंसक विजयालाही धुळीला मिळवून टाकणार होती.
काही क्षणांनंतरच घराच्या उंबऱ्यावर एक सावली प्रकट झाली—महाभूषण. तोच महाभूषण ज्याला सहस्त्रपाणीने अनेक दिवस गडात कैदेत ठेवलेले होते. अंधारातून सुटून, तो थेट आर्याच्या घरी पोहोचला होता. तिचे रक्ताने भरलेले शरीर पाहताच त्याच्या चेहऱ्यावर काळजी उमटली.
महाभूषण त्या थिजलेल्या क्षणात थांबला. घरातले वातावरण मृत शांततेने भरलेले होते—जणू काळाने काही क्षण थांबवले होते. त्याच्या नजरेसमोर आर्या जमिनीवर निपचित पडलेली होती, तिच्या शुभ्र वस्त्रावर लाल रक्ताचे डाग उमटले होते. त्या दृश्याने क्षणभर त्याचा श्वासही थांबला. या स्त्रीच्या पोटात केवळ एक मूल नव्हते—ते एक शक्तीचे बीज होते, संहार आणि सृष्टीच्या सीमारेषेवर उभे असलेले. महाभूषणच्या मनात एकाच विचाराने गोंधळ उडवला—हा अंत आहे की सुरुवात?
त्याने हळूहळू तिच्याजवळ जाऊन गुडघे टेकले. त्याच्या हातांनी आर्याच्या नाडीचा स्पर्श शोधला. काही क्षण, काही शांत श्वासांनंतर, त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली—नाडी अजून चालू होती. ती जिवंत होती! कमकुवत आणि अशक्त, पण अजूनही तिच्या आत काहीतरी धडधडत होते. महाभूषणच्या ओठांवर एक क्षीण हसू उमटले. त्याने तिला उचलले, तिच्या केसांवरून हलकासा हात फिरवला आणि म्हटले.
“हा शेवट नाही आर्या… तुझे युध्द तर आता सुरू होणार आहे."
"आर्या!" त्याने हळूच तिच्या गळ्यात रोवलेली सहस्त्रपाण्याची कट्यार बाहेर काढली आणि स्वतःचा झगा फाडून त्याने तिच्या जखमेवर बांधला. पण रक्तस्राव प्रचंड होता. त्याला कळून चुकले की वेळ फारच थोडा आहे.
महाभूषणचे हात थरथर कापत होते, पण त्याच्या मंत्रोच्चारात एकाग्रता होती. त्याने आपल्या ज्ञानाच्या कक्षा पार करत, एक पुरातन आणि अत्यंत दुर्मीळ मंत्र सादर केला—जो केवळ अर्धमृत अवस्थेत असलेल्या जीवाला जीवनाच्या सीमारेषेवरून परत आणू शकत होता. आर्याच्या चेहऱ्यावर शांतता होती, जणू तिच्या शरीरातून जीव निघून गेला होता. पण तिच्या कपाळावरून घामाच्या धारा वाहत होत्या, आणि महाभूषणच्या मंत्रोच्चारांबरोबर तिचा श्वास अगदी हलकासा का होईना, पण चालू होता.
त्या क्षणी, झपाटल्यासारखा वेळ थांबलेला वाटत होता. महाभूषणने तिच्या जखमेवर आपला झगा अधिक घट्ट बांधला आणि हात आर्याच्या कपाळावर ठेवत डोळे मिटले. त्याच्या मनात एकच विचार होता—"तू जिवंत राहिलीच पाहिजेस... कारण तुझ्या अपत्याचा श्वास ही या सृष्टीच्या भवितव्याची अखेरची आशा आहे." वातावरणात एक ऊर्जेची लाट उठली. क्षणभर आर्याचे शरीर मंद प्रकाशाने झळकू लागले... आणि महाभूषणच्या डोळ्यांत एक चमक उमटली—कारण त्याला त्या प्रकाशात नव्या जिवंतपणाची लाट जाणवली होती.
महाभूषण घराबाहेर धावत निघाला, त्याचे हात रक्ताने माखलेले होते, पण त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती—होते ते केवळ तातडीचे ध्येय. गावाच्या आत पोहोचताच त्याने कडाडून आवाज दिला. काही क्षणांत, गावातील अनुभवी स्त्रिया—ज्यांनी अनेक बाळंतपणे केली होती—पळत पळत त्याच्याजवळ आल्या.
“तिला वाचवायला पाहिजे... आत्ता..” महाभूषण थरथरत्या आवाजात म्हणाला. आर्याचे सात महिने पूर्ण झालेली अवस्था लक्षात घेता, त्यांना ठाऊक होते की बाळाला आता बाहेर आणणे हेच योग्य आहे. त्या स्त्रियांनी एकमेकांकडे पाहिले आणि कोणतीही शंका न घेता आत धाव घेतली.
आर्या कोसळलेली होती, पण तिच्या श्वासांची मंद गती अजूनही जीवनाचा संकेत देत होती. स्त्रियांनी झपाट्याने तिची तपासणी केली. “सात महिने पूर्ण झाले आहेत... हे बाळ आता बाहेर यायला तयार आहे,” एका वृद्ध स्त्रीने गंभीर आवाजात सांगितले, वेळ खूप थोडा होता. त्या झपाट्याने तयारीला लागल्या. उष्ण पाणी, स्वच्छ कापडे, औषधी वनस्पतींची तयारी... घरच्या दरवाजाच्या बाहेर बाजूला उभा असलेला महाभूषण सगळे पहात होता. त्याच्या डोळ्यांत असहायता होती, पण एक आशाही होती—की हे बाळ, ज्याला सृष्टीच्या रक्षणाचे गुपित लाभलेले आहे, आता जन्म घेणार आहे... अंधाराच्या काळात एक प्रकाशाची झुळूक बनून.
त्या स्त्रिया गरम पाण्याच्या घड्या घेऊन आल्या. एकीने आर्याच्या कपाळावर ओलसर कापड ठेवले, दुसरीने तिच्या पोटावर थरथरत हात ठेवला. हवामान बिघडत चालले होते.
गावात अचानक हवेत विचित्र थंडी पसरली. आकाश कढईसारखे काळे होऊन झाकले गेले, जणू सूर्यच लपून गेला होता. झाडांच्या फांद्या एका अनोळखी वाऱ्याने थरथर कापू लागल्या, पक्ष्यांनी आपले घरटे सोडले आणि आभाळात गोंधळून उडू लागले. क्षणाक्षणाला वाऱ्याचा वेग वाढत गेला—तो नुसता वारा नव्हता, तर त्यात काहीतरी भयाण, जिवंत होते. धुळीचे वावटळ गावभर उठायला लागले. लोक दारे बंद करू लागली, पण दरवाजे आपोआप उघडू लागले, खिडक्यांच्या काचा कडाडून फुटल्या.
अचानक आकाशात एक तीव्र गडगडाट झाला, आणि विजेचा एक मोठा झोत गावाच्या मध्यावर कोसळला. जमिनीला थरकाप बसला. गावकऱ्यांनी जेव्हा त्या विजेच्या झोताकडे पाहिले, तेव्हा त्यांच्या नजरेसमोर एक विचित्र लालसर तेज प्रकट झाले—जणू एखादे प्राचीन, अनोळखी राक्षसी बळ जमिनीच्या पोटातून वर येत होते. गावातले वातावरण आता शांततेचं नव्हते, तर उलथापालथीचे भाकीत करत होते —वादळ फक्त हवेत नव्हते, ते सृष्टीच्या अस्तित्वात घुसू पाहत होते.
आर्याची अवस्था गंभीर होत गेली. स्त्रियांनी संयम राखत, तिच्या पोटावर हलक्या थरात घड्यांनी उष्णता दिली. मानेभोवती नवे कपडे गुंडाळले गेले, पण रक्तस्राव थांबत नव्हता.
---------
तेवढ्यात, घराजवळ लांडग्यांच्या पावलांचा आवाज आला. दरवाजा उघडून राजवीर आणि त्याचे युद्धसज्ज साथीदार आत आले. आर्याच्या अवस्थेची कल्पना येताच त्याच्या काळजाचा ठोका चुकला. तो ताडकन घरात घुसला आणि आर्याला झपाटल्यासारखे शोधू लागला.
"ती जिवंत आहे का?" तो किंचाळला. महाभूषण त्याला थांबवत म्हणाला, "मी तिचे बाळ वाचवण्याचा प्रयत्न करतोय. वेळ खूप थोडा आहे!"
राजवीरला संताप अनावर झाला. “तिला वाचवले पाहिजे होते! तु इथे बाळावर लक्ष का केंद्रीत केलेस?” असे ओरडत त्याने महाभूषणला उचलून भिंतीकडे फेकायला घेतले. पण तेवढ्यात आशय तिथे पोहोचला आणि त्याने हस्तक्षेप करत राजवीरला शांत राहायला सांगितले.
"राजवीर, आधी हे बघ. आर्याने जिवाची बाजी लावली आहे या बाळासाठी… आपल्याला तिचा निर्णय मान्य करावा लागेल."
राजवीरच्या डोळ्यांत पाणी तरळले. तेवढ्यात घराच्या आतल्या खोलीतून एक गोड आवाज उमटला—बाळाचा रडण्याचा पहिला सूर. सर्वांचे लक्ष त्या दिशेने वळले. राजवीर झपाटल्यासारखा त्या खोलीत धावला.
त्या खोलीच्या दरवाज्यापाशी उभे राहून त्याने पाहिले—एका वृद्ध स्त्रीच्या हातात एक गोंडस, पांढऱ्याशुभ्र चंदेरी त्वचेचे, निळ्या डोळ्यांचे बाळ कळकळून रडत होते. त्या बाळाच्या चेहऱ्यावर एक दिव्य तेज होते.
राजवीरने त्या बाळाला हलक्या हाताने उचलून आपल्या छातीशी धरले त्याचे डोळे पाणवले. त्याला आठवले—आर्याने त्याच्यावर ठेवलेला विश्वास, आणि आता हे बाळ त्याचेच प्रत्यक्ष रूप होते.
"हे बघ, आर्या," तो म्हणाला, "आपले बाळ, आपला वारसा"
त्याने बाळ परत त्या स्त्रीच्या हाती दिले आणि धावत आर्याजवळ पोहोचला. आर्या अजूनही रक्ताने माखलेली होती. तिच्या डोळ्यांत सौम्यता होती. पण तिचे शरीर थकत चाललेले होते. तिला बोलता येत नव्हते, पण तिचा चेहरा सांगत होता—"बाळाची काळजी घे."
राजवीरने तिचा हात हातात घेतला. आशय आणि बलदेव त्यांच्या मागे उभे होते, त्या क्षणाचे जणू ते साक्षीदार होते.
आर्याचे डोळे हळूहळू मिटू लागले.
क्रमशः -
सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे इरा फेसबुक पेज वर येतील, त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा.
ता क: ही कथा पुस्तक काल्पनिक आहे. यातील नावे, पात्रे, स्थळे आणि घटना या लेखकाच्या कल्पनेचा अविष्कार आहेत किंवा काल्पनिक पद्धतीने ती योजली आहेत. कोणाही जिवंत वा मृत व्यक्तीशी, घटना प्रसंगाशी किंवा ठिकाणांशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
सर्व हक्क राखीव आहेत, लेखकाच्या स्पष्ट लेखी परवानगीशिवाय या प्रकाशनाचा कोणताही भाग कोणत्याही स्वरूपात किंवा कोणत्याही प्रकारे पुनरुत्पादित किंवा कॉपी केला जाऊ शकत नाही किंवा कोणत्याही डिस्क, टेप, मीडिया किंवा इतर माहिती स्टोरेज डिव्हाइसवर हस्तांतरित किंवा पुनरुत्पादित केला जाऊ शकत नाही. पुस्तक परीक्षणातील संक्षिप्त अवतरण वगळता.
copyright: ©®
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा