रक्षाबंधन म्हणजे बहिण भावाच्या नात्याचे पवित्र असे बंधन..
तो एक राजकुमार आणि ती नन्ही परी.. दोघेही आईबाबांचे लाडके.. दोघेही मस्त खेळायचे, बागडायचे.. खूप खूप भांडायचे आणि एकत्र यायचे..
तो जाता जाता काहीतरी खोड्या काढायचा.. ती चिडायची आई सांग ना याला किती छळतो हा मला.. आईला सांगायची.. आईला त्यांची भांडणं सोडवू पर्यंत नाकीनऊ यायची.. पण ते दोघे भांडणारही आणि एक होणारही..
असेच दिवस जात असतात.. दोघेही मोठे होतात.. पण त्यांची भांडणं काही कमी होत नाहीत.. चिडवणे, डिवचणे चालूच असते.. आई कधी कधी चिडून म्हणे.. ती सासरी गेल्यावर कळेल.. तेव्हा काय मी नाही रडणार तू नाही रडणार.. असे दोघेही म्हणाले..
पण एक दिवस आलाच.. ती सासरी जायची वेळ आली.. झालं.. दोघांचे डोळे रडून रडून लालबुंद झालेले.. त्यातही तो हळूच म्हणाला.. जीजूंना छळू नकोस हं.. मग दोघेही हसतात आणि एक प्रेमाची छप्पी देऊन खूप खूप रडतात..
तेव्हा पासून तो दर रक्षाबंधन आणि भाऊबीजला यायचा.. ती पण त्याच्या आवडीचे गोडधोड बनवून त्याला खाऊ घालायची.. लहानपणी चिडवून मग गिफ्ट देणारा तो आता न मागताच गिफ्ट देत होता..
पण यावर्षी तुझ्या भावाला येता येणार नाही ग सखी.. त्याला तू राखी बांधू शकणार नाहीस ग.. तो पवित्र धागा.. भावाच्या रक्षणासाठी बांधायचा असतो.. तो बांधता येणार नाही ग सखी..
पण तू एक करू शकतेस.. तू तुझ्या भावाच्या रक्षणासाठी देवाकडे प्रार्थना कर.. त्याच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना कर.. पण त्याला बोलावण्याचा अट्टाहास करू नकोस ग सखी.. तू बोलावलीस तर तो येणारच.. पण तू त्याचे रक्षण करण्यासाठी त्याला बोलावू नकोस.. या महामारीच्या आजारापासून त्याचे रक्षण करण्यासाठी तू बोलावू नकोस ग.. आणि भाऊराया तू पण जपून रहा बरं का?? इकडे तिकडे कोठे जाऊ नकोस रे..
रक्षाबंधन काय दर वर्षी येतोच की.. पण आपलं नातं काय फक्त रक्षाबंधन पुरतेच मर्यादीत आहे का?? हे चिरंतन टिकणारे नाते आहे.. यावर्षी धागा बांधून नाही तर तू घरीच राहून.. सुरक्षित राहून आपण रक्षाबंधन साजरा करूया..
आईवडीलांच्या नंतर जर कुणाचा आधार असतो तर तो भाऊ असतो.
आईवडीलांच्या नंतर हक्काच माहेर म्हणजे भाऊ असतो.
ए आई लवकर लग्न करून सासरी पाठव ग हिला असे म्हणत सासरी गेल्यावर तिची वाट पाहत बसणारा भाऊ असतो.
तू सासरी जाताना मी अजिबात रडणार नाही अस म्हणत ती सासरी जाताना कोपर्यात हुंदके देत रडणारा भाऊ असतो.
आईने बनवलेल्या पदार्थांवर पहिला ताव मारणारा ती सुट्टीला आल्यावर तिला पहिला देणारा भाऊ असतो.
काय बसली आहेस जा काम कर जा असे म्हणणारा ती माहेरी आली की कुठे बसवू आणि कुठे नको असं करणारा भाऊ असतो.
मानलेल्या आईचा मुलगा हा देखील भाऊच असतो.
एखादा मित्र आपली काळजी घेत असेल आपल्याला मदत करत असेल तर तोदेखील भाऊच असतो.
लग्न झाल्यावर मदत करणारा दीर हा देखील भाऊच असतो.
तर या माझ्या भावांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा