राधा भाग नऊ अंतिम

तिचे अश्रु पुसत म्हणाला “ राधा तर फक्त आणि फक्त ह्या विकासची. इतक्या सहज मी माझे प्रेम सोडणार नव्हतोच. खरं प्रेम केले होते राधा . खरंच खूप प्रेम केले होते.


कथेचे शीर्षक – राधा
विषय – कौटुंबिक
फेरी – राजस्तरीय करंडक कथामालिका.
संघ – रायगड रत्नागिरी


राधा घरी आली. ती नाराज होती. तिचा उतरलेला चेहरा पाहून आजीला कळाले होते की, नक्कीच काहीतरी बिनसले होते. राधाच्या आईपेक्षा जास्त ती राधाला ओळखत होती.
राधाचे बाबा गेल्यावर जशी राधा गुमसुम झाली अगदी तशीच आज झाली होती. रूमवर गेल्यावर तिने दरवाजा आतून बंद केला आणि डोळ्यात नकळतपणे पाणी तरळले. हे असे का होत होते , ह्या प्रश्नाचे उत्तर तिला कळाले होते. ती देखील प्रेम करू लागली होती विकासवर. तिचे एक मन तिला प्रश्न विचारत होते.
“पडलीस ना प्रेमात? तुला खूप गर्व होता स्वत:च्या निर्णयावर. काय म्हणे शिक्षण आणि करियर करायचे आहे. 
आणि एक मन म्हणत होते
“बरोबर वागते आहेस. लांब रहा त्या विकासपासून. असे छप्पन येतील आणि जातील. तू शिक्षणाची कास धर”
पुन्हा डोळ्यासमोर विकासचा चेहरा दिसत होता.
तिच्या मनात आता एक युद्ध सुरू होते.
किती ती बैचेनी. कधीच असे कोणत्याही मुलाविषयी वाटले नव्हते; पण विकाससाठी अश्या भावना सतत येत होत्या. किती छान मुलगा आहे. किती आदर करतो. किती प्रेम करतो तो माझ्यावर आणि मी देखील त्याच्या प्रेमात पडले आहे.
हे काय बोलते आहे मी. खरंच प्रेमात पडले आहे का मी?
नाही नाही. अजिबात नाही. माझी स्वप्न खूप मोठी आहे आणि असे मी नाही विचार करू शकत. हे देवा माझे अश्या विचारापासून रक्षण कर.
ती अभ्यासाला बसली.
दुसऱ्या दिवशी ती कॉलेजमध्ये गेली.
राधाला अशक्तपणा वाटत होता. जीने चढत असताना तिला चक्कर आली. ती खाली पडणार तोच पाठून येणाऱ्या विकासने तिला सावरले. दोघांची नजरा नजर झाली. राधा उठण्याचा प्रयत्न करू लागली; पण विकास तिला थांबवत म्हणाला
“राधा, थांब जरा. तुला चक्कर आली आहे.”
गौरीही आली. राधाला बरे वाटत होते. विकासची बैचेनी डोळ्यात दिसत होती.
“राधा, तुला बरं वाटते आहे ना?”
राधाने होकारार्थी मान हलवली आणि निघून गेली. विकास तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होता.

विकास तिला चोरून पाहत होता. तिची तब्येत बरी असल्याची खात्री करत होता. राधाला कसेतरी वाटत होते. अगदी असहज वाटत होते.
तिच्या खांद्यावर हात ठेवत गौरी म्हणाली
“राधा, तुला अजूनही बरं वाटत नाही का?”
राधाचे गौरीच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते.
गौरीने तिला पुन्हा विचारले तेव्हा ती कुठे भानावर आली.
“गौरी, अस्वस्थ वाटते आहे. आपण हे लेक्चर झाल्यावर जरा कॅम्पसमध्ये बसूया का?
“चालेल”
लेक्चर झाले तसे, राधा आणि गौरी दोघी बाहेर गेल्या . विकासचे लक्ष राधाकडे होते. राधा दिसेनासी झाली तेव्हा विकास उठला आणि क्लासरूमच्या बाहेर येत होता तोच सर आले. इच्छा नसताना तो वर्गात बसून राहिला.
“कुठे गेली असेल राधा?”
 मन लागत नव्हते.
इथे गौरी आणि राधा कॅम्पसमध्ये बसल्या होत्या.
सगळीकडे हिरवळ पसरली होती. सूर्याची कोवळी किरणे पडली होती. पाखरे ह्या झाडावरून त्या झाडावर उडत होती. बाजूला कोपऱ्यात मित्र मैत्रिणीचा ग्रुप हसण्या खिदळण्यात व्यस्त होता.
गौरीनेच विषयाला हात घातला.
“बोल राधा काय झाले. आज पहिल्यांदा तू लेक्चर मिस केलेस? काही त्रास होतो आहे का ? चक्कर येते आहे?”
राधाच्या डोळ्यात अश्रु आले.
“राधा, अगं काय झाले? काही प्रॉब्लेम झाला का? काही त्रास होत आहे?”
राधाचा आवाज कातर झाला होता.
ती थोडं पाणी प्यायली.
गौरी तिच्या पाठीवरून हात फिरवत होती.
राधा “गौरी, मी विकासच्या प्रेमात पडले आहे”
गौरी “काय?”
राधा “हो गौरी, काल मी तुला म्हणाले मी विकासशी बोलणार नाही; पण मला घरी गेल्यावर खूप रडू आले. मला विकास हवा आहे. त्याचे मला पाहणे , काळजी करणे. माझ्यावर प्रेम करणे हे सगळे मला आवडू लागले आहे गौरी. हवे हवेसे आहे. स्वतः पासून त्याला दूर करण्याचा विचार मला करवत नाही. खूप बैचेन झाले आहे मी. काहीच कळेना काय करू ?”
गौरी : “ राधा, प्रेम काही वाईट गोष्ट नाही. खरं तर विकास चांगला मुलगा आहे. तुला चक्कर आली तेव्हा तो खूप अस्वस्थ झाला होता. तुझी खूप काळजी घेतो. तो खरंच प्रेम करतो . त्याच्या डोळ्यात ते खरे प्रेम दिसून येते. होकार द्यायला काय हरकत आहे?”
राधा “नाही नाही , प्रेम असले म्हणून काय झाले? मी वाहवत नाही जाणार. माझी स्वप्न पूर्ण करायची आहे. काही गरज नाही भावनिक होण्याची. चल गौरी लायब्ररीत जावून बसू. आता जे लेक्चर मिस झाले त्यांचे नोट्स लिहूयात . चल लवकर.”
गौरी “अगं काय हे राधा. काय अशी वागते. आहे प्रेम विकासवर तर हो बोलून मोकळी”
राधा “कोण विकास? मी नाही ओळखत. ती रुक्षपणे बोलली.
गौरीला सर्वकाही कळत होते.
ती काहीच बोलली नाही. तिच्यासोबत लायब्ररीत गेली.
कॉलेज सुटल्यावर विकास राधाकडे आला.
“बरी आहेस ना राधा?”
राधाने त्याच्याकडे पाहीले आणि पुन्हा पुस्तकात पाहून फक्त बरी आहे म्हणाली.
नंतर त्याला पाहीले देखील नाही .विकास तोंड पाडून निघून गेला.
गौरीला राधाच्या अश्या वागण्याचे कारण कळत होते आणि तिला राधाचा रागही येत होता.
ती बोलायला गेली तर राधा काही ऐकून घेत नव्हती.

राधाने मन कठोर केले होते.
खूप कठोर. त्या नंतर तिने मनाला आवर घातला.
विकास किती जरी जवळ येण्याचा प्रयत्न करत असला तरी त्याला भाव देत नव्हती.
विकास राधाच्या अश्या वागण्याने दुखावला होता.
शेवटच्या वर्षात राधा पहिली आली होती. घरातले सर्व खुश होते.
गौरी देखील खूप खुश होती. राधाची मेहनत तिने जवळून पाहिली होती.
गौरी देखील चांगल्या गुणांनी पास झाली होती. पुढे राधा उच्च शिक्षणासाठी बाहेर गावी गेली. गौरी नेहमी तिच्या संपर्कात राहिली होती. मैत्रीचे नाते घट्ट झाले होते. राधा पुन्हा भारतात परतली. तिला चांगल्या पॅकेजची नोकरी लागली होती.

राधाच्या लग्नाचे बघणे चालू होते. आजीच्या ओळखीचा एक मुलगा होता. आजीने कांदे पोह्याचा कार्यक्रम ठेवला होता.
राधाची खास मैत्रीण गौरी आली होती. राधाने छान लाल रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता. रेशमी केस मोकळे सोडले होते. छान नाजुक डायमंड टिकली लावली होती. चेहर्‍यावर असणारी खळी तिचे रूप खुलवत होती.
मुलाचे आई, वडील बहीण आले . मुलगा त्याच्या मित्रासोबत येत होता. आजीने राधाला बोलावले. राधाने नमस्कार केला.
तो मुलगा आला.
गौरी “ आला आहे गं मुलगा. बघून घे एकदा”
राधाने हळूच नजर वर केली आणि त्या मुलाला पाहिले .
विकास होता; आणि त्याच्या सोबत राज.
राधाला सुखाचा धक्काच बसला.
डोळ्यातून घळाघळा अश्रु येऊ लागले. विकाससुद्धा तितकाच भावुक झाला होता.
राधाला बिलगावे असे वाटत होते.
आजी “जा राधा, विकास सोबत काही बोलायचे असेल तर बोलून घे”
विकास आणि राधा रूममध्ये गेले.
राधा “विकास तू?”
विकास जवळ आला. राधाचे ह्रदय जोरजोरात धडधड करत होते.
तिचे अश्रु पुसत म्हणाला “ राधा तर फक्त आणि फक्त ह्या विकासची. इतक्या सहज मी माझे प्रेम सोडणार नव्हतोच. खरं प्रेम केले होते राधा . खरंच खूप प्रेम केले होते.
गौरी घसा खाकरतच रूम मध्ये आली
“ थोडं क्रेडिट मलाही द्या “
राधा “म्हणजे ?”
“म्हणजे ? तुम्हा दोघांची प्रेमकहाणी मी आजीच्या कानावर घातली”
राधाने गौरीला मिठी मारली .
“थॅंक्स गौरी”

बरं ! बाहेर बोलावलं आहे.
राधा आणि विकास बाहेर आले.
विकासचे वडील राधा आणि विकासकडे पाहून म्हणाले “कधी काढायची मग लग्नाची तरीख?”

सर्वांच्या डोळ्यात आनंदअश्रु होते.
शेवटी राधाला तिचे खरे प्रेम भेटलेच.

समाप्त
हा होता गोड शेवट . शेवटी का होईना आपल्या हळव्या राधाला भेटली होती साथ तिच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या विकासची . परिवार, मैत्री ,प्रेम , करीयर हा आयुष्याचा भाग असतो . महत्व प्रत्येक गोष्टीचे असते. समतोल हा आपल्याला साधावा लागतो नाही का ?
राधाची कथा आवडली असेल तर नक्की कमेन्ट मध्ये सांगा. धन्यवाद.



अश्विनी ओगले

🎭 Series Post

View all