पुरस्कार
"राम, झाला कां रे अभ्यास? रामच्या मित्राने रामला विचारले."
"हो, थांब थोडा वेळ. एवढे वाचून घेतो आणि मग झोपू आपण."राम म्हणाला.
अरे, बघ ना रात्रीचे बारा वाजून गेले. चल झोप आता. पहाटेला उठून कर अभ्यास. असे म्हणत दोघेही झोपी गेले.
राम इयत्ता दहावीची परीक्षा देणार होता. उद्या त्याचा पेपर होता. राम अतिशय हुशार विद्यार्थी. शिवाय कोणालाही चटकन मदत करणारा. त्यामुळे आजूबाजूच्या सर्वांचा तो लाडका होता.
रामचे आई वडील तो लहान असतानाच एका साथीमध्ये वारले. आत्याकडे राहून तो शिक्षण घेत होता आत्याची अत्यंत गरिबीची परिस्थिती.
सकाळी उठून गोठ्यातली झाडलोट करणे, पाणी भरणे अशी अनेक छोटी-मोठी कामं रामला करावी लागत. परीक्षा असूनही त्या कामापासून त्याची सुटका नव्हती. कारण आत्याचा धाक जबरदस्त.
रामच्या आत्याचे म्हणणे होते, की तुला जर इथं राहायचं असेल, शिक्षण शिकायचं असेल तर ही कामं तुला करावीच लागणार.
आपण खूप शिकायचं, खूप मोठं व्हायचं अशी रामची मनापासून इच्छा होती. मग त्यासाठी कितीही कष्ट करायला तो तयार होता.
राम आपल्या मित्राकडे अभ्यास करण्यासाठी जायचा. पेपर असल्यामुळे राम पहाटेच उठला. घरी आला. घरची सगळी कामं, गोठ्यातली झाडलोट उरकून त्याने अभ्यास केला. व पेपर देण्यासाठी शाळेत जाण्यास निघाला.
त्याच्या घराजवळून रेल्वे लाईन गेली होती. कडे कडेने चालत असताना त्याला एका ठिकाणी फुटलेल्या काचेच्या ग्लासचे तुकडे दिसले. मागून येणाऱ्या कोणाच्या पायाला त्यामुळे दुखापत होऊ शकते. म्हणून ते उचलण्यासाठी राम खाली वाकला.
तेव्हा त्याचे लक्ष रुळाखाली पडलेल्या मोठ्या भगदाडाकडे गेले. रोज तर आपण येथूनच जातो. आज हे काय असेल म्हणून त्याने जवळ जाऊन पाहिलं, तर कोणीतरी काँक्रीट फोडून रेल्वेचे रूळ वेडे वाकडे करून ठेवल्याचे त्याला दिसले.
नक्कीच काहीतरी घातपात आहे हे त्याच्या चाणाक्ष नजरेने ओळखले. काय करावे बरे? रेल्वे स्टेशन बरेच दूर होते. स्टेशन मास्तरांना याची माहिती देण्यासाठी जावे, तर पेपरला वेळ होईल आणि नाही गेलो तर...
भयंकर अपघाताचे दृश्य त्याच्या डोळ्यासमोर दिसू लागले. त्याच्या संवेदनशील मनाला वेदना होऊ लागल्या. काहीही विचार न करता तो सरळ धावत सुटला. आणि स्टेशन मास्तरांना सर्व माहिती दिली.
स्टेशन मास्तर सोबत सर्व चमू तिथे पोहोचले. बापरे!! किती भयंकर अपघात झाला असता. स्टेशन मास्तरांनी लगेच फोनद्वारे गाड्या थांबवण्याचे आदेश दिले. एवढा मोठा अपघात राम मुळे टळला होता.
राम मात्र एका ठिकाणी बसून रडत होता. कारण त्याच्या पेपरची वेळ निघून गेली होती. आता आत्या आपल्याला रागावणार. आपले शिक्षण अपूर्ण राहणार. असे अनेक प्रश्न त्याच्यासमोर उभे राहिले.
स्टेशन मास्तर राम जवळ आले. त्याला धीर दिला. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात रामच्या प्रसंगावधानाने भयंकर अपघात टळल्याची बातमी छापून आली होती. रामच्या आत्याकडे रामला भेटायला जिल्हाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक व इतरही अधिकारी मंडळी आली होती. मात्र राम सारखा रडत होता. तो मुख्याध्यापकांना सारखा म्हणत होता.सर, मी आता नापास होणार.
मुख्याध्यापकांनी त्याला सांगितले, राम या लोकांमध्ये शाळेचे अधिकारी आहेत. खुद्द जिल्हाधिकारी सुद्धा आहेत. आम्ही सर्व तुझे अभिनंदन करण्यासाठी आलो आहोत. पुढच्या गणराज्यदिनी तुझा सत्कार सुद्धा होईल. तुला पुरस्कार सुद्धा दिला जाईल.
आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे तुला तुझा पेपरही देता येईल.
खरंच, मला पेपर देता येणार? सर, तुमचे खूप खूप आभार. सर, मला पेपर द्यायला मिळणार हाच माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे. मला दुसरे काहीही नको. मुख्याध्यापकांनी रामला हृदयाशी धरले. हे दृश्य पाहताना सर्वांचे डोळे पाणावले होते.
सौ. रेखा देशमुख
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा